फॉलोअर

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

सुगरणींचा दरबार

                    स्त्री देह धारण करून जन्मलेल्या तुमच्या आत्म्याचं महापातक काही असेल तर ते म्हणजे स्वयंपाकात रुची नसणे...पुढे गती नसणे ओघानं आलंच. कारण स्वयंपाकाची आवड असल्याशिवाय प्रयोग होत नाहीत, मग जुजबी चालढकल चालते आणि त्यात गती असणं अशक्यप्राय बनतं.त्यातही तुम्ही एखादा नरक स्कीप करून आले असाल तर तुमची सासू सुगरण असते आणि साहजिकच तिचं लेकरू उर्फ पतीपरमेश्वर प्रचंड खवय्या (स्पष्टपणे सांगायचं तर खादाड)असतो.. तुमच्या प्रत्येक पदार्थाला नाके मुरडून मुरडून तो तुमची जिरवतो आणि नवीन काही पदार्थ करण्याचा एकवटलेला राहिला साहिला उत्साह वाहून जातो. बरं... आपण ज्या समाजात राहतो ना तिथं एकवेळ तुम्ही निरक्षर असलं तरी चालतं पण स्वयंपाक मात्र यायला हवाच... खरेतर आज प्रत्येकाला जुजबी स्वयंपाक यायला हवा... घरापासून दूर राहणारे, परदेशी शिकायला गेलेले मुले मुली थोडेफार पदार्थ गरजेपोटी शिकतातच.. मात्र एखाद्या बिचारीला रोजचे वरण, भात, भाजी, पोळी तर निभावता येते पण बाकी स्वयंपाकात फार काही उजेड पडत नाही ...तिचा निभाव लागणे अवघड होते. त्यात ती जर गृहिणी असेल तर तिने बल्लवाचार्य असलेच पाहिजे...अश्या वेळी तिला सुगरणींच्या दरबारात हजेरी द्यावीच लागते. वेळ पडली तर लोटांगणे देखिल घालावी लागतात....
                    सुगरण ह्या शब्दामुळे सगळ्यांत पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो तो सुगरण पक्षी.. घरटे तर सगळेच पक्षी विणतात मात्र सुगरणींचा खोपा म्हणजे कमाल कौशल्य, नजाकत,नेटकेपणाचा कस. याच दाखल्या वरून एखाद्या निष्णात अन्नपूर्णेला सुगरण म्हणत असावेत..थोडक्यात स्वयंपाक काय कुणीही करतं.. पण स्वयंपाक करतांना कमाल कौशल्य वापरते ती सुगरण...अशी आपली माझी व्याख्या.यात एक गफलत अशी की सुगरण पक्षी घरटे विणतो आणि पक्षीण केवळ हवं ते, योग्य वाटेल ते घरटं निवडते...आपल्या जगात सुगरण तिचं असते.. (काही प्रसिद्ध शेफ असतात पण घरी त्यांच्या बायकाच करतात स्वयंपाक) वेगवेगळ्या पाककृतींवर हुकमी अधिसत्ता गाजवणारी साम्राज्ञी.... मुदपाकखान्यात जाताच तेल तिखट मीठ जिन्नस तिला पाहून चळाचळा कापतात आणि निमूट प्रमाणात पडतात...जिचं कोणतंच पीठ कधी सैल होत नाही आणि जी सातत्याने आपले अगाध ज्ञान तपश्चर्येच्या विविध प्रयोगांनीशी अधिक सिद्ध करत असते... ती खरी सुगरण. जिचा नवरा कधीही आईच्या हातचे अमुक ढमुक असे तुणतुणे वाजवत नाही.. आणि पोरे बाळे आईच्या कौतुकाचे गुणगान गाताना थकत नाही... होय तिचं तर खरीखुरी सुगरण....यात तिच्या सासूने कौतुक (चुकून) केले तर ती मास्टर शेफ असणारच ..... काय सांगता?? असे काहीच घडत नाही तुमच्याकडे...आता नमनाला घडाभर तेल ओतले आहेच तर सांगते... आधी अशी वरील नमूद लक्षणांनी युक्त सुगरण स्त्री शोधावी... नंतर तिच्या दरबारी लीन व्हावे... हीच सुगरण बनण्याची पहिली पायरी आहे आता तुम्ही सुगरण झालाच म्हणून समजा
                      तुमचा जर समज असेल की अशी सुगरण मैत्रीण, बहीण , काकू...वगैरे आशीर्वादाचा हात मस्तकावर ठेवेल आणि तुम्ही सुगरण व्हाल तर ही केवळ अंधश्रद्धा आहे.☺ त्या सुगरणीला डोळ्यांदेखत एखादा पदार्थ करतांना पाहून आपण तस्साच करू शकू हा फाजील आत्मविश्वास शुद्ध वेडगळपणाच आहे... माझी एक सुगरण मावशी... गॅसच्या चारही शेगड्यांवर एकाच वेळी चार फोडण्या टाकते... तिचे चारही पदार्थ अप्रतिम चविष्ट होतातच... कश्यात काही अधिक उणे नाही...अश्यावेळी तिच्या झटपट हालचाली एखाद्या कसलेल्या गायकाच्या गान-मैफिली सारख्या सच्च्या आणि काळजाला भिडणाऱ्या असतात...आहाहा! ... पण नंतर त्यातला एकही पदार्थ काय घालून अन काय प्रमाणात घालून केला हे मात्र मी सांगूच शकत नाही.स्वयंपाक करून येऊ शकतो पण नुसता पाहून मुळीच नाही....त्यात ह्या सुगरणींना तुम्ही पाककृती .. रेसिपी हो! विचारूच नका... त्यांच्या हातांना वस्तू न मोजता प्रमाणात घालायची सवय झालेली असते. एखाद्या मेरीट स्टुडंटने उत्तरे दाखवली तरी आपल्याला ती कॉपी करता येऊ नयेत इतकी अवघड असतात... जसे शीग लावून डाळ घे, गुलाबी रंगावर परतून घे (गुलाबी???), पोटातून ओल्या असतांना वाटून घे, अधमुरं दही घाल... एका बाजूने तळ, जास्त घट्ट नाही अन् जास्त पातळ नाही,साखर घाल उगाच आपली नावाला???? देवा रे! ह्या सगळ्याचा बाप म्हणजे 'पाक'.... ह्या पाकावरूनच पाककला हे नाव यथार्थपणे सिद्ध होते. अर्ध कच्चा अर्ध गोळीबंद पाक करून माझी आजी लाडू मुरत घालायची... काही तासांनी ते वळले जात.. चव अर्थात झक्कास... मात्र त्याच क्षणी मी आयुष्यात पाकातले लाडू  न करण्याची भीेष्मप्रतिज्ञा केली. पाक ह्या शब्दाचा अर्थ पवित्र होत असला तरी तो फसला की जी काय नासधूस होते ते महापातकच होय.
