फॉलोअर

बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

कळप

कळप
                    जर... आपल्यापुढे तीन समूह असतील ....1.शेकड्याने रानगाईंचा कळप आहे, 2. बारा पंधरा हत्तींचा कळप आहे आणि 3.आठ/दहा स्त्रियांचा समूह आहे..... यापैकी सगळ्यात deadly, सर्वांत भयंकर किंवा अत्यंत निर्घृण समूह कोणता?? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नं 3 चा समूह. होय ! मी स्वतः एक स्त्री असून माझं उत्तर अभ्यासपूर्वक आणि जबाबदार विधान आहे.या तिन्ही समूहांपैकी आठ दहा स्त्रियांचा समूह हा एकमेव असा समूह आहे जो स्वतःच्याच समूहातील सदस्यांना चिरडून पुढे जात असतो.रानगाईंचा कळप पहा... लहान पिल्ले, कमजोर ,लंगड्या गाई मध्यभागी असतात... सगळे मजबूत शिलेदार चहुकडून समूहाचे रक्षण करत असतात. हत्तींचा कळप तर आपल्या एकजुटीसाठी ओळखला जातो... बहुतेक समूहात बहिणी हत्तीणी असतात... साऱ्याच पिल्लांना त्या साऱ्या आपले मानतात.मात्र याउलट कोणत्याही प्रयोजनासाठी एकत्र आलेला ,कोणत्याही वयाच्या ,काही मोजक्या स्त्रियांचा अगदी तात्पुरता समूह सुद्धा 'संघ' किंवा 'कळपाची' कोणतीच लक्षणे बाळगून नसतो. या समूहात सातत्याने वर्चस्वाचे डावपेच सुरू असतात, एखादीला लक्ष करून तिला गुदमरून टाकण्याचे अखंड प्रयत्न असतात... एका उद्देशाने एकत्र आलेल्या स्त्रियांचा समूह त्या व्यतिरीक्त अनेक गुंतागुंतीच्या मोड तोडीत मग्न असतो.सगळ्यांनी हातात हात घेऊन समूहाचा विकास करू ही सांघिक भावना तर नसतेच पण असतो एक अट्टाहास कुणालातरी नामोहरम करण्याचा, तगमग असते कुणाला तरी नेस्तनाबूत करण्याची...त्याही पलिकडे , कुणाला तरी नीच दाखवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची....वर्चस्वाची घनघोर लढाई.
                      मला माहिती आहे ... या क्षणी तुम्हा सगळ्यांना निश्चित वाटत असणार,"आमचा अमुक भिशी ग्रुप/किटी ग्रुप किंवा भजनी मंडळ असं मुळीच नाही.आम्ही कित्ती प्रेमळ मैत्रिणी आहोत." अशी खात्री असेल ना तर काही मुद्दे नक्कीच तुमच्या ग्रुप मध्ये पडताळून पहा हं! ★ अनुपस्थित असणाऱ्या मेंबर बद्दल काहीच बोलले जात नाही. ★एखादीला माहीत असणारे दुसरीचे काही सिक्रेट्स किंवा हळव्या बाबी ग्रुप ला सांगण्याचे काम चोख होत नाही.★ग्रुप चा जर कुणी लीडर असेलच तर तो बाकीच्या मंडळींशी खाजगी संवाद साधून इतरांबद्दल माहिती घेत नाही.★लिडरच्या अनुपस्थितीत केलेल्या साध्याशा विधानाचा विपर्यास करून किंवा रंग बदलून ग्रुप लीडर पुढे मांडले जातच नाही.★थेट स्पष्ट चर्चेने गैरसमज झालेच तर सोडविण्याचे कार्य केले जाते........ या वरील पाचही प्रश्नांची उत्तरे जर खात्रीशीर "होय" अशी असतील तर खरेच आपला ग्रुप आदर्श आहे 5स्टार प्रामाणिकपणे सांगायचं तर या साऱ्यांचीच उत्तरे कधीही पॉझिटीव्ह असणे शक्य नाही.कारण ग्रुपला स्वतःचा एक चेहरा असतो... एक व्यक्तिमत्त्व असतं, एक विचारधारा असते.ती ग्रुप मधील एखाद्या व्यक्तीच्या अगदी भिन्न असू शकते. ज्याप्रमाणे मोहरी, हळद,तिखट ,मीठ, मसाला, गुळाचा खडा सारे एकत्र येत फोडणी दिल्यास बनणारा पदार्थ निराळा असतो.. त्यात ह्या साऱ्यांची चव असते मात्र पदार्थाचे रुपडे वेगळे असते... तसेच काहीसे प्रत्येक ग्रुपचे असते.
