फॉलोअर

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

बंटी.. चल खेळू

                     माझा लेक अभय उर्फ बंटी... नाव अभय असलं तरी  मुलखाचा भित्रा ससा....अगदी झुरळापासून मांजरपर्यंत सगळ्यांना घाबरणारा. आम्ही सगळे घरचे, नातेवाईक एव्हढेच काय टीचर आणि त्याचं मित्रमंडळ देखिल त्याला बंटी म्हणूनच ओळखतात.गेल्याच महिन्यात आठ वर्षांचा झाला.... "आता बंटी नको ना म्हणू "... असं सारखं सुरू झालंय."मग काय दामाजी सारखं बंटी साहेब म्हणू का?".. मी विचारलं. दामाजी आमचा पूर्ण वेळ रखवालदार, कम माळी, कम स्वीपर वगैरे....आमच्याच बंगल्यातील खालच्या खोलीत राहतो.. एकटा जीव.
                     गावापासून जरा दूरच आमचा बंगला ... ... पाथर्डी रस्ता लागला की एक जुनं चर्च... चर्चच्या पाठी चार दोन घरे...आणि त्याच चौकात चार दुकानं... एक अमूल मिल्क पार्लर...एक सलून, एक किराणा मालाच नी एक कसलं तरी ऑफिस.चौकाच्या पुढं काहीही नाही... सगळं माळरान आमचा एकटाच बंगला.खालच्या मजल्यावर बंटीच्या बाबांचा बिझनेसचा पसारा वरती प्रशस्त राहतं घर...घराला माणसांच्या दुप्पट खोल्या.. आम्ही इन मीन साडे तीन माणसं... मी , बंटीचे बाबा, आज्जी आणि बंटी साहेब ...  खरंतर बंटी अगदी चार महिन्यांचा असतांना इथे रहायला म्हणून आले तर एव्हढां एकांत भयावह वाटला .हळूहळू माझी झाडाफुलांची आवड जपत सुंदर बाग फुलवली.. प्रशस्त घर, शुद्ध हवा, मोकळं वातावरण, शहराच्या गोंगाटापासून दूर असणारं आमचं घर मला आवडायला लागलं.त्यात बंटीच्या बाबांचीही सोय झाली... त्यांना मस्त गरमागरम जेवण ,नाष्टा सारं देता येई. बंटीच्या शाळेच्या बसचा स्टॉप देखिल चौकातच होता अमूल मिल्क पार्लर जवळ... सगळं कसं सोयीचं होतं.
                  एक मात्र झालं बंटीला खेळायला सोबत नव्हती कुणाची.. पोर एकटा पडला. खोलीभरून सगळ्या प्रकारची खेळणी होती... त्यात हा एकटाच खेळत बसे... तसा शहाणा होता...कधी कसली तक्रार नसे.दामाजीशी मस्त गट्टी होतीच.. कंटाळा आला की त्याच्यासोबत चक्कर मारून येई...कधी भाजी आणून देई तर कधी वाण सामान.सकाळी 7:15 ला बंटीला मी चौकातल्या स्कूल बसच्या स्टॉपला सोडायला जायचे...त्या स्टॉप वर बंटी एकटाच असायचा.... एव्हाना शिंदे आजोबा अमूलचे दुकान उघडून माल उतरवून घेत असत...दोन जुजबी वाक्य बोलून, ताजं दूध घेऊन मी परत येत असे.साधारण जुलै महिन्यातल्या एका सकाळी त्या स्टॉप वर आणिक 2 व्यक्ती दिसल्या साधारण बंटीच्या वयाचा मुलगा आणि एक आजीबाई.दुपारी 2:15 ला बंटीला घ्यायला स्टॉप वर पोहोचेपर्यंत आजीबाई आलेल्या होत्या.ओळखीचं हसल्या... जुजबी ओळखी झाल्या... एवढ्यात दोघे बसमधून  उतरले.दोघे एकाच वर्गांत होते...सुजॉय त्याचं नाव... बंटी साहेब खूपच खुषीत होते.नवा मित्र मिळाला होता... घरी जाईपर्यंत सुजॉय पुराण ऐकायला मिळाले.
