फॉलोअर

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ६ :- अनाहूत


स्पृहा आणि सौमित्र गेली सात आठ वर्षे एकमेकांचे परिचित.. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर गेली सहा वर्षे दोघेही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. हल्ली ह्या just chill, time pass किंवा move on प्रकारच्या casual relationship असतांना ... स्पृहा आणि सौमित्र मात्र त्यांच्या नात्याबद्दल खूपच गंभीर होते. एका पार्टीत "कॉमन फ्रेंड" च्या माध्यमातून पहिल्यांदा भेटलेले दोघे हळूहळू एकमेकांचे चांगले मित्र झाले नि वर्षभरात एकमेकांच्या प्रेमात पडले.. खरेतर दोघांचे स्वभाव टोकाचे भिन्न..स्पृहा प्रॅक्टिकल, सडेतोड , रॅशनल... थोडीशी फटकळ. तर सौमित्र हळवा, इमोशनल, जरा बुजरा आणि शक्यतो कुणाला न दुखावणारा भिडस्त.... कसं कोण जाणे पण दोघांचं जमलं.उंच, सडपातळ सावळीशी स्पृहा फार सुंदर नसली तरी कमालीची आकर्षक होती.. सौमित्र तुलनेनं गोरापान आणि देखणा.. जरासे सुखवस्तूपणाचे मूठभर मास चढलेला होता... C.A.पूर्ण झाल्यावर जरा जम बसेपर्यंत सौमित्रने वेळ घेतला... आणि लगेच स्पृहाला प्रपोज केलं... डान्स स्पेशल घेऊन M.A. झालेली स्पृहा जरासे वेगळे करियर निवडलेली स्वतंत्र मुलगी होती... सौमित्रने लग्नाचा विषय काढताच तिने वेळ मागून घेतला. तिचे भरतनाट्यमचे कार्यक्रम, देश विदेशातले दौरे ह्यासाठी तिला आवश्यक स्वातंत्र्य गरजेचं होतं.. जरा घाईघाईने सौमित्रने त्यांच्या दोघांच्या घरच्यांची भेट घालून देण्याचं ठरवलं.

स्पृहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाकडाची लेक... एव्हढेच नव्हे तिचे आईवडील सुद्धा एकुलते एक अपत्य.. त्यामुळे मावशी, काका, आत्या असे नातेवाईक नाहीत.. लहानसे कुटुंब.. घरी दोन आज्या आणि हे तिघे.... मॉडर्न विचारांचं टिपिकल उच्च मध्यमवर्गीय घर. सौमित्रच्या घरचे लोक मात्र ह्याच्या अगदीच दुप्पट.  सौमित्रला दोन मोठे काका. काका आणि त्याचे वडील अश्या तिघांनी मिळून एका मोठ्या प्लॉटवर तीन मजली बंगला बांधलेला... म्हणायला वेगळे पण दिसायला एकत्र. मोठ्या काका-काकीला मुलबाळ नसल्याने सौमित्रवर त्या दोघांचा विलक्षण जीव...सौमित्रची आई बँकेत नोकरीला असल्याने त्याला मोठ्या काकूनेच सांभाळलं. दुसऱ्या काकालाही दोन मुलीच.. त्याही त्यांच्या सासरी सुखाने नांदत होत्या. सौमित्र त्यांचा लाडका भाऊ. झालंच तर दोन आत्या, शेतीवाडी, येणारा जाणारा ह्यांचा घरात सतत राबता असायचा. घरचे प्रचंड गडगंज.. पण तितकेच कर्मठ रीतीभाती जपणारे. सौमित्रची आई सातारकडची... तिकडे मोठा जमीन जुमला, साखर कारखाना... 80 च्या आसपास वय असणारे आईवडील पण कर्ते सगळीकडे वचक असणारे. सौमित्रला एकूण चार मामा... त्याची आई सगळ्यांत धाकटी आणि तितकीच लाडकी... त्यामुळे सगळ्या बाजूंनी सौमित्र लाडका होता... त्याच्या लग्नाची मोठी स्वप्ने सगळे पाहत होते... त्याचे त्यांनी जमवल्याचे कळताच जरासे नाराज झाले पण "होऊ दे त्याच्या मनासारखं!"   म्हणत उत्साहाने तयारीला लागले. पहिल्यांदा पहायला म्हणून आले तर सौमित्रकडचे 30 लोक... स्पृहाची आई बावरून गेली. एकदम एव्हढी माणसं.. बापरे!

साधीशी साडी नेसून आलेली, फार चमचमीत मेकअप न केलेली... मोकळं बोलणारी स्पृहा सगळ्यांना पाहताक्षणीच आवडली.थोड्या ओळखी वगैरे उरकल्यावर थेट विषयाला हात घालत मोठे मामा म्हणाले,

"हल्ली पोरं आपापसांत जमवतात.. आपण काय आनंदाने स्वीकारायचं... थाटात बार उडवून देऊ काय म्हणता?"

स्पृहाच्या आईला सौमित्र आवडला होता मात्र ह्या इतक्या लोकांमध्ये आपल्या लेकीने जाणं आणि तिचं तिथे निभण म्हणजे अवघड वाटत होतं... त्यांनी आढेवेढे न घेता स्पष्टच आपली बाजू मांडली..

"आमच्याकडे फार माणसे नाहीत एव्हढ्या माणसांमध्ये रहायची, निगुतीने करायची माझ्या लेकीवर वेळच आली नाही... तशी तिला कामे सगळी येतात पण आजवर जबाबदारी कधी पडली नाही."

"आम्ही कश्याला आहोत मग? लेकीसारखं सांभाळून घेऊ.."
सौमित्रची आई प्रेमाने म्हणाली.

स्पृहाने आपले करियर, डान्सचे कार्यक्रम ह्याबद्दल स्पष्टपणे सांगून टाकले...त्यावर मोठ्या काकी अगदी मायेनं म्हणाल्या..

"तुझ्या सासूचं सगळं करीयर लग्नानंतरचे बरं! तिने बँकेच्या परीक्षा दिल्या पुढे पुढे जात राहिली.. आम्ही कुणी कधी आडकाठी केली नाही... तुझं काम म्हणजे तुझी नृत्यसाधना.. जरा वेगळं आहे मान्य पण कुणी अडवणार नाही कधीच तुला..."

"प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायचा हक्क आहेच की.."
सौमित्रची बाबा म्हणाले.

स्पृहासाठी हेच ठिकाण अगदी योग्य आहे ह्या मतावर स्पृहाचे बाबा आले आणि लग्न ठरले. फार काही अपेक्षाच नव्हत्या कुणाच्या... पण एकंदर सौमित्रचे कुटुंब आणि भरपूर माणसे पाहता मुलीकडच्यांना सोय करणे सोपे नव्हते म्हणून त्यांच्या गावी पारंपारीक पद्धतीने लग्नसोहळा करण्याचे ठरले. खर्चाचा वाटा स्पृहाच्या वडिलांनी स्वेच्छेने द्यावा ..;  मात्र सगळ्यांचे मानपान त्यांनी करावे हेही निश्चित झाले. स्पृहा त्यांचीही एकुलती एक लेक त्यामुळे त्यांनी साखरपुडा थाटामाटात आपल्याकडे करायचा प्रस्ताव मांडला... उभयपक्षी तो मान्य झाला आणि तारीख सुद्धा ठरली.

स्पृहाच्या वडिलांनी ग्रँड रॉयल हॉटेल बुक केले ... आपली मोजकी जवळची माणसे त्यांनी आमंत्रित केली. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी त्यांनीही काही स्वप्ने पाहिली होती... सौमित्र आणि स्पृहाने अगदी थोडक्यात रिंग सेरेमनी करायचं ठरवलं.... सौमित्रच्या घरच्यांनी देखील साखरपुडा त्यांच्या पद्धतीने होऊ देत म्हणून तयारी दर्शवली.... लग्न विधीवत होणार होतेच. स्पृहाला waterfall बॅकग्राऊंडला हवा होता त्याप्रमाणे स्टेज design झाला.. तिने फिश कट वन पीस ... सियांन रंगांच्या रंगछटा वापरून खास बनवून घेतला... त्यावर मोजके नाजूक डायमंडचे दागिने... तिने अंगठीही निलमची निवडली होती. सौमित्र देखील गडद निळा सूट घालणार होता... आधुनिक प्रथेप्रमाणे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या.. मग त्यांच्यावर फुलांची बरसात आणि खास थीम केक... समुद्र आणि शंख शिंपल्यांचा... सगळी ऑर्डर नक्की झाली... साखरपुड्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट बोलावून स्पृहा तयार होत होती... एव्हढ्यात सौमित्रच्या आजोळचे सगळे लोक दाखल झाले.. सावळी मुलगी बघून सौमित्रच्या मामींनी नाके मुरडली...सौमित्रची आजी येतांना नातसुनेसाठी महागडी पैठणी आणि चांगले ठसठशीत दागिने घेऊन आली होती... तिने आपल्या लेकीची चांगली खरडपट्टी काढली..

"ते लाख म्हणतील ग ! तुला कळत नाही का? असे झगे घालून का साखरपुडा होतो... नव्या सुनेचे पाय धुवावे ओटी भरावी ... हे काय ? आपल्याच धर्माचीच आहे ना पोर?? तिला म्हणा तिचे तिच्या घरी ठेव"

आजीचा सूर चांगलाच चढला ... भराभर सगळे स्वरूप पालटले... चौरंग मांडण्यात आला आणि स्पृहाला साडी नेसून येण्याचे फर्मान निघाले... स्पृहाचा चांगलाच हिरमोड झाला.. तिचा उतरलेला चेहरा पाहून आई म्हणाली..

"बघ ! म्हणून तुला म्हणत होते एव्हढी माणसं म्हणजे प्रत्येकाशी जमवून घ्यावे लागेल... माझं पटतं का काही तुम्हा बाप लेकीला?"

स्पृहा हट्टाने तशीच उदास बसून होती.. शेवटी सौमित्र येऊन गयावया करू लागला...

"थोडा वेळ साडी नेस स्पृहा ... please माझ्यासाठी...💝आजीचे किती दिवस राहिलेत.. तिच्याही मनाने होऊ दे... फक्त थोडा वेळ... नंतर लगेच आपण रिंग सेरेमनी करूयात..."

कशीबशी स्पृहा तयार झाली... विधीवत साखरपुडा झाला... तिला पुन्हा साडी बदलून पैठणी नेसून येण्यास सांगितले...  ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीत बराच उशीर झाला... सगळ्यांना जोडीने नमस्कार मग प्रत्येकासोबत फोटो ह्या वेळात सगळे आमंत्रित जेवून परतले सुद्धा... स्पृहाला तिचा वन पीस घालायला सवडच मिळाली नाही तसेच पैठणीवर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. रिंग सेरेमनी चा विधीवत वाङ्निश्चय झाला... आजीबाई खुश झाल्या... पण स्पृहा मनांतून चांगलीच दुखावली गेली असणार... हे तिला चांगलेच ओळखणाऱ्या सौमित्रच्या नजरेतून सुटले नाही... एकाही फोटोत तिने साधी smile सुद्धा दिली नाही... केवळ उपचार म्हणून तिने सगळे उरकले. रात्री घरी परतल्यावर त्याने स्पृहाला सविस्तरपणे माफी मागणारा मेसेज केला... तिने त्याच्या शब्दाचा मान राखून साडी नेसली ह्याबद्दल देखील तिचे कौतुक केले... वेळेला ती त्याला आयुष्यभर साथ देईल ही खात्री असल्याने तो स्पृहाच्या अधिकच प्रेमात पडला असल्याचेही त्याने text केले...  आता ती काही दिवस तरी रुसून बसणार, ह्याची त्याला खात्रीच होती. सौमित्रने तिला शांत व्हायला थोडा वेळ देण्याचं ठरवलं.

लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होत... पुन्हा प्रवासाची दगदग नको म्हणून आजी बाईंनी सौमित्रकडेच तळ ठोकला होता.... शिवाय जातीने सगळ्या बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्या ती अगदी नीटनेटकी करणार होत्या. लहान मोठ्या गोष्टी लगेच स्टेटस वर अपडेट करणाऱ्या स्पृहाने आठ दिवस झाले तरी सोशल मीडियावर आपल्या एंगेजमेंटचे अपडेट केलेलेच नव्हते.. सौमित्रनेच मग fb वर त्यांचा अंगठ्या घालतांनाचा फोटो शेअर केला आणि स्पृहाला टॅग केलं.  थोड्याच वेळात स्पृहाने तो टॅग remove केलेला त्याला दिसला... तो मनातून खूप दुखावला पण स्पृहाची नाराजी त्याला कळत होती. हल्ली तिने त्याचे फोन घेणे सुद्धा कमी केले होते... स्वतःहून फोन करणे तर तिनेच केव्हाच बंद केले होते... जेव्हढ्यास तेव्हढं कामापुरतंच ती बोलायची. सौमित्रने अनेकदा तिला फिरायला जाण्याविषयी किंवा डिनरला जाण्याविषयी विचारले पण ती वेळ नसल्याची सबब पुढे करायची..... दागिन्यांच्या खरेदीच्या वेळी स्पृहाला फोन केला असता ..