                     'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे', हा पाठ आपण शालेय जीवनात गिरविलेला असतो. त्यामुळे विविध समूह हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. विशेषतः स्त्रिया वेगवेगळ्या समूहात सक्रिय असतात... बरेचदा विरंगुळा म्हणून , आनंदासाठी तर कधी एखादे विशिष्ट कार्य (सामाजिक/सांस्कृतिक/आर्थिक वगैरे)करण्याच्या हेतूने बहुसंख्य स्त्रिया वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये सहभागी होतात. घराबाहेर पडतांना समविचारी समवयस्क मैत्रिणी असणे सोयीचे असते.या साऱ्याच समूहात प्रचंड मोठी energy शक्ती दडली आहे, असे मला कायम जाणवते.ह्या एकत्रित शक्तीच्या जोरावर अनेक अफाट अशक्य कामे सहजी होऊ शकतात.सगळ्यांत महत्वाचे म्हणजे एकमेकींना आधार देणं, मदतीचा हात देणं सहजी शक्य असतं.मात्र प्रत्यक्षात स्त्रियांचे हे समूह वादविवाद, भांडणे आणि राजकारणी डावपेचांनी  काठोकाठ भरलेल्या घागरीच असतात. एकदा तुम्ही ही घागर उचलली की डोईवरून उतरवणे फार अवघड काम होऊन बसते.खरंतर उंबरठा ओलांडणारी प्रत्येक स्त्री मोठा संघर्ष करूनच बाहेर पडलेली असते... कुणाच्या घरी कडक नियमांचा जाच असतो, कुणावर वृद्धांची जबाबदारी असते, कुणाला नवऱ्याचे विक्षिप्त वागणे झेलावे लागते तर कुणाला आर्थिक प्रश्न, मुलांचे प्रश्न असतात, नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवर तर त्याहून निराळा ताणही असतो.ह्या साऱ्याचे भान आपण एक स्त्री म्हणून समूहात वागताना राखतो का? हा प्रश्न प्रत्येकीनं स्वतः ला विचारायला हवा. 'ही अशीच आहे नी ती तश्शीच आहे "असे म्हणून बोटे मोडतांना आपण तिच्या शूजमध्ये पाय घालून किती खिळे टोचतात हे पाहतो का? शिक्का मारणं कदाचित सोप्पय! अवघड आहे दुसऱ्या स्त्री ला समजून घेणं.
                        नुकताच एका ग्रुप चा अत्यंत कडवट अनुभव मी घेतला.. गेली पाच वर्षे सोबत चालणारा आणि कार्यक्रम करणारा हा ग्रुप... अचानक काहीही न सांगता मला वगळण्यात आलं... बरं गंमत अशी की ग्रुप मधील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी अगदी "तुझ्या गळा माझ्या गळा" पद्धतीने वागणारी... अश्यावेळी प्रत्येकीला माझ्याशी असणारे वैयक्तिक गोड संबंध जपायचे होते मग वाईटपणा घेणार कोण? एका मैत्रिणीला तर मनातून हे इतकं बोचतय की चोरासारखी ती नजर चोरत असते☺ मी त्यांची अडचण समजून घेतली कोणताही आकांतांडव न करता... एखाद्या समूहात एखादी व्यक्ती श्रेष्ठ वरचढ ठरू लागली की त्या ग्रुप ला तुम्ही नकोसे होता. प्रत्येक समूहाचा चेहरा असतो असे मी म्हणते ते याचसाठी. हा अनुभव थोड्या फार फरकानं प्रत्येकीला आलाच असणार.एखादा ग्रुप मनातून तुमचं श्रेष्ठत्व मान्य करू लागला की समजावं हकालपट्टी निश्चित आहे. कोणत्याच समूहाला स्वयंपूर्ण शक्तिशाली लोक नकोच असतात... दुबळ्या, रडणाऱ्या, sort of बिचाऱ्या बायकाच का कुणास ठाऊक समूहांना हव्या असतात.
                     स्त्रियांचे समूह खरेतर जादूगार ठरू शकतात... एखादीला डिप्रेशन मधून बाहेर काढणारे, एखादीला आत्मविश्वास देणारे, एखादीच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालणारे. चालती बोलती जिवंत शाळा ठरू शकतात... आयुष्याचे ज्ञान देणारे, खूप काही शिकवणारे...कधी एखादी कला तर कधी एखादा पदार्थ ... त्याहीपलिकडे जाऊन प्रती माहेर होऊ शकतात... अगदी एकमेकींच्या गळ्यात पडून मनमोकळं रडणारे, एकमेकांचे कौतुक करणारे , माया करणारे, मदतीला धावणारे अन धीर देणारे. प्रत्यक्षात मात्र स्त्रियांचे समूह आखाडे असतात... अश्या खेळाचे ज्याला नियमच नाहीत... आहे केवळ वार .. जमेल तसे आणि जमतील तेव्हढे समोरच्याला मारत राहायचे.. कधी कृतीतून, कधी शब्दांतून... एव्हढं कठीण आहे का हो स्त्री म्हणून जन्माला आल्यावर दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं??? 'स्त्री म्हणजे निसर्गातील सृजनाचा साक्षात्कार आहे'... मग हा साक्षात्कार इतका कोता कसा जो दुसऱ्या सृजनाला सामावू तर शकतच नाही पण साधं समजूनही घेऊ शकत नाही.