                     लवकरच सुजॉय आणि बंटी जिवलग मित्र बनले. सुजॉय घोष ...देशपांडे आजींच्या मुलीचा मुलगा.बंगाली बाबूशी तिने केलेला विवाह 2 वर्षांत मोडला.. दोघांनी आपापले दुसरे संसार मांडले... सुजॉयची अडचण दोघांनाही नको होती... सुजॉयची रवानगी मग आजीआजोबांकडे झाली.अधून मधून दोघेही येऊन भरपूर पैसे, सुजॉयला गिफ्ट्स वगैरे देऊन जात...कळत्या वयापासून सुजॉय आजीकडेच वाढला.सुजॉय विलक्षण बुद्धिमान आणि समजूतदार होता...कसलीही तक्रार ,हट्ट आपण करताच कामा नये हे ; न सांगताच त्याला उमजले होते..वर्गांत कायम अव्वल तर असायचाच पण सगळ्या स्पर्धांत देखिल हिरीरीने भाग घेई... चुणचुणीत, लाघवी होता.
                थोडक्यात काय तर आमच्या बंटीच्या अगदी विरुद्ध ... मितभाषी, बुजरा , एकलकोंडा बंटी तर बडबडा,हसतमुख,सगळ्यांशी मैत्री करणारा सुजॉय. तरीही दोघांची घट्ट मैत्री झालीच.. दिवसभर दोघे एकमेकांसोबत असायचे..शाळेत एकाच बाकावर बसायचे. उरलेला वेळ हा त्याच्या नाहीतर ; तो ह्याच्या घरी पडीक असायचा.त्याच्या सोबत बंटी देखील खुलू लागला... बंटीकडून वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी सुजॉय करून घेई.. बंटीला कठीण वाटणाऱ्या गणिताचाही अभ्यास तोच करून घेत असे.त्यांच्या योगाने दोन वर्षांत त्यांच्या आज्यांचीही मस्त मैत्री झाली.. देशपांडे आजी आणि बंटीच्या आजी चौकात भेटून रिक्षा करत मग कधी कोणत्या देवळात जात तर कधी कीर्तन, भजन अश्या कार्यक्रमांना जोडीने जात. या दोघांच्या हाताने डब्यातून खाऊ आवर्जून पाठविला जाई.. एव्हाना सुजॉय आणि बंटीच्या आवडीनिवडी दोन्ही घरांत कळल्या होत्या. बंटीला देशपांडे आजींच्या हातचं झणझणीत आवडे तर सुजॉयला माझ्या हातचं गोडधोड.सुजॉय मला "बंटीची आई" म्हणायचा. एकदा त्याला म्हटले देखिल, " सुजॉय ; मला काकू किंवा मावशी म्हण ना!.. हे बंटीची आई फार परकं वाटतं".सुजॉय चटकन म्हणाला, "आई बरं वाटतं!" नकळतपणे भरून आलेले डोळे पुसत खेळायला पळाला.