                         एखाद्या सुगरणीला मार्गदर्शनाला बोलावून बाजूला उभे करावे नि आपण शिकावे असा विचार करत असाल तर तोही साफ आपटणार. सुगरण स्त्री नुसती बाजूला बसू शकत नाही. तिचे हात स्वयंपाक घरात लगेच शिवशिवतात... तुम्ही मंद आचेवर रवा भाजत असतांना ती खवा भाजून , नारळ खवून,पाक करून पुढच्या चार पायऱ्या पूर्ण करणार...थोडक्यात पदार्थ 75% तिचं करणार... नंतर स्वतंत्रपणे नारळीपाकाचे लाडू तुम्हाला कसले येताहेत.... मग दर वेळी धरा तिचेच पाय.... वर त्या लाडूला तुमचे वंशज मावशीचे किंवा काकूंचे लाडू असे नाव देणार हे वेगळेच.रेसिपीची पुस्तके देखिल मिळतात अगदी ढिगाने... झटपट नाश्ता 101 डिश, रोजचे पदार्थ 151 पाककृती, आईसक्रीमचे 501 प्रकार,1001 गोड पदार्थ असे चढत्या क्रमाने उपलब्ध पुस्तके घेतल्यावर शेवटी एक जमला तर शप्पथ! ह्या मुद्द्यावर यावे लागते... बाई ग तुझे 999 ठेव तुलाच मला एक तरी नीट जमू दे...... अर्धा इंच आलं , 137gm मैदा ,2.4gm खायचा सोडा... असं कुणी करतं का राव ??त्यात ह्या पुस्तकांतील देखणी चित्रे बघून अवसान ढासळते... आणि कुरुक्षेत्रावर उभ्या अर्जुनासारखे आपण शस्त्रच खाली ठेवतो.
                       यु ट्यूब वरच्या रेसिपी किंवा एखाद्या नकटीचे रेसिपी शो जर तुम्ही फॉलो करत असाल ना तर एक लक्षात घ्या ... तुम्हाला 2 महिन्याच्या किराण्याएव्हढे पदार्थ निव्वळ सजावटीला लागणार आहेत...2 कप काजूची पूड / वाटीभर पिस्त्याचे काप/ दोन वाट्या ताजी साय/ वाट्यांनी तेल तूप अबब! एव्हढं घालूनही पदार्थ तस्साच होत नाही... कारण झटपट भिजवणे,चटपट परतणे,120 ला बेक करणे आणि हलक्या हातानं चिमूटभर सोडा घालणे अश्या क्रिया काही जमत नाहीत...मग तुम्ही निर्लेप चे तवे, कढई...मॉल मधून भरमसाठ किंमतीला आणता. गेला बाजार मातीचे,तांब्याचे,बीडाचे आणि कश्या कश्याचे भांडे आणता. (सध्या स्टीलच्या कढया/ कुकर्सचे कौतुक बोकाळले आहे).एव्हढं करून तयार झालेला पदार्थ खाताच... खाववत नाही अन फेकवत नाही अशी अवस्था होते... नेमकं काय बिघडलं ते मात्र उमजत नाही...मात्र पुन्हा तो पदार्थ करायची हिम्मत खचते... घरात तुमच्याशिवाय कुत्रेही त्याला तोंड लावत नाही..नवरा झापतो ते वेगळं...आणि दर वेळी त्या पदार्थाचे नाव घेऊन तुमचा उद्धार होतो ... जसं एखादा केक... तूप साखरेचं प्रमाण बिघडून बसला थोडक्यात फसला तर घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला चोमडे कन्यारत्न ,"बाबा बेकरीतून विकतच आणा हं केक... आईच्या केकच्या वड्या होतात" ... मग बापलेक टाळी देत हसतात किंवा दर वेळी मॉल मध्ये केकच्या सामानाचे सेक्शन आले रे आले की नवरा काहीतरी अश्लाघ्य दिसल्या सारखा तुम्हाला तिथून खेचू लागतो... चार लोक पाहताहेत याचीही पर्वा न करता.... हात जोडत "आता पुन्हा नको ग बाई" विनवणी करू लागतो. मग सुगरण व्हायचे कसे??उत्तर सोप्पे आहे...सुगरणींचा दरबार जॉईन करून  
                    सुगरणींचा दरबार ... अर्थात विविध सोशल मीडियावर(fb, whats app वगैरे) असणारे पाककृतींचे ग्रुप... यांची नावे साधारण रुचिरा, सुगरण, आईच्या हातची चव, पूर्णान्न वगैरे पठडीतील असतात. पुढे त्याचे व्हेज/ नॉनव्हेज झटका असे मुख्य दोन प्रवाह आहेत. प्रादेशिक वादातून त्यात राजस्थानी चविष्ट पदार्थ, साऊथचे रस्सम, अस्सल महाराष्ट्रीयन, बंगाली स्वीटस, गुजराथी चाट..... असे अनेक उपप्रकार पडतात.जरा देशाच्या सीमा ओलांडायच्या असतील तर कॉन्टिनेन्टल, थाई, इटालियन... वगैरे देखील दरबार आहेत. या दरबारात जगभरातील अनेक विद्यार्थी डोके टेकवितात... अनेक पदार्थांवर हुकूमत असणाऱ्या सुगरणी अहोरात्र लोकांच्या उत्थानासाठी झटत असतात. भिशीचा मेन्यू, पार्टी चा मेन्यू... इथपासून तर चार माणसांना किती वाट्यांचा रस लागेल, दहा माणसांना किती बटाट्याची भाजी लागेल असे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. एखाद्या पदार्थाची कृती तर मिळेल पण तो बिघडल्यास काय करायचे ह्याचे प्रात्यक्षिक देखील मिळणारच.. अनारसे हसले तर काय करायचे अन लाडू वळले जात नाही तर कसे बांधायचे.... उरलेल्या अन्नाचे नवीन पदार्थात बेमालूम रूपांतर ...सारे सारे अगाध ज्ञान येथेच प्राप्त होते. त्याचबरोबर तुम्ही कितीही बेसिक प्रश्न विचारला जसे "पुरी टम्म फुगायला काय करायचे?" तर कुणीही तुमची टिंगल करत नाही.. उलट सुगरण गुरूंना एक प्रकारचा ज्ञान दानाचा अवीट आनंद त्यातून प्राप्त होतो. दुसऱ्या बाजूला तुमच्या घरच्या कुणालाही नाके मुरडू देत पण ग्रुप वर कंमेंट अन लाइक्स ची बरसात तुम्हाला प्रोत्साहन देत असते.हळूहळू तुम्ही पाककलेत पारंगत होत जाता....मुळात स्वयंपाक करणे ही आनंददायी प्रक्रिया असल्याची ज्ञानप्राप्ती तुम्हाला याच दरबारात होते. अधून मधून गुरूंचा जयघोष मात्र करायलाच हवा हं !... त्याशिवाय त्यांना आनंद मिळणार तो कसा?
