फॉलोअर

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

अनवट


काल परवा पर्यंत मुलामाणसांनी गजबजलेला 'राधानिल' बंगला आज कमालीचा शांत होता. एरव्ही एव्हढ्या मोठ्या बंगल्यात दोघेच तर असत, अनिलराव अन् अनुराधा ताई रानडे, बागकामाचा माळी, दिवसभर कामाच्या बाई अन् त्यांची मोठी लेक कधीतरी दिसे तेव्हढीच काय ती वर्दळ. तसे अधूनमधून येणारे मित्र - गणगोत असायचे, बाकी राधानिलमध्ये अर्थातच दोघेच अनुराधा अन् अनिल. त्यांच्याच तर नावांची सांगड घालत ठळक पितळी घडीव पाटी डौलात चमकायची. दोनेक दिवसांपूर्वी मात्र त्यांचा सारा परीवार जमला होता ....लग्नाचा पन्नासावा का काय तो वाढदिवस साजरा करायला घरगुती कार्यक्रम... असे अनुराधा ताई काहीतरी म्हणाल्या होत्या. "आज सकाळी फिरायला दिसल्या नाहीत"... असे कुजबुजत सकाळी सोबत फिरायला जाणाऱ्या बायका आपापल्या घरांकडे वळल्या.

अनुराधा आज जरा उशीराच उठली. निवांतपणे बंगळीवर बसत स्वस्थपणानं डोळे पुन्हा एकदा मिटून घेतले. आज चहाचे आपल्यालाच बघावे लागणार हे जाणून अनिलरावांनी स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. प्रेम, उत्साह, आनंद आणि कौतुकाने सजलेला सारा सोहळा अनुराधा पुन्हा पुन्हा आठवू लागली, अन् त्या साऱ्यावर विरजण घालणारे ताईचे शब्द, ...  "तिला आई आहे.".... वारंवार त्यांच्यावर आघात करू लागले. भरलेले डोळे उघडून पाहतात तो हातात चहाचा कप अन् बिस्कीट्स घेऊन अनिलराव उभे,

"काय मुलानातवंडांच्या आठवणीत आम्हाला विसरलात ना ?"

काहीही न बोलता चहाचा कप हातात घेत अनुराधा सावकाश घोट-घोट पिऊ लागली.

"अजून आज ताईची चक्कर कशी नाही झाली ?"

विचारत पेपर उघडून अनिलरावांनी जगाच्या घडामोडीत स्वतःला गुंतवून टाकले.

अतीव थकव्याने अनुराधा त्याच झोपाळ्यावर आडवी झाली.... आपल्या संपूर्ण आयुष्याचा पट चित्रपटासारखा त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर ती उलगडून बसली. अनिलराव बँकेत मोठ्या पदावर कार्यरत होते तर अनुराधा शिक्षिका... दिसायला देखण्या, रसिक ,भाषा शिक्षिका. अनिलराव बँकेत सुरुवातीला कॅशियर पण पुढे परीक्षा देत देत मॅनेजर होत रिटायर्ड झाले. अनुराधा देखिल विद्यार्थ्यांची लाडकी, आसपासच्या अन् सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला आपलसं करणारी. त्यांच सारं जग म्हणजे त्यांची तीन अपत्य. पहिली लेक आरोही, पाठोपाठ दोन वर्षांनी ओंकार आणि जरा उशीराच म्हणजे जवळजवळ आरोही दहा वर्षांची झाल्यावर झालेली अनुप्रिता.

शेंडेफळ अनुप्रिता तिची प्रचंड लाडकी, तिचंच रूप घेऊन आलेली अनुप्रिता केतकी गोऱ्या वर्णाची , घाऱ्या डोळ्यांची बाहुलीच जणू.  ती अभिमानानं सांगायची "अनुप्रिता म्हणजे देवाचं Sweet Surprise" आहे. बडबडी, चंचल, सगळ्या स्पर्धा गाजवणारी अनुप्रिता.... हैद्राबादच्या जहागिरदार या  गडगंज घराण्यातील  आशिष सारख्या देखण्या डॉक्टरने  तिला मागणी घातली काय, ती राजाची राणी यथावकाश दोन मुलांची आई झाली. दोघेही गोरेघारे हो !.. सारे स्वप्नवत. अनुप्रिता त्यांच्या काळजाचा तुकडा, तिच्या साऱ्या आठवणी त्यांना सुखावणाऱ्याच... अनुप्रिता..  लाडाचे नाव अनु... अनु तिच्या कलागुणांमुळे इतकी प्रसिद्ध होती की अनेक लोक त्यांना 'अनुची आई' म्हणूनच ओळखत. मुलांना सुट्ट्या असल्या की ती महिनाभर हक्काने माहेरी येई अन् तिच्या साऱ्या हौशी , आवडीनिवडी, हट्ट पुरवणे हा अनुराधाचा आवडता कार्यक्रम असायचा. तिच्या मुलांच्या मौंजीत तर काय करू आणि काय नाही असे झाले अनुराधाला. दागिन्यांनी महालक्ष्मी सारख्या सजलेल्या आपल्या देखण्या लेकीकडे ती कितीतरी वेळा कौतुकानं पाहत अन् दृष्ट काढीत होती .... तिच्या प्रतिष्ठा शोभेल अशी पैठणी, सोन्याचे दागिने खास तिच्या पसंतीने बनवून घेतले होते.