"मला काय कळतंय त्यातलं? तुम्हीच आवडीप्रमाणे घ्या."

असे उत्तर तिने दिले. कपडा खरेदीच्या वेळेलाही वेळ नाही ही सबब पुढे केली. दोघांचं काहीतरी नक्कीच बिनसलं आहे हे फक्त सौमित्रच्या मोठ्या काकींच्या लक्षात आलं... बाकी सगळे लग्नाच्या गडबडीत व्यस्त होते. स्पृहाच्या नृत्यसाधना अकॅडमीचा कार्यक्रम एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात बँगकॉकला ठरला आणि ती त्या धावपळीत व्यस्त झाली... जाण्यापूर्वी भेटीला म्हणून आलेल्या स्पृहाला आजी म्हणाल्या..

"काय नाच गाणं बाकी असेल ते करून घ्या... मग आयुष्यभर आमच्या सौमित्रच्या तालावर नाचायचं आहे."

स्पृहा काहीही उलट न बोलता... शांतपणे घरी परतली. खरेतर लग्न अगदी तोंडावर आले असतांना.. हा कार्यक्रम तिने टाळावा असे सौमित्रच्या घरच्या मंडळींचे मत होते.. पण तिने परवानगी मागितली कुठे होती?ती थायलंडला रवाना झाली आणि नंतर तिने सौमित्रशी असणारा उरला सुरला संपर्कही तोडून टाकला... तो वेड्यापीश्यागत सैरभैर झाला... तो सतत तिला कॉल करायचा आणि ती शांतपणे त्याचा कॉल कट करायची... व्हाट्स अँप वर त्याने मेसेजेसचा रतीब घातला पण तिने उत्तर दिलेच नाही. एके दिवशी सकाळी तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचा बांध फुटला.. आपल्या काकींच्या मांडीवर डोके ठेवून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो रडू लागला.. काकीने त्याला समजावले .. की त्या बोलतील स्पृहाशी ,समजावतील तिला...

"काय रे तुम्ही ही हल्लीची मुले !"

म्हणत त्यांनीही कॉल करण्याचा प्रयत्न केला पण स्पृहाने उत्तर दिले नाही.. फक्त एक मेसेज पाठविला

"परत आल्यावर सविस्तर बोलूया!"

सहा दिवसांसाठी गेलेली स्पृहा परतली नाही उलट तिथूनच ती बालीला फिरायला निघून गेली. हेही सौमित्रला त्यांच्या एका कॉमन फ्रेंड कडून कळले... ती बालीला गेल्याचे आणि तिथे एन्जॉय करत असतांनाचे ढीगभर फोटोज् तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हा काय प्रकार आहे? हे त्याला कळेना.. कारण लग्नानंतर आठ दिवसांनी दोघांनी बालीला हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार सगळे बुकिंग वगैरे करूनही झाले होते. स्पृहाला समुद्र खूप आवडायचा म्हणून त्या दोघांनी मिळून हे ठिकाण नक्की केलं होतं.स्पृहा आपल्याला टाळतेय का? सौमित्रला काही सुचनासं झालं... सगळीकडे वाटलेल्या लग्नपत्रिका, तिच्यासोबत पाहिलेली आयुष्याची स्वप्ने, तिच्या आवडी , दोघांच्या गप्पा सारं सारं त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं... स्पृहाच्या मनात काय आहे हे तिनं घडाघडा बोलून टाकावं , आपण माफी मागू हवं तर आणि सगळं सुरळीत व्हावं एव्हढंच त्याला वाटत होतं. पाच सहा दिवसांनी स्पृहा परत आली.. हेही त्याला कळवण्याचे कष्ट तिने घेतले नाही... लग्न आठ दिवसांवर आलं.. व्याही भोजनाचं आमंत्रण करायला मोठे काका-काकी निघाले...

"आज काय ते स्पष्टच बोलतो.."

असे मनाशी ठरवून सौमित्र देखील त्यांच्याबरोबर निघाला.
स्पृहाच्या घरी अगदी शांतता होती आठ दिवसांवर लग्न आले असल्याची, लग्नघरातील धावपळ गडबड काहीच दिसत नव्हते... स्पृहा अगदी शांतपणे बाहेर येत टोकाच्या कोरड्या आवाजात म्हणाली..

"मला नाही वाटत हे लग्न करून मी सुखी होईन... "

तिने पैठणी, दागिने आणि साखरपुड्याची अंगठी परत केली.. काका मटकन खालीच बसले...
स्पृहाच्या बाबांकडे पाहत म्हणाले ...

"अहो काय समजायचं काय आम्ही? आठ दिवसांवर लग्न आलंय.. सगळीकडे पत्रिका वाटल्या गेल्या आहेत..."

त्यांना शांत राहण्याची खूण करत काकी समजावण्याचा सुरात म्हणाल्या..

" स्पृहा बेटा! अशी घाईने निर्णय घेऊ नकोस. सौमित्रच खूप प्रेम आहे तुझ्यावर.. त्या दिवशी तुला जबरदस्तीनं ही पैठणी नेसावी लागली... आमचं चुकलं .. हवं तर मी माफी मागते... आपण बोलूया शांततेनं..."

तटकतोड पणानं स्पृहा म्हणाली...

"प्रेम माझंही होतच ना! पण म्हणून मी त्याच्यावर काहीही लादलं नाही. त्या दिवशी सौमित्रने माझी बाजू घ्यायला हवी होती.. प्रश्न पैठणी किंवा वन पीस हा नव्हताच प्रश्न होता साथ देण्याचा..."

सगळे मूग गिळून गप्प बसले होते.. एखाद्या तोफेतून आगीचे लोळ बाहेर पडावेत तशी स्पृहा बोलत सुटली..

"आजीचे म्हणाल ना तर मलाही दोन्ही आजी आहेत .. आणि मी त्यांचं मन जपते योग्य वेळी.. पण म्हणून माझ्या जोडीदाराने ते जपत का बसावे?? त्या दिवशी आजीचे मन मोडायला नको म्हणून सौमित्रने मला ऍडजेस्टमेंट करायला सांगितली.. उद्या अजून कुणासाठी , पर्वा अजून कुणासाठी... मला हे शक्य नाही..
मी पूर्वीच त्याला सांगितलं होतं .. अगदी स्पष्टपणे."

एव्हाना सौमित्रचे डोके भणाणू लागले होते... आवाज वाढवत तार सप्तकात तो ओरडला..

"इतके दिवस तुला हेच समजवून सांगायचं प्रयत्न करतोय ना! पण तुला बोलायचं नाहीच आहे... तुझी इतके वेळा मी माफी मागितली... तू म्हणशील ती शिक्षा मला मान्य आहे त्यासाठी..."

"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही सौमित्र ! मी तुझी बायको झालेली नाही... आणि खरं सांगायचं तर मला व्हायचंही नाही... तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन ? असा मूर्ख प्रश्न मला पडला होता.. तोच सोडवायला मी मस्त एकटी फिरून आले... तुझा फोन नको, मेसेज नको आणि आठवणही नको...
And see... मी खूप मज्जेत ...आनंदात आहे."

काका-काकींनी तिच्या आईबाबांशी बोलून ह्यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला... त्यांनी स्पृहाला समजावून सांगावे असेही त्यांनी सुचवले... तास दोन तासांच्या चर्चेनंतर स्पृहा ठामपणे म्हणाली..

"मला नाही वाटत आता काही बोलायचं उरलं आहे.. माझ्याकडून हे लग्न मोडलं..."

आणि ती तरातरा आतल्या खोलीत निघून गेली.नाईलाजाने काका-काकी आणि सौमित्र जायला निघाले.. स्पृहाच्या आईने ,"पैठणी दागिने आणि अंगठी वगैरे नीट पाहून घ्या नंतर वाद नको " असे सुचवले.काकीने जड मनाने ते उचलले.. सगळे घरी आले.. नेमकं काय झालं कुणाला कळेना.. पैठणी आजीसमोर भिरकावत सौमित्र म्हणाला..

"झालं तुम्हा सगळ्यांच समाधान... माझं लग्न मोडलं आहे... पैठणी नेसवताहेत.. नेसवा अजून नेसवा ..." 

म्हणत वाट्टेल तसं बडबडत तो त्याच्या खोलीत निघून गेला.पुन्हा घरी तोच विषय सगळे संतापले होते.. मामा तर म्हणालेही .....

"त्या पोरीला काय सोनं लागलंय का तिच्याहून सरस मुलगी मिळेल सौमित्रला.."

सौमित्रची काकी मात्र मनातून हादरली होती... सौमित्र ह्या मुलीत खूपच गुंतला असल्याचं तिला पुरतं माहीत होतं.. सकाळपर्यंत सौमित्रने खोलीचे दार उघडले नाही... सगळ्यांचीच मनःस्थिती बरी नव्हतीच.. शेवटी जेवायच्या वेळेला बोलवायला म्हणून गेलेल्या काकी घाबरत म्हणाल्या..

"तो दार उघडत नाहीये.. दार तोडा मला वेगळीच भीती वाटतेय..."

त्यांची भीती खरी होती.. दार तोडल्यावर सौमित्र अर्धमेल्या अवस्थेत सापडला.. खोलीभर त्याने त्याचे आणि स्पृहाचे फोटो पसरून ठेवले होते... स्पृहाशिवाय जगणेच मान्य नसल्याचेही त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिचवल्याने त्याचा मेंदू बधिर झाला होता.. हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत होते...तोंडात मारल्यागत आजी देवापुढे हात जोडून बसली होती...नेमकं कुणाचं चुकलं होतं माहीत नाही? पण अनाहूतपणे आलेल्या ह्या वादळाने सारं घर उध्वस्त झालं होतं.

✒️ यशश्री रहाळकर


शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ५ :- विदीर्ण


जवळपास सहा वर्षांनंतर ...अभिषेक व्यसनमुक्त होऊन केंद्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचं वय 25 वर्षे होतं, शिक्षण अपूर्ण .. मॅट्रिक नापास.. केंद्रात थोडे फार काम करवून घेतले होते. त्यातूनच त्याला गाड्या दुरुस्त करण्याची आवड निर्माण झाली होती... मालती ताईंनी शब्द टाकून त्याला एका ITI कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दिली होती. सकाळी कॉलेज असायचे, दुपारी 2 ते 7/ 8 वाजेपर्यंत तो एका गॅरेजला काम करायचा.. रात्री थकून झोप चटकन लागायची... आणि थोडे पैसेही मिळायचे... तसा प्रश्न पैश्यांचा कधी नव्हताच. उलट गरजेहून जास्त मिळालेल्या पैश्यांचा होता... मालती ताईंनी त्याच्या आईवडिलांना ,

"अभिला पैसे पाठवून मारण्यापेक्षा विष का देत नाहीत तुम्ही? "

असा थंड डोक्याने प्रश्न विचारल्यावर त्याच्यावर होणारा पैश्यांचा पाऊस थोडा घटला होता.. पण आता त्याला ते पैसेच नको होते. केंद्रातून बाहेर पडल्यावर औरंगाबादला आजीच्या जुन्या घरात रहायचा निर्णय त्याने कळवून टाकला. आजी ... त्याच्या वडिलांची आई ...; एकटीच तर राहत होती तिनेही होकार दिला ... तशी थोडी भीती तिलाही वाटली असेल पण नातवाच्या प्रेमापुढे कदाचित तिची भीती दुबळी ठरली. दोघांनाही एकमेकांची सोबत झाली.. तशी अबोल सोबत म्हणायची कारण अभि फारसा बोलत नसायचा .. मात्र आजी सांगेल ती सगळी कामे चटाचटा करायचा..भाजी आणून देणे, दळण आणणे, बिल भरणे वगैरे वगैरे. दर पाच दिवसांनी मालती ताईंचा फोन यायचा तेव्हा मात्र अर्धा तास मोकळेपणाने बोलणे व्हायचे.. मालती ताई सप्रे म्हणजे त्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका... स्वतःचा तरुण लेक व्यसनाला बळी पडल्यानंतर तरुण मुलांच्या व्यसनमुक्तीला सर्वस्व वाहून घेतलेली प्रेमळ माऊली. अभिषेक नेहमी मालती ताईंना म्हणायचा..

"तुम्ही माझ्या आई का नाही हो झालात?"

त्यावर मालती ताई म्हणायच्या, "तू ज्या दिवशी व्यसनमुक्त होऊन नीट आयुष्य जगू लागशील त्या दिवसापासून मी तुझी आई असेन!"