                          एकदा तुम्ही ह्या दरबाराचे पाईक झालात की काही पथ्ये/ नियम कटाक्षाने पाळावे लागतात. इन्स्टंट हा शब्द कायमचा मनातून काढून टाकणे, स्मार्ट वर्क न करता हार्ड वर्कच करणे, पारंपारिक पदार्थांचा ज्वलंत अभिमान बाळगणे..."पोळ्यांची बाई" म्हणजे शिव शिव ... कसे काय लोक खातात बाईच्या हातच्या पोळ्या.. माझ्या अश्या मऊसूत होतात. .... विकत पदार्थ आणणे महापाप. घरचेच अन्न चवीचे बाहेरचे वाईटात वाईट... "माझ्या मुलांना माझ्याच हातचा पिझ्झा आवडतो बाहेरचा मुळीच नाही" असे सांगणारीच्या मुलांना आपण कालच पिझ्झा हट मध्ये पाहिल्याचे मुळीच बोलायचे नाही. नवऱ्याला पौष्टिकतेच्या नावाखाली उकडलेल्या भाज्या खाऊ घालणाऱ्या सखीचा नवरा कालच शेजारच्या टेबलवर बसून मिसळ आणि जिलब्या चापत होता हे विसरून जायचं. वाटण.. पाट्या वरवंट्याच.. मिक्सरची चव छ्या! वेलची खलबत्त्यात कुटून , जायफळ सहाणेवर उगाळून, नारळ खवून, पीठं घरघंटीची, कुंडीतल्या मिरच्या अन कढीपत्ता ... कितीही तयार मिळालं तरी सगळं कसं घरीच करायचं.... शिवाय अजून एक सिद्धी प्राप्त असायला हवी मुलांना न आवडणाऱ्या भाज्या / फळं बेमालूम त्यांना खायला घालायची.मी कसे कमी तेल वापरते.. मी कशी आरोग्य जपते हेही सांगणे जमले पाहिजे... तूप जरा करपले तर काय करायचे? असा प्रश्न असेल तर खरे उत्तर आहे पुढील वेळी अधिक लक्ष देऊन काळजीपूर्वक करायचे... मात्र हे उत्तर दरबारात चालत नाही त्यात लवंग घाल, विड्याचे पान घाल असे काही बाही सुचवीत राहायचं. साधी इडली किंवा थालपीठ केलं ना तरी फोटो काढायचा नि दरबारी पेश करायचा... अय्यो!भाजणी विकतची आहे किंवा इडलीचे पीठ अप्पाचे आहे हे कश्याला सांगायचे??अश्या प्रकारे दरबारात हजेरी लावली की लोक हळूहळू तुम्हाला सुगरण म्हणून ओळखू लागतात. मग बिंधास्त सांगायचे दोन वाटी रव्याला 2 वाट्या साखर लागतेच ग! चांगलं दीड वाटी तूप घे...... तिच्या घरचं जातंय ना! झाला लाडू तर ठीक नाहीतर बसेल बोंबलत.
© यशश्री रहाळकर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

नथ

                 सध्या सोशल मीडियावर "साधी राहणी ग बाई माझी" असे ढोल वाजविले जातात.मला कशी दागिने आणि भारीच्या साड्यांची मुळ्ळीच आवड नाही ... असे वारंवार सांगितले जाते.... आणि गंमत म्हणजे ह्या बायकांचे dp /फोटो ह्या विधानाच्या अगदीच विपरीत सत्य उघड करत असतात .मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली अशातला हा प्रकार..... दागिन्यांची आवड नाही असे असूच शकत नाही... कदाचित घालायची सवड आणि सांभाळायची जोखीम न परवडणारी असू शकेल.अर्थात दागिन्यांचा संबंध कोणत्याही विशिष्ट धातूला अधोरेखित करीत नाही बरं!  हिऱ्यांचे, सोन्याचे किंवा सध्या चर्चेत असणारे प्लॅटिनमचे महागडे दागिने म्हणजेच दागिने असतात का हो?? आमचे जग खऱ्या अर्थानं पिवळं धम्मक केलं ते 2 ग्रॅम, बेनटेक्स वगैरे दागिन्यांनी... पण भारतीय स्त्रियांना सोन्याची चमक भुरळ घालते यात शंकाच नाही.