अनुराधाचा लेक ओंकार...रूपानं बेताचा पण प्रचंड हुशार. प्रत्येक परीक्षेत पहीला तोच असायचा, प्रचंड अभ्यासू... त्याच्या परीक्षांचे निकाल म्हणजे अनुराधाचा अभिमानाने मिरवण्याचा काळ. अतिशय प्रक्टीकल असलेला ओंकार झपाझप परीक्षा देत इंजीनियर होऊन MS साठी अमेरीकेत गेला ..तो तिथलाच झाला. अनिलराव जरा दुखावले पण मुलाच्या हट्टापुढे काय चालणार ? लग्न मात्र त्यानी आईवडीलांच्या पसंतीने स्वातीशी केलं. सून आवडायची अनुराधाला. दोनेक वेळेला जाऊनही आले दोघे अमेरीकेला. लेकाने सुट्ट्या घेऊन भरपूर फिरवल हो ! त्यालाही मुलगेच दोन ,जुळी.. बाळंतपणाला काय काय घेऊन गेल्या त्या भारतातून..... नातवंड, सून सगळे लाघवी. वर्ष दोन वर्षांनी येतात. काय काय घेऊन येतात साऱ्यांना अन् यादीही देऊन ठेवतात , पूर्ण कार्यक्रमाची ..... म्हणजे किती दिवस येणार, कुठे जाणार, काय करणार वगैरे वगैरे. तो आला की त्यांचे दिवस कुठे येत अन् कुठे जात काही कळायचे नाही. आठ-दहा दिवसात मुलाला अन् नातवंडांना त्या नजरेत भरून घेत.

अनिलरावांच्या हाकेन तिची विचारांची तंद्री भंग पावली...

"अगबाई दहा वाजले का? आज बाई आल्या नाहीत अजून.... नाश्ता करायला घेते, तुम्हाला BPची गोळी घ्यायची असेल ना!"

म्हणत धडपडत उठू लागली. अनिलरावांनी खुणेनेच त्यांना बसायला सांगितल अन् उपम्याच्या प्लेट भरून आणल्या. नारळू पेरून केलेला साजूक तूपातला त्यांना आवडतो तसाच उपमा....

"ताई आली होती वाटतं."
त्या नकळत म्हणाल्या.

"हो ना ! आज बाई आजारी आहेत म्हणे, त्यांनी ताईला सकाळी फोन करून सांगितलं. तिनीच मग नाश्ता केला. पोळी भाजी आणलीये करून अन् कुकर लाऊन गेली ती."
अनिलराव म्हणाले.

आश्चर्यान उपमा खात त्या उदगारल्या,

"अग बाई माझी झोप म्हणावी का कुंभकर्णाची... काsही कळलेच नाही."

ताई, त्यांची मोठी लेक.. आरोही, गावातच राहायची. तिच्या कॉलेजच्या वाटेवर त्यांच घर, येता जातांना डोकवायची. अनिलरावांना गेल्या वर्षी हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर तर फारच हळवी झाली.... त्यांची सारी कामे, बँकेत जाणे, वेगवेगळ्या तपासण्या, डॉक्टर, भाजी, किराणा सारे सारे तिच पाही.. अनुराधा रिकाम्या प्लेट ठेवायला उठली. तिला आज प्रकर्षाने जाणवल. भिंतीवर ओंकार, अनुप्रिता आणि त्यांच्या मुलांचेच फोटोज् फक्त लावलेत आपण... पुन्हा एकदा जखमेची खपली निघून रक्त भळभळाव तसे ताईचे शब्द आठवले,

"तिला आई आहे ."

त्यांचा हुंदका ऐकून अनिलराव एकढेच म्हणाले,

"तुला जाणीव झाली हेच महत्वाचे "
त्यांनी शब्दकोडे सोडविण्यास सुरुवात केली.

