फॉलोअर

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

हळवा कप्पा

          अण्णा किर्लोस्करांना सगळा गाव "सद्दाम" अश्याच नावाने ओळखायचा.. अर्थात त्यांच्यापुढे बोलायची धमक नव्हती कुणातच पण माघारी सगळे सद्दामच म्हणत. 90च्या दशकात इराकच्या सद्दाम हुसेनने घातलेला धुमाकूळ लक्षात घेता , दिवाळीतील सुतळी बॉम्बच्या डब्यांवरसुद्धा सद्दामचे चित्र असायचे... एकदम कडक वाजणारा फटाका म्हणून तो तुफान विकला जायचा... तर असे कडक वाजणारे म्हणून अण्णा सद्दाम झाले. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की अण्णा नेमके कसे असतील? लोकशाहीची शाल पांघरलेला हुकूमशाह, अशी काही जरब होती त्यांची की भल्याभल्यांनी गुडघे टेकले होते. त्यांच्या घरी एक पितळी बंब होता... त्यात भल्या पहाटे लाकडे घालून पेटवायचे काम त्यांचे होते... तशीच लाकडे ते तोंडातही पेटवत असावेत.. पहाटे पाचला शिव्यांच्या लाखोलीने त्यांची आणि पर्यायाने शेजारी म्हणून आमची 'मंगल प्रभात' होत असे.


          संतापी ह्या शब्दाला पर्यायवाची शब्द अण्णा द्यावा,  इतके अण्णा संतापी होते. अखिल ब्रह्मांडात त्यांचे कुणाशीच सख्य नव्हते, त्यांना एकही मित्र नव्हता, त्यांचे नातेवाईकसुद्धा  भिऊनच असायचे. अगदी सख्खी मोठी बहीण गावातच रहायची पण ती चाळीस वर्षांत कधीही ह्यांच्या घरी फिरकलीच नाही... तिच्याही नवऱ्याशी अण्णांचे वाजले होते, इतके की तो मनुष्य गेला तरी अण्णा काही अंत्ययात्रेला गेले नाहीत. अण्णा तिरसट आणि कोपिष्टपणाचे अद्भुत मिश्रण होते... वाढत्या वयासोबत त्यांच्या ह्या मूळ प्रवृत्ती देखिल वाढत गेल्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ते सत्तरीच्या घरात असतील. सहा फूट उंच, शिडशिडीत, काळाभोर रंग , त्यात रापलेला काटक देह, झुपकेदार मिशा आणि त्यावरच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप.... फाटकाचे दार लावले नाही म्हणून ते मला इतके ओरडले की मी तिथेच मुळूमुळू रडायला लागले... त्यांच्या नाती म्हणजे माझ्या मैत्रिणी आम्ही पुन्हा कधीही त्यांच्या घरी खेळायला गेलो नाही. 


          त्यांची मुलेच काय  नातवंडेसुद्धा त्यांच्या वाऱ्याला उभी राहत नसत... मुले दिसली की ते त्यांना कामाला लावत... काम काय तर वीटा उचलणे. घरातील कोणत्यातरी कामाच्या वेळी उरलेल्या वीटा ते थप्पी करून एका जागी लावत मग दर आठवड्याला त्यांची जागा बदलत असे. ह्या वीटा प्राचीन धरोहर असल्यागत वर्षोनुवर्षे ते सांभाळत होते... न थकता आत बाहेर हलवत होते. त्या विटांपैकी एखादी कमी जास्त झाली तर ??? ते वीटा मोजून ठेवत.... एकदा गल्लीतल्या मुलांनी क्रिकेट खेळायला स्टम्प उभे करायला तीन वीटा उचलल्या आणि झाले त्यांच्या तीन पिढ्यांचा अर्वाच्च उद्धार करत अण्णा त्यांच्या अंगावर असे काही धावून गेले की पुढचा महिनाभर कुणीही क्रिकेटचे नावच घेतले नाही. अण्णा सतत कष्ट करत असायचे बरेचदा ते निरर्थक असत पण कदाचित ते तेव्हढाच वेळ शांत बसतात म्हणून घरच्यांना बरे वाटे. घरी गाय वासरू होते त्याचे सगळे तेच करत, कडबा ढेप सरकी कालवून देणे, बंबासाठी  लाकडे फोडणे, झाडलोट करणे , झाडांना खत घालणे, पाणी देणे असे सतत त्यांचे काहीना काही सुरू असे.