                     नवरात्रीच्या निमित्ताने आपण नवदुर्गांचे पूजन करतो. प्रत्येक देवीरूप एका विशिष्ट शक्तीच्या उपासनेसाठी पूजिले जाते... लक्ष्मी माता संपत्तीदायिनी, सरस्वती माता विद्यादायिनी, रेणुकामाता मातृस्वरूपीणी, अन्नपूर्णा माता अन्नधान्य समृद्धी साठी , कालिका, दुर्गा,तुळजाभवानी माता आपल्या पराक्रम ,शौर्य आणि अतुलनीय धैर्यासाठी पूजिल्या जातात.यातील प्रत्येक स्वरूप दुसऱ्या पेक्षा निराळे आहे... सारीच रूपे श्रेष्ठ सारीच तितकीच तेजस्वी....विविध व्रतवैकल्ये ,उपासतापास , दानधर्म या निमित्ताने आपण करीत असतो... पण हे सारे तोपर्यंत अर्थहीन आहे जोवर आपण हे स्त्री शक्तीचे तत्व समजून घेऊ शकत नाही की "प्रत्येक स्त्री दुसरी पेक्षा निराळी आहे" तिच्या ठायी असणाऱ्या शक्तींचा आदर आणि योग्य सन्मान आपण करायलाच हवा. हे एकमेकींना समजून घेणं जमायला लागलं ना तर आयुष्यातले अर्धेअधिक प्रश्नच मिटतील. देवी महात्म्यातील एका कथेनुसार सरस्वती मातेचा अपमान शुम्ब निशुम्ब दैत्य करतात... तिला युद्धाचे आव्हान देऊन मोठ्या फौजेनिशी चालून येतात... त्या वेळी या युद्धात प्रत्येक देवी आपापली आयुधे घेऊन चालून येतात... मोठा रोमहर्षक कथाभाग आहे. आपण त्याची पारायणे करतो, पाठ करतो पण त्यातून शिकतो काय?? नवरात्र म्हणजे नऊ रंगाचे परीधान... प्रत्येक रंग निराळा ... प्रत्येकाचं आपापल्या जागी अढळ स्थान. हे सारे प्रत्यक्षात जेव्हा आपण मान्य करू आणि त्यानुसार आचरण करू तेव्हाच खऱ्या अर्थानं नवरात्र आपल्याला उमजले असे म्हणता येईल नाही का??
              या नवरात्रीच्या निमित्ताने किमान 9 अगदी जवळच्या स्त्रियांना मी समजून घेईन असा निश्चय करूया...
1. जिच्याशी आपले सदाच वाद होतात ती आई
2. ज्यांचे काहीच पटत नाही त्या सासूबाई
3. अधूनमधून दांड्या मारणारी पण विश्वासू कामवाली बाई
4. सतत काहीतरी विकत घेण्याचा हट्ट करणारी लेक
5.लाडकी बहीण किंवा बहिणीसारखी जाऊ /नणंद
6.कधीमध्येच डोकावणारी पण गरजेला धावून येणारी शेजारीण
7. अनेक वर्षांची जिवलग मैत्रीण
8. जुजबी ओळखीची मैत्रीण
9. अनेक फॉर्मल निमित्ताने आयुष्यात येणारी स्त्री
या साऱ्यांना आपण समजून घेत गेलो तर ईर्षा, असूया,चढाओढ, भांडणे... ह्या राक्षसांचा वध करणे फारसे कठीण नाही.या दसऱ्याला लुटुया एकतेचं, आदर आणि प्रेमाचं सोनं...                 