                    दिवाळीच्या आधीची कामांची लगबग आवरा-सावर सुरू होती. देशपांडे आज्जी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला म्हणून आल्या...सुजॉयनी गियरची सायकल घेण्याचा हट्ट धरलाय म्हणाल्या.मला नवलच वाटले कारण सुजॉय हट्ट करणारा मुलगा नव्हताच.सायकल महागडी तर होतीच पण आमच्या चौकातल्या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असे.. म्हणून देखिल त्यांचा ह्या सायकल प्रकरणाला विरोध होता.. रात्री आमच्याही घरी बंटीने गियरची सायकल हवीच असा हट्ट धरला.वर्गातल्या कुठल्यातरी मुलाची stylish सायकल पाहून तश्शीच घ्यायचा या दोघांचाही विचार होता.... मी देखिल या सायकल घेण्याला कडाडून विरोधच केला. त्यात भर म्हणजे ह्या दिवाळीला मी भावाकडे जायचे ठरविले होते.. भावाने नवे घर घेतले आणि आईची एकसष्ठी .. दोन्ही एकत्रच सारे मिळून करायचे ठरले. झाले बंटीने आकाशपाताळ एक केले...."मी सुजॉयला सोडून मुळीच येणार नाही.त्यालाही घेऊन जाऊ. मला तिथे करमत नाही.मी नाही येत..." पर्यंत सारे करून झाले. माझ्या दोन्ही भावांना दोन मुलीचं.. त्यांच्याशी काय खेळणार... कसेबसे चार दिवसांसाठी त्याला तयार केले.सुजॉयला कसे नेणार? शेवटी लोकांचं पोर ते. आम्ही गाडीत सामान ठेवले.. अन निघणार तेव्हढ्यात सुजॉय आला.. स्वारी नव्या कोऱ्या गियरच्या सायकलवर स्वार.. त्याच्या पप्पांनी घेऊन दिल्याचे म्हणाला. बंटी खुश झाला.. आल्यावर खूप खेळायचे ,काय काय करायचे, कुठे कुठे सायकलवर भटकायचं.. सारं planning करून दोघांनी निरोप घेतला. पुढचे चार दिवस कसे गेले कळलं देखिल नाही.. दिवाळी, नवीन घराची वास्तुशांत आणि आईचा वाढदिवस...मनभर आनंद भरून घेत आम्ही परतलो.
                     घरात पाऊल की दारात पाऊल... बंटी सुजॉयकडे निघाला...नवीन सायकलची उत्सुकता होतीच. दाराशीच त्याला दामाजीने अडवलं.. काय सांगितलं कोण जाणे.. बंटी हातपाय आपटत ओरडतच वर आला, " नाही हे खोटं आहे. सांग ना दामाजीला.. सुजॉय असं कधीच करणार नाही. मला केलेलं प्रॉमिस तो कधीच मोडणार नाही" म्हणत बंटी ओक्साबोक्शी रडू लागला....अखेर आपल्या खोलीत जात त्याने धाडकन दार लावलं. दामाजीने बंटीला सुजॉय त्याच्या पप्पांकडे कलकत्त्याला कायमचा निघून गेल्याचं सांगितलं होतं.देशपांडे आज्जींना फोन करून विचारू म्हणून बंटीच्या आजी वळणार तोच दामाजीने मोठ्ठी धक्कादायक बातमी सांगितली... आम्ही निघालो त्याच वेळी सायकलवर घरी परतणारा सुजॉय .. एका ट्रेलरच्या मागच्या चाकात येऊन जागीच गतप्राण झाला होता." मोठं वंगाळ झालं बाई! हे रस्ताभर लोक जमले व्हते.. कवटी फोडून पोराचा मेंदू बाहेर आला होता पार चेंदामेंदा झाला व्हता .. पोरगं पार एका फटक्यात जागीच गेलतं...कुठे नेन्या आणन्या पल्याड...लई वंगाळ!" डोळ्यांत पाणी आणून दामाजीने वर्णन केले. आम्ही सासू सुना जागेवरच हबकून बसलो..... बंटीला दामाजीने सांगितले तेच बरे म्हणायचे. आम्ही दोघी देशपांडे आजींना भेटून आलो.. देशपांडे आजींची भीती खरी झाली होती.... त्यांचा विलाप ऐकवत नव्हता अगदी... कशी अन कोणत्या शब्दात समजूत घालू कळेनासं झालं होतं... जड पावलांनी परतत होतो अंगणात सुजॉयची सायकल लावलेली होती... एव्हढ्या मोठ्या अपघातात सायकल जश्यास तशी होती... बहुदा दगडावर आपटून सुजॉय ट्रेलरच्या चाकात फेकला गेला होता.. सायकल मात्र बाजूला पडली... ती काळीकुळकुळीत सायकल एखाद्या चांडाळा सारखी माझ्याकडे पाहून जणू हसत होती.