आता ह्या माऊलीच्या शब्दांखातर तो नीट वागू लागला.. पौगंडावस्थेत जडलेल्या व्यसनावर त्यानी मोठ्या धैर्याने मात केली.. एक चांगलं आयुष्य जगायचे वचन मालती ताईंना देऊन तो केंद्रातून बाहेर पडला. त्याचं आयुष्य साचलेलं डबकं असलं तरी ह्या सहा सात वर्षांत सगळ्यांची आयुष्ये धावत पुढे गेली होती.. आधीच त्याच्या आयुष्याची काय कमी फरपट झाली होती ?? ..आता त्याला कुणाच्याच पाठी धावायचे नव्हते तर स्वतःच्या गतीने एक शांत आयुष्य जगायचे होते. आई किंवा बाबा कुणाचाही फोन आलाच तर तो न बोलता आजीकडे देत असे... स्वतःला शांत आणि आनंदी ठेवायचे सगळे प्रयत्न तो करणार होता.. तसं त्याने मालती ताईंना वचनच दिलं होतं. 

रविवार मात्र त्याच्या अंगावर येई.. मग तो सरळ वाट फुटेल तिकडे चालून थकला की परत येई... बाकी बाह्य जगाशी त्याने फारसा संबंध ठेवलाच नव्हता, त्यापेक्षाही त्याला तो नकोच होता... नको ती स्पष्टीकरणे, नको ते प्रश्न आणि नको ते त्याच त्याच जळजळीत जाणिवांचे न सुटणारे कोडे.
जळजळीत भावनेसरशी त्याला आतडी जाळून टाकणाऱ्या दारूची तीव्र तलफ आली.... थोडी थोडकी नाही तर गेली आठ नऊ वर्षे तो ऍक्टिव्ह अल्कोहोल ऍडिक्ट होता... हळूहळू कमी करत करत त्याने बऱ्याच निग्रहाने त्यावर नियंत्रण मिळवले होते पण संयम बरेचदा डगमगायचा. अश्या वेळी तो मालती ताईंना फोन करायचा, अधून मधून केंद्रात जाऊन व्यसनमुक्तीच्या प्रवासातील आपले अनुभव सांगायचा. बरेचदा अदालत रोडवर चालत निघायचा आणि फॅमिली कोर्टातील एखाद्या सेशनला जाऊन बसायचा. 

"टी. व्ही. / सिनेमातील खोटी खोटी पात्रे पाहण्यापेक्षा ही खरीखुरी पात्रे अधिक मनोरंजक असतात .." 

असे नेहमीच त्याच्या मनात यायचे... तशीही आयुष्यातली बरीच वर्षे त्यानेही कोर्टात खेटे घालून घालूनच संपवली होती. तिथे त्याला एकप्रकारे उबदारपण जाणवे... सगळ्या मनाच्या आठवणींनी पार चिंध्या केल्या की त्या गोळा करून तो परत येई. हे ऐन पौगंडावस्थेत भोगलेलं हलाहल  आतपर्यंत जाळत गेलं की त्याची दारूची तलफ आपसूक भागत असे.

आजही तो असाच उध्वस्त मनाने फॅमिली कोर्टात येऊन कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसता झाला... दोन मुलांच्या कस्टडीची केस होती... आई आणि वडील विभक्त झाले होते, दोघांनाही लग्ने करायची होती आणि ही मुले नावाची ब्याद कुणालाच नको होती.. दोघेही त्यासाठी पैसे मोजायला तयार होते... अभिला गलबलून आलं... मनाचा दगड झालेल्या त्या 8/9 वर्षाच्या मुलाकडे त्यानं पाहिलं... बिच्चारा! मुलांना कुणाकडे जायचं आहे असे कोर्टानं विचारलं... ह्या प्रश्नाचं उत्तर किती कठीण असतं...? नवरा बायकोचे वाद टिपेच्या सुरात वाढले आणि कोर्टाने पुढील तारीख दिली. अभिषेक बाहेर पडला.. गेट शेजारच्या टपरीवर चहा पिऊ लागला.. त्या निष्पाप पोराच्या जागी तो स्वतः उभा असल्याचं त्याला दिसलं... चालत घरी परत निघाल्यावर त्याचं मन मात्र कधीच भूतकाळात चालतं झालं होतं.

तो लहान असतांना... किती छान ,गोड ,सुखी संसारासारखं चित्र होतं त्याच्या घराचं... त्याचे आईवडील दोघेही उच्चशिक्षित मोठ्या पदावर कार्यरत.. घर कसलं भला मोठा बंगला, गाड्या , नोकर चाकर सारं वैभव जन्मजात त्याला मिळालं. वडील ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये अधिकारी तर आई LIC मध्ये चांगल्या पोस्ट वर.... एकुलत्या एक अभिषेककडे सगळे सगळे होते फक्त आईबाबांचा सहवास सोडून...दोघेही त्यांच्या कामांच्या व्यापात मिटींगमध्ये बुडालेले... दोघांचे वाद भांडण कधीही  झाले नाही ...पण जोपर्यंत चोपडे साहेब प्रकरण उद्भवले नव्हते.... फक्त तोपर्यन्त.

शहरातल्या उच्चभ्रू पालकांची मुले जायची त्या शाळेत अभिषेकला घातले होते. लहानपणापासून आपल्याला छान मार्क मिळाले ,बक्षीस मिळाले की मम्मी पप्पा खुश होत असत हे त्या चिमण्या जीवाला कळले होते... त्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असायची.  सरळमार्गी अभिषेक घर, शाळा, क्लासेस मध्ये व्यस्त असायचा... अधून मधून सुट्टीत तो औरंगाबादला जायचा किंवा आजीआबा त्याच्याकडे येत. 

तो दहावीला होता तेव्हाची गोष्ट... एक दिवस मम्मी घरी येतांना भला मोठा पिझ्झा बॉक्स घेऊन आली... तिच्यासोबत कुणीतरी साहेब होते... त्यांना ऑफिसचे महत्वाचे काम करायचे होते... आईने अभिला पाचशेची नोट देत ,"बाहेर फिरून ये , मित्रांसोबत मज्जा कर ." असे सांगितले. पहिल्यांदा त्याला काहीच वाटले नाही पण हळूहळू  हे असं बरेचदा घडू लागलं. अर्धवट वयात असणाऱ्या अभिला हे खटकत होतं पण नेमकं काय खटकतंय हेही कळत नव्हतं. पुढे त्या साहेबांचं नाव चोपडे साहेब असून.. ते नवीनच बदलून आल्याचेही कळलं.  काळा ,दांडगट रेड्यासारखा चोपडे त्याला अज्जिबात आवडला नव्हता.. त्याच्याकडे येणाऱ्या पाचशेच्या नोटांची संख्या हळूहळू बरीच वाढू लागली... तसे त्याच्या भवती फुकट्या, वाया गेलेल्या मुलांचे टोळके बनले... त्याचा बराचसा वेळ मॉल ,सिनेमा ,गेमझोन मध्ये जाऊ लागला. सहज उत्सुकता, गंमत म्हणून आणि खिशात बक्कळ पैसा खुळखुळत होता म्हणूनही अश्याच एका मित्रासोबत तो पबला गेला.. पहिल्यांदा त्याने दारू चाखली..... मग वाईन, बिअर, व्हिस्की, रम... नावं फक्त वेगळी.... अभिला दारूची चटक लागली. गंमत म्हणून खेळलेला जुगार , कसिनो, कार्ड्स तो सहज जिंकायचा.. मग काय अजून पैसे अजून दारू. सांभाळायची अक्कल नसतांना मिळालेला पैसा अधिकाधिक दुर्दैवाकडे फेकत जातो..अभि वाहावत गेला.

 एक दिवस जवळचे पैसे संपले म्हणून पैसे घ्यायला घरी परत आलेल्या अभिने त्याच्या जवळील लॅच की ने दार उघडले. घरांत कुणाचा तरी दबलेला आवाज त्याला ऐकू आला... म्हणून शोधाशोध करत असताना... त्याने चोपडे आणि त्याच्या मम्मीला नको त्या अवस्थेत पाहिले.
त्याच्या पायाखालची जमीन सरकली... आजवर मिळणाऱ्या पाच -पाचशेच्या नोटांचे अर्थ क्षणभरात त्याला कळले. हे सगळे पप्पांना कळू नये म्हणून पुन्हा नोटांवर नोटा त्याला मिळू लागल्या... त्याला स्वतःचीच किळस वाटू लागली... आणि तो अधिकाधिक व्यसनाच्या विळख्यात सापडला... अपेक्षेप्रमाणे दहावीला तो नापास झाला. कधीतरी वडिलांनाही चोपडे प्रकरण कळलं... आणि मग सुरू झाली धडपड एकमेकांना नामोहरम करण्याची. मम्मी त्याच्या पप्पांना डिव्होर्स द्यायला तयार नव्हती... आणि चोपडेला सोडणेही तिला मान्य नव्हते... फॅमिली कोर्टात केस उभी राहिली.. वडिलांनी आईवर व्यभिचाराचा आरोप केला होता.. तो खरा असला तरी त्याचे असे सार्वजनिक वाभाडे निघायला नको होते. तुफान पेपरबाजी झाली... ह्या आंबट बातमीला मसाला चोळून पुढे करण्यात आले... त्यात कधीतरी अभिने त्यांना रंगेहात पकडल्याचेही वडिलांनी पुढे केले... त्यालाही साक्षीला बोलवण्यात आले...

सतरा अठरा वर्षाच्या त्या पोराच्या मनाचे काय झाले असेल?? कुणीही विचार केला नाही. अभिच्या जगात तो टिंगलटवाळीचा विषय झाला होता... त्याची पाठ वळली की मुले "चोपडे कुठे आहे रे?"  असे ओरडायचे. एकदा तर एकाशी त्याची मारामारी झाली आणि तो मुलगा थेट म्हणाला..

"तुझ्या आईचे आधीचे बॉस पण घरी यायचे का रे?? तू तुझ्याच बापाचा आहेस ना?"

अभिने त्याला अर्धमेला होईपर्यंत तुडवला.. अखेर पोलिसांनी त्याला उचलून चार दिवस कोठडीत ठेवले. चार वर्षांनी डिव्होर्स झाला आणि आई वडिलांनी वाटा वेगळ्या झाल्या.. वडिलांनी दुसरे लग्न केले.. आईने तसेच राहायचे ठरवले... आणि अभिषेक बाटलीत बुडून गेला... विचारांच्या गर्तेत घर कधी आलं त्याला कळलंच नाही. घरात अंधार होता.. आजी म्हणाली,

"आपलेच लाईट गेले रे ! काही कळत नाहीये."

अभिने थोडी खटपट केली आणि दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघालं. त्याने आजीला प्रसन्न हास्य देत .. हातानेच थांबवलं 

"उशीर झालाय ना! आता काही करत बसू नकोस.. मी मस्त तुझ्या आवडीची पावभाजी आणतो." 

पिशवी घेत पायात चपला सरकवीत तो निघालाही. आजी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली... तिला अजूनही समुपदेशनाच्या वेळेचं त्याचं टाहो फोडून रडणं आठवत होतं..

"प्रत्येकासाठी आपली आई गंगा असते... पवित्र, सुंदर. तिची अशी गटारगंगा झाल्याचं पाहिलं आणि मी बाटलीत बुडत गेलो."

अभिषेकचे सुदैव म्हणायचे की त्याच्यासाठी मालती ताईंसारखी समुपदेशक होती, मार्गदर्शक होती.. पण सोन्यासारखं आयुष्य विस्कटलं .. त्याचं काय?

✒️ यशश्री रहाळकर

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ४ :- काटेरी फुलांच्या वाटा


राघवचा पोलीस कोठडीतील आज दुसरा दिवस... आयुष्यात हातात बेड्या पडण्याची वेळ आपल्यावरही कधीतरी येईल... ह्याचा पापभिरू राघवने स्वप्नातही विचार केला नव्हता. बेदम माराने अंगाची रेषन् रेष ठणकत होती... नेमका कोणता अवयव सुजलाय हेही कळेनासं झालं होतं.... डोळा काळानिळा झालेला, पाठ हात-पाय बधिर झालेले... तहानेने कमी आणि भीतीने अधिक शोष पडलेला घसा... ग्लानीतच बिचारा झोपून गेला... दुसऱ्या दिवशी शनिवार म्हणजे अजून दोन दिवस तरी त्याला बेल मिळणार नव्हती. डोळे मिटताच त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यात पहिल्यांदा पैठणी नेसून सुरेख नटलेली आई आणि तिच्याच पैठणीला मॅचिंग कुर्ता घालून तयार झालेले बाबा उभे राहिले... काय काय स्वप्न असतील ना त्यांची? सुखी ,समाधानी ... आनंदाने उजळलेले त्यांचे चेहरे आठवले आणि राघव खाडकन जागा झाला... काय वाटत असेल त्यांना? कोणता नरक जिवंतपणी भोगत होते ते... आपणच ..आपणच ह्याला जबाबदार आहोत... क्षणभर त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार थयथयाट करून गेला... पुन्हा दुसऱ्या मनाने त्याला समजावले... आपला खरंच दोष आहे का? सुलक्षणाचं नेमकं काय झालं?? हे कळेपर्यंत मुक्ती नाहीच... त्याशिवाय सुटका शक्यच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो रेडा सदृश्य हवालदार कोठडीत आला... त्याने ओढतच राघवला खुर्चीत बसवलं... कुणीतरी ऑफिसर आला असावा.. तो तुलनेने सभ्य होता... राघवला चहा दिला .. शांतपणे त्याच्याकडे पाहत पुन्हा तेच प्रश्न पण मवाळ सुरात विचारू लागला..