©यशश्री रहाळकर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

उपास

                तुम्ही कधी स्वतःचा OLSM स्कोर चेक केलाय का हो ? माझा 12 तासांचा साडे सहा हजार होता.एका दिवसाचा ,अर्ध्या दिवसाचा, गेला बाजार एका तासाचा सुद्धा काढता येईल..... अत्यंत महत्वाचा झालाय हल्ली ...Off Line Social Media Score. कुठला रेकॉर्ड, कॅश बॅक, गिफ्ट वगैरे साठी नाही हो!  आत्मपरीक्षणासाठी.... तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह राहता ह्याचा हा पुरावा. अगदी सोप्प आहे ... काही तास तुमचा मोबाईल इंटरनेट किंवा डेटा कनेक्शन ऑफ करून ठेवायचा... हाताला सहजी लागणार नाही असा हं! .... वाटतं तितकं सोपं नाही हे... बेवडा बाटलीकडे धाव घेतो तसे हात शिवशिवतात... सतत मोबाईल सॉरी सेल म्हणायचे आता☺ एखाद्या अवयवासारखा देहासोबत वागवत असतो आपण... फार जड जातं हे स्वानुभवाचे बोल.मी हा प्रयोग करायचं ठरवलं ... एक दिवस झाले ऑफलाईन सकाळी 6 ते संध्याकाळी 6... संध्याकाळी6 ला शार्प नेट ऑन केले ... साडेसहा हजार मेसेज होते इनबॉक्स ला...  त्यातले थेट मला जास्तीत जास्त  20 मेसेज होते... त्यातही माझ्या कामाचे फार तर 5/6 बाकी सगळे ग्रुप चॅट... निरर्थक /फॉरवरडेड ....याचा अर्थ काय होतो??माहितीये ... माझा दिवसाचा कितीतरी वेळ मी निरर्थक मेसेज वाचण्यात घालविणारी रिकामटेकडी आहे.
                  ह्या व्हर्चुअल जगाची मोहिनीच इतकी तीव्र आहे की एकदा चक्रव्यूहात अडकलो की अभिमन्यू व्हायचाच... यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याला कुठे सांगितलाय?? माझ्या 7 वर्षांच्या लेकीचे आणि तिच्या काही मैत्रिणींचे भातुकली खेळतांना कडाक्याचे भांडण झाले... कुणालाही खेळात आई व्हायचे नव्हते.सगळ्याच मुलींना लहान मूल व्हायचे होते... मोठं मजेशीर भांडण ... आम्ही लहानपणी खेळतांना आई होण्यासाठी भांडायचो... त्यांना समजवायला गेले तर सगळ्या एकासुरांत म्हणाल्या," आई झाले की खूप वेळ सेलफोन घेऊन एकाच जागी बसावे लागते ना! उड्या मारता येत नाही" सणसणीत चपराक ..... आवाजा शिवाय. मोबाईलचा अतिवापर कसा वाईट? असे मुलांना कोरड्या उपदेशाचे धडे देतांना मात्र आपण 24 तास ऑनलाइन असण्यासाठी धडपडत असतो.
                      दिवसरात्र आपण सगळ्यांच्या "touch" मध्ये राहण्यासाठी धडपडत असतो.... पण हे सगळे कोण आहेत ह्याचा लेखाजोखा मांडायला हवाच. न पाहिलेले ,कधीही न भेटलेले हजारो आभासी मित्र , कित्येक वर्षांपूर्वी शाळेत सोबत होतो पण त्यानंतर कधीच न भेटलेले... जगाच्या नकाशावर असणाऱ्या कुठल्यातरी देशात राहणारे वर्गमित्र, पाय खेचणारे नातेवाईक आणि तुमच्या सुखावर उगाचच जळणारे शेजारी....... प्रत्येकाची यादी साधारणपणे अशीच असणार. या व्यतिरीक्त वेगवेगळ्या प्रयोजनांचे ग्रुप... जसे ऑफिस/बिझनेस चा ग्रुप, कॉलनी ग्रुप किंवा मुलांच्या शाळा विविध क्लासेसचे ग्रुप, ढिगभर भिशीचे नी मंडळांचे ग्रुप.......ही यादी दररोज मारुतीच्या शेपटी सारखी वाढणारी असते. मध्यंतरी ऑनलाइन साड्या नी दागिने विकणाऱ्यांनी आपापल्या ग्रुप मध्ये ऍड करत माझ्यावर साड्या नी दागिन्यांचा पाऊस पाडला... शेवटी माझे स्वीस बँकेत खाते नाही असे सांगून मी माघार घेतली. यातल्या खरंच कितीजणांच्या touch मध्ये राहणे गरजेचे आहे...?? या ग्रुप वरील चॅट क्लिअर करणे हे टॉयलेट ला जाण्याइतके नेमाने करावे लागणारे कार्य... अन्यथा खूप काही साठून साठून मोबाईल मान टाकतो. काही ग्रुप असे सतत फ्लश करावे लागताहेत का? ह्याचा विचार करा की....