आपल्या आयुष्याच्या न सुटणाऱ्या कोड्याकडे अनुराधा तटस्थपणे पाहू लागली ...आरोही, तिची पहिलीच लेक... ज्या बाळानं तिला आईपण दिलं ती आरोही. तिची चाहुल, तिचा जन्म, पहिलं पाऊल, पहिल्यांदा तिनं आई म्हणून मारलेली हाक सारं सारं आठवलं त्यांना. आरोही अनिलरावांचा जीव की प्राण होती. रूपानं सामान्य बुद्धीनंही बेताचीच. ओंकार अन अनुची ताई झाली अन् मूळची गंभीर मितभाषी आरोही अधिक गंभीर, अबोल होत गेली. त्यांची ताई म्हणून सारेच तिला ताई म्हणू लागले. त्यांची दुखणी खुपणी, अभ्यास परीक्षा सारे काही तिच सांभाळायची. अनुराधाची नोकरी जणू काही तिच्याच आधाराने चालायची. सारं घर ती लीलया सांभाळायची. कधीही तिने काही हट्ट केला, मागणी केलेली त्यांना आठवत नाही. Physics फार आवडता विषय तिचा . BSc होत नाही तोच बाई आत्या म्हणजे त्यांच्या मोठ्या नणंदेनी.... कुलकर्णीचं ठिकाण सांगितलं. ताईच्या सर्वतोपरी सामान्यत्वाचा विचार करता लग्न करण्यास आपण चटकन होकार दिला. 'चुकल का काही आपलं??', त्या पुन्हा पुन्हा आठवू लागल्या.

लग्न जुळवणं बाई आत्यांचा आनंदाचा छंद... घरातल्या जवळपास सगळ्यांचेच लग्न जुळवणे, गाठीभेटी, व्यवहार त्या मोठ्या मानाने मिरवत करत..... आणि आत्तापर्यंत त्यात त्यांना यशही आलेले होते. आरोहीसाठी सतिश कुलकर्णीच ठिकाणंही त्यांनीच आणलं. मुलगा क्लार्क म्हणून वडीलांच्या जागी सरकारी नोकरीत लागलेला B.Com. निर्व्यसनी. बाई आत्यांनी आरोहीच्या रूपाचा काटेरी उल्लेख केला अन् ही काय पुढे शिकणार ? जेमतेम II Class टाक उजवून सांगितले.... मिही तयार झाले सहजच अन् माझ्या आरोहीला उजवून टाकले. घरात दोन धाकट्या नणंदा, नुकताच नवरा गेल्याच्या दुःखातून न सावरलेली सासू... त्यांनी काही मागितले नाही. त्यातच त्याच वर्षी ओंकार अमेरीकेला जाणार म्हणून मोठी रक्कम त्याच्या शिक्षणासाठी गुंतवली... ताईचं लग्न रजिस्टर झालं. आपली नोकरी सुरू होती त्यामुळे सणवारही आपण टाळलेच, तशी त्यांनाही हौसमौज नव्हतीच. कोणत्याही सणाचे म्हणून विशिष्ठ पैसे मिळाले की ताईची सासू खुष होई, तश्या लोभी नव्हत्या त्या;  पण ताई एकदाच म्हणावी होती...

"माणसं वाईट नाहीत म्हणून चांगली आहेत म्हणायचं... इतकंच"

तक्रार करणं हा तिचा स्वभावच नव्हता. एकूणात कधीच तिची काहीच हौसमौज केली गेली नाही. गावातच राहते म्हणून माहेरी राहता यायचे नाही. मात्र तिच्या सासरी, भावंडात, मैत्रिणीत, सगळ्यांनाच ती प्रिय होती. कुटुंबाला हातभार म्हणून B.Ed. करत लगेचच नोकरी स्विकारली तिने... पुढे M.SC. करत त्याच शाळेच्या संलग्न कॉलेजला Lecturer झाली. सारं मेहनतीने, सावकाश तिला कधीच स्पर्धा करावीशी वाटत नव्हती. यथावकाश नणंदांची लग्ने झाली, वृद्धापकाळाने सासुबाई निर्वतल्या. ती अजूनही धरून आहे साऱ्यांना. आरोही गेल्याच महिन्यात Ph.D. झाली. तिच्या या यशाने अनिलरावांना कोण आनंद झाला. भेटेल त्याला कौतुकानं सांगत सुटले. आता नवीन सत्रात जुलैमध्ये ती प्राचार्या होणार,अशी शक्यता असल्याचेही त्यांना कळले होते.