          त्यांच्या घरी दोन तीन बिऱ्हाडकरू भाडेकरी होते... दोन चार महिन्यांतच ते पळून जात... अण्णा प्रत्येकाशी भांडायचे... कारण अतिक्षुल्लक असायचे. दूधवाला, पेपरवाला, भाजीवाले, घरकामाची बाई .. कुणीही त्यांच्याकडे टिकायचे नाही. घराभवती त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे ,फुलझाडे लावली होती... सतत ते त्यांची मशागत करायचे , काळजी घ्यायचे... मात्र एकही फुल किंवा फळ कुणीही त्यांना न विचारता तोडलेले चालत नसे... अर्थात त्यांना विचारायची हिंमत कुणातच नव्हती, हा भाग वेगळा. एकदा नव्यानेच रहायला आलेल्या शेजारच्या मुलीने रामफळासाठी हट्ट केला तिच्या वडिलांनी सहज तोडून दिले . त्यांच्याशी अण्णांचे भांडण इतके विकोपाला गेले की चार माणसांनी मधे पडून ते कसेबसे सोडवले.


          अण्णा हे त्यांचे  कागदोपत्री नाव नव्हे ते "महादेव" असावे, हा योगायोग नव्हता तर ते त्याच्याच सारखे तांडवही करायचे.  त्या शंभू महादेवाला तिसरा डोळा उघडावा तरी लागे पण ह्या मनुष्याला त्याचीही गरज नव्हती.... महादेवासारखेच आयुष्याचे हलाहल ते प्यायलेही होते. जन्माला आले तशी आई गेली पुढे काही वर्षांनी वडीलही गेले, पोरकेपणानेच त्यांना वाढवले. नाही म्हणायला सावत्र आई आणि दोन धाकटी सावत्र भावंडे होती. चार घरी वार लावून शिक्षण पूर्ण केले, स्वतः ढोर मेहनत करून त्यांनी घरदार उभे केले... घराच्या भिंतीही त्यांनी स्वतः लिंपलेल्या होत्या. वाट्याला आलेल्या अवहेलना आणि कटू अनुभवांमुळे ते अधिकच संतापी होत गेले. ह्या सगळ्यांत एकच व्यक्ती अशी होती जिने खऱ्या अर्थानं आयुष्यभर त्यांना साथ दिली, एव्हढेच नव्हे तर त्यांच्याशी त्यांच्या कलाकलाने जुळवून घेतले... ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी नानी.


नानी अण्णांच्या अगदी विरुद्ध... इवलीशी ठेंगणी, नाजूक, गोरीपान .. केशरी पातळ नेसले की अगदी  पारीजाताचे फुल वाटायची. त्यांची अगदी जया-अमिताभची जोडी होती. स्वभावानेही नानी अगदी लाघवी , सगळ्यांना धरून ठेवणारी आणि कमालीची शांत होती. नानी तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन वावरत होती. तिला एक पक्के ठाऊक झाले होते की आपल्यालाच चार माणसांना धरून रहायचे आहे. प्रत्येकाच्या अडल्या नडल्याला ती धावून जात असे, प्रत्येकाच्या लेकिसुनांची चौकशी करणे, अण्णांच्या अपरोक्ष मुलांना बागेतली फळे दे, झाडाच्या कैऱ्या दे, लिंब दे असे सारे ती करायची. कुणाच्याही घरी काही कार्यक्रम असला की नानी पदर खोचून कामाला हजर असायची.