                 ह्या व्हर्चुअल टच साठी मी प्रत्यक्षातले कित्येक टच अक्षरशः गमावते आहे हे मला ऑफलाईन झाल्यावर उमजलं.मैत्रिणीशी टाळी देत केलेल्या गप्पा, घरातल्या वृद्धांचा मायेचा स्पर्श असू दे किंवा लेकीशी मस्ती करतांना मारलेली गळामिठी... हे सारेच स्पर्श अनमोल आहेत... उद्या ते कदाचित माझ्या वाट्याला येणार नाहीत....आणि त्याहून महत्वाचं ते खरेखुरे आहेत.पार्कमध्ये मुलांना खेळायला सोडून मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्या पालकांची कीव कराविशी वाटते... घसरगुंडी किंवा झुल्यावर दंगा करणारी ही पिल्लं.. चार दोन वर्षांनी मोठी झाली एकदा की हे दृश्य दिसणार नाहीये..पर्यटनाला जा लोक ऑनलाइन, काही जण तर लॅपटॉप उघडून लगेच ऑनलाइन....accident झाला लोक ऑनलाइन ... पाठव फोटो, पाठव विडिओ.... काय हे??     
                    आजकाल एक गंमतीशीर बाब सर्रास गार्डन मध्ये पाहायला मिळते....पूर्वी झाडाझुडपा आड असणारे प्रेमी युगुल हल्ली सगळा वेळ केवळ सेल्फी काढण्यात आणि ते अपलोड करण्यात अक्षरशः वाया घालवतांना दिसतात. ह्या अनलिमिटेड नेटपॅक चा वापर भविष्यात लोकसंख्या नियंत्रणाचे साधन म्हणून होईल ,कदाचित.☺ दिवसाला पाच ते दर तासाला एक याप्रमाणें dp  बदलणारी माणसे सुद्धा आहेत... एव्हढे फोटो सतत आपण झळकवत असतो जेव्हढे एखाद्या वॉन्टेड डॉनचे... फोटो काय असावे याला सुमार नाहीच.. पण लावा बाबांनो हवे तेव्हढे असे म्हणावे तर अखंड वेडेवाकडे फोटो काढण्यासाठी धडपड सुरू असते...कुणासाठी कशासाठी करतो हे? व्हर्चुअल Likes साठी ...प्रत्यक्षात गल्लीतल्या काळ्या कुत्र्याला तू न का आवडे... fb वर 1लाख like. त्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या चार प्रत्यक्षातल्या जिवंत लोकांना आपण आवडायला हवे हे कुणालाच वाटत नाही.
                     सोशल मीडियाच्या बाबतीत आपण साक्षर झालोय पण सुशिक्षीत नाही हे खेदाने मान्य करावेच लागेल.... ज्या प्रयोजनासाठी ग्रुप ची निर्मिती केली आहे त्याच साठी त्याचा वापर व्हायला हवा.मात्र शुभ प्रभात आणि शुभ रात्री चे मेसेज इतके असतात... की कंटाळा येऊ लागतो. त्यातही काही लोकांना सुविचार पाठवायचे व्यसन असते... हे सुविचार कम good thoughts कम quotes वाचून असे वाटू लागते की या जगातील सर्वांत नीच, वाया गेलेला , उडानटप्पू  मनुष्य म्हणजे 'मी' च.... काही लोक गुरुदेवांचे/बाबा लोकांचे संप्रदाय follow करीत असतात... जरूर करा ना राव तुम्ही ! पण आमच्यावर ते गुरुवचन वाचण्याची सक्ती कशाला? तुमच्या बाबा/महाराजांचे मार्केटिंग कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करा रे!
                चतुर्थी ला मोदकांचा फोटो पाठव, सोमवारी बेलाचा, एकादशीला तुळशीचा ... यातून आपण नेमकं काय साध्य करतो.... हाच तो touch का त्यासाठी दिवसाचे अनेक तास आपण वाया घालवत असतो.एखाद्या ग्रुप वर पाठविल्या गेलेल्या मेसेजची दखलही न घेता आहेरात मिळालेल्या साड्यांसारखे लोक धपाधप इकडून उचलून तिकडे मेसेज फेकत असतात.कधीकधी एक मेसेज इतका वेळ वारंवार एकाच ग्रुप वर येतो की गणितातील 'अनंत' ही संकल्पना आताच गवसली मला. एका receipe च्या ग्रुप वर टिप्स येत असत... त्यातली एक म्हणजे पोळ्या करण्या आधी लाटणं फ्रीज मध्ये ठेवा... कणिक चिकटत नाही ... (खरंतर हा शुद्ध मूर्खपणा आहे कोणत्याच पोळ्या नीट येणाऱ्या व्यक्तीची कणिक कधीच लाटण्याला चिटकत नाही.) ही पोस्ट त्या ग्रुप वर इतक्यांदा आली की अखेर ऍडमीननी "लाटण्याची पोस्ट पुन्हा टाकली तर डोक्यात लाटणे घालीन " अशी स्पष्ट धमकीवजा सूचना दिली.
