"सिंधों ! अग यें सिंधों ! इक्डे यें बघों...."
आजही कित्येकदा डोळे मिटलेले असतात आणि कानात तिची सानुनासिक साद घुमत राहते... मधली उणीपुरी तीस वर्षे गळून पडतात आणि मी मनाने आमच्या जुन्या घरात पोहोचते सुद्धा.. माळवदाचं घर, त्यातली ती खांबा-खांबांची मधली खोली, वर जाणारा लाकडी जीना आणि वर तिची पिटुकली खोली... सगळं चित्र काढल्यागत झपझप डोळ्यांसमोर साकार होतं... ती शतकाच्या दोन दशके मागे आणि मी जेमतेम अर्ध दशक गाठलेलं .. तरीही वयाचा अडसर न होता, तिची आणि माझी खास गट्टी होती... श्रीमती शांताबाई दिनकर केतकर माझी पणजी आज्जी ... सगळे तिला "मोठी आई" म्हणायचे. फार थोड्या लोकांच्या नशिबात आजी-आजोबांचे प्रेम असते आणि त्याहून अगदीच भाग्यवान लोकांना पणजी आजी/आबा असतात ... मी त्यांपैकीच एक.
मोठी आई बाकी नावालाच "शांता" होती बाकी तिचा आणि शांततेचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नव्हता. ती अगदी हाय पिच मध्ये तिच्या सुनांची (म्हणजे माझ्या आजींची) नावे घेऊन किंचाळत असायची... आणि ह्या मात्र स्थितप्रज्ञासारख्या आपापली कामे शांतपणे करीत असत.... बरेच वर्षांची सवय असावी.. माझ्या वाट्याला मोठी आई आली तीच अंगभर सुरकुत्यांचे जाळे घेऊनच, कमरेत वाकलेली , आणि डोळ्यांवर जाडा काळ्या फ्रेमचा चष्मा असणारी... तिचा मूळ रंग कोणता होता देवास ठाऊक? पण कष्ट करकरून ती पुरती रापलेली होती. कथ्था आणि खरबूजी फुलाफुलांची नऊवारी ती चापून चोपून नेसायची... अजूनही आठवते मला ती तशीच ... ती मूळची हट्टी होतीच आणि आपलं तेच खरं करूनही घ्यायची. स्वभावाने बोलघेवडी आणि बिनधास्त होती... अगदी समोरच्या बाईला,
"लेक नकटी आहे गो नाकाने कांदे नको सोलू"
असे खुशाल म्हणून मोकळी व्हायची. आमचीच काय ती साऱ्या गल्लीची मोठी आई होती... जाणारा येणारा प्रत्येक जण तिच्यापाशी घडीभर टेकायचाच... आणि नाहीच थांबला कुणी तर...
"म्हैस व्याली काय रे रामभाऊ?"... म्हणून ती अडवायची मग काय पळणाऱ्याला थांबवेच लागे.
ती बहुतेक सगळ्यांच्या चार पिढ्यांना ओळखायची... त्यामुळे हा दुर्गाचा नातू, तो सदाशिवाचा बाळू, रामनाथचा धाकटा ... असे अगम्य परीचय तिच्या पुरते फिक्स असायचे, आम्हाला ते काही कळायचे नाही हा भाग वेगळा.
सगळी गल्ली तिची जिवलग होती सगळ्याच तिच्या लेकी सुना होत्या... तिचा नशिबावर खूप विश्वास होता... तशी नशिबाने तिला अजिबातच साथ दिली नव्हती तरीही.. ती लॉटरीचे तिकीट घ्यायची... आणि गंमत म्हणजे दोनचार वेळा लागले सुद्धा. एकदा दोन की तीन हजार रुपयांची लॉटरी लागली तिला आणि गल्लीतल्या सगळ्या लेकिसुनांना तिने पैसे चक्क वाटून टाकले... त्या सगळ्या तिच्या केवळ तोंडदेखल्या सूना नव्हत्या ती त्यांच्यावर मायाही करायची आणि तितकाच हक्कही गाजवायची. आमच्या घरी एक भलीमोठी सतरंजी होती आणि एक आंबेफोडणी (लोणच्याचा कैऱ्या फोडायची विळी) ... ह्या दोन वस्तू अख्ख्या गल्लीत केवळ आमच्या घरी होत्या आणि त्या आमच्या घरी कधीच नसायच्या... मग जेव्हा कधी त्या लागायच्या तेव्हा शेवटी कुणाकडे कार्य झालं किंवा शेवटी लोणचं कुणी घातलं असा अंदाज घेऊन मागून आणाव्या लागत असत.