          अण्णांच्या संतापातून नानीचीही सुटका नसायची... मात्र अश्या वेळी ती पुतळा झाल्यागत शांत बसून घ्यायची मग थोड्या वेळाने काही झालेच नाहीये असे दाखवत अण्णांना जेवायला वाढायची. त्या काळानुसार नानींना चार अपत्ये होती. सुना, जावई, नातवंडे अगदी नातसुना, पणतू , पणती सुद्धा होते... त्या घरात येणारा प्रत्येक माणूस केवळ नानीच्या प्रेमाखातर आणि शक्यतो अण्णा बाहेर पडलेत किंवा झोपलेत असे पाहून यायचा.मी माहेरी गेले आणि नानींची चक्कर झाली नाही असे कधीही झाले नाही... माझ्या मैत्रिणीची आजी आणि माझ्या आजीची मैत्रीण असे दुहेरी नाते असल्याने नानी यायच्या,चार समजुतीच्या संसारी गोष्टी सांगायच्या.. म्हणायच्या,


"तुम्ही हल्लीच्या मुली कशा ग? कुणाशीच कसे जमत नाही तुमचे..?"


नानींना नवरा कमी की काय असा सासुरवास होता... त्यात सावत्र सासू म्हणजे दुस्वासात भरच....कदा बोलता बोलता त्या म्हणाल्या,


"दूध उतू गेलं म्हणून उलथने तापवून चटका दिला सासूबाईंनी..."


बापरे! माझ्या अंगावर सरसरून काटा आला, मी रागानेच म्हणाले,


"कश्याला केले हो तुम्ही हे असले संसार? सोडून निघून जायचे सरळ...."


माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नानी म्हणाली,

"कुठे?.. कुठे निघून जायचे?? माझे वडील जमदग्नीचा अवतार तुमचे अण्णा परवडले."


देवा रे !या मनुष्याहून अधिक संतापी प्राणी पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे?? कमाल आहे.. नानी पुढे म्हणाली,..


"अण्णा तसे मायाळू आहेत ग! फक्त त्यांचं  बिनसलं की बिनसतं... मनात दाटलेला सगळा राग काढतात कुणावर तरी... जसे सापाला देवाने विष दिलंय तसा ह्यांना संताप... त्यात त्यांचा तरी काय दोष."


आम्ही सगळ्या उपस्थित आबालवृद्ध स्त्रियांनी नानीपुढे दंडवत घातला... काही भारतीय स्त्रिया त्यांचे मंदीर बांधावे इतक्या महान असतात, नानी त्यातलीच एक.


          या वेळी मी माहेरी गेले तेव्हा नानी आजारी असल्याचे कळले आणि मीच त्यांना भेटायला गेले. अण्णा नव्वदी पार केलेले पण अजूनही सत्तरीचे वाटत होते... नानी मात्र गलितगात्र होऊन अंथरुणाला खिळली होती... तिच्या इवल्याश्या देहात असलेलं सगळं चैतन्य एकवटून ती नेहमीसारखी गोड हसली. आता चित्र अगदीच पालटले होते... अण्णांचा भित्रा ससा झालेला मी पहिल्यांदा पाहिला. काय झाले कसे झाले? चौकशी होईपर्यंत अण्णा चक्क सरबताचे दोन ग्लास भरून पुढ्यात उभे, मी भूत बघितल्यागत अविश्वासाने पाहत होते. अण्णा मृदू आवाजात म्हणाले,


"तुझ्यासोबत तरी घेईल ती थोडेसे.. दोन दिवस झाले जेवण जात नाहीये.."


अण्णांच्या डोळ्यांत पहिल्यांदा मी पाणी पाहिलं... मग आम्ही नानींना थोडे बसते केले... पाठीला भराभर जाऊन अण्णांनी मऊ उश्या लावल्या... आणि चमच्याने सरबत पाजू लागले.  नानींनी क्षीण आवाजात विचारले,


"तुम्ही घेतलं का? अग बी पीची गोळी असते ह्यांना, अजिबात लक्ष देत नाहीत स्वतःकडे, उद्या मी गेल्यावर कसे होणार ह्यांचे??"


बास ! नानींचे ते शब्द ऐकले आणि अण्णा लहान मुलागत धाय मोकलून रडू लागले... नदीच्या प्रवाहाने पहाड खचताना मी पहिल्यांदाच पाहत होते. हात जोडून थरथरत म्हणाले,


"ऎकलंस ना! कसं बोलते पहा ही... ही निघून गेली तर माझं काय होईल? कसा जगू मी? सवय झाली होती ग आयुष्यभर मी संतापायचं आणि हिने सावरून घ्यायचं, कुणी कुण्णी नसतं ग माझ्यासारख्या फाटक्या तोंडाच्या माणसाचं... "

अण्णा डोळे पुसत आतल्या खोलीत निघून गेले.