"हे बघा साहेब.. जंटलमन दिसता तुमी राव! एव्हढे शिकलेले हुश्शार... तुमचा त्रास आन आमची कटकट कायला वाढवता.. चटाचटा सांगून सोडा की .. काय केलंत त्या पोरीचं?? पोरीचा मॅटर हाय...लै डेंजर! "

राघव पुन्हा तेच सांगू लागला... कारण तेच सत्य होतं...

"सुलक्षणा कुठे गेली माहीत नाही. आम्ही सकाळी उठलो तर ती घरात नव्हती... तिने कसलीच चिठ्ठी, मेसेज, ई-मेल काहीही पाठवलेलं नाही... ती आत्ता कुठे आहे हे मला माहित नाही." 

साहेब वैतागला... इतका मार खाऊन सुद्धा ह्याचं उत्तर तेच ... रेडासदृश्य हवालदाराला खूण करून तो बाहेर पडला... हवालदाराने पुन्हा आपली काठी उगारत राघवच्या पार्श्वभागावर बडवणे सुरू केले. मार खातांनाही राघवला बालपणीची आठवण झाली.. त्याच्या आईने कधीही त्याला साधी चापटही मारली नव्हती... त्या मानाने धाकटे बंधुराज कृष्णाने बराच मार खाल्ला होता... कृष्णा तसा उपद्व्यापीच होता... शाळा , कॉलेजमध्ये देखील राघव पुस्तकी कीडा म्हणून ओळखला जात असे.. कुणाशी भांडणे , मारामारी तर दूरची गोष्ट साधे वाद घालणेही त्याला जमत नव्हते... आईवडिलांच्या कष्टाची त्याला पूर्ण जाण होती.. लवकरात लवकर पायावर उभे राहायचे आणि घरात हातभार लावायचा हीच सतत धडपड तो करत असायचा. पॉलिटेक्निक पूर्ण होताच.. त्याने मिळेल ती नोकरी धरली पुढे BE, MBA त्याने नोकरी करत करत पूर्ण केले. नवा 2 BHK फ्लॅट घेतला तेव्हा तर आईवडिलांना आभाळ ठेंगणे झाले... चाळीतल्या भाड्याच्या दोन खणी घरातून थेट हा प्रशस्त फ्लॅट म्हणजे त्यांच्या आयुष्याचे सार्थक होते. आयुष्यभर छोटेसे स्टेशनरी दुकान चालवणारे वडील आणि पडेल ती कष्टाची कामे करणारी आई... ह्यांच्यासाठी त्यांची दोन मुले राघव आणि कृष्णा सर्वस्व होते. हवालदाराची ड्युटी संपली असावी.. त्याने मारणे आवरते घेतले... नवा हवालदार आला तसे त्याने खुणेनेच "काय झालं?" असं विचारलं असता ..

"गेंड्याच्या कातडीचा निब्बार गडी हाय.. कालपासून बडवतोय.. पन उत्तर काही देत नाही..."

"काय रं बाबा! चांगल्या घरचा दिसतोय... बोल की पटापटा.." 
नवीन हवालदार म्हणाला..

दोघेही नकारार्थी मान डोलवत कोठडी बाहेर पडत तंबाखू मळू लागले.. अकरा वाजताच्या सुमारास राघवचे वडील डबा घेऊन आले ... पोलिसांच्या हातापाया पडून ..

"माझा पोरगा गरीब आहे साहेब.. सोडा त्याला आम्ही काही केलं नाही... त्याला जेवण तरी देऊ द्या म्हणून गयावया करू लागले..."

त्यांना शिव्यांची लाखोली मिळत होती... इकडे राघवच्या हृदयाचे पाणी पाणी झालं... सोमवारी खटपटी करून कृष्णाने बेलवर राघवला घरी आणलं... तेव्हा तो जेमतेम जिवंत होता.. तडक डॉक्टर गाठत उपचार सुरू झाले..
 कृष्णा भयंकर संतापला होता...
 
 "ही काय पद्धत आहे चौकशीची जिवानी जायचा एखादा.."

पंधरा दिवसांनी थोडा बरा होताच... राघवला कोर्ट गाठावं लागलं... रोज सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागे.. त्याला शहराबाहेर पडण्यास मनाई होती. राघवची नोकरी गेली.. स्वप्नांचे घरकुल अखेर विकावे लागले... सारे होत्याचे नव्हते झाले... राघव ह्या साऱ्यात स्वतःला जबाबदार मानत होता तर त्याचे आईवडील आपलीच निवड चुकली म्हणत स्वतःला दोषी मानत होते.. हसत्या खेळत्या घरकुलात सगळे एकमेकांपासून डोळे चोरत होते.. प्रत्येक जण सुलक्षणाचा विषय काढायचे टाळत होते..मूळ समस्येपासून पळत होते... एकच व्यक्ती खंबीर तटस्थ मनाने ह्या साऱ्यात उभी राहिली.. ती म्हणजे राघवचा धाकटा भाऊ कृष्णा.. कृष्णाचे आपल्या दादावर विलक्षण प्रेम होते.. साधी माशी सुद्धा आयुष्यात मारली नाही तो आपला दादा ह्या प्रकरणात दोषी असूच शकत नाही ... आता हे प्रकरण उकरून काढण्याशिवाय पर्याय नाही हेही त्याने पक्के केले. घरात सगळ्यांना एकत्र बोलावून तो ठामपणे म्हणाला..

"दादा.. किती दिवस आपण हे असं जगायचं आहे?? ... आपला काहीही दोष नसतांना... आपण का भोगायचं??"

"नशीब फिरलं आपलं .."  म्हणत आईने पदर डोळ्यांना लावला.

"किती दिवस असं नशिबावर हवाला देऊन बसायचं??"

"हात दगडाखाली आहेत आपले... शांत राहा"
गरीब बिचारे बाबा काळजीपोटी कळवळून म्हणाले.

"मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे.. काय व्हायचे ते होऊ देत!.. तसंही आता याहून वाईट काय होणार म्हणा..."
कृष्णा तणतणत घराबाहेर पडला... कृष्णाची धडपड, त्याचं प्रेम आणि आत्मविश्वास ह्याने सगळेच भारावून गेले. राघव कृष्णाची वाट पाहत दारातच बसला होता.. तो येताच त्याने कडकडून आपल्या भावाला मिठी मारली.. आणि काळवेळ, वय,पुरुषी अहंकार सारे बाजूला ठेवत तो दोन महिन्यांनी पहिल्यांदा ढसाढसा रडू लागला... त्याला मोकळं..  शांत होऊ देत.. कृष्णाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला..

"मी आहे ना दादा! हे बघ आपला काहीच दोष नाहीये.. मात्र नेमकं काय झालं ह्याचा शोध घ्यायला हवा."

कृष्णा कागद पेन काढून बसला एकेका घटनेची संगती लावायला त्याने नोंद घेणे सुरू केले.. साधारण सहा महिन्यांपूर्वी सुलक्षणाच्या वडिलांनी रीतसर येऊन राघव आणि सुलक्षणाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांना कुठल्याश्या मॅट्रीमनी साइटवर राघवचे प्रोफाईल मिळाले होते. ते बँकेत मॅनेजर..त्यांची आर्थिक स्थिती राघवच्या कुटुंबापेक्षा खूपच उजवी होती. सुलक्षणा त्यांची एकुलती एक लेक.दोघांच्या पत्रिका जुळल्या.. विशेष म्हणजे जातच नव्हे तर पोटजातही एकच असल्याने सुलक्षणाचे वडील खूप खुश होते.. ते अत्यंत कर्मठ म्हणावे असेच होते.पाहण्याचा कार्यक्रम झाला... आणि दोघांनीही पसंती दिली. राघवला सतत सुलक्षणाला कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत होतं. ह्यावर सुलक्षणाने लाजून "पूर्वजन्मी असेल" असे उत्तर दिले.. अत्यंत साधी राहणी , दागिन्यांची , मेकअपची फारशी आवड नाही.. अशी घरगुती वळणाची सुलक्षणा राघवच्या घरी सगळ्यांनाच पसंत पडली. लगेचच महिनाभरात सुलक्षणाच्या वडिलांच्या घरी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. आपली एकच लेक असल्याने लग्नाचा खर्च सुद्धा आपणच करणार असे ते म्हणाले.. त्यानंतर तीन महिन्यांनी लग्न होतं.. ह्या दरम्यान अनेकदा राघव आणि सुलक्षणा भेटत होते, फिरायला जात होते.

भवताली सगळे फोटो मांडत नीट निरीक्षण करत अचानक कृष्णाने विचारलं..

"तुमच्या ह्या भेटी दरम्यान तुला काही खटकलं का दादा? म्हणजे काहीही अगदी लहानशी गोष्ट असू शकेल बघ आठवून.."

राघव म्हणाला..
"तसं काही खास नाही पण मी तिला पूर्वी कुठेतरी पाहिलंय हे असं सतत मला वाटायचं.. आणि  आणि तिचं वागणं खूप दडपण असताना असतं ना तसं असायचं बरेचदा!"

"लग्नात तर किती खुश दिसत होती... अज्जिबात काही वाटलं नाही " आई म्हणाली.

"लग्नानंतर तुमचे काही वाद??" कृष्णाने विचारताच.. दोघांनी नकारार्थी मान डोलावली.

"लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे गोंधळ होता.. नंतर आम्ही त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो.. तिच्या माहेरी सुद्धा पूजा होती आपण सगळेच गेलो होतो की... ह्या सगळ्यात ती आनंदाने सामील झाली.. जराही शंका आली नाही....  की दुसऱ्या दिवशी सकाळी सुलक्षणा घरात नसेल." 

"तिला काही झालं तर नसेल की जीव दिला असेल की कुणी पळवून नेलं असेल... माझ्या तर डोक्याचा भुगा झालाय.." म्हणत राघव डोकं धरून बसला.

"त्यानंतर चार दिवसांनी तुम्ही दोघे उटीला जाणार होता .. बरोबर.. म्हणजे जे काही झालंय ते ह्या चार दिवसांत..."

अचानकपणे उभा राहत राघवचे दोन्ही खांदे हलवत कृष्णा म्हणाला... 
"ह्या चार दिवसांत ... रात्री काय झालं दादा? मला माहिती आहे हे खूप खाजगी आहे पण हे विचारण्याशिवाय पर्याय नाही."

थोडं संकोचत राघव म्हणाला.. 
"तिने तिचे पिरियड्स असल्याचे सांगितले.. मग काय काहीच नाही! तशी ती खूपच लाजाळू होती.. लग्नाआधीच्या आमच्या भेटीतही ती अंतर राखूनच वागायची. मला वाटले उटीला गेल्यावर जरा मोकळी होईल."

लग्नानंतर पाचव्याच दिवशी सकाळी नववधू सासरहून गायब होते.. तिचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही.. ती परत येत नाही, कोणताच संपर्क करत नाही.. फोन सुद्धा घरीच ठेऊन जाते... मोठे अजब होते सगळे... सगळीकडे शोध घेऊन, सगळ्या नातेवाईकांना कळवून झाले पण सुलक्षणा काही सापडली नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली... त्यात हुंड्याची मागणी, शारीरिक मानसिक छळ असे काय काय जोडले.. त्यांना त्यांची लेक परत हवी होती आणि ती नेमकी कुठे आहे हे राघवच्या घरच्यांना माहीत नव्हते. मोठाच गंभीर प्रश्न होता.

अचानक वडिलांना काहीतरी आठवले... 
"सुलक्षणा गेली त्या दिवशी काय गाढ झोप लागली होती... काळझोपच म्हणायचे.. एरव्ही माझी झोप तशी सावध असते..."

कृष्णाच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली..आदल्या दिवशी रात्री खीर करून सुलक्षणाने आग्रहाने सगळ्यांना खाऊ घातली होती..तिने स्वतः मात्र खीर आवडत नाही,  सांगून खाणे टाळले. कृष्णा आणि राघवला खात्रीच पटली... काहीतरी गडबड नक्कीच आहे.... आठवडाभर जंग जंग पछाडत तिचा भूतकाळ त्यांनी उकरून काढला. राघवला एका सकाळी सुलक्षणाला आपल्याच ऑफिसच्या शेजारच्या एका ब्रँच मध्ये पाहिल्याचं खात्रीने आठवलं... मग तिथूनही शोध सुरू झाला.. त्यांच्या साऱ्या खटपटीला यश आलं... मात्र हाती लागलेलं सत्य भयंकर कल्पनातीत होतं.