             मुले किंवा विस्मरण झालेले वृद्ध हरवले आहे ह्या स्वरूपाच्या पोस्ट तर मूर्खपणाचा कळस गाठतात.अरे कुठून हरवला आहे, किती तारखेला हे न पाहताच आला की कर फॉरवर्ड....तरी सध्या ते देवाचे मेसेज कमी झालेत "अमुक इतके ग्रुप ना फॉरवर्ड करा नाहीतर वाईट होईल" type चे मेसेज कोण तयार करतं त्याचा जाहीर सत्कार करायला हवा.अमुक विद्यार्थ्यांचे कागदपत्र सापडले आहेत हे आवाहन सुद्धा मूर्ख शिरोमणींचेच ... त्या कागदपत्रांवर पत्ता असतो की राव .. किमान शाळा/कॉलेजचे नाव असतेच... करा ना संपर्क तिथेच थेट सतर्कतेचा इशारा देत वाट्टेल त्या बायकांचे फोटो चोर म्हणून किंवा मुले पळविणारी टोळी म्हणून फॉरवर्ड करतांना आपण हा विचार करतो का की यात तथ्य आहे की नाही? अनेक प्रसिद्ध जिवंत व्यक्तींना या व्हर्चुअल जगात मारून श्रद्धांजली वाहणारे महाभागही कमी नाहीत. आपण जबाबदार नागरीक किंवा विचारी माणूस म्हणून सोशल मीडियाचा वापर करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवाच  ...अनेक ग्रुप मध्ये जातीवाचक एकेरी उल्लेख करून एकमेकांना हिणवण्याचेही प्रकार घडतात... कशाला हे सारे... काय मिळतं ह्यातून ?दिवसभर वाद ,कागाळ्या, रडारड आणि दिवसाअखेर मनःस्ताप हाच का तो आपल्याला अपेक्षित touch??
                   अनेकदा लोक निनावी पोस्ट फॉरवर्ड करतात ...हे खरेतर खूप चुकीचे आहे. निलाजऱ्यांच्या ह्या जगात ..करा काय करायचं ते... या मुद्द्यावर मी आलेय हल्ली... पण आपण फॉरवर्ड करत असलेल्या पोस्ट चा अर्थ आपण त्या विचारांशी सहमत आहोत ते आपल्याला पटलेले आहेत असाच थेट होतो... ह्याचा विचार करतोय का आपण?? धर की फेक मेसेज असा व्हर्चुअल कचरा आपण वाढवत आहोत केवळ... थांबा हो कुठेतरी?? अनावश्यक पोस्ट फॉरवर्ड करणे टाळा किमान फॉरवर्ड करण्यापूर्वी पोस्ट नीट वाचा त्यात काय म्हटलंय ते पहा... ज्या ग्रुप ला फॉरवर्ड करतोय त्या ग्रुप च्या विषयाशी सुसंगत आहे का ती?? उगाच व्यायामाच्या ग्रुप वर receipe पोस्ट कशाला करायची? त्या ग्रुप शी सुसंगत असेल आधी तिथे कुणी पाठवली नसेल तर पाठवा की पण सोशल मीडिया हल्ली मॅरेथॉन झाले आहे . कोणता मेसेज मी आधी फॉरवर्ड करून मिल्खा होणारेय का?☺ मध्यंतरी एका ग्रुप वरील कुणालातरी माझा वाढदिवस असल्याचा भास झाला अन माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला...शुभेच्छा देणे खूप सुरेख गोष्ट आहे ... गंमत वाटली... मात्र एकीची आई गेल्याची बातमी आणि RIP/श्रध्दांजलीचे शेकडो मेसेज .. आता त्या बिचारीची आई पाच सहा वर्षांपूर्वीच वारली होती म्हणून ठीक .. पण चुकीच्या वेळी चुकीचे मेसेज ह्या प्रकारे करणे म्हणजे मेंढ्या आहोत आपण ... घातली मान खाली की निघालो खड्डयात पडायला.