 नानी पुन्हा गोड हसत मला म्हणाली,

"बघा तुमचे अण्णा?? मी आजारी पडले आणि लहान मुल झालेत अगदी सतत उशाशी बसून असतात, कसला कसला जप करतात, माझं सगळं करतात... कधीतरी मांडीवर डोकं ठेऊन म्हणतात... तुम्ही जाऊ नका हो!... आता कसं व्हायचं बाई ह्या माणसाचं? म्हणून माझाही जीव सुटत नाही.."


          माझे डोळे माझ्याही नकळत ओसंडून वाहत होते. नानी त्या जीवघेण्या दुखण्यातून पुढे बऱ्या झाल्या... आणि अण्णा मात्र आयुष्याचा धडा शिकले. कदाचित खूप उशीर झाला होता पण देवाने त्यांना एक सुरेख संधी दिली होती.. हृदयातील हळवा कप्पा उघडून पाहण्याची. खरेतर, उतारवयात नवऱ्याला बायकोसारखी दुसरी सोबत नसते.. ती कधी आई होत सांभाळून घेते तर कधी मैत्रीण होत आयुष्य अधिक आनंदी करते... 'ती'च खरी सखी , खऱ्या अर्थानं अर्धांगिनी असते... फक्त एक खंत वाटते की हे कित्येक पुरुषांना खूप उशीरा कळते. फार उशीर होण्यापूर्वी एकदा आपल्याही मनाचे असे काही कुलूप घातलेले बंद कप्पे असतील तर ते जरूर उघडून पहा.... तिथे खजिना नक्कीच सापडेल.

✒️ यशश्री रहाळकर







मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

कोsहम् ?


         स्नेहल दोन महिन्यांपूर्वीच सोळा वर्षांची झाली होती.तिच्या बरोबरीच्या मुली केव्हाच वयात आल्या होत्या. हल्ली मुली अगदी बाराव्या तेराव्या वर्षीच वयात येतात. एका दृष्टीने स्नेहलच्या आईला... सीमाला हे बरेच वाटत होते. बाराव्या वर्षी कुठे काही जाण असते हो देहाची? आणि तसेही काही मुली उशिराच वयात येतात... अशी स्वतःची समजूत घालून घेत सीमा निश्चिन्त होती...  मात्र सीमाची धाकटी लेक सोनलची मासिक पाळी सुरू झाली आणि आता मात्र सीमा जराशी चिंतेत पडली.. सोनल जेमतेम बारा वर्षांची... मोठ्या स्नेहलहून चार वर्षांनी लहान... तिच्या शरीरात भराभर होणारे बदल आईच्या चकार नजरेतून सुटले नाहीत. मात्र स्नेहलच्या बाबतीत कसलेच चिन्ह दिसेना, एका कळीचे फूल होण्याच्या प्रवासाची सुरुवात अजून झालीच नव्हती का? , ह्या काळजीने ग्रासल्यावर तिने हा विषय आपला नवरा... संकेतच्या कानावर जरा संकोचानेच घातला. संकेतने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना लगेचच एका गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन दिली. सीमा आणि स्नेहल डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये बसलेल्या असताना त्यांच्या आयुष्यात हाच क्षण मोठे वादळ घेऊन येणार आहे , ह्याची जराही कल्पना त्यांना नव्हती.


     एक साधे सरळ आयुष्य जगणारी सीमा आपल्या छोट्याश्या चौकोनी संसारात खुष होती. नवरा संकेत शाळेत क्लार्क होता. दोघी लेकी ,मोठी स्नेहल दहावीत धाकटी सोनल सहाव्या वर्गात शिकत होत्या. फावल्या वेळात संसाराला मदत म्हणून सीमा शिवणकाम करायची... फार मोठी स्वप्ने नाहीत आणि जगण्याच्या फार गरजाही नाहीत....त्यांच्या लेकी आणि छोटसं घरकुल ह्यातच अवघं विश्व सामावलेलं होतं. सारं काही सुरळीत सुरू होतं पण दुधात मिठाचा खडा पडावा तसं काहीसं झालं.