                      बंटीला हळूहळू सुजॉयचे जाणे स्वीकारावेच लागले... मात्र तो आपल्या जगात नाहीच हे सत्य मानायला त्याचं मन तयारच नव्हतं. बंटीच्या मनावर खोल आघात झाला होता... त्याचं घुमेपण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं.त्याचं आमच्याशी अवाक्षरही न बोलणं ...माझी काळजी वाढवत नेणारं होतं.या दुःखातून सावरायला त्यालाही वेळ देणं गरजेचं होतंच... मी काहीतरी निमित्ताने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत राहिले... सुट्ट्या संपून शाळा उघडली ... आता सगळे रुळावर येईल असे वाटू लागले... नेहमीप्रमाणे बंटीला बस स्टॉपवर सोडायला गेले तर अमूल पार्लर बंद...आज बराच उशीर झालाय शिंदे आजोबांना... असा विचार करून घराकडे वळणार एव्हढ्यात एका मुलानी दुकान उघडलं...मी त्याच्याकडे शिंदे आजोबांची चौकशी केली... तेव्हा कळलं त्यांची तब्येत गेले काही दिवस गंभीर आहे. 'तो' अपघात त्यांच्याच दुकानासमोर झाला होता... सुजॉयला अखेरचं त्यांनीच पाहिलं... त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मी घरी परतले.    
                साधारण चार दिवस बंटी शाळेत जाई परत येई.. उरलेला वेळ आढयाकडे पाहत बसे...एकदा सकाळी 12 च्या सुमारास बंटीच्या शाळेतून तातडीने मला बोलवले असल्याचा फोन आला अन् काळजाचा ठोकाच चुकला..धावतपळत आम्ही शाळा गाठली. बंटीने एका मुलाला बेदम मारले होते...हातापाया पडून माफी मागून प्रकरण निवळले.तरीही महिनाभरासाठी बंटीला शाळेतून काढून टाकले होते.झाल्या प्रकारावर बंटी बोलायला तयार नव्हता.त्याच्या वर्गशिक्षिका आम्हाला बाहेर भेटून ...बंटीला मानसोपचारांची गरज असल्याचे म्हणाल्या... तो हल्ली विचित्र वागतो ,प्रश्नांची उत्तरे देत नाही, एकटाच स्वतःशीच बोलत बसतो... आजही एक मुलगा सुजॉयच्या जागेवर बसला आणि वाद सुरू झाले ... त्याला सांभाळायला सांगून त्यांनी निरोप घेतला.
                  घरी पोचतो न पोचतो तोच बंटी "आलो आलो रे!" म्हणत धावत सुटला. कसंबसं दामाजीने पकडून त्याला घरी आणलं. बंटी आपल्याच तंद्रीत बडबडत होता... "सुजॉय आलाय तो बघ कंपाऊंड जवळ उभाय... ते बघ! तो आवाज देतोय बंटी चल खेळू... बंटी चल खेळू..." बंटीच्या बाबांनी त्याला दोन सणसणीत लगावल्या... तसा तो गळा काढून रडू लागला... त्याला फरपटत आजोबांच्या फोटोपुढे उभे करत बंटीचे बाबा म्हणाले, " हे बघ! हे तुझे आबा. देवाघरी गेले आहेत पुन्हा कधीही परत न येण्यासाठी... तसाच तुझा सुजॉय कायमचा देवाघरी गेलाय... काय म्हणतोय मी?? कळतंय का तुला??" बंटीच्या आजीने या दोघात उडी घेत बंटीला पोटाशी धरलं, त्याची दृष्ट काढली, स्वामींचा अंगारा लावला तसा बंटी शांत होत गेला.या सगळ्यात मी थिजून उभी होते. पुढे  मानसोपचार तज्ञ, कौंसेलिंग वगैरे सोपस्कार पार पडले. त्यांच्या मते बंटीला डिप्रेशन आले होते.बंटीला औषध द्यायला म्हणून त्याच्या खोलीत गेले तर हा आढयाकडे नजर लावून बसलेला...दहा वर्षांचं चिमण पिल्लू माझं.. काय होऊन बसलं होतं? खोल गेलेले डोळे,त्याखाली  काळी वर्तुळं, खाण्यापिण्यात चित्त नाही त्यामुळे खंगून पार वाळलेला बंटी.. मला पोटातून भडभडून आलं. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतांना त्यानी अचानक माझा हात घट्ट धरून ठेवला . माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, " आई... मी खरं बोलतोय तुझी शप्पत.... मला सुजॉय दिसतो. तो मला खालून आवाज देतो.. बंटी चल खेळू...असा. खर आहे" म्हणत रडू लागला....त्याला जवळ घेत मी त्याच्याशी बोलत राहिले... त्याच्या मनात साचलेलं सारं निवळायला हवंच होतं. थोडक्यात काय तर बंटीला सुजॉय सगळीकडे दिसत नसे फक्त खेळायला बोलवायला येई... हे सारे त्याच्या मनाचे खेळ आहेत या खेळात त्याला जिंकलेच पाहिजे वगैरे मी त्याला सांगू लागली. त्याला ते कितपत कळलं कोण जाणे? औषधांच्या गुंगीने बंटीला गाढ झोप लागली .