                      एका थोर विदुषिने फेसबुकवर #नवऱ्याने पाडव्याला मला खरे अनमोल दागिने भेट दिले ... असे म्हणत स्वतःचा पुस्तकांसोबत फोटो टाकला... मी कशी पुस्तकप्रेमी आहे हेच यातून दाखवायचे असावे पुस्तके अनमोल निश्चित आहेत...ते भेट म्हणून देणे यात काहीच गैर नाही मात्र पाडव्याला नवऱ्याने पुस्तके भेट देणे... म्हणजे पाणीपुरीवाल्याकडे पिझ्झा मागण्या सारखं आहे... मला तर कल्पनेत सुद्धा ती महान हस्ती एखाद्या समारंभात गळ्यात हातात पुस्तके बांधून दिसते☺☺ कदाचित काही पुस्तके वाचून तरी तिच्या विचार आणि वर्तनात बदल होईल अशी आशा बिचाऱ्याला वाटली असावी...पुस्तके आणि दागिने ह्यांची तुलना म्हणजे ईश्वराची नश्वराशी तुलनाच आहे... प्रत्येकाची योग्य जागा असते तेथेच ते शोभून दिसते...माझ्यासारख्या संसारी व्यक्तीला नश्वराने भुरळ घातली तर चूक काय त्यात?...मुळातच लोक पुस्तके किती वाचतात? त्याहीपलीकडे त्या पुस्तकात नेमके काय आहे? ह्या अत्यंत महत्वाच्या विषयाची चर्चा होण्यापेक्षा पुस्तकांची आकर्षक ,महागडी प्रदर्शने दिवाणखान्यात मांडून मी कशी उच्च अभिरुची बाळगून आहे.. मराठीचे संवर्धन, संरक्षण जणू माझेच खांदे वाहत आहेत... अशी जाहिरातबाजी हल्ली सोशल मीडियावर प्रकर्षाने होतांना दिसते.....अश्या पोस्ट चुकूनही फॉरवर्ड होणार नाही (थोडक्यात आपापल्या नवऱ्यापर्यंत जाणार नाही )याची आपण प्रत्येकीने दक्षता घ्यायलाच हवी.... त्यात पुस्तके भेट देतांना मागच्या अनेक वादांचा वचपा नवरा काढू शकतो...जरा खर्चाला सैल असणाऱ्या बायकोला ,'पैश्याने पैसा वाढवूया' अश्या सारखे पुस्तक  तर हात राखून खर्च करणाऱ्या बायकोला  'आर्थिक मंदीची गणिते'... असे पुस्तक खऊट नवरे भेट देतील.आर्थिक नियोजनात लक्षच न घालणाऱ्या आळशी बायकोला 'शेअर बाजाराचा अभ्यास' तर स्वयंपाकाची जरा कमी आवड असणाऱ्या बायकोला ...' सहज सोप्या 101 पाककृती' हे पुस्तक भेट म्हणून मिळणार... बरं पुस्तक देऊन गप्प बसेल तो नवरा कसला? थोड्या दिवसांनी वाचलं का पुस्तक ? एव्हढं प्रेमानं भेट दिलेलं म्हणून भुणभुण सुरू होईल... नंतर  घरापासून जगापर्यंतचे आर्थिक धोरण कळल्यावर डोक्याला बाम लावायची वेळ येईल......नको रे बाबा !  त्यापेक्षा  दागिनाच आवडेल मला...अगदी शे पाचशेची नोट सुद्धा चालेल.
                      अनेकदा पुरुष मंडळीचा... सोन्याचे दागिने म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट कशी आहे? त्याच पैश्यांचे fd चे दहा वर्षांनी किती मिळतील आणि shares चे 18% रिटर्न्स कसे मिळतील... हा चर्चेचा अत्यंत आवडता विषय असतो.अश्या वेळी आपण अजिबात डोके खर्च करू नये... नवऱ्यापुढे..."आपण कित्ती हुशार आहात" हा भाव  चेहऱ्यावर आणावा...शक्य झाल्यास इतर मंडळींसमोर "यांचं आर्थिक नियोजन वाह! वाह!" असा एक छोटेखानी कौतुक सोहळा जरूर करावा. मंडळी आपल्या माहेरची माणसं असतील तर कृतज्ञता चेहऱ्यावरून ओसंडून जायला हवी...मंद आचेवर शिजत घातलेल्या भातासारखा हा प्रकार आहे.घाईगडबड करून नुकसान करून घ्यायचं नाही...तर अश्या कौतुकाने खुश झालेला नवरा ,"तुला काय पाडव्याचं गिफ्ट देऊ राणी? "असं गोडीत येत विचारतो...तेव्हा चपखल दागिना मागता यायला हवा... यासाठी तुमचा गृहपाठ आधीच तयार हवा... साधारण सोन्याचा भाव काय आहे? नवऱ्याला बोनस वगैरे किती मिळाला आहे... आणि लग्नाला साधारण किती वर्षे झाली ह्या त्रिसूत्रीच्या गुणाकारातून आपल्याला योग्य उत्तर लाभू शकते. फॅक्टर 1सोन्याचा भाव काढणे फार काही अवघड नसते पण फॅक्टर 2 अर्थातच सहजी कळत नाही ... आपल्याला कितीही वाटत असेल की पाटल्या कराव्यात पण नवऱ्याच्या बजेट मध्ये 2 बांगड्या बसत असतील तर पाटल्यांचा हट्ट धरणे म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं ... योग्य वेळी योग्य मागणी पदरात पाडून घेणे जमले पाहिजे... हळूहळू लग्नाला जसजशी वर्षे होऊ लागतात तसतसे हे स्कील जमू लागते.. मात्र एक नुकसान होते... घटत्या उपयोगीतेच्या नियमानुसार आपले रुसणे, अबोला, आपटधोपट .. ह्यांचा उपयोग लग्नाला होणाऱ्या वर्षाबरोबर घटत जातो.हळूहळू तर लग्नाला झालेली वर्षे वाढू लागली की आपला अबोला नवऱ्याला गोड वाटू लागतो...म्हणूनच फॅक्टर 3 लग्नाला झालेली वर्षे अत्यंत महत्वाची आहेत.
                        आमचा नवरा नाही बाई असलं काही विचारत... असे वाटत असेल तर गणिताचा नसून भाषेचा अभ्यास करायला हवा आहे. मावस नणंदेच्या लग्नाहून परतल्यावर ,"माझे हात कसे तरीच दिसत होते .. अगदीच सुने" असे तुमच्याच मामी म्हणाल्या याचे ... आवडीचा नाश्ता देतांना रसभरीत वर्णन असावे... ह्या वेळी बेफिकीरीचे भाव असावे...(वाईट वाटलं तरी डोळ्यांतून पाणी काढू नये.. त्याचा उपयोग पुढेे)... भिशीहून परतल्यावर..." दोन बांगड्यांच्या जोडीला अजून दोन करून घे ग.. हात भरून दिसेल " असे मैत्रिणींनी म्हटल्याचे पुन्हा पुन्हा सांगावे... आणि अखेर एखाद्या जावेने किंवा शेजारणीने पाटल्या किंवा बांगडया केलेल्या दाखवल्या की ,"माझी कित्ती दिवसांची इच्छा होती"  म्हणून डोळ्यांच्या कडेला राखलेले पाणी बाहेर काढावे. या संधीचं सोनं करत आपण कसं मन मारून जगतो ...संसाराला प्राधान्य देतो ह्याचे प्रास्ताविक मांडावे.एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा की नवऱ्याचा मेंदू  आपल्यासारखा सरसकट सगळे साठवून ठेवत नाही..त्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीच तो सांभाळतो. आपलं हे आद्य कर्तव्य आहे की आपल्या दृष्टीने आवश्यक माहितीची आपण वारंवार आठवण देत राहावी.