         डॉक्टरांनी स्नेहलची प्राथमिक तपासणी केली आणि तिची सोनोग्राफी काढून आणायला सांगितले. दोनच दिवसांत पुन्हा मायलेकी रिपोर्ट घेऊन क्लिनिकला हजर झाल्या...  डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सीमा भोवळ येऊन तिथेच पडली. संकेतला फोन करून बोलावून घेण्यात आलं... आणि डॉक्टरांनी त्यांना दोन दिवसांनी पुन्हा भेटून सविस्तर बोलायला सांगितलं.. सीमा दोन दिवस त्याच धक्क्यात होती. संकेतने शेवटी स्वतः डॉक्टरांची भेट घेण्याचा ठरवलं. डॉक्टरांनी शांतपणे स्नेहलचे सोनोग्राफीचे रिपोर्ट पुढे करत सांगितले,


"हे बघा मि. संकेत ... तुमच्या मुलीला स्नेहलला गर्भाशयच नाहीये... म्हणजे जन्मतः काही दोष घेऊन बाळ जन्म घेते त्यातलाच हा एक दोष आहे."


"अहो काय बोलताय काय डॉक्टर तुम्ही?? असे कसे असेल ? आमची स्नेहल अगदी नॉर्मल आहे .. इतके वर्षांत तिला कसलाही त्रास झालेला नाही."

संकेतला भर ए. सीत दरदरून घाम फुटला.


          स्नेहलच्या अजूनही काही तपासण्या करणे आवश्यक आहे. तिची केस प्रचंड रेअर आहे, अगदीच वेगळी आहे.. आपण एका डॉक्टरांच्या एक्स्पर्ट टीमलाच तिचे रिपोर्ट दाखवू ,असेही त्या डॉक्टरांचे म्हणणे होते. दरम्यान अजूनही कुणाकडे रिपोर्ट दाखवून सेकंड ओपिनियन जरूर घ्या.. असेही सांगायला त्या कचरल्या नाहीत. त्या त्यांच्या उत्तरावर ठाम होत्या... स्नेहलला जन्मजात गर्भाशय नव्हतेच. नशीबापुढे हताश झालेला संकेत जड पावलांनी घरी परतला... त्याची आणि सीमाची नजरानजर झाली आणि तिचा बांध फुटला...


"असे हो कसे झाले?? आजवर साधा ताप नाही आला कधी पोरीला... काहीतरी चूक झालीये डॉक्टरांची. आपण .. आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू."


          पुढे काही दिवस दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या डॉक्टरांचेही मत घेण्यात आले. तीन- चार वेळा आतून बाहेरून अशी स्नेहलची सोनोग्राफीही करण्यात आली... ह्या सगळ्या खटाटोपात सत्य बदलणार नव्हते स्नेहलला जन्मजात गर्भाशयच नव्हते. स्नेहल ह्या सगळ्यात बावरून गेली होती... आपल्याकडे काहीतरी नाहीये जे असायला हवं होतं एव्हढंच तिला कळलं. तिच्या पासून सत्य किती दिवस लपवून ठेवणार होती सीमा? शेवटी पुन्हा पहिल्याच डॉक्टरांना गाठून सीमाने पदर पसरला... 


"काहीतरी ट्रीटमेंट असेल ना हो डॉक्टर... काहीतरी करा.."

आईचा भाबडा आशावाद बोलत होता... एव्हाना तिने सगळ्या देवांना साकडं घालून झालं होतं.


डॉक्टरांनी शांतपणे सीमा आणि संकेतशी बोलायला सुरुवात केली..


"आता तुम्ही सावरले आहात असे गृहीत धरून सविस्तर बोलते.... एखादा अवयव जन्मजात नसेल तर तो आपण तयार करू शकत नाही पण हो काही केसेसमध्ये गर्भाशय रोपण यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे... तुमच्या मुलीच्या बाबतीत ती शक्यता पडताळून पाहण्यासाठी आणि अजून अधिक गुंतागुंतीच्या समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी आपल्याला अधिक तपासण्या कराव्या लागतील... तसेच तज्ञांचे मतही विचारात घ्यावे लागेल.."