                   कोणतीही गोष्ट अती झाली की माती होणारच... मग उपाय काय ...अनेक गोष्टी गुंतल्यात ह्या जंजाळात . कदाचित आता पाऊल मागे घेऊन सोशल मीडिया संपूर्ण बंद करणे शक्य होणार नाहीये. अजीर्ण झालं कधी तर काय करतो आपण  " उपास" .. जेवणखाण कायमचं सोडून देता येत नाही ना! असाच सोशल मीडियाचा उपास करायची वेळ आली आहे.दिवसाचे काही तास, आठवड्यातील एक दिवस किंवा अगदी महिन्यातला एक दिवस ... करून तर पहा नेट बंद 👍सकाळी योगासने किंवा इतर व्यायामास जातांना फोन नेणे टाळा... आपल्या घरचं तासाभरात काही अडत नाही . तशी त्यांना आणि स्वतः ला सवयच लावा ... हा एक तास पूर्णपणे स्वतः च्या आरोग्याला द्या. मुलांशी खेळतांना त्यांनाच वेळ द्या...हातात आभासी जग नकोच... जोडीदाराबरोबर हातात हात घालून फिरायला जातांना फोन नेण्याचं टाळा... एकमेकांना द्यायचा साराच वेळ status आणि dp च्या फोटोसाठी वाया घालवू नका. मैत्रिणींच्या get-together ला मज्जा मस्ती धम्माल करा... सोशल मीडियावर आपण वाया घालवत असलेला वेळ सत्कारणी लावा. माझे एक काका अतीशय सहृदयी,हुशार आणि रसिक माणूस...रिटायर्ड झाल्यावर ते अतिशय सुरेख आयुष्य जगतात... फिरायला जातात,भरपूर पुस्तके वाचतात, आवडत्या कवितांचे अनुवाद करतात, आवडती गाणी गातात बासरी वाजवतात... मात्र कटाक्षाने ते सोमवारचा सोशल मीडियाचा उपास करतात. सोमवारी ते ऑफलाईन असतातच... हा वेळ त्यांना खूप काही देणारा निश्चित आहे. मी देखिल दिवसातले काही तास माझी प्रिय पुस्तके घेऊन वाचायला सोशल मीडियाला तात्पुरता आराम देईन म्हणतेय...वेळ आलीये स्वतःशी संवाद साधायची.... त्यासाठी सोशल मीडियाचा उपास करायलाच हवा. या नवरात्रीच्या निमित्ताने मन आणि कुटुंब प्रसन्न करणारे हे व्रत नक्कीच करून पहा 👍
© यशश्री रहाळकर

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

गौराईची भेट

                  "तुझ्या घरी गौरी/महालक्ष्मी नाहीत का ग?".... या प्रश्नाचं उत्तर देतांना मनांत एक तीव्र टोचणी लागून राहते . नाही, माझ्या घरी गौरी नाहीत... ना माहेरी ना सासरी.अगदी लहान होते तेव्हापासून गौराईचे कोण अप्रूप वाटायचं... काही असो नसो सासरी गौरी तरी असाव्यात असं वाटायचं.माझ्या घरात भले येवो ना येवो पण माझ्या मनात मात्र गौराई थाटात येऊन जात असे... अजूनही येते.खरं सांगू!माझा निरोप घेतल्याविना जात नाही हं ती. माहेरून सासरी परततांना कश्या मुली मागच्या आळीतल्या मैत्रिणीकडे जरा डोकावून येतात .. तश्शी ती माझ्याकडे आवर्जून येऊन जाते.ख्यालीखुशाली विचारते... गोडसं हसू चेहऱ्यावर आणत पाणावले डोळे पुसत ... मजेत रहा म्हणत निरोप घेते.
                   माझ्या घरी नसू देत गौरी पण माझ्या मागं लगीन घाई असते. एखाद्या मैत्रिणी सोबत साड्या बघायला अगणित दुकाने पालथी घातलेली असतात, कुणाच्या बाळांचे ड्रेस तर कुणाचे खण आण,हार आण, गजरे आण अमुक वाणसामान आण... वेलची विसरले ग म्हणत मैत्रिणींचे फोन घणाणत असतात...वर बरंय ग तुझ्याकडे गौरी नाहीत... म्हणत साऱ्या जणी हक्कानं मदतीला बोलावतात.मी देखिल तितक्याच प्रेमानं काही काम असेल तर सांगा म्हणते. लहानपणी तर सगळ्यांचे हळदी कुंकवाचे निरोप मी द्यायचे....आणि गंमत म्हणजे प्रत्येक घरी गौरी असल्यानं गोडधोड हातावर मिळे कधी लाडू तर कधी चकली. सोन्याच्या पावलांनी येणारी गौरी माझ्या भेटीला घडीभर विसावतेच... मी साद घातली की उभ्या उभ्या का असेना टेकून जाते. "आपल्या घरी का नाही ग गौरी?" लहानपणी अगदी पाचव्या वर्षी..आईला विचारलं होतं... आई म्हणाली होती,"घरात नसेना का मनांत तर आहेत ना! आपण भेटून यावं त्यांना." माझं अन गौराईचं सख्य असच बालमैत्रिणी सारखं.