                           दागिने प्रत्येक स्त्रीचं हक्काचं धन...ज्यावर तिचा संपूर्ण अधिकार असतो... मात्र स्त्री धन म्हणून गौरवण्यात आलेल्या दागिन्यांचे मोल ; प्रत्येक स्त्री साठी पैश्यात नसतंच मुळी... लोकांसाठी अमुक ग्रॅम किंवा तोळे असणारा दागिना तिच्यासाठी आठवणींचा ठेवा असतो...फक्त शरीर जरी तो दागिना धारण करत असेल तरी खरंतर तिचं मन त्यात अडकलेलं असतं.... लग्नातलं मंगळसूत्र, दोघांनी जोडीनं घेतलेल्या साखरपुड्याच्या अंगठ्या... इथपासून आईच्या बांगड्या.. ताईचा तन्मणी, सासूबाईंचा पोहेहार,आजेसासूची नथ... इथपर्यंत ही यादी वाढती असते. दागिने जितके जुने तितके त्याचे महत्व अनन्यसाधारण असते...कारण त्याच्या वजनाइतकेच किंवा काकणभर अधिकच प्रेम, कौतुक, माया,ओढ यांत ओथंबलेले क्षण त्यात गुंतलेले असतात.आजकालच्या use n throw पिढीसाठी कदाचित वेडेपणा असेलही ... मात्र पिढ्यानपिढ्या वापरलेला दागिना आगळ्या झळाळीचा असतो... एका पिढीचा संघर्ष, कसोटीचे क्षण, सुखाच्या अनुभूती आणि आशीर्वाद यांचा तो जिवंत वारसा असतो....हा अनुभव शब्दांत मांडणं कदाचित अनुभवण्याइतकं सोपं नाही.... तरीही प्रयत्न करते
                          लग्नानंतर अनेक वर्षे सणासुदीला चांदीची उपकरणे नी दागिने काढून वापरली जायची नी जबाबदारीने ती आली तशी परत जात. घरातील जेष्ठ म्हणून सासूबाई हे काम जबाबदारीने करत... हळूहळू वर्षे सरली... अन् ही कामे जबाबदार गृहिणी या नात्याने माझ्यावर सोपविली गेली...त्याच वेळी मला "ती" सापडली... मोहक सुरेख देखणी चांदीची डबी...सुरेखशी वेलबुट्टी ची नक्षी....उघडून पाहते तर काय ?....लालबुंद मखमालीवर पहुडलेली अप्रतिम सुरेख ठसठशीत नथ... डबीवर आजेसासूबाईंचे नाव कोरलेलं.'पाहताच ही बाला कलीजा खलास झाला'... आधीच नथ मला प्रचंड प्रिय त्यात ही खरेच अप्सरा... मी प्रेमात पडले अक्षरशः... (होय! बायका दागिन्यांच्या प्रेमात पडतात..नवल नाही त्यात काही)... खरंतर... एकुलती सून म्हणजे ती माझीच होती पण ऑफीशिअली ती माझी नव्हती...लगेच सासूबाईं ना विचारणा केली ... त्या साफ विसरून गेल्या होत्या त्या नथेंबद्दल... ,"अग !माझ्या सासूबाईंची नथ ती...एकतर ती चांगलीच जडजूड आणि तिची दांडी खूपच जाड .. तुम्ही आजकालच्या पोरी कश्याला वापरताय... म्हणून मागे पडली .. त्यात तुझं नाकही टोचलेलं नाही ना!" म्हणजे थोडक्यात दिली असती पण नाक टोचलेलं नाही.. प्रश्न मोठा बिकट होता. मी खरंच नाक कधी टोचलच नव्हतं.. इतक्या वेगवेगळ्या चापाच्या नथ मिळत असतांना कश्याला टोचायचं नाक?? असं सारं माझ्या चांगलंच नाकाला झोंबलं.☺
                        नवऱ्याच्या कडव्या विरोधाला मोडून मी शांतपणे नाक टोचून घेतलं... या वयात टोचलेलं नाक पाहून मैत्रिणींनी हात जोडले... सहनशक्तीची खरंच कमाल होती.पुढे त्यात तार फिरवत राहणे, मग सुजणे, फुगणे सगळे प्रकार एक वर्षभर पुरले.. फक्त नाक टोचून भागणार नव्हतेच. नथेची दांडी चांगलीच मोठी होती.अखेर नाकातून तार काढून लवंग घाल, शोपेची काडी घाल करत ते मोठे केले. एक जाड तारेची रिंग घालून घेतली.. हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता.. आणि कठिणही.. अखेर रिंग सेट झाली...आणि दिवाळीच्या दिवशी हिमतीने मी ती नथ घातली... काहीही त्रास न देता ती इतकी चटकन गेली की जणू तिला माझी ओढ, माझी धडपड सारे समजले होते. नथ सुरेख तर होतीच पण त्याहूनही काहीतरी अधिक त्या क्षणी मला मिळालं...कदाचित मी मनानं 100% रहाळकर झाले...इवलासा दागिना, मला अप्राप्य नव्हता पण दोन अडीच वर्षे त्यासाठी मी खूप काही केलं ...ती घातली नि मनात आनंद ,अभिमान, आदर, रुबाब या साऱ्या संमिश्र भावनांचा कल्लोळ झाला..... याचसाठी केला होता अट्टाहास....शब्दशः खरे होते.