आता फार काळ न दवडता, "डॉक्टर सांगतील तसे करूयात" , असे ठरवून दोघे घरी परतले. तिथूनच स्नेहलचा एक प्रचंड थकवणारा प्रवास सुरु झाला... गर्भ फलनाच्या वेळी गुणसूत्रांच्या ज्या जोड्या जुळतात त्यातल्या लिंगनिश्चिती करणाऱ्या गुणसूत्रांच्या जोडीत गोंधळ उडाला की असे होत असावे.... पुढे तीन महिने विविध तपासण्यांचा आणि रोज कुणातरी वेगळ्या डॉक्टरांना भेटण्याच्या चक्रातून स्नेहलची अखेर सुटका झाली. 


          डॉक्टरांच्या एका ग्रुपने स्नेहल आणि तिच्या आईवडिलांसह एक सेशनच घेतले. त्यातल्या तज्ञांच्या मते, स्नेहलची केस जनुकीय अभ्यासकांसाठी एक कोडेच आहे. जगभरात अश्या जवळपास पाच हजार केसेस आहेत ज्या स्त्रियांना जन्मजात गर्भाशयच नाही. बाकी त्यांचे आयुष्य वयात येण्याच्या टप्प्यापर्यंत नॉर्मल होतं. MRKH अर्थात Mayer-Rokitansky-Kuster-Hauser snydrom असे तिच्या समस्येचे क्लिष्ट नाव होते. ह्यात प्रामुख्याने बाह्य अवयवांची वाढ नॉर्मल होत असली तरी शरीरांतर्गत अवयव अविकसित राहतात किंवा नसतातच. हा एक प्रकारचा जेनेटिक डिफेक्ट असून त्याच्या जोडीला एखादी किडनी सुद्धा अविकसित अर्थातच निरुपयोगी असण्याचा धोका असू शकतो. स्नेहलच्या बाबतीत दोन्ही किडनी उत्तम काम करत होत्या पण तिची समस्या त्याहून क्लिष्ट होती. Intersex प्रकारातील 46,XY  असे तिचे मेडिकल भाषेतील निदान होते. अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचे तर ती अर्धी स्त्री अर्धा पुरुष होती... बाह्य इंद्रिये स्त्री सूचक असली तरी अंतर्गत पुरुष इंद्रिये अविकसित अवस्थेत होती. तिला ओव्हरीज अर्थात अंडकोष नव्हतेच तर त्या ऐवजी अविकसित टेस्टीज , वृषणकोष होते... ही अशी  जनुकीय दोषांची केस काही कोटींत एखादीच ... तिच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना खूप महत्वाचे ठरणार होते. त्यासाठी पालकांची परवानगी मिळावी म्हणून सगळे प्रयत्नशील होते.


सेशनमध्ये डॉक्टरांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या सीमाचा शेवटी कडेलोट झाला...


"केव्हाची ऐकतेय मी केस केस , असं संबोधता आहात तुम्ही माझ्या मुलीला. तुमच्यासाठी ती फक्त एक केस असेलही, एक नंबर पण त्याआधी ती जिवंत माणूस आहे हे तुम्ही लोक बहुदा विसरले आहात."


तिच्या संतापापुढे सगळेच जरा वरमले. .. संकेत बापाच्या मायेने विचारता झाला....


"बाकी ती एक निरोगी आयुष्य जगू शकेल ना डॉक्टर..?"


          डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली आणि ते दोघे स्नेहलला घेऊन घरी परतले. एक लढाई नशीबासोबत ते पराभूत होऊन आले होते... दुसरी लढाई समाज नावाच्या राक्षसाशी बाकी होती. सगळे मेडिकल इथिक्स बाजूला ठेवून क्लिनिकच्या स्टाफ पैकी कुणीतरी नाव फोटोनिशी "जेनेटिकल चमत्कार" अश्या सवंग मथळ्याची बातमीच छापून आणली. आता जे काही होणार होतं ते ह्या जेनेटिकल दोषापेक्षाही भयंकर होतं.