सुलक्षणा गोव्याला मिसेस सॅली जोनाथन फ्लोरेन्स ह्या नावाने राहत होती. जोनाथन हा तिचा प्रियकर सहा वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू होते.. मात्र लग्नाचा विषय काढताच.. सुलक्षणाचे वडील तडकून उठले त्यांनी तिला जातीतच लग्न करण्याची अट घातली .. नाहीतर जीव देण्याची धमकीही दिली... त्याच वेळी मॅट्रीमनी साईटवर तिला राघवचे प्रोफाईल दिसले.. हा माणूस तिच्याच ऑफिसच्या शेजारी काम करायचा.. तिने महिनाभर त्याचे निरीक्षण केले... साधा सरळ आणि सहज वेड्यात काढता येईल असा राघव आपला बकरा आहे हे तिने निश्चित केलं. वडिलांना मुद्दाम ह्या स्थळाची लिंक पाठवली.. आणि पुढचा सगळा जमाव जुळून आणला... त्यांच्या लग्नाचा विषय काढण्यापूर्वीच तिने जोनाथनशी कोर्ट मॅरेज केलेले होते. हे सारे दडवून साळसूदपणे घरातल्या मंडळींना खिरीतून झोपेचे औषध देऊन तिने घरातून पोबारा केला. राघव सारखा नेभळट मुलगा आपला शोध घेऊच शकणार नाही असेच तिला वाटत होते... तिचा बाण वर्मी लागला.. लग्नानंतर पाचव्या दिवशी घरातून गायब झाल्याचे खापर वडिलांनी राघववर फोडले आणि त्याच्या मागे ते हात धुवून लागले... ह्या साऱ्यात आपल्या लेकीचा काही दोष असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नाही.

राघव सगळ्याच बाजूंनी उध्वस्त झाला.. त्याचं झालेलं लग्न कायदेशीर नव्हतंच.. तरीही बीजवर झाल्याचा डाग लागला... शिवाय बायको पळून गेली, केस झाली , मानहानी, मनःस्ताप, पोलिसांकडून मारहाण, नोकरी मिळाली पण पत गेली... हे सारं सारं त्याला भोगाव लागलं. ह्यात त्याचा दोष काय होता?? नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आयुष्यातील काही वाटा प्रथमदर्शनी  फुलांच्या दिसत असल्या तरी ती फुले काट्यांची असू शकतात.
✒️ यशश्री रहाळकर

"पुरुषस्पंदन" कथा३ :- आकर्षण

"सोळावं वरीस धोक्याचं ग!" ही प्रसिद्ध मराठी लावणी षोडश वर्षातल्या निसरड्या वाटांवर सहज भाष्य करते. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या नवतरुणीला हे वेडं वय मोहात पाडतं .. भलतीच चूक नकळत घडू शकते... म्हणूनच हे वर्ष धोक्याचं सूचक. हेच गाणं एखाद्याच्या लग्नाला सोळा वर्षे होऊन गेली आहेत तर लागू होऊ शकेल काय?? आता तुम्ही म्हणाल पुरुष जात्याचं अनेक स्त्रियांमध्ये रस घेणारा असतो... त्यात प्रौढ वयात एखादीचे आकर्षण वाटले तर नवल ते काय? मात्र ह्या कथेत हेच तर अचंबित करणारं वेगळेपण आहे... लग्नाच्या सोळा वर्षांनी स्वतःचा सुखी संसार लाथाडून निघून गेलेल्या एका मध्यमवयीन स्त्रीची ही कथा. वयस्कर माणसे बोलताना, "कलियुगाचा महिमा बाबा! काय दाखवेल सांगता यायचं नाही." असं सतत म्हणतात .. त्याचा अश्या प्रसंगी प्रत्यय आल्याविना राहत नाही.


रुपाली नाव 100% शोभून दिसेल इतकी देखणी. रंग केतकी मधाच्या रंगाचे डोळे, इवलीशी नाजूक चण आणि सोनेरी लांब केस... देवानी भरपूर वेळ घेऊन घडवले असावे असं आरस्पानी रूप. मात्र हे माप पदरात घेता घेता आर्थिक बाजूचे गणित नशीबाने हुकलेले. वडील जेमतेम कमवत त्यातही कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. चार घरी पोळ्या करून आईने तिला वाढवलं. ग्रॅज्युवेट होताच मिळेल ती नोकरी धरली... पाठ मान मोडून खर्डेघाशी करावी लागे.. सगळीकडे रूपाची जादू चालत नाही. ... पण कधीतरी नशीब भरभरून कृपा करतं. तिची आई पोळ्या करायला जायची त्यांचीच मैत्रीण रूपाच्या लग्नासाठी विचारपूस करू लागली. जहागिरदारांच्या गडगंज श्रीमंत एकुलत्या एक मुलासाठी त्यांनी रुपालीला मागणी घातली. पैश्याला मुळीच कमी नव्हती, मुलगा श्रीकांत जहागीरदार गोरापान देखणा होता.. आपला वडिलोपार्जितील केटरिंग, मंगल कार्यालय वगैरे व्यवसायांचा व्याप तो उत्तम सांभाळत होता. तीन मजली प्रशस्त घरात फार माणसेही नाहीत.. फक्त आई आणि तो. बहीणींची योग्य वयात सुस्थळी रवानगी झाली होती. नाही म्हणायला एक उणीव होती.. श्रीकांत जेमतेम मॅट्रिक पास होता ... त्याचे वडील गेल्यानंतर व्यवसायाचा व्याप सांभाळून शिक्षण पूर्ण करणे त्याला जमलेच नव्हते.. एव्हढ्या एकाच कारणामुळे ...अनेक उपवर मुलींनी नन्नाचा पाढा वाचला होता. शिवाय व्यवसायाचा व्याप असल्याने घरी राहून सगळे नीट सांभाळणारी मुलगी त्याला हवी होती. रुपालीच्या घरच्या मंडळींपुढे त्याने स्पष्ट शब्दांत आपले  मत मांडले. लग्नाचा खर्च तो स्वतः करणार होता शिवाय मुलीच्या आईवडिलांचा आधार देईन हेही त्याने खात्रीपूर्वक सांगितले.... रुपालीच्या मनात काय होते कोण जाणे? मात्र प्राप्त परिस्थिती पाहता तिने होकार दिला.


मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.... रुपालीची "सौ. राजश्री श्रीकांत जहागीरदार"  झाली. आपण दिलेल्या शब्दाला जागून श्रीकांतने तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांचे घर रुपालीच्या आईवडिलांना सन्मानाने दिले... जशी आपली आई तसेच पत्नीचेही आईवडील आपलेच हे सूत्र श्रीकांतने मनापासून जपलं... त्यांच्या अडल्या नडल्या वेळी मदत केली, वडिलांना ओळखीने काम मिळवून दिले. रुपाली आता खऱ्या अर्थाने "राजश्री" झाली होती... भारीच्या साड्या, दागदागिने ह्यांची बरसात तिच्यावर होत होती. सासू नणंदा ह्यांची तर ती प्रचंड लाडकी होती.तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होई अगदी रांगोळी काढण्यापासून ते स्वयंपाकपर्यंत. त्रयस्थाने पाहता क्षणी दृष्ट लागावी असा सुखाचा संसार सुरू होता. वर्षभरात पहिली लेक "ऐश्वर्या" जन्मली... सहा वर्षांनी तिच्या पाठीवर दुसरीही लेकचं.. "सौंदर्या" जन्मली. खरंतर श्रीकांत जरासा उदासच झाला होता... त्याला त्याची संपत्ती आणि व्यवसायाला मुलगा वारस हवा होता.. पण ह्यात लेकीचा काय दोष? त्याने मोठ्या थाटामाटात तिचं बारसं केलं... दोन्ही लेकी शहरातल्या टॉपच्या शाळेत शिक्षण घेत होत्या...  आई वडिलांच्या सौंदर्याचा वारसा घेऊन जन्मलेल्या दोघी लेकी काकणभर अधिकच देखण्या होत्या. मोठी ऐश्वर्या वयात आली असल्याने अधिकच सुरेख नक्षत्रासारखी दिसत होती. दोघी लेकींवर श्रीकांतचे खूप प्रेम होते... आपल्या ह्या देखण्या, हुशार लेकी पाहिल्या की त्याचं बापाचं हृदय गलबलून जाई...


"आपल्या बाबतीत झालं तसं लेकीच्या बाबतीत होता कामा नये, त्यांना हवे ते शिक्षण हवी तेव्हढी वर्षे घेऊ देत  .. त्यानंतरच मी त्यांचं एखाद्या राजकुमाराशी लग्न लावून देईन"


श्रीकांत स्वतःलाच पटवून द्यायचा... शेवटी लेक कितीही म्हटली तरी परक्याचं धन. घरी प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र कार...लेकींनाही शाळेत क्लासला सोडायला स्वतंत्र कार आणि ड्रायव्हर. सुखात सुखात म्हणता म्हणता सोळा वर्षे संसार झाला... आणि काय झालं कोण जाणे?? एकंदर श्रीकांतचे ग्रहच फिरले.... म्हणायचे.


राजश्री विनाकारण तणतणत असायची, मुलींशी नीट बोलायची नाही,  सतत काहींना काही कुरबुरी काढून भांडत बसायची.. कधी श्रीकांतशी तर कधी त्याच्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आईशी.... घरातलं वातावरण पार ढवळून निघालं होतं. एकतर श्रीकांतवरचा कामाचा वाढलेला व्याप त्याच्याकडून आवरता आवरता दिवस संपून जायचा त्यात राजश्रीची सतत फणफण असायची.अनेकदा त्याला वाटायचं आपण हिला वेळ देत नाही म्हणून असेल किंवा तिच्याही काही गरजा असतील , इच्छा असतील ज्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याने अनेकदा स्पष्टपणे राजश्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला... तिला नेमकं काय झालंय हेही ती सांगेना. एकदिवस अश्याच क्षुल्लक विषयावर भांडण उकरून काढले आणि ते इतके वाढले की राजश्री बॅग भरून घराबाहेर पडली... जातांना .."डोकं शांत झाल्यावर परत येईन", असे सासूला सांगून गेली. तिच्या आईने ती पुण्याच्या मावशीकडे गेल्याच सांगितलं... चार सहा दिवसांनी काहीच जणू घडलंच नाही असा आव आणत राजश्री परत आली. पुन्हा रोजचा दिनक्रम सुरळीत सुरू झाला.हळूहळू ह्याच प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती होऊ लागली. कधी दोन तीन महिन्यांनी तर पुढे पुढे दर महिन्याला राजश्री पुण्याला जाई.. चार आठ दिवसांत परत येई. तिची मावशी तिथे रहायची.. मावशीच्या दोन लेकीही पुण्यातच होत्या... त्यामुळे राजश्री तिथं रमत असावी असा समज सगळ्यांनी सोईस्करपणे करून घेतला.


"तिथून आल्यावर ती शांत खुश असते ना ! झालं तर मग..."


असे आईला सांगून श्रीकांत आपल्या व्यापात लागला.मात्र श्रीकांतच्या आईच्या नजरेतून राजश्री मधील सूक्ष्म बदल सुटले नाहीत. तिने आपल्या बारीक अनुभवी नजरेने राजश्रीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. एखाद्या नवथर तरुणीप्रमाणे ती हल्ली तासन तास फोनवर गप्पा मारत असते... "कुणाचा फोन ?" विचारले तर "मैत्रिणीचा" ...असे मोघम उत्तर देते. काहीतरी नक्कीच आहे ... त्यांचा संशय बळावत गेला. आपला संशय त्यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत जावेजवळ बोलून दाखवला. ह्या जाउबाई आणि त्यांचे कुटुंब कोकणातून आश्रयाला आलेले... दोन्ही मुले कष्टीक होती त्यांना श्रीकांतच्या वडिलांनी बरीच मदत केली होती. त्या दोघांची लग्ने सुद्धा त्यांनीच लावून दिली होती ... दोघांना चांगली कर्ती मुले होती .. मोठ्याचा मुलगा हैद्राबादला बँकेत लागला ,दुसरा बारावीला होता... तर धाकट्याचा मुलगा इंजिनिअर होऊन पुण्यात कंपनीत कामाला होता.. श्रीकांतच्या आईचे विचार जाऊबाईंना मुळीच पटले नाही .. त्यांच्या दृष्टीने राजश्री अगदी सोज्वळ स्त्री आणि आदर्श सून होती...


"माझ्या दोन्ही नातवंडांच्या लग्नाचं पाहतेय.. अगदी तुमच्या राजश्री सारख्याच नातसुना मिळायला हव्या हो!"


जाऊबाईंनी मांडलेल्या विचाराने श्रीकांतच्या आईचे मन थोडे स्थिर झाले. नेमका पुढच्याच महिन्यात एका नात्यातल्या लग्न समारंभात पुण्याला जाण्याचा योग आला... ह्या वेळी त्या मिठाई, भेटवस्तू वगैरे घेऊन आवर्जून राजश्रीच्या मावशीकडे भेटीला गेल्या. सहज बोलता बोलता विषय काढला असता,


"राजश्रीची गेल्या कित्येक वर्षांत भेटच नाही .."