मोठी आई आणि मी पायऱ्यांवर बसून गप्पा मारतोय, असं चित्र आजही स्पष्ट दिसतं डोळ्यांपुढे, गप्पा काय मारायचो ते मात्र आठवत नाही. तिला पान खायची भारी आवड होती . वयपरत्वे दात गेल्याने चावून खाता येईना मग ती ते एका पितळी खलबत्त्यात कुटून कुटून खायची. पानाने तोंड चरबट होऊ नये म्हणून त्यात एक गोड गोळी सुद्धा घालायची. ह्या गोड गोळ्या दहा पैश्याला दहा मिळायच्या... त्या आणण्याची जबाबदारी अस्मादिकांच्या शिरावर असायची...घरासमोरचा रस्ता ओलांडून माऊली नावाचे एक दुकान होते तिथे ह्या रंगीबेरंगी गोड गोळ्या बरणीत भरलेल्या असायच्या. त्या आणून देण्याचा टॅक्स म्हणून मग 2 गोळ्या मला देण्यात येत होत्या. मोठ्या आईची आठवण म्हणून मी तो पितळी खलबत्ता आजही जपून ठेवला आहे आणि माहेराहून हक्काने तोंड उघडून मागून घेतलेली ती एकमेव वस्तू आहे.... माझ्यासाठी सगळ्यांत किंमती , अनमोल आहे तो.
माझ्या आईवरही नातसून म्हणून तिची अतिशय माया होती... तिने तिच्या खोलीत काही खास केले की ती डब्यात डबा घालून आईच्या नावे झाकून ठेवायची आणि सगळ्यांत धाकटा काका बरोब्बर ते फस्त करायचा... त्याच वय आणि स्वभाव हूड ... दोघांचे क्षणभर पटले नाही कधी... सतत ती त्याच्या नावे आजीला बोल लावायची आणि मग तो अजून खोड्या काढायचा. मोठी आई कटाची आमटी अप्रतिम करायची, ती मला आठवते तशी शेवटचे काही महिने सोडले तर बरेच वर्षे चांगली कामे करायची... घरकामांचा तिचा उरक फार होता... मात्र सोबत तिचे तोंडही त्याच वेगाने वाजायचे. माझी आजी आवर्जून सांगायची की , "मोठ्या आईंनी आमची बाळंतपणे खूप व्यवस्थित केली अजिबात सव्वा महिना खाटेखाली उतरू दिलं नाही." सतत काम करणे हा तिचा पिंड होता.. ती स्वस्थ बसलेली दिसणे दुर्मिळच होते. हातात माळ घेऊन जप तरी करायची नाहीतर वाती तरी वळायची ती बसल्या जागी.
माझ्या आजीला वस्तू चटकन कुठे ठेवली ते काही आठवायचे नाही मग ती घरातील देवघरात ठेवायची... असे करत करत अर्धा संसार देवघरात गोळा होई. एकदा मोठी आई पूजेला बसली मी बाजूला सहाणेवर चंदनाचे खोड उगाळत बसले... देवासमोर वस्तूंचा एव्हढा डोंगर होता की देवच दिसेनात... मग मोठ्या आईने एकेका देवाचे नाव घेऊन (किंचाळत) एकेक वस्तू बसल्या जागेहून फेकायला सुरुवात केली... घरभर तिने दाणादाण उडवली... पेपर, चष्मा, सुटे पैसे, बिले, याद्या, पत्रिका घरभर चहूदिशेला पसरून फेकल्या. आजही तो प्रसंग आठवला की हसू आवरत नाही मला... केशवाय नमः माधवाय नमः इतक्या रागाने त्या नारायणाच्या शत्रूनेही म्हटले नसेल... सगळे देव ताम्हणात झोडपून काढत तिची पूजा होत असे.
सगळ्यांमध्ये राहूनही स्वतंत्र कसे रहायचे ह्याचा ती आदर्श वस्तुपाठ होती. ती सणावाराला किंवा मन मानेल तसे दोन पैकी कोणत्याही सुनेकडे जेवायला जायची पण तिची स्वतंत्र खोली आणि स्वतंत्र खाणेपिणेही करायची... ते तिच्या खोलीत.. दोन्ही घरांच्या मध्ये जिन्यावरच्या खोलीत बरीच वर्षे तिने तिचे तिचे केले... अर्थात म्हणून तोडुनही टाकले नाही कुणाला पण व्यवहार सुद्धा चुकवला नाही. काका आजोबांचा दुधाचा व्यवसाय होता ,त्यांना (स्वतःच्या मुलाला) ही मानी बाई चक्क पैसे द्यायची दुधाचे... प्रेम वेगळे व्यवहार वेगळा हे शिकवले तिने. तिच्या शेवटच्या काही महिन्यांत तर तिची फार गंमत यायची तिचे काळवेळेचे गणित पार बिघडले होते ती मध्यरात्री सकाळ झाली म्हणून सगळ्यांना उठवायची तोपर्यंत तिचे स्नान पूजा वगैरे झालेले असायचे आणि घड्याळात रात्रीचे दोन /तीन वाजलेले असत... मग सगळे तिला समजावत की अजून रात्र आहे पण तिला काही ते पटायचे नाही.