          चारचौघात सहज लपून जाईल अशी स्नेहल अचानक चर्चेचा  विषय बनली. आडून आडून चौकशी करणारे शेजारी आता थेट घरात घुसून सांत्वन करू लागले. संकेतलाही कामाच्या ठिकाणी अनंत प्रश्न पडलेल्या लोकांना तोंड द्यावे लागे... त्या सगळ्यांचे साधे सरळ आयुष्य ढवळून निघाले. कुणी तिची कीव करत होतं तर कुणी टिंगल. रोज सोबत शाळेत जाण्याऱ्या, एका बेंचवर बसणाऱ्या मुलींच्या आईंनी त्यांना स्नेहलशी मैत्री तोडायला सांगितली... बिचाऱ्या स्नेहलला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागत होता. तिचे भविष्य आता काय ह्या वंचनेत अखंड आईबाबा बुडालेले असायचे , त्याचाही उगाचच एक अपराधी चरा तिच्या काळजावर खोलवर उमटून गेला. आपण नेमके कोण आहोत.. एक स्त्री की एक पुरुष? असा प्रश्न सतत त्या पुरत्या वयातही न आलेल्या मुलीला सतत बेजार करत होता. एकदा शाळेतील मुलींच्या वॉश रुम्सच्या भिंतीवर कुणा टारगट मुलाने ,


"स्नेहल कोण आहे ती की तो?" 


असे खरडून ठेवले आणि तशीच धावत स्नेहल घरी आली. आईच्या मांडीवर स्वतःला झोकून देत कितीतरी वेळ ती रडत होती. तिला कुशीत घेऊन स्नेहलही रडत होती. दुसऱ्या दिवशी एक किन्नरांची टोळी त्यांच्या दारात उभी होती, "ती आमच्यापैकी आहे तिला आमच्या सोबत पाठवा." अशी गळ ते घालू लागले. त्यांचे ते बीभत्स हावभाव आणि टाळ्या बघून स्नेहल भीतीने पांढरी पडली, दुसऱ्या दिवशी तिला सणसणून ताप भरला. सोळा वर्षांचा कोवळा जीव सहन तरी किती करणार? 


           दोन चार दिवस होत नाही तोच एक सो कोल्ड सोशल वर्कर टी व्ही रिपोर्टर आणि कॅमेरा घेऊनच हजर झाले... त्यांना स्नेहलची मुलाखत घ्यायची होती... तिला तिचे जेंडर लिंगभाव निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, ती हवे तर पुरुष होणे स्वीकारू शकते तश्या प्रकारच्या लिंग बदल शस्त्रक्रियेला त्यांची NGO मदत करेल असे काहीबाही ती बरळत होती.


            सीमाने काडकन तिच्या मुस्काटात ठेऊन दिली, आजवर रोखून धरलेल्या सगळ्या हतबलतेचे, निराशेचे रागात रूपांतर झाले होते. स्नेहलला पोटाशी धरत प्रचंड संतापाने ती किंचाळली..


"काय हवंय तुम्हाला ? काय हवंय काय? आता तिचे प्रदर्शन टी व्ही वर मांडायचे आहे का? घ्या काढा फोटो. अरे तुमच्यापेक्षा गुरं बरे रे! एखादे लंगडे वासरू सहज सांभाळून घेतात आणि तुम्ही नावालाच माणसे ... गिधाडे आहात गिधाडे... किती टोचाल ?  किती चोची माराल? नशिबाने आधीच  पाचर मारलेल्या ह्या जीवाला.. कुणी म्हणत प्रयोगाला द्या, कुणी म्हणत मुलाखत द्या... अरे माणूस तरी समजता का तुम्ही तिला??"


सीमाला धाप लागली होती पण ती थांबली नाही ,

"काय फरक पडतोय ती स्त्री आहे की पुरुष की आणखी कुणी.. ? त्या आधी माणूस आहे ना ती.. पिल्लू आहे माझं ते.. हात जोडते मी जगू द्या तिला ..आम्हाला एकटं सोडा."


सीमा धाय मोकलून रडू लागली.


किती अजब असतो ना आपण माणसे... 

आपलं 'तो' किंवा 'ती' कुणीतरी असण्यापेक्षा "माणूस"  असणं आपल्यासाठी इतकं बिनमहत्वाचं का असतं ?

✒️ यशश्री रहाळकर