असे मावशी बोलून गेल्या. श्रीकांतच्या आईचा अंदाज खरा ठरला.. घरी आल्यावर सगळा प्रकार त्यांनी श्रीकांतच्या कानावर घातला... राजश्रीला जाब विचारणार तर चोराच्या उलट्या बोंबा.. आक्रस्ताळेपणाने तिने भांडण सुरू केले..


"जाते मी माझ्या मैत्रिणीकडे .. काय चुकलं त्यात.. तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नसतो मी माझी एन्जॉय करतेय त्याचाही तुमच्या आईला त्रास होतोय.. माझं सुख डोळ्यात खुपतयं..."


शब्दाने शब्द वाढत गेला आणि मोठा तमाशा झाला दोन्ही लेकी भेदरलेल्या कोकरागत बघत होत्या. पुढे दोन महिने राजश्रीला पुण्याला जाण्याचे धारिष्ट्य झाले नाही... दिवाळी आली... सगळे घर पाहुणे नातेवाईक ह्यांनी भरून गेले... सुट्टीच्या निमित्ताने वरच्या चुलत घरचे दोघे नातूही आले होते... आता त्यांच्यासाठी मुली बघायला सुरुवात करायची होती. सगळ्या चुलत पुतण्यांचे, नणंदेच्या मुलांचे राजश्रीशी भलतेच मेतकूट होते. सुट्टीत त्यांच्यासोबत पत्ते खेळणे, कॅरम खेळणे ह्यात ती रमून जाई... वरचा चुलत पुतण्या स्वप्नीलशी तिचे अधिकच गहिरे नाते होते... तसा त्यात आक्षेप वाटावा असेही काही नव्हते. स्वप्नील तिच्याहून दहा वर्षे लहान होता ... शिवाय काकू पुतण्याचं नातं म्हणजे आईमुलागतच तर असतं.दिवाळी आनंदात पार पडली... एक दिवस स्वप्नील आपली काकू राजश्रीला केक बनवायला शिकवत होता... त्याला निरनिराळ्या रेसिपीज उत्तम येत असत... ह्या वेळी श्रीकांतच्या आईला त्या दोघांची जवळीक आणि लगट आक्षेपार्ह वाटली... आता तिने अधिकच तीव्रतेने डोळ्यांत तेल घालून राजश्रीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली..आणि एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.


तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या राजश्रीच्या आईच्या घराची डुप्लिकेट किल्ली तिच्याकडेच असायची... दोघेही कामाला बाहेर पडल्यावर... राजश्री तिथे गेली आणि थोड्या वेळाने स्वप्नीलही गेला ... श्रीकांतच्या आईने दाराला गुपचूप बाहेरून कडी घालत ... सगळं घर गोळा केलं... कडी उघडून दोघांना राजरोस रंगेहात पकडलं. दोन वर्षांपूर्वी पुण्याला एका नात्यातल्या लग्नाच्या निमित्ताने स्वप्नीलच्या फ्लॅटवर उतरलेल्या राजश्री आणि स्वप्नीलच्या नात्याने सगळ्या सीमा पार केल्या होत्या... राजश्री सतत पुण्याला जाऊन स्वप्नीललाच भेटत होती. राजश्री आणि श्रीकांतच्या लग्नाच्या वेळी 14/15 वर्षांचा असणारा स्वप्नील  ...राजश्रीला पाहता क्षणीच वेडा झाला होता... कसेही करून हिला मिळवायचीच हा ध्यास त्याने घेतला होता... सतत तिच्या रूपाची स्तुती करत तिच्याभवती पिंगा घालत त्याने आपला हेतू उघडपणे व्यक्त केला होता.. मात्र ह्या साऱ्यात नवल हेच की राजश्रीचा पाय का घसरावा? ह्या वेळी तिला आपल्या वयात आलेल्या मुलीचा, संसाराचा, तिच्या आणि स्वप्नीलच्या नात्याचा विसर पडला होता.


इतके सगळे महाभारत घडूनही श्रीकांतने आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार करता राजश्री समोर ... झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र म्हणतात ना .. "कामातूराणां भयं न लज्जा।" गळ्यातील मंगळसूत्र श्रीकांतवर भिरकावत , भरल्या घरातून , सुखाचे माप लाथाडून राजश्री स्वप्नीलचा हात धरून चालती झाली.. पुढे अनेक वर्षे डिव्होर्स केस आणि कोर्टाच्या हेलपाट्यांत गेली... मुलींना विचारले असता त्यांनी वडिलांकडे राहण्याचे ठरवले... आयुष्यभरासाठी त्या दोन अश्राप लेकींवर ,"पळून गेलेल्या आईच्या मुली" हा  कधीही पुसता न येणारा ठप्पा बसला. आपल्या कष्टाने व्यवसायात भरभराट करणारा श्रीकांत जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा उरला नाही... आपल्या लेकींसाठी राजकुमाराची स्वप्ने पाहणारा बाप आता किमान सभ्य ठिकाणी आपल्या मुलींना पदरात घेतील का ? ह्या  विवंचनेत असतो.


काय दोष होता त्याचा?? तो जाईल तिथं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे लोकांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला...


"अरे हाच तो! ह्याचीच बायको पुतण्याचा हात धरून पळून गेली."


✒️ यशश्री रहाळकर


मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा २ :- नाकर्ता


अश्विन आणि आशाचं लग्न बरंच उशिरा झालं. आशा 32 वर्षे पूर्ण तर अश्विनने पस्तिशी गाठली होती. आशा समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका ... बरीच वर्षे नॉन ग्रँट वर अक्षरशः विनावेतन काम केल्यावर तिच्या कॉलेजला ग्रँट मिळाली. मग मात्र तिची बॅक डेटेड अपॉइंटमेंट दाखवून सगळा पगार घसघशीतपणे हातात पडला. आता तिने Ph.D. साठीही प्रयत्न सुरू केले होते. तिच्या जातीच्या मानानं तिचं वय आणि शिक्षण दोन्हीही खूपच जास्त झालं होतं. त्यात आशाच्या मोठ्या दोघी बहिणींच्या गडगंज सासरी त्यांचे नवरे नित्यनेमाने दारू पिऊन मारहाण करायचे. ह्या साऱ्याची घृणा वाटून आशाने निर्व्यसनीच मुलगा असावा एव्हढीच एकमेव अट घातली... तो काही मिळेना. त्यात ही प्राध्यापिका म्हणजे कायम तिच्याच शहरात राहण्याची तयारी हवी... तेही शक्य होईना. दुसरीकडे अश्विन घरातला सगळ्यांत मोठा ... वडिलांच्या माघारी पाठच्या तीन बहिणींचे सुस्थळी विवाह करून मुक्त होईतो आईने राम म्हटले. तसा एकटाच उरलेला अश्विन निर्व्यसनी होता आणि ऍडजेस्टमेंट करणे ... त्याचा सहज स्वभाव होता. एका मध्यस्थाने पुढाकार घेतला दोघांची गाठ घालून दिली... आवश्यक ती बोलणी झाली आणि साध्या पद्धतीने लग्न पार पडले.

लग्नाच्या आधीच अश्विनने स्पष्टपणे आपल्या परिस्थितीची कल्पना आशाला दिली होती. अश्विन एका शिक्षण संस्थेत क्लार्क होता.. शिक्षणही जेमतेमच.. पगार पंधरा हजार. आईवडिलांचे होते नव्हते सारे बहिणींच्या लग्नात संपून गेले होते. ह्याउलट आशा प्राध्यापिका होती, महत्वाकांक्षी होती तिला प्रगती करत पुढे जायचं होतं, तिचा पगार लग्नाचे वेळी चाळीस हजारांच्या आसपास होता. पगाराची दरी सोडली तर दोघांनाही जोडीदाराची गरज होती आणि दोघेही सामंजस्याने संसार करत होते. फक्त आशा वाशीमला तर अश्विन यवतमाळला... नव्या नवलाईच्या दिवसांत सतत होणाऱ्या भेटीगाठी हळूहळू कमी होऊ लागल्या. प्रवासाचा कंटाळा येऊ लागला... सतत एकमेकांसोबत राहून , सुखदुःख वाटावेत , गप्पा माराव्यात अशी ओढ दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली. त्यातच आशाला एकदा खूप ताप भरला... टायफॉईड असावा पण अंगावर काढल्याने दुखणं चांगलंच वाढलं. शनिवारी रात्री उशिरा नेहमीसारखा अश्विन घरी आला तर आशा तापाने ग्लानीत अर्धमेली होऊन तळमळत होती. तिला हॉस्पिटलाईज करावे लागले...पुढचे पंधरा दिवस अतिशय  कठीण होते . आशा अगदी देवाच्या दारातून परतली. अश्विनने खूप प्रेमाने तिची तब्येत अगदी नीट होईपर्यंत सारं सांभाळलं. मुळात एकटा राहत असल्याने नीटनेटकेपणा, स्वयंपाक, घर व्यवस्थित ठेवणे सारेच तो उत्तम करायचा. तो असेपर्यंत आशा निर्धास्त होती , मात्र तो जायला निघालो तसे तिने एकवटलेला सगळं धीर सुटला... 

"मला एकटीला रहायचं नाही .. अश्विन जाऊ नका ."
असे म्हणत ती रडायला लागली. अश्विनची पाऊलही जड झाली... त्यालाही आशाला सोडून जावे वाटत नव्हते पण सुट्टी तरी किती मिळणार ?? अखेर दोघेही परस्पर सामंजस्याने ह्या निर्णयावर आले की ,

"आता येथून पुढे आपण एकत्र जगायचे ... नाहीतर सगळे आयुष्य एकट्याने सरले की हाती काहीच उरणार नाही."

आशाची नोकरी स्थिर , पगार उत्तम. .... अश्विनने नोकरी सोडली आणि तो कायमचा आशा सोबत वाशीमला स्थायिक झाले. सुरुवातीला तिथेच मिळेल अश्या लहान मोठ्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण चाळीशीत कोण जॉब देणार? शेवटी त्याने घर सांभाळायचे ठरवले. लोकांनी यथेच्छ टिंगल केली... 

"हाऊस वाईफ सारखा हा हाऊस हजबंड आहे .."

इथपासून तर ..

"आशा मॅडमचा घरगडी ..!"

इथपर्यंत टोमणे त्याने शांतपणे पचवले. बाहेर जग काहीही म्हणो... आशा आणि अश्विनचा संसार दुधात साखर विरघळून जावी असाच होता... फक्त इतर उदाहरणात ही साखर स्त्री असते.. इथे मात्र ती भूमिका अश्विनच्या वाट्याला आली आणि त्यानेही ती उत्तम निभावली. आर्या आणि अनिषच्या जन्माने त्यांचा संसार दोनाचा चार झाला. आशाची डॉक्टरेट पूर्ण झाली... तिची काही पुस्तके, संशोधने प्रकाशीत झाली... उत्तम वक्ता म्हणून तिचं नाव झालं आणि ठिकठिकाणी आवर्जून तिला आमंत्रण दिलं जाऊ लागलं. कधी कुठली अभ्यास परीषद, कुठली कॉन्फरन्स , कुठले मंडळ, चर्चासत्र ... आशा वक्ता म्हणून जायची आणि अक्षरशः व्यासपीठ गाजवायची. आशा तिच्या संसारात समाधानी, तृप्त होती. त्यांचं छान टुमदार घर आणि उबदार घरकुल होतं. तिच्या साऱ्याच कर्तृत्वात अश्विनचा मोठा वाटा होता आणि हे ती प्रांजळपणे कबूलही करत असे. 

मुलांना अगदी तान्हे असल्यापासून अश्विननेच सांभाळले होते.. पुरुष असल्याने आई होऊ शकला नाही इतकेच पण आईच्या म्हणून असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यानेच पार पाडल्या होत्या. आपल्या दोन्ही मुलांवर त्याची विलक्षण माया होती... स्वतःचे बाहेरचे जग नसल्याने त्याचं घर आणि कुटुंब हेच त्याचं संपूर्ण जग होतं. सकाळी मुलांना उठवणे, तयार करणे, शाळेत सोडणे, class ला नेणे आणणे, अभ्यास घेणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे... एव्हढेच नाही तर त्यांची दुखणी, आजारपणे काळजी घेऊन, रात्री जागून त्यानेच पार पाडली होती. आशा असतांना किचनचा भार त्याच्यावर फारसा पडत नव्हता पण आशा बाहेरगावी असली की किचनही तो उत्तम सांभाळायचा. कधी कामाची बाई आली नाही तर सिंक मध्ये खरकटी भांडी आशाची वाट पाहत पडलेली नसत ... कधीच अश्विनने ती घासून ठेवलेली असायची... त्यातही त्याला लाज , कमीपणा कधीच वाटला नाही. सकाळी उठून आवरून नाश्ता करून अश्विन सार्वजनिक वाचनालयात जायचा... तिथे तासभर बसून वाचन आणि पुस्तके बदलून आणणे .. ही कामे होत. तेव्हढाच त्याचा हक्काचा एक तास बाकी सगळा वेळ फक्त कुटुंबाचा. आशा आणि त्याच्यामध्ये  पुरुषी अहंकाराची दरी नव्हती आणि मी कमवती हा अभिमानाचा डोलाराही नव्हता. घरात येणारा पैसा कुणीही कमावला तरी तो सगळ्या कुटुंबाचाच आहे अशीच दोघांचीही भावना होती. आशाने तर सर्व आर्थिक व्यवहार अश्विनवर सोपवले होते... ते CA शी बोलणं, पैसे invest करणं, इन्शुरन्स, टॅक्स सगळं सगळं तिला भलतंच कटकटीचं वाटायचं. अश्विन हे सगळं जबाबदारीने पार पडायचाच आणि एक पै देखील उधळणार नाही हा दृढ विश्वास तर होताच.

