अण्णा किर्लोस्करांना सगळा गाव "सद्दाम" अश्याच नावाने ओळखायचा.. अर्थात त्यांच्यापुढे बोलायची धमक नव्हती कुणातच पण माघारी सगळे सद्दामच म्हणत. 90च्या दशकात इराकच्या सद्दाम हुसेनने घातलेला धुमाकूळ लक्षात घेता , दिवाळीतील सुतळी बॉम्बच्या डब्यांवरसुद्धा सद्दामचे चित्र असायचे... एकदम कडक वाजणारा फटाका म्हणून तो तुफान विकला जायचा... तर असे कडक वाजणारे म्हणून अण्णा सद्दाम झाले. एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल की अण्णा नेमके कसे असतील? लोकशाहीची शाल पांघरलेला हुकूमशाह, अशी काही जरब होती त्यांची की भल्याभल्यांनी गुडघे टेकले होते. त्यांच्या घरी एक पितळी बंब होता... त्यात भल्या पहाटे लाकडे घालून पेटवायचे काम त्यांचे होते... तशीच लाकडे ते तोंडातही पेटवत असावेत.. पहाटे पाचला शिव्यांच्या लाखोलीने त्यांची आणि पर्यायाने शेजारी म्हणून आमची 'मंगल प्रभात' होत असे.
संतापी ह्या शब्दाला पर्यायवाची शब्द अण्णा द्यावा, इतके अण्णा संतापी होते. अखिल ब्रह्मांडात त्यांचे कुणाशीच सख्य नव्हते, त्यांना एकही मित्र नव्हता, त्यांचे नातेवाईकसुद्धा भिऊनच असायचे. अगदी सख्खी मोठी बहीण गावातच रहायची पण ती चाळीस वर्षांत कधीही ह्यांच्या घरी फिरकलीच नाही... तिच्याही नवऱ्याशी अण्णांचे वाजले होते, इतके की तो मनुष्य गेला तरी अण्णा काही अंत्ययात्रेला गेले नाहीत. अण्णा तिरसट आणि कोपिष्टपणाचे अद्भुत मिश्रण होते... वाढत्या वयासोबत त्यांच्या ह्या मूळ प्रवृत्ती देखिल वाढत गेल्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हाच ते सत्तरीच्या घरात असतील. सहा फूट उंच, शिडशिडीत, काळाभोर रंग , त्यात रापलेला काटक देह, झुपकेदार मिशा आणि त्यावरच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप.... फाटकाचे दार लावले नाही म्हणून ते मला इतके ओरडले की मी तिथेच मुळूमुळू रडायला लागले... त्यांच्या नाती म्हणजे माझ्या मैत्रिणी आम्ही पुन्हा कधीही त्यांच्या घरी खेळायला गेलो नाही.
त्यांची मुलेच काय नातवंडेसुद्धा त्यांच्या वाऱ्याला उभी राहत नसत... मुले दिसली की ते त्यांना कामाला लावत... काम काय तर वीटा उचलणे. घरातील कोणत्यातरी कामाच्या वेळी उरलेल्या वीटा ते थप्पी करून एका जागी लावत मग दर आठवड्याला त्यांची जागा बदलत असे. ह्या वीटा प्राचीन धरोहर असल्यागत वर्षोनुवर्षे ते सांभाळत होते... न थकता आत बाहेर हलवत होते. त्या विटांपैकी एखादी कमी जास्त झाली तर ??? ते वीटा मोजून ठेवत.... एकदा गल्लीतल्या मुलांनी क्रिकेट खेळायला स्टम्प उभे करायला तीन वीटा उचलल्या आणि झाले त्यांच्या तीन पिढ्यांचा अर्वाच्च उद्धार करत अण्णा त्यांच्या अंगावर असे काही धावून गेले की पुढचा महिनाभर कुणीही क्रिकेटचे नावच घेतले नाही. अण्णा सतत कष्ट करत असायचे बरेचदा ते निरर्थक असत पण कदाचित ते तेव्हढाच वेळ शांत बसतात म्हणून घरच्यांना बरे वाटे. घरी गाय वासरू होते त्याचे सगळे तेच करत, कडबा ढेप सरकी कालवून देणे, बंबासाठी लाकडे फोडणे, झाडलोट करणे , झाडांना खत घालणे, पाणी देणे असे सतत त्यांचे काहीना काही सुरू असे.