ताईला एकुलती एक लेक समिधा, त्यांची ही एकटीच नात, त्यांची खूप लाडकी.  तिला गोष्टी सांगणे, तिच्याशी गप्पा मारणे अनुराधाला फार फार आवडायचे . तिच्यावेळी ताईचं बाळंतपण कसंबसं रेटलं त्यांनी... ऐन फेब्रुवारीत त्यांना सुट्या घेता येईनात....परीक्षांमुळे जेमतेम सव्वा महीन्यात त्यांनी ताईला सासरी पाठवले. खरंतर ताईला तिथे कामाला जुंपून घ्यावे लागणार हे कळत असूनही त्यांनी स्वार्थ साधला. अनुची दोन्ही बाळंतपणे मात्र त्यांच्या रिटायर्डमेन्ट नंतरची ...त्यात हैद्राबाद दूर म्हणून चांगले सहा सहा महिने ठेऊन घेतलं त्यांनी अनुप्रिताला... तसे तिचे लग्न, प्रत्येक सण थाटामाटात झाला होता अन् अनुराधाला वेळ असल्याने तिने तो मोठ्या हौशीने,मजेत साजराही केला होता.

समिधा, ताईची लेक अगदी तिचीच प्रतिकृती. या वर्षी ग्रॅज्युवेशन फायनलला होती.... तशीच शांत, मनमिळावू फक्त ताईइतकी गंभीर नाही तर आनंदी.... खळखळून हसायची तर खूप गोड दिसायची. समिधा पाचएक वर्षांची असेल तेव्हाची गोष्ट... आता दुसरा चान्स घेण्याविषयी कुणीतरी ताईला चिडवत होतं... ताई म्हणाली होती,

"दूसरे मूल म्हणजे पहिल्या मुलावर अन्याय असतो ग.."

खरं होत का तिचं? मी अन्याय केला होता तिच्यावर?? परवाच्या कार्यक्रमांत बाई आत्यानी जेव्हा समिधासाठी स्थळ आणलं आणि तिच रुप सामान्य ,लग्न उरकून टाक असं सांगितलं ... तेव्हा ताई शांतपणे म्हणाली,

"तिचं लग्न उरकून टाकायला ती आरोही रानडे नाही आत्या....आणि हो ! सगळ्यात महत्वाची गोष्ट... "

अनुराधाकडे रोखून पाहत ती कडव्या स्वरात म्हणाली

"तिला आई आहे."

क्षण दोन क्षण पराकोटीच्या शांत नजरेनं तिनं अनुराधाकडे रोखून पाहीलं अन् पुन्हा चेहऱ्यावर मूळचे गांभीर्य परत आणत ती कामांकडे वळली. दाखवत नसले तरी ती बोच साऱ्यांना जाणवलीच... प्रसंग संपला एकेक जण मार्गस्थ झाला. घरात दोघेच उरले पुन्हा.

"अहो एकच शब्द अडलाय कोड्यातला "

अनिलरावांनी पुकारा केला.

"कोणता हो ?" म्हणत अनुराधा टेकली.

"कधीही कुणी न चाललेली वाट, माहीत नसलेली वाट"  अनिलरावांनी विचारले.

"चार अक्षरी"...बोटे नाचवत म्हणाले.

"अनवट ".... त्या स्वतःलाच सांगितल्या सारख्या पुटपुटल्या. अनिलरावांनी कोडं सुटल्याच्या आनंदात टाळी वाजवली. एक कोडं अनुराधालाही सुटलं होतं. त्यांना त्यांच्या पन्नाशीच्या लेकीची आई व्हायचं होतं. त्यांनी तडक जावयाला फोन केला..

"सतिशराव ! हो हो, मीच आरोहीची आई बोलतेय. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन महिने आरोहीला माहेरपणाला आणेन म्हणतेय. तुम्ही परवानगी द्या म्हणजे झालं... अहो... एकदा का ती प्राचार्य झाली की कसली येतेय? क्षणभर उसंत मिळणार नाही मग तिला. हो हो.... उदयाच गाडी पाठवते; पण तिला सांगू नका हं! Surprize देऊया. समिधाला Bag भरायला सांगते."

अनिलरावांकडे वळत त्या म्हणाल्या,

"माझी पेन्शन झाली का हो जमा ?"

"आता काय घेताय ? " अनिलरावांनी विचारले.

"आरोहीला पांढरी शुभ्र पैठणी घेईन म्हणते - प्राचार्य झाली म्हणजे 15 ऑगस्टला तिच्या हस्ते ध्वजारोहण होईल ना !"

अनिलराव समजून पुटपुटले.... "अनवट वाटा.. चांगलं आहे."

✒️ यशश्री रहाळकर