हळूहळू आजूबाजूच्या लोकांसाठी ह्या जोडप्याचा विषय शिळा झाला. काळाच्या ओघात अशी तुरळक जोडपीही दिसू लागली... बायकोचं कमावणं नवऱ्याचं घर सांभाळणं ह्या विषयातलं नाविण्य संपलं. आयुष्य कुणासाठी थांबत नाही... आशा आणि अश्विनची लेक आर्या 18 वर्षांची झाली... बारावी तिने उत्तम मार्कांनी पास केलं पण एन्ट्रन्स एक्सामला स्कोर घसरला... मनाजोगं कॉलेज काही मिळेना... त्यामुळे नैराश्याने ह्या वयातल्या मुलांची होते तशीच तिचीही चिडचिड होऊ लागली... ह्या फुलपंखी वयात सारे मनाजोगे व्हायला हवे असते. त्यात आर्या म्हणजे लाडोबा.. अश्विनने तिला एखाद्या राजकुमारी सारखे वाढवलेले... जात्याचं बापाची लेकीवर अधिक माया आणि त्यात अश्विनसाठी आर्या म्हणजे जीव की प्राण. तिला ह्याहून उत्तम स्कोर नक्कीच मिळेल अशी खात्री आपल्या लेकीबद्दल त्याला होती म्हणूनच तो आर्याला पुन्हा एन्ट्रान्स एक्साम देण्याविषयी सतत समजावून सांगत होता...

"हे बघ पिल्लू.. तुला नक्कीच याहून चांगला स्कोर मिळेल.. तू एक वर्ष गॅप घे आणि झोकून देऊन प्रयत्न कर...खूप अभ्यास कर. मला खात्री आहे तुझा गव्हर्नमेंट कोट्यातून नंबर नक्की लागेल."

"पप्पा.. आयुष्यातलं एक वर्ष ... वर्ष किती मोठं असतं माहिती आहे?? वाया जाईल पप्पा.. आणि नाहीच मिळाला स्कोर चांगला तर...?"

"तू असा negative विचार का करतेस?? पिल्लू नक्की मिळेल तुला उत्तम स्कोर.. मला पूर्ण विश्वास आहे."

एकमेकांच्या विरोधाचे सूर लागले आणि संभाषणाला धार चढत गेली... आर्याच्या मते, तिच्या इतर मैत्रिणींसारखी भरमसाठ डोनेशन्स भरून तिला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन द्यावी तर अश्विनच्या मते, तिने एक वर्ष गॅप घेऊन पुन्हा प्रयत्न करावेत आणि गव्हर्नमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा. प्रकरण हातघाईवर आले.. बाप लेकीचं हे वाद अखेर आईच्या कोर्टात गेले...

"आई माझ्यासाठी तुझ्याकडे पैसेच नाही आहेत का? सगळं डबोलं तुझ्या लाडक्या अनिषसाठीच ठेवणार का?"

"आर्या काय बोलतेस तू.. पिल्लू आईशी नीट बोल.." अश्विनने दरडावले.

"हे बघ आई मी स्पष्टच सांगतेय माझ्या सगळ्या मैत्रिणी रग्गड डोनेशन भरून ऍडमिशन घेताहेत त्यांच्या ड्रीम कॉलेजला.. मलाही ऍडमिशन हवीय.. शिकेन तर त्याच कॉलेजला..."

तिचे बोलणे मध्येच तोडत अश्विन म्हणाला..

"पिल्लू तू त्याच कॉलेजला घे ऍडमिशन .. फक्त त्यासाठी थोडी मेहनत घे, मेहनतीने मिळवलेल्या गोष्टीतील आनंदच वेगळा असतो..."

"पप्पा मेहनती बद्दल तू बोलतोयस?? तू तर ह्या विषयावर बोलूच नकोस... आई मी तुला विचारतेय तुझ्याकडे माझ्यासाठी पैसे आहेत की नाहीत??"

आर्याने इतके तोडून बोलल्यावर, अपमान केल्यावरही अश्विन त्याकडे दुर्लक्ष करत  होता.. त्याला फक्त आपल्या लेकीचं भलं व्हावं वाटत होतं.. आर्याने कोणतेही शॉर्टकट्स वापरू नयेत. तिने मेहनत करावी आणि यश मिळवावं.. अशी प्रत्येक बापाची असते तशीच आणि तेव्हढीच अपेक्षा होती त्याची. आपला मुद्दा रेटत अश्विन पुन्हा म्हणाला...

"पिल्लू प्रश्न पैश्यांचा नाही .. तू मुद्दा लक्षात घेतच नाही आहेस... पैसे आहेत तुझ्या भविष्याची तरतूद सर्वांत आधी करून ठेवलीये आम्ही.. तुझं शिक्षण तुझं लग्न अगदी काही काही कमी पडणार नाही..."

आर्या पुन्हा तुटकपणे म्हणाली..

"आई मी तुझ्या पैश्यांबद्दल विचारतेय.. मी जॉब लागल्यानंतर तुझे पैसे परत करेन पाहिजे तर तसे लिहून घे.."

आर्याचं एकेक वाक्य आशाला नामोहरम करत होतं... सगळ्या जगभर कुटुंबसंस्थेची उत्क्रांती आणि सामाजिक सामंजस्यावर भाषणे देणारी आशा आज तिच्याच लेकीकडून पराभूत झाली होती. आत्तापर्यंत फक्त ऐकून घेत शांत बसलेली आशा कडव्या स्वरात म्हणाली..

"आर्या ! पप्पा काय म्हणताहेत ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर... ते शत्रू नाहीयेत तुझे... "

आर्या बेलगामपणे किंचाळली..
"ते कोण होतात ठरवणारे तू सांग.. पैसे तू कमावतेस ना... दीड दमडीही न कमावणाऱ्या कर्तुत्वशून्य माणसाने निर्णय घ्यायचा नाहीये माझ्या भविष्याचा.. मला ते चालणार नाही."

तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आशाने काडकन कानाखाली जाळ काढला... 
"यापुढे एक अवाक्षर बोललीस ना तर बोलायच्या लायकीची ठेवणार नाही तुला.. स्वतःच्या वडिलांबद्दल असे अपशब्द बोलतांना लाज कशी वाटली नाही तुला? "
आशाचे डोळे आग ओकत होते.

"वाटली ना आई खूप लाज वाटली जेव्हा मला वर्गात कुणीतरी विचारायचं तुझे पप्पा काय करतात?? तेव्हा उत्तर नसायचं माझ्याकडे .... सगळे टिंगल करायचे.. सगळे हसायचे माझ्यावर .. तेव्हा खूप लाज वाटायची. माझ्या मैत्रिणींचे पप्पा पाहते ना तेव्हाही खूप लाज वाटते मला..लाज वाटते मला रिकामटेकडा नाकर्ता बाप असल्याची..."

आशा हतबुद्ध होऊन पाहत राहिली.. हे एव्हढं विष साचलं होतं हिच्या मनात... आपलं खरंच मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे. दाणादाण पावलं आपटत आर्या तिच्या खोलीकडे वळली .. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आशा थक्क होऊन पाहत राहिली. क्षणभर तिला आपल्या खांद्यावरील पत्नी ह्या जबाबदारीचेही भान आले.. अश्विन पायात चप्पल घालून घरातून निघून गेले होते. आपल्याला जे शब्द काळजाला चटका लावून गेले ते अश्विनचं काळिजच जाळत गेले असणार ह्याची तिला खात्री होती. स्वतःच डोकं आणि मन शांत करायला अश्विन लांब चालत निघाला होता... लेकीचे "नाकर्ता रिकामटेकडा " हे शब्द घणाचे घाव घातल्या प्रमाणे त्याचं डोकं फोडत होते..

रात्री उशिरा दमून भागून थकल्या मनानं घरी परतलेल्या अश्विनची पावलं जड झाली होती... काळजीने अर्धमेली झालेली आशा दारातच आत बाहेर करत होती.. अश्विनला पाहताच तिच्या जीवात जीव आला. आशाच्या मांडीवर डोकं ठेवून अश्विनचं डोळे झरू लागले... त्याला ढसाढसा रडावसं वाटत होतं.. पण अखेर पुरुष होता तो रडणार तरी कसा?? आज तो खूप काहीतरी मौल्यवान हरवून बसला होता. आशा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली..

"अर्धवट वय आहे तिचं.. ह्या वयात कळत नाही काय चांगलं काय वाईट... विसरून जा सगळं."

पाझरणाऱ्या डोळ्यांनी आशाचे हात हातात घट्ट धरत अश्विन म्हणाला..

"प्रत्येक बाप त्याच्या मुलीसाठी हिरो असतो.  मला नाही होता येणार का ग ??.. मी हा असा नाकर्ता.... माझ्या मुलांना माझी लाज वाटावी असं काही केलंय का मी??"

✒️ यशश्री रहाळकर

सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

पुरुषस्पंदन कथा १:- अनभिज्ञ


"ती" म्हणजे कुणीतरी बिचारी... सतत अन्याय झेलणारी आणि "तो" अन्याय करणारा, क्रूरकर्मा वगैरे असे ढोबळ साचे आपण बनवलेले आहेत.  प्रत्यक्षात पडताळून पाहिले तर 99% हे खरेही आहेच ना! पण उरलेल्या 1% मध्ये काही असेही बिचारे पुरुष आहेत ज्यांचा काहीही दोष नसतांना ते होरपळले आहेत, कदाचित त्यांनी खूप सोसलं आहे... ह्या कथांची प्रत्यक्ष साक्षीदार होताना "त्याच्या" वेदना, "त्याची" दुःख अगदी दाहकपणे मी पाहिली आहेत, अनुभवली आहेत .. त्यांनाच कथारूपाने मांडतेय.. अर्थातच नावे गाळून कथास्वरूप देऊन... "पुरुषस्पंदन" मधील प्रत्येक कथा निराळी तरीही एका समान धाग्यावर बेतलेली आहे.


कथा १ :- अनभिज्ञ

ज्योती मावशीचा पहाटे साडे चार वाजता फोन आला आणि मनांत शंकेची पाल चुकचुकली. बरं तिने स्पष्ट काहीच सांगितलंही नाही . नुसतेच "ताबडतोब ये ग!"  म्हणून रडायला लागली. ह्या अवेळी फोन म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच आहे... काकांची तब्येत पुन्हा बिघडली की काय? दोन महिन्यांपूर्वी असेच पहाटे बीपी शूट झाले होते.. ह्या साऱ्या विचारचक्रात मी मावशीच्या घरी पोहोचलेही. ज्योती मावशी म्हणजे माझं लोकल माहेर... खरंतर ती आईची चुलत बहीण पण मी लग्न होऊन तिच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये रहायला आले आणि आमचे गुळपीठ वाढत गेलं. वेळ मिळेल तश्या आम्ही मावशी भाच्या एकमेकींकडे पडीक असतो , एकत्र खरेदीला जातो, कोणताही पदार्थ एकमेकींना दिल्याशिवाय खात नाही आणि आमच्या गप्पा काही संपत नाहीत. .. तिला एकुलता एक मुलगा क्षितीज ...मुलगी नाही म्हणून माझ्यावर विशेषच माया. आनंद असो वा गंभीर काही.. पहिला फोन एकमेकींना करून हक्काने बोलावले जाई. मी पोहोचले तेव्हा घराभवती गर्दी जमलेली दिसली.. आणि काळजाचा ठोकाच चुकला. कशीबशी गर्दी मोडत घरात गेले तर अवकळा पसरलेली... घरांत स्मशान शांतता होती. चारच दिवसांपूर्वी ह्याच घरातून सनई चौघड्याचे मंगल सूर निघत होते.... हे  सांगूनही खरं वाटत नव्हतं. काका शून्यात नजर लावून बसले होते... मला अशुभाची चाहूल लागली. मला पाहताच मावशी कोसळली... माझ्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली. 