                     म्हणूनच मी नेहमीच म्हणते बायकांना कितीही वेड्यात काढा दागिन्यांसाठी... त्यांचं ते वेड पुरुषांना समजण्या पलीकडचं असतं.असं म्हणतात... "दागिना घालतो तो अवयव तो दागिना अधोरेखित करतो, अधिक उठावदार अधिक आकर्षक बनवतो".... मी तर म्हणेन प्रत्येक दागिना तिचं कुटुंबातील गुंतलेपण अधोरेखित करतो.दागिना म्हणजे तिचा सासर माहेरचा सार्थ अभिमान असतो... "दागिने घालून मिरवणे" म्हणण्याची जी पद्धत आहे ती याचसाठी... हा दागिना तिचा अडीअडचणीला हक्काचा आधार असतो.वेळप्रसंगी वाईट वेळेला त्यातून पैसा उभा राहू शकतो... मात्र सतत चेन स्नॅचिंग च्या केसेस, लूट,भूल घालणे वगैरेंमुळे अधिक धोक्याचा, जोखमीचा भाग बनला आहे.पहाटे अंधारात सहा आठ तोळ्यांचे दागिने घालून फिरायला निघणाऱ्या स्त्रियांना तिथेच दंडवत घालावा वाटतो... जिमला  किंवा योगा, एरोबिक्स ला ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वर पाटल्या बांगड्या घालून येणाऱ्या बायकांमध्ये मला मिनी माऊस दिसते☺..(थोडक्यात कार्टून). "दागिना घालून लाखाला, हात शेअर रिक्षाला" ही नवी म्हण तर मी मराठीला द्यायलाच हवी.. कशाला आयांनो , बायांनो? काळजी घ्या की जरा... दागिन्यांची. काय होतं...आमच्या नवऱ्याला आयतच कोलीत मिळतं ना!अश्या  मंगळसूत्र चोरीच्या बातम्या ते तिखट मीठ लावून वाचून दाखवतात....अश्या वेळी काय करायचं? बरोब्बर! "आजच्या काळात दागिने घेणे मूर्खपणा आहे.. पैसा पाण्यात जातो...त्यापेक्षा शेअर्स उत्तम  एकदा मला शेअर बद्दल अभ्यास करायचा आहे....." वगैरे वगैरे मी बोलत बसते. खरेतर, पाटल्याचं design केव्हाच पाहून ठेवलंय... तुम्हाला तर माहितीच आहे नुसत्या बांगडयानी हात सुनाच दिसतो ...☺
 ©यशश्री रहाळकर                 
    
                        

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

बंटी.. चल खेळू भाग 2

पूर्वार्ध:-
https://kattayashashri.blogspot.com/2019/10/blog-post_31.html?m=1
                       समोरच्या समईचा प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले....देवाला हात जोडून वळत नाही तोच घरातला कोलाहल कानी पडला. बंटीचे बाबा आणि आजी यांचे भांडण विकोपाला गेले होते.दोघांनाही बंटीची काळजी होतीच पण आपापल्या मुद्द्यावर दोघे ठाम होते... आजींच्या मते... सुजॉयने बंटीला झपाटले होते... त्याला बाहेरची बाधा झाली होती... तर बंटीच्या बाबांसाठी ह्या साऱ्या अंधश्रद्धा होत्या, थोतांड होते.त्यांच्या मते बंटीचा मानसिक तोल ढळला होता...त्याला उपचारांची गरज होती. मी दोघांनाही शांत करत म्हणाले,"आपण सारेच आपापल्या परीने प्रयत्न करूया... सुजॉयला बंटीपासून वेगळं करायचं आहे .. हे नक्की. मी ते करणारच..." तेव्हढ्यात आतून खदाखदा हसत बंटी बाहेर आला...,
" बंटीची आई.. कशाला हवाय तुम्हाला हा असला बावळट, बिंडोक, ऍव्हरेज मुलगा... भित्रा कुठला! नेहमी त्याला सांगायचा ना! बघ त्या सुजॉयकडे .. शिक त्याच्याकडून काहीतरी.... तुम्हाला माझ्यासारख्या स्मार्ट, क्लास मध्ये फर्स्ट येणारा.. हुशार मुलगाच हवा होता ना!... तसाही तो  बंटी तुमचं प्रेम डीझर्व करतच नाही.सुजॉय हक्कदार आहे सगळ्याचा... सगळ्यांचे लाड, लक्ष, आईचे प्रेम ... सारे सुजॉयचे आहे..." पुन्हा त्याचं ते अंगावर काटा आणणारं विकल हास्य... आम्ही सारे जागीच गोठून गेलो होतो.क्षणात बंटीचा आवाज बदलला... ढसाढसा रडत बंटी माझ्या गळ्यात पडला... " आई सांग ना सुजॉयला... जा आता . सोडून दे मला... मला नकोय तो ... नकोय माझ्या आत... मला म्हणाला... माझ्या विश कॉम्प्लिट नाहीत.. मला हेल्प कर त्या पूर्ण करायला... आई हेल्प करणं चांगलं असतं ना! तूच सांग? मी हेल्प केली आता तो जाणार नाही म्हणतो... मलाच बाहेर जायला सांगतोय...आई मला नाही जायचं तुला सोडून..." मोठी किंकाळी मारून बंटी बेशुद्ध पडला. डॉक्टरांना बोलावून उपचार सुरू झाले.. बंटी खंगला होता... मानसिक ताणाने ताप आला होता... सुजॉय माझ्या बंटीपेक्षा प्रभावी होत होता..माझं पिल्लू दुबळ होतं.. पण त्याची आई दुबळी नक्कीच नव्हती.
                खाली उतरताच मी एक मोठ्ठा धोंडा उचलला आणि त्या काळ्या सायकलवर घातला.. दामाजी पहातच राहिला...मी पुन्हा पुन्हा त्वेषाने धोंडा उचलत होती नि सायकलवर पुन्हा पुन्हा घालत होती... अखेर सायकलचे तुकडे तुकडे झाले तशी बंटीला शुद्ध आली... त्याने डोळे उघडले... बंटीच्या बाबांनी वरूनच आवाज देऊन मला बोलावले...माझ्या हातानी दोन घोट पाणी पाजतांना मी बंटीला म्हणाले...,"बंटी राजा.. मला तू खूप खूप आवडतोस... का? माहितीये.. कारण तू सगळ्यांना मदत करतोस... अरे! अभ्यास करून कुणीही फर्स्ट येईल पण .. असा स्वभाव मात्र कुणाकडे नसतो बरं!" सारं कळून बंटी फिकट हसला.. पुन्हा डोळे मिटून घेतले.दामाजीला परिस्थितीच गांभीर्य कदाचित न सांगताच कळलं असावं...तेव्हढ्या वेळात त्याने ते सायकलचे तुकडे गोळा करून कुठल्याश्या भट्टीत स्वाहा! केले .