                      गौरी जेवतात त्या दिवशी तर गंमतच होते... मला किमान 15 ठिकाणाहून जेवणाची आमंत्रणे मिळतात. सगळ्यांना नाईलाजानं नकार द्यावा लागतो... आणि हे अगदी दर वर्षी होतं बरं! एकाच ठिकाणी कायमसाठी निमंत्रण स्वीकारलेले असल्याने इतर ठिकाणी जाता येत नाही ...मात्र कुणाकडे वेळेवर अडचण आली किंवा सवाष्ण मिळतच नाहीये
मग "चालेल जेवलेली सवाष्ण...उष्टवायला तरी ये ग !" असा आग्रह होतो. वेळ निभावून न्यावी लागते. लोक आत्यंतिक श्रद्धेने हे पूजन करीत असतात त्यांच्या श्रद्धेचा आदर राखलाच पाहिजे... या गडबडीत एका ठिकाणी मला रात्रीचे जेवायला बोलावले देवा रे! सकाळ संध्याकाळ नैवेद्याचे पानभर जेवण ... पुढे चार दिवस मी जेवले नाही.. नंतर मात्र मी माफ करा असे स्पष्ट सांगू लागले.अनेक लोक मला,"तुझ्याकडे गौरी नाहीत आयत जेवायला काय होतं" असं जरा कटुपणे म्हणतातही पण आयांनो !बायांनो ! ... पोटात करंज्या साठोऱ्या ठेवायला आम्ही गौरी नव्हे! ज्यांच्याकडे गौरी आहेत त्यांनी ह्याचे आवर्जून भान ठेवा... आग्रह करकरून जेवायला घालणे .. ह्यात काही पुण्य नव्हे. तरी बरे अमुक 4 पुरणपोळ्या खाव्या असा नियम नाही ... नाहीतर आमची धडगत नव्हती.
                       गौरींचे हळदीकुंकू म्हणजे पर्वणीच असते. मला आमंत्रण देतांनाच तुझ्या घरी नाहीना मग आलंच पाहिजे अशी धाकयुक्त छुपी भूमिका असते...खरं सांगायचं तर मलाही खूप आवडतं जायला... संध्याकाळी 5ला निघालेली आम्हा मायलेकींची वरात रात्री 11 साडे अकरा पर्यंत घरी येते.प्रत्येक घरी मी शांतपणे टेकते... दिवसभराच्या अविश्रांत श्रमाने दमलेली खरीखुरी गौरी अलौकिक सुंदर दिसत असते...कुणी घाईघाईने साडी बदललेली तर कुणी नेमके एका कानात कानातले घालायला विसरली असते.तृप्तता या शब्दांचं मूर्त रूप पहायचं असल्यास या हळदी कुंकवाला जरूर जावे. गौराईला नेसविलेल्या साड्यांच्या प्रकाराची चर्चा करावी, आरास सुरेख झालीये असं भरभरून कौतुक करावं.... खरी खुरी गौराई प्रसन्न होते... मला त्या देखाव्यांच, सजावटीच मुळीच कौतुक नाही ... नजर लागून राहते ती गृहलक्ष्मीवर. असं तेज जे कोणत्याही कृत्रिम रंगरांगोटीने येऊच शकत नाही. कुंकू लावतांना ती म्हणते,"गौरी सेवा करून घेतात. होईल तसे करायचे" घरातील सासू किंवा जेष्ठ स्त्री भरभरून सुनेचे कधी नव्हे ते कौतुक करते... त्या त्या प्रत्येक क्षणी मला गौराई भेटते.
             खरी गौराई आहे घरातल्या सुना ... लोक म्हणतात जेष्ठा कनिष्ठा दोघी माहेरवाशिणी आहेत. नक्कीच दीड दिवसासाठी माहेरी येणाऱ्या प्रत्येक लेकीचं कौतुक करा, प्रेम द्या हे शिकविणारा हा सण. पण तुमच्या या माहेरवाशिणीचं कौतुक करणाऱ्या तरी परक्या कुठे आहेत??त्याच खऱ्या मूर्तिमंत गृहलक्ष्मी आहे ना!चार शब्द कौतुकाचे पुरेसे असतात त्यांना.मला तर याच गृहलक्ष्मीच्या रूपात गौरी भेटत असतात. प्रसन्न, समाधानी, करारी आणि तेव्हढ्याच प्रेमळ.दरवर्षी या खऱ्या गौराईची भेट घ्यावीच लागते... नाहीतर त्या नाराज होतात ना! त्यांचा राग परवडणारा नसतो मला.शिवाय निमित्त असतेच ,"हिच्याघरी गौरी नाही तरी आली नाही दर्शनाला" ... गौराई प्रत्येक घरी सोन्याच्या, हळदी कुंकवाच्या पावलांनी ये हो ! घर सुखसमृद्धी ने भरून टाक. माझ्यासाठी मात्र गोड तृप्त हसू आणि एक गळाभेट राखून ठेव ... नक्की.
© यशश्री रहाळकर