                  दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे उठलो तर बंटी घरात नव्हताच..... बरं! कुणाला सांगूनही गेला नव्हता.सगळे शोधायला निघाले.. तेव्हढ्यात देशपांडे आजींचा फोन आला.. बंटी त्यांच्या घरी गेला होता... पाहते तर काय???? बंटी सुजॉयची सायकल चालवत आला ... खुशीत दिसत होता.. पण बंटीला तर सायकल चालवताच येत नव्हती. सायकल स्टँडवर लावून बंटी घरी आला... कसलं तरी गाणं गुणगुणत...म्हणाला  "खायला द्या पटकन काहीतरी खूप भूक लागलीये" बंटीचा आवाज नव्हताच तो.... की मलाही भास होताहेत. "काय करू तूच सांग... तिखट मिठाच्या पुऱ्या करू तुझ्या आवडीच्या की पोहे करू?आणि काय रे सायकल कधी शिकलास तू?"मी विचारले. "सुजॉयला येते ना सायकल" बंटी म्हणाला... मी पहातच राहिले... हात पाय धुतांना... बंटी बोलू लागला... आवाज पुन्हा बदललेला... सायकलवर कसं मस्त वाटतं... पक्षांसारखं उडतोय असं वाटतं... आता खूप अभ्यास राहिलाय अभ्यासाला बसतो... असं काही काही बडबडत राहिला.... खोलीत जाताजाता.. "मस्त गोड शिरा करा ना बंटीची आई! " असं म्हणाला... मी जागीच कोसळले... "बंटीची आई "  म्हणाला होता मला तो..... पुन्हा मानसोपचार तज्ञ गाठले... आता त्यांच्या सेशनला रोज बंटीला न्यावे लागे... त्यांच्या मते बंटीला split personality disorder  दुहेरी व्यक्तिमत्व असं काहीतरी अगम्य झालं होतं... तो स्वतः ला कधीकधी सुजॉय समजायचा.