                  सुजॉयला जाऊन आज 28 दिवस पूर्ण झाले होते. सकाळी बंटी उठला तोच गरम शिऱ्याची मागणी करत ... त्याला खूप भूक लागली होती...मी कांद्याचे खमंग थालीपीठ त्याच्यापुढे ठेवत म्हटले..."माझ्या बंटीला गोड मुळीच आवडत नाही." संतापाने प्लेट उधळून देत बंटी म्हणाला, "बंटीची आई.. मला शिरा हवाय..मला शिरा आवडतो." मी शांतपणे म्हणाले,"मी बंटीची आई आहे ... मला माहितीये त्याला शिरा मुळीच आवडत नाही." ...बंटी तोंड फिरवून बसला.. मी मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.. नी एकेक घास स्वतः त्याला भरवू लागले," बंटी.. तू लहान असतांना मी अशीच तुला एकेक घास भरवायचे... तू घरभर फिरायचा नी मी तुझ्या मागे मागे ताट घेऊन..."त्याचं बालपण आठवेल तसं तसं त्याच्याच पुढे मी मांडू लागले...बंटी शांत झाला होता.. माझ्या बोलण्यात रमला होता.त्याच्या बाबांनी आम्हाला पाहिलं नी लहानपणच्या त्याच्या फोटोंचा अल्बम समोर ठेवला.. एकेक फोटो दाखवून आम्ही त्याचे किस्से त्याला सांगत होतो... आणि काही गमतीशीर प्रसंगांची उजळणी करीत होतो....एका फोटोत वर्षाच्या बंटीने सगळ्या अंगाला आईसक्रीम फासून घेतलं होतं... तो फोटो पाहून मी हसत हसत बंटीला म्हणाले,"बंटी हे सारे क्षण म्हणजे आमचा अनमोल ठेवा आहेत.. तू कित्तीही मोठा झालास ना तरी आम्हाला तुझे हेच दिवस आठवणार..."बंटी गोळ्या घेऊन शांत झोपला.
                  त्या आईस्क्रीम च्या फोटोमुळे मला अमूल पार्लरची आणि शिंदे आजोबांची आठवण झाली... खरेच या धामधुमीत त्यांना भेटायला जायचा विसरच पडला होता ... मी यांना तडक गाडी काढायला सांगितली ... दुकानातील मुलाकडून शिंदे आजोबांच्या घराचा पत्ता घेऊन आम्ही निघालो... एव्हाना त्यांना हॉस्पिटलमधून  डिस्चार्ज मिळाला होता. आजोबा पार खंगले होते... त्या अपघाताचा विषय निघताच त्यांच्या पत्नीने हात जोडले...,"आत्ता कुठं जरा सावरले आहेत आता पुन्हा तो विषय नको" म्हणून गयावया करू लागल्या...मी त्यांचे पाय धरले...अक्षरशः पदर पसरला... माझ्या बंटीला जे काय झाले ते सारे सांगू लागली..आतल्या खोलीत पडल्या पडल्या बहुदा शिंदे आजोबा सारे ऐकत असावेत... हळूहळू चालत ते बाहेर आले...बायकोला हातानेच थांबण्याची खूण करत.. बोलू लागले... बहुदा बोलतांनाही त्यांना खूप कष्ट पडत असावेत... " पोरी माझ्या मुलीच्या वयाची तू..कित्येक वर्षे रोज सकाळी भेटतो तुला...त्या मुलाचा अपघात काय नाव म्हणालीस???"..."सुजॉय".मी मध्येच घाईने उत्तरले...जरा दम खात शिंदे आजोबा म्हणाले,"हो.. तोच.. तोही यायचा सकाळी शाळेच्या बस करता...त्या दिवशी..  मी दुकानात कुणी नाही म्हणून बाहेर उगाच फेऱ्या मारत होतो... एव्हढ्यात एक मोठ्ठ ट्रेलरचं धूड धडधड आवाज करत जाऊ लागलं... माझ्या दुकानापुढे स्पीड ब्रेकर आहे ना!... तेव्हढ्यात मागून येणारं हे पोरगं .. कसं कोण जाणे सायकल डिव्हाईडरवर आढळून ट्रेलरमध्ये ओढलं गेलं... अरे अरे! म्हणेपर्यंत ड्रायव्हर पळाला... दहा बारा वर्षाचा इवला जीव... कवटी फुटून मेंदू बाहेर आला होता"......
             आजोबांना धाप लागली ते पाणी पिण्यासाठी थांबले... माझ्या डोळ्यासमोर जणू अख्खा प्रसंग उभा राहिला... भयाची एक शिरशिरी उभी राहिली.पुन्हा विषयाकडे वळत आजोबा म्हणाले," त्याही अवस्थेत पोरगं उठून बसलं ... एक आचका दिला नी देह सोडला.. हे सारं एकट्या मी पाहिलं होतं... त्याचा काळ आला होता हेच खरं! गर्दी जमली.. पोलीस आले.. सारे सोपस्कार झाले..मन उतरलं हे सारं पाहून.. दुकान वाढवून  संध्याकाळी घरी निघालो तो हा त्या स्पीड ब्रेकरवर बसलेला....तसाच कवटी फुटून मेंदू बाहेर आलेल्या अवस्थेत... माझ्याकडे पाहून ओळखीचं हसला.. इवलासा जीव तो काय इच्छा असतील त्याच्या?जग कितीसे पाहिलं असेल त्यानं?... मी फार विचार केल्याने असेल भास झाला... असं वाटून मी सोडून दिलं... ... दुसऱ्याही दिवशी दुकान वाढवून जरा लवकरच घरी निघालो... पुन्हा तोच प्रकार...तिसऱ्या दिवशी तसेच घडले... आता मात्र तो उठून माझ्याजवळ आला... मला मदत करा माझ्या विश पूर्ण केल्या की मी सुटेन म्हणाला...माझ्यावर कुणी विश्वास ठेवे ना .... मी दुकानात जाणेच बंद केले...पण त्या दिवसापासून शांत झोप नाही मला... डोळे मिटले की तोच मुलगा येतो नि पुन्हा पुन्हा गयावया करतो... डोकं फुटलेलं.. मेंदू लोम्बतोय .. अंग रक्तानं माखलंय... कपाळावरन रक्ताची धार ओघळतेय...." हे सांगताना शिंदे आजोबांचे डोळे भीतीने मोठमोठे होत गेले..."पुरे पुरे ! नाही ऐकवत "म्हणत मी कानावर हात ठेवले.