माझ्यापाशी तिच्या फार मोजक्या स्मृती आहेत त्यातल्याही कित्येक काळाच्या ओघात पुसून गेल्या... पण ती मला भेटत गेली ती बाबांच्या गप्पांमधून. बाबांचे तिच्यावर आणि तिचेही बाबांवर विलक्षण प्रेम... पहिला नातू म्हणून असेलही कदाचित. बाबा तिच्याविषयी भरभरून बोलायचे... त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत तर ती त्यांना दिसत असे😢 .. ते ती समोर बसलीये असे सांगत तिच्याशी गप्पा मारत. त्या त्या वेळी वाटायचं.. ,"आता तिच्याशी बोलता आलं असतं तर..? ".. कदाचित ती अधिक चांगली कळली असती.
शांताबाई उर्फ मोठ्या आईचे आयुष्य कोणत्याही कादंबरीपेक्षा कमी नव्हते . बडोद्याचे माहेर असणारी ही जोश्यांची लेक , हरिहरेश्वर जवळच्या केतकीच्या केतकरांना कशी दिली हे माझ्यासाठी एक कोडंच आहे.माझे पणजोबा इंग्रजांच्या काळात लष्करात होते... कोणत्यातरी युद्धात ते गेले आणि ऐन तारुण्यात २६ व्या वर्षी ती विधवा झाली. पदरात दोन मुले एक मुलगी आणि मिळालेला जमिनीचा तुकडा विदर्भातील एका खेड्यात... तेव्हाची परिस्थिती अत्यंत बिकट होती . तेव्हा कुणीही ताक विकायचे नाही मग ही मुलांना घेऊन गोठयांमधून ताक आणायची... घरातील दोन मुलांपैकी जो शिकत होता त्याला म्हणजे माझे आजोबा, दादांना एक पूर्ण भाकरी मिळत असे आणि दुसऱ्याला अर्धीच भाकरी.... तिने प्रचंड कष्ट केले . थकली नाही परिस्थितीपुढे झुकली नाही... ऐन तरुण वयात, ती निडरपणे शेतात राखणीला जायची. दर वेळी कुणाला मदतीला बोलावणार, आपणच आपलं काम करून मोकळं व्हायचं... असं तिचं म्हणणं असायचं.
लेकीचं त्या काळातल्या प्रथेनुसार योग्य वेळी लग्न लावून दिलं.. मुलगा पाहण्याची वगैरे पद्धत नव्हती. त्या मुलाचा कान तुटका असावा... नवरीला मैत्रिणींनी," तुझा नवरा कान्या" असं चिडवलं... पोर वयच ते तिने ते इतकं जिव्हारी लावून घेतलं की ऐन तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तिने तिची जीवनयात्रा संपवली... मोठ्या आईसारख्या प्रचंड खंबीर बाईचे तेव्हा काय झाले असेल, मी कल्पनाच करू शकत नाही. तेव्हापासून आमच्या कडे प्रत्येक कार्यात तिची आठवण काढून एक सवाष्ण जेवू घातली जाते, तुळशीचे लग्न करत नाहीत ते 'लेकीबाळींना साहत नाही' असे तिचे मत होते. पुढे ती घरातील मुलींच्या बाबतीत फार हळवी होत गेली... माझी आत्या तिची फार लाडकी होती... एकंदरच तिची तिच्या नातींवर आणि मग माझ्यावर म्हणजे पणतीवर सुद्धा विशेष माया होती. तो तिच्या मनातील कदाचित खूप हळवा कोपरा असेल.
पुढे दिवस पालटले, दादांना नोकरी लागली, शेतीत जम बसला... तिने चांगले दिवस सुद्धा पाहिले. माझी आई म्हणजे तिची पहिली नातसून.. आपली खंत एकदिवस बोलून दाखवत ती म्हणाली,
"लता! तुला आजेसासू म्हणून माझी नथ मी द्यायला हवी होती ग ! पण तेव्हढा एकमेव दागिना उरला जो माझ्या लेकाचा दहावीचा फॉर्म भरताना मोडावा लागला..."
ती भन्नाट होती... मानी होती , कष्टीक होती आणि मुख्य म्हणजे कमालीची खंबीर होती. माई गेली (माझी आजी), बाबाही गेले... तिला माझ्याशी जोडणाऱ्या दोन्ही साखळ्या गळून पडल्या... पण अजूनही ती माझ्यात कुठेतरी आहे अंशरूपाने असेल कदाचित.... विपरीत परिस्थिती, परीक्षेची वेळ येते, मन निराश होतं... तेव्हा तेव्हा मी पाय घट्ट रोवून खंबीरपणे उभी राहते... ती मी एकटी नसते तर माझ्यातले तिचे DNA असतात. "जिथे आयुष्य संपल्यात जमा असतं तिथे एक नवी सुरुवात करता येते"...ती मला सांगत असते.
कै शांताबाई केतकर ह्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏
✒️ यशश्री रहाळकर