त्यांच्या घरी दोन तीन बिऱ्हाडकरू भाडेकरी होते... दोन चार महिन्यांतच ते पळून जात... अण्णा प्रत्येकाशी भांडायचे... कारण अतिक्षुल्लक असायचे. दूधवाला, पेपरवाला, भाजीवाले, घरकामाची बाई .. कुणीही त्यांच्याकडे टिकायचे नाही. घराभवती त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे ,फुलझाडे लावली होती... सतत ते त्यांची मशागत करायचे , काळजी घ्यायचे... मात्र एकही फुल किंवा फळ कुणीही त्यांना न विचारता तोडलेले चालत नसे... अर्थात त्यांना विचारायची हिंमत कुणातच नव्हती, हा भाग वेगळा. एकदा नव्यानेच रहायला आलेल्या शेजारच्या मुलीने रामफळासाठी हट्ट केला तिच्या वडिलांनी सहज तोडून दिले . त्यांच्याशी अण्णांचे भांडण इतके विकोपाला गेले की चार माणसांनी मधे पडून ते कसेबसे सोडवले.
अण्णा हे त्यांचे कागदोपत्री नाव नव्हे ते "महादेव" असावे, हा योगायोग नव्हता तर ते त्याच्याच सारखे तांडवही करायचे. त्या शंभू महादेवाला तिसरा डोळा उघडावा तरी लागे पण ह्या मनुष्याला त्याचीही गरज नव्हती.... महादेवासारखेच आयुष्याचे हलाहल ते प्यायलेही होते. जन्माला आले तशी आई गेली पुढे काही वर्षांनी वडीलही गेले, पोरकेपणानेच त्यांना वाढवले. नाही म्हणायला सावत्र आई आणि दोन धाकटी सावत्र भावंडे होती. चार घरी वार लावून शिक्षण पूर्ण केले, स्वतः ढोर मेहनत करून त्यांनी घरदार उभे केले... घराच्या भिंतीही त्यांनी स्वतः लिंपलेल्या होत्या. वाट्याला आलेल्या अवहेलना आणि कटू अनुभवांमुळे ते अधिकच संतापी होत गेले. ह्या सगळ्यांत एकच व्यक्ती अशी होती जिने खऱ्या अर्थानं आयुष्यभर त्यांना साथ दिली, एव्हढेच नव्हे तर त्यांच्याशी त्यांच्या कलाकलाने जुळवून घेतले... ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी नानी.
नानी अण्णांच्या अगदी विरुद्ध... इवलीशी ठेंगणी, नाजूक, गोरीपान .. केशरी पातळ नेसले की अगदी पारीजाताचे फुल वाटायची. त्यांची अगदी जया-अमिताभची जोडी होती. स्वभावानेही नानी अगदी लाघवी , सगळ्यांना धरून ठेवणारी आणि कमालीची शांत होती. नानी तोंडात खडीसाखर आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन वावरत होती. तिला एक पक्के ठाऊक झाले होते की आपल्यालाच चार माणसांना धरून रहायचे आहे. प्रत्येकाच्या अडल्या नडल्याला ती धावून जात असे, प्रत्येकाच्या लेकिसुनांची चौकशी करणे, अण्णांच्या अपरोक्ष मुलांना बागेतली फळे दे, झाडाच्या कैऱ्या दे, लिंब दे असे सारे ती करायची. कुणाच्याही घरी काही कार्यक्रम असला की नानी पदर खोचून कामाला हजर असायची.
अण्णांच्या संतापातून नानीचीही सुटका नसायची... मात्र अश्या वेळी ती पुतळा झाल्यागत शांत बसून घ्यायची मग थोड्या वेळाने काही झालेच नाहीये असे दाखवत अण्णांना जेवायला वाढायची. त्या काळानुसार नानींना चार अपत्ये होती. सुना, जावई, नातवंडे अगदी नातसुना, पणतू , पणती सुद्धा होते... त्या घरात येणारा प्रत्येक माणूस केवळ नानीच्या प्रेमाखातर आणि शक्यतो अण्णा बाहेर पडलेत किंवा झोपलेत असे पाहून यायचा.मी माहेरी गेले आणि नानींची चक्कर झाली नाही असे कधीही झाले नाही... माझ्या मैत्रिणीची आजी आणि माझ्या आजीची मैत्रीण असे दुहेरी नाते असल्याने नानी यायच्या,चार समजुतीच्या संसारी गोष्टी सांगायच्या.. म्हणायच्या,
"तुम्ही हल्लीच्या मुली कशा ग? कुणाशीच कसे जमत नाही तुमचे..?"
नानींना नवरा कमी की काय असा सासुरवास होता... त्यात सावत्र सासू म्हणजे दुस्वासात भरच....कदा बोलता बोलता त्या म्हणाल्या,
"दूध उतू गेलं म्हणून उलथने तापवून चटका दिला सासूबाईंनी..."
बापरे! माझ्या अंगावर सरसरून काटा आला, मी रागानेच म्हणाले,
"कश्याला केले हो तुम्ही हे असले संसार? सोडून निघून जायचे सरळ...."
माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नानी म्हणाली,
"कुठे?.. कुठे निघून जायचे?? माझे वडील जमदग्नीचा अवतार तुमचे अण्णा परवडले."
देवा रे !या मनुष्याहून अधिक संतापी प्राणी पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे?? कमाल आहे.. नानी पुढे म्हणाली,..
"अण्णा तसे मायाळू आहेत ग! फक्त त्यांचं बिनसलं की बिनसतं... मनात दाटलेला सगळा राग काढतात कुणावर तरी... जसे सापाला देवाने विष दिलंय तसा ह्यांना संताप... त्यात त्यांचा तरी काय दोष."
आम्ही सगळ्या उपस्थित आबालवृद्ध स्त्रियांनी नानीपुढे दंडवत घातला... काही भारतीय स्त्रिया त्यांचे मंदीर बांधावे इतक्या महान असतात, नानी त्यातलीच एक.
या वेळी मी माहेरी गेले तेव्हा नानी आजारी असल्याचे कळले आणि मीच त्यांना भेटायला गेले. अण्णा नव्वदी पार केलेले पण अजूनही सत्तरीचे वाटत होते... नानी मात्र गलितगात्र होऊन अंथरुणाला खिळली होती... तिच्या इवल्याश्या देहात असलेलं सगळं चैतन्य एकवटून ती नेहमीसारखी गोड हसली. आता चित्र अगदीच पालटले होते... अण्णांचा भित्रा ससा झालेला मी पहिल्यांदा पाहिला. काय झाले कसे झाले? चौकशी होईपर्यंत अण्णा चक्क सरबताचे दोन ग्लास भरून पुढ्यात उभे, मी भूत बघितल्यागत अविश्वासाने पाहत होते. अण्णा मृदू आवाजात म्हणाले,
"तुझ्यासोबत तरी घेईल ती थोडेसे.. दोन दिवस झाले जेवण जात नाहीये.."
अण्णांच्या डोळ्यांत पहिल्यांदा मी पाणी पाहिलं... मग आम्ही नानींना थोडे बसते केले... पाठीला भराभर जाऊन अण्णांनी मऊ उश्या लावल्या... आणि चमच्याने सरबत पाजू लागले. नानींनी क्षीण आवाजात विचारले,
"तुम्ही घेतलं का? अग बी पीची गोळी असते ह्यांना, अजिबात लक्ष देत नाहीत स्वतःकडे, उद्या मी गेल्यावर कसे होणार ह्यांचे??"
बास ! नानींचे ते शब्द ऐकले आणि अण्णा लहान मुलागत धाय मोकलून रडू लागले... नदीच्या प्रवाहाने पहाड खचताना मी पहिल्यांदाच पाहत होते. हात जोडून थरथरत म्हणाले,
"ऎकलंस ना! कसं बोलते पहा ही... ही निघून गेली तर माझं काय होईल? कसा जगू मी? सवय झाली होती ग आयुष्यभर मी संतापायचं आणि हिने सावरून घ्यायचं, कुणी कुण्णी नसतं ग माझ्यासारख्या फाटक्या तोंडाच्या माणसाचं... "
अण्णा डोळे पुसत आतल्या खोलीत निघून गेले.
नानी पुन्हा गोड हसत मला म्हणाली,
"बघा तुमचे अण्णा?? मी आजारी पडले आणि लहान मुल झालेत अगदी सतत उशाशी बसून असतात, कसला कसला जप करतात, माझं सगळं करतात... कधीतरी मांडीवर डोकं ठेऊन म्हणतात... तुम्ही जाऊ नका हो!... आता कसं व्हायचं बाई ह्या माणसाचं? म्हणून माझाही जीव सुटत नाही.."
माझे डोळे माझ्याही नकळत ओसंडून वाहत होते. नानी त्या जीवघेण्या दुखण्यातून पुढे बऱ्या झाल्या... आणि अण्णा मात्र आयुष्याचा धडा शिकले. कदाचित खूप उशीर झाला होता पण देवाने त्यांना एक सुरेख संधी दिली होती.. हृदयातील हळवा कप्पा उघडून पाहण्याची. खरेतर, उतारवयात नवऱ्याला बायकोसारखी दुसरी सोबत नसते.. ती कधी आई होत सांभाळून घेते तर कधी मैत्रीण होत आयुष्य अधिक आनंदी करते... 'ती'च खरी सखी , खऱ्या अर्थानं अर्धांगिनी असते... फक्त एक खंत वाटते की हे कित्येक पुरुषांना खूप उशीरा कळते. फार उशीर होण्यापूर्वी एकदा आपल्याही मनाचे असे काही कुलूप घातलेले बंद कप्पे असतील तर ते जरूर उघडून पहा.... तिथे खजिना नक्कीच सापडेल.
✒️ यशश्री रहाळकर