                        शिंदे आजोबांचा निरोप घेतांना एव्हढीच उकल झाली होती की सुजॉयची इच्छा अपूर्ण राहिली होती... काय असेल? हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या घरातून बाहेर पडतांना बंटीच्या बाबांनी प्रांजळपणे कबूली दिली, "हे असं काही असू शकत ह्यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.बापरे! भयंकर आहे हे." मी आपल्याच तंद्रीत होती...काय असेल बरं मनात ह्याच्या?? त्याच्या घरी शोधायला हवे..तडक आम्ही देशपांडे आजींचे घर गाठले...त्या बऱ्याच सावरल्या होत्या.. सगळी हकीगत थोडक्यात त्यांना ऐकवली...बंटी सुजॉयचे माध्यम होता... त्याच्या अपूर्ण इच्छेविषयी मात्र त्यांना सांगता आले नाही.तेव्हढ्यात त्यांना त्यांच्या मुलीचा म्हणजे सुजॉयच्या आईचा फोन आला.. तिचीे flight एअरपोर्ट ला लॅन्ड झाली होती....देशपांडे आजी वेदनेने पिळवटून म्हणाल्या, "काय दुर्दैव विलास पहा! सुजॉयच्या आईच्या नशीबात त्याची भेट तर नव्हतीच पण अखेरचे दर्शनही नव्हते. आता येतेय ती उद्या महिना होईल सुजॉयला जाऊन." ही स्वतः च्या करियर मध्ये व्यस्त असणारी...अत्यंत यशस्वी व्यावसायिक... आणि तितकीच अयशस्वी आई देखिल माझ्या मनात आलं. झटकन लाईट लागावा तशी सारी समीकरण मनात स्पष्ट झाली. सुजॉयने जाण्यापूर्वी आमचा निरोप घेतला होता... बंटीची छबी डोळ्यात किंवा मनात असावी.नंतर शिंदे आजोबांनी अखेरचा आचका देतांना त्याला पाहिलं असावं... म्हणून याच दोघांना तो दिसू शकतोय. जाण्यापूर्वी त्यानं बंटीशी आल्यावर भरपूर खेळायचं, सायकलवर भटकायचं ठरवलं होतं... ते तर झालंय की पूर्ण अजून काय ? अजून काय असेल बरं? मी डोळे बंद करून आठवू लागले, "बंटीची आई बंटीची आई!"त्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते.. मला उत्तर मिळालं... आई.. आईचं प्रेम ,माया... तो इवला जीव आईच्या आठवणीनं व्याकुळ झाला असावा. आता ग्रहण सुटले होते.
                       आज सुजॉयला जाऊन महिना झाला होता... बरोबर 11:30 ला मी देशपांडे आजींकडे पोहोचले... सुजॉयच्या आईला थोडी कल्पना आधीच आजींनी दिली होती.. बाकी फार खोलात न शिरता...त्यांना मी तुमची भेट सुजॉयशी घालून देते म्हणून सोबत घेऊन निघाले. त्या अविश्वासाने पाहत होत्या मात्र आपल्या आईच्या शब्दाखातर तयार झाल्या... आम्ही अमूल मिल्क पार्लरच्या जवळच्या स्पीड ब्रेकर जवळ थांबलो... तिकडून दामाजी आणि हे बंटीला जवळजवळ उचलून घेऊन आले... त्याच्या अंगात एक पाऊल टाकण्याची ताकद नव्हती. बरोबर 12 वाजून 2 मिन झाली ....याच वेळी ,याच जागी महिन्यांपूर्वी सुजॉयचा अपघात झाला होता... अंगात ताकद नसणारा बंटी सुजॉयच्या आईला पाहत धावत सुटला... मम्मा म्हणत त्यांच्या गळ्यात पडून हमसून रडू लागला.."मम्मा कधी आलीस तू युरोपहुन?" त्याचा आवाज ऐकताच सुजॉयच्या आईचा जीव हळहळला पोराचा आवाज आईने ओळखला.. त्याला मायेनं पोटाशी धरलं..."मी खूप बॅड मम्मा आहे सुजो... तुझ्यासारख्या गोड बाळाला मला सांभाळता नाही आलं.. माफ कर मला.But I love you my boy... miss you forever... please forgive me.. sorry sorry.. oh God... " म्हणत सुजॉयच्या आईने हंबरडा फोडला
...पुढं मायलेकरांचा राहिलेला संवाद माझ्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता.. पोहोचले ते प्रेम निरतिशय माया.. ममता... बंटीच्या कपाळाच प्रेमानं चुंबन घेत सुजॉयच्या आई म्हणाल्या, "I am proud of you my boy.. मला खूप खूप अभिमान वाटतोय तुझा...कायम वाटेल..." त्याच क्षणी सुजॉयच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. सुजॉयचा आत्मा आईच्या भेटीसाठीच नव्हे तर तिच्या तोंडून .. लेकरा तुझा अभिमान वाटतो. हे शब्द ऐकण्यासाठी आसुसला होता...पुढे सारं मळभ सरलं.. माझ्या बंटीला बरं व्हायला 2 महिने लागले . त्याचं एक शैक्षणिक वर्ष देखिल वाया गेलं... मात्र आईपणाचा मोठा पाठ मी सुजॉयकडून शिकले... मुलांचा हक्क आहे आईच्या दोन कौतुकाच्या शब्दांवर... प्रत्येक मूल आगळं आहे.. प्रत्येक जण काहीतरी विशेष घेऊन जन्माला आलंय.. कधीही इतरांसारखं होण्याचे दाखले त्याला देऊ नका.. आयुष्याचं एव्हढं मोठं युद्ध लढून जिंकणाऱ्या माझ्या बंटीचा मला खूप खूप अभिमान आहे... Proud of you my boy!
© यशश्री रहाळकर