                  सुजॉयला जाऊन जवळपास 25 दिवस होऊन गेले होते...मात्र  हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक जटील होत चाललं होतं... कधी तो बंटी असे तर कधी सुजॉय... कधी शांत असे तर कधी आक्रमक होत जाई... कधी दोनदा आंघोळ करायचा तर कधी नुकतेच घातलेले कपडे बदलायचा... कधी तिखट करायला सांगायचा नी दुसऱ्या मिनटांत गोडाचा हट्ट धरायचा... सकाळ दुपार संध्याकाळ सायकलवर फेऱ्या मात्र मारायचा ... त्या झाल्या की मज्जेत असायचा...मात्र सगळ्यांत भयावह वाटायचं जेव्हा बंटी आमच्याच घराच्या खाली उभा राहून हाका घालायचा, "बंटी चल खेळू... बंटी चल खेळू" तेव्हा तो सुजॉय असायचा... बंटीच्या आजी त्याला स्वामींचा अंगारा लावायच्या ... आपापल्या परीने जप उपास तापास करायला लागल्या..एकदा त्या देशपांडे आजींना घेऊनच आल्या... बंटी धावत येऊन आजी म्हणत त्यांना बिलगला... क्षणभर त्यांनाही सुजॉय भेटल्याचाच भास झाला... बंटीच्या आजीने घडलेले सारे ईत्तंबूत वर्णन केले... हे काय आक्रीत आणिक? त्यांनाही कळेनासं झालं. मात्र त्यांनी त्याही परिस्थितीत एक प्रयत्न म्हणून बंटीला जवळ बोलावले... जणू सुजॉयला समजून सांगत असाव्या तश्या मायेनं जवळ घेत म्हणाल्या... " बाळा! फार सोसलस रे इवल्या आयुष्यात... माय बापाची भांडण, त्यात तुझा तिरस्कार.. तुला त्यांनी टाकून देणं...मी strong boy आहे म्हणायचास ना तू..." काय आश्चर्य बंटी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला....तश्या प्रेमानं पाठीवर हात फिरवत म्हणाल्या... " शहाणा राजा माझा! मला माहित आहे , बंटी खूप आवडायचा ना तुला... पण त्याच काय होतंय कळतंय का तुझ्यामुळे?मुक्त कर त्याला" तसा एकदम संतापाने किंचाळत स्वतः च्या खोलीत पळत जात बंटी म्हणाला... "मी नाही जाणार.. मला खूप खेळायचंय बंटी सोबत... मला आवडतं इथे राहायला.. बंटीच्या आई  किती प्रेमळ आहेत.. किती माया करतात माझ्यावर... आवडतं मला ते मी नाही जाणार." त्याचा रुद्रावतार आम्हाला नवा नव्हता... पण देशपांडे आजी भीतीने थरथरू लागल्या.... माझ्या प्रेमामुळेच तर माझ्या लेकराची ही अवस्था झाली नव्हती ना ??... माझ्या कानात शब्द घुमत होते..."बंटीच्या आई प्रेमळ ... किती प्रेमळ" माझ्यातली आई हरली होती.. देवापुढे पदर पसरून मी रडू लागले... काय चुकलं असेल त्याची शिक्षा मला दे माझ्या पिल्लाला सोडव म्हणत... माझ्यातली हतबल आई रडू लागली....समोरच्या समईच्या प्रकाश रेणुका मातेच्या मुखावर उजळून गेला.. जणू मला विचारू लागला काय करू शकतेस तू आपल्या लेकरासाठी?? स्वतःला आई म्हणवतेस ना... एका दृढ निश्चयानिशी मी देवीपुढे हात जोडले.......क्रमशः....
(बंटीचं पुढे काय झालं?? वाचा भाग 2 मध्ये)
© यशश्री रहाळकर
                           

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

अनादी निर्गुण प्रकटली भवानी

"अनादी निर्गुण प्रकटली भवानी"
           
            नवरात्र किंवा दसऱ्या नंतरच्या काळात घराघरात अचानकपणे भवानी माता प्रकट झालीए ही अनुभूती प्रत्येकाला येतेच . अस्वच्छता नामक राक्षसांचा पराजय व्हावा म्हणून ही माता सिद्धहस्ता झाडू, जळमटांचा दांडी फडा , फडके आदी आयुधांनी सज्ज होऊन स्टूल/ घोडी (उंच स्टूल  )/ फोल्डींग शिडी यांवर स्वार होत " दिवाळीची स्वच्छता " या रणांगणात उडी घेते. या रणांगणात कुटुंबवत्सल पुरूष देवतांना लढताना पाहण्याचा योग अम्मळ दुर्मिळच म्हणावा लागेल. स्त्रियांनी वर्चस्व प्रस्थापित केलेल्या या क्षेत्रात स्त्रिया हिरीरीने प्राण कंठाशी वगैरे आणत लढत असतात.
           त्यातही भांडेवालीला सर्वात आधी गाठणे , जमल्यास तिला किंवा तिच्या ओळखीच्या कुणाला मदतीला धरणे ,शिताफीने घरातील प्रत्येक डबा आणि भांडे बाई कडून लख्ख घासून घेणे, अगदी कचऱ्याची टोपली देखिल घासावी ह्या साऱ्यासाठी