तिला शांत करत मी नेमकं काय झालं ते विचारू लागले... काकांना पहाटे 3 च्या सुमारास जाग आली..ते पाणी प्यायला म्हणून उठले तर क्षितीज गळफास लावून घेतांना त्यांना दिसला... मोठाच अनर्थ टळला. त्याला झोपेचे इंजेक्शन देऊन शांत केले होते... मी आधी सगळ्या जमलेल्या शेजारी आणि बघ्यांचे आभार मानले आणि त्यांना आपापल्या घरी परतण्याची विनंती केली. गर्दी ओसरली आणि मी तडक किचन गाठत कडक चहा करून आणला.. मावशी आणि काकांना काय करावे काहीच सुचत नव्हतं. खरंच परिस्थितीच अशी होती की काय करावे सुचत नव्हतं. मी क्षितीजला समजावेन,  आपण एखाद्या सायकायट्रिस्टला दाखवू असे काहीबाही बोलून मी त्यांची समजूत काढली. क्षितीज अतिशय साधा...सरळ रेषेत चालणारा मुलगा. निर्व्यसनी, उमदा स्वभाव ,साधे सरळ चौकटीतले आयुष्य जगण्याची स्वप्ने पाहणारा मुलगा. शाळेतील वर्गात मधल्या बाकावर बसणारी मुलं असतात ना! त्यातलाच हा... म्हणजे रूपाने, बुद्धीने चारचौघांसारखा. वर्षीचे वर्षी पास होऊन इंजिनिअरिंग पूर्ण केले... दोन तीन लहानमोठे जॉब बदलत चांगल्या नोकरीत लागेपर्यंत 28 वर्षांचा पूर्ण झाला. स्वतः स्वतःचा जोडीदार निवडेल अश्या प्रकारचा नव्हताच तो... मग काय रीतसर कांदे पोह्यांना सुरुवात झाली.
               उत्तम पगार , मावशी आणि काकांशिवाय जबाबदारी नाही, काका बँकेत असल्याने त्यांनी बऱ्यापैकी पैसे जोडून ठेवलेले, दोन प्रशस्त फ्लॅट एकत्र करून सुंदर इंटेरिअर करून घेतलेले घर, गावाकडे जमीन, 2 गाळे आणि 1 फ्लॅट भाड्याने दिलेले... अश्या सगळ्या जमेच्या बाजू असूनही क्षितीजचा विवाह योग काही जुळून येईना. ह्या साऱ्यात जवळपास 3 वर्षे गेली... हौसेनी सुनेचे कौतुक करायला आसुसलेली ज्योती मावशी हिरमुसली, काळजी करू लागली. 

"हल्लीच्या मुलींच्या अपेक्षाच कळत नाहीत मला... अजून हवंय तरी काय ह्यांना...?"

असं ती कळवळून म्हणायची..😢 खरंय हल्ली मुलींना नेमकं काय हवं असतं कोण जाणे? बरेचदा मुलगी ह्यांना पसंत पडायची आणि तिचा नकार येई. शेवटी ह्या योगांच्या गोष्टी. नुपुराचं स्थळ आलं आणि योग जुळून आला. आईवडील सामान्य परिस्थितीतले दोन बहिणी त्यातली ही धाकटी.बुद्धीने बेताचीच असणारी नुपूर दिसायला देखणी... मनमोकळी ,खळखळून हसणारी, पाहता क्षणी प्रेमात पडावे अशीच. ब्युटी पार्लरचा कोर्स केलेली नुपूर घरगुती वळणाची मावशीला अगदी हवी तशी सून आणि क्षितीजला मनाजोगी पत्नी मिळाली. काकांनी देखील लगेच एक गाळा खाली करून घेऊन सुनेला पार्लर काढून देण्याचे ठरवले.ज्योती मावशीला आपल्या होणाऱ्या सुनेला कुठे ठेऊ कुठे नको असे झाले. थाटात साखरपुडा झाला...  अर्थातच सगळा खर्च ज्योती मावशी आणि काकांनी केला. साखरपुड्यालाच होणाऱ्या सुनेवर पैठणी, सोन्याचा नेकलेस आणि गिफ्ट्सची लयलूट करण्यात आली. नुपुरच्या वडिलांचं साधं स्टेशनरीचं दुकान त्यात मोठ्या लेकीच्या लग्नात बराच खर्च झालेला त्यामुळे त्यांनी हात वर केलेले. लग्नाचा खर्चही विभागून करायचे ठरले.लग्नाचा मुहूर्त सहा महिन्यानंतरचा नक्की झाला.

नुपूर क्षीतीजच्या सतत भेटीगाठी होऊ लागल्या, फोनवर बोलणे,हॉटेलला; सिनेमाला जाणे... सारे सारे आलबेल होते. नुपूर सुद्धा खूप खुष दिसत होती. हनिमूनसाठी सिंगापूर, थायलंडचे बुकिंग झाले... दोघेही आनंदात होते. मावशी बाईंच्या उत्साहाला तर उधाणच आले होते.. मी बरेचदा तिच्याकडे असायची. पाहुण्यांच्या याद्या, देण्याघेण्याचे आहेर, लग्नातला मेन्यू असं सारं ठरवून झालं.. आजकाल नवरा नवरी एकमेकांना मॅचिंग असणारे कपडे खरेदी करतात... नवा ट्रेंड! मग काय दोघेही आपल्या मित्र- मैत्रिणींसह खरेदीला गेले. लग्नाच्या सगळ्या धावपळीत काहीतरी बिनसलं असेल असा संशयसुद्धा कुणाला आला नाही.क्षीतीज नव्या संसाराच्या स्वप्नात रंगून गेला होता... होय! मुलांची सुद्धा असतात ना स्वप्ने... सतत बोलतांना ,
"ताई! हा पदार्थ तू नुपुरला शिकव म्हणजे मग तुला त्रास द्यावा लागणार नाही." 

"नुपूर आली ना आई की आराम कारायचास तू!"

असा सतत नुपुरचा उल्लेख असायचा. नुपूर हे नाव सुद्धा इतकं आवडलं होतं त्याला की लग्नानंतरही तसंच ठेवेन म्हणायचा. सगळं सुरळीत म्हणता म्हणता दुधात मिठाचा खडा पडलाच... ऐन लग्नाच्या दिवशी सिनेस्टाईल नुपूर घरातून पळून गेली. होय! हा प्रसंग कोणत्याही सिनेमातला नाही तर प्रत्यक्षात घडला आहे... अंगावरच्या दागिन्यांसह कपडेलत्ते घेऊन नीट नियोजन करून नुपूर पळून गेली.आदल्या रात्री श्रीमंतपूजनाला मावशीने सगळे दागिने तिला घातले होते जवळपास दहा तोळ्यांचे दागिने, चाळीस हजाराचे कपडे घेऊन भर मांडवातून नुपूर पळून गेली. लग्नाच्या मांडवाचे युद्धभूमीत रूपांतर झाले... नुपुरचा अगतिक बाप रडत , हात पसरत करुणा भाकत होता. त्यांना नुपूर असे काही करेल ह्याची सुतराम कल्पना नव्हती, असे ते वारंवार सांगत होते. "तिचे आधीच लफडे होते तर आम्हाला का फसवले?" म्हणत क्षितिजचे नातेवाईक हमरीतुमरीवर आले...नुपुरच्या वडिलांचे नावे पोलीस कँप्लेन्ट झाली... फसवणुकीचा, दागिने लुबाडण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक झाली... आणि नुपुरचा शोध सुरू झाला. सगळे काही होऊन, अतिशय अपमान होऊन रिकाम्या हाती क्षितीजचे वऱ्हाड घरी परतले. सोसायटी, आप्त परिवारात चर्चेला विषय मिळाला. मावशी काकांना तर जबर धक्का बसलाच पण हळवा क्षितीज मनातून उध्वस्त झाला... 

"तिला दुसरा कुणीतरी आवडतो , हे तिने सांगायला हवे होते. आम्ही कित्ती गप्पा मारायचो... मला कधीही साधा संशय सुद्धा आला नाही."

डोळ्यांतली संसाराची स्वप्ने फसवणुकीने धुवून निघालेला क्षीतीज कळवळून म्हणायचा . त्यालाच काय आमच्यापैकी कुणालाच साधा संशयही आला नाही... इतकं नूपुरचं वागणं मोकळं होतं... काय झालं कोण जाणे? सगळं समजशक्ती पलिकडलं होतं.

चार दिवसांत पोलिसांनी नुपुरला तिच्या प्रियकरासोबत पकडले... त्यांनी लग्न केले होते. सगळे दागिने चीजवस्तू ताब्यात घेऊन केस मागे घ्यावी अशी विनंती नुपुरने केली. क्षीतीजने पोलीस स्टेशन गाठत नुपुरला जाब विचारायचे ठरवले... अशी फसवणूक करून काय मिळालं तिला? स्पष्ट सांगितले असते तर लग्नाच्या आदल्या दिवशीही लग्न थांबवता आलेच असते ना! नुपुरला भेटून घरी परतलेला क्षितीज पार कोलमडला होता ... कुणाशी एक अवाक्षरही न बोलता त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि हा असा प्रकार करून जीव द्यायचा प्रयत्न केला. त्याच्या जिव्हारी लागले हे खरे! पण म्हणून काय जीव द्यायचा?? 

क्षीतीज दुपारपर्यंत झोपूनच होता तो उठला तसे मावशीने मला बोलावून घेतलं... काका भयंकर संतापले होते... 

"स्वतः जीव देण्यापूर्वी आम्हा म्हाताऱ्यांना विष पाज..." 

असे काहीबाही ते बडबडत होते. क्षीतीज एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागला मावशीने त्याला पोटाशी धरलं... त्याला समजावण्याचा सुरात मी म्हणाले..

"बरं झालं ना रे बाबा! तू वाचलास ...लग्न झाल्यावर ही पोरगी पळून गेली असती तर तू कुठलाच नसता राहिला."

क्षीतीज कळवळून रडू लागला... एखाद्या पुरुषाला असं धाय मोकलून रडतांना मी पहिल्यांदाच पाहत होते. क्षितीज म्हणाला...

"माझंच चुकलं ताई..... फार मोठी चूक झाली माझी."

नेमकं काय बिनसलंय ह्याचा अंदाज घेत आम्ही एकमेकांकडे पाहू लागलो. क्षीतीज पुढे सांगू लागला...

"नुपूर कुणासोबत पळाली माहिती आहे... माझा मित्र बंड्या जगताप..."

आमचे डोळे इतके विस्फारले गेले की बुबुळेच बाहेर यावीत... बंड्या क्षीतीजचा बालमित्र, फारसा शिकला नाही, वडिलांच्या छोट्याश्या पानाच्या टपरीवर बसायचा. दिसायला देखणा, राहणी छानछौकीची... एकदम हिरो सारखी. कुणीही पाहताच इम्प्रेस व्हायचे. बोलण्यात मिठ्ठास , कामात चटपटीत... त्याची आणि क्षितीजची मैत्री म्हणजे एक गूढच होतं.... तसा तो सतत मदतीला धावून यायचा... माणूस चांगला होता, मित्र म्हणून मदतीला  धावून येणारा होता.

"नुपूर आणि बंड्याचे... जुळले कधी आणि कसे??"

मावशीने उत्सुकतेने विचारलं...प्रचंड पराभूत नजरेनं क्षीतीज उत्तरला..

"आमच्या लग्नाच्या कपडा खरेदीच्या वेळी..."

पुन्हा एकवार स्मशान शांतता पसरली... अरे देवा! हे काय भलतंच. म्हणजे मित्राच्या लग्नाच्या कपडा खरेदीला सोबत म्हणून गेलेल्या बंड्या जगतापने नुपुरला पटवले होते. कुठल्याश्या चाळीत दीड खणी घरात सहा माणसांमध्ये नुपुरला राहणं शक्यच नव्हतं मग वेगळं घर घ्यायचं तर पैसा हवा ... म्हणून हा सगळा पळून जाण्याचा प्रकार केला. सहा महिने ज्याच्याशी लग्न जुळले होते त्या मुलाच्या भावनांशी काडीमात्र घेणेदेणे नसावे ह्या बयेला?? जेमतेम महिना भराच्या ओळखीत ती म्हणे बंड्याच्या प्रेमात पडली होती... आणि जे क्षीतीज बद्दल कधीही वाटले नाही ते तिला ह्या महिनाभरात बंड्या बद्दल वाटले होते..... ह्या सगळ्या मुर्खपणाला ती प्रेमाचे उदात्त नाव देत असली तरी हा शुद्ध मूर्खपणा होता. बंड्या देखील मित्राच्या होणाऱ्या बायकोच्या प्रेमात पडला आणि तिला पळवून नेण्याइतका का पुढे गेला ?? ... हे सारेच अगम्य , अतर्क्य होते. ह्या सगळ्या लग्नाच्या उत्साहात आम्हीच काय नुपुरचे आई वडील देखील तिच्या आणि बंड्याच्या ह्या प्रेम प्रकरणाबद्दल अनभिज्ञ असावे. क्षीतीज सध्या डिप्रेशनवर मानसोपचार घेतो आहे... मावशी आणि काका मनातून कोसळले आहेत... आता लग्न ह्या विषयाची त्या भरल्या आनंदी घराने धास्ती घेतली आहे.
ज्योती मावशी म्हणते ते अगदी खरंय..

"हल्लीच्या मुलींना नेमकं काय हवं असतं .. कोण जाणे?"

✒️ यशश्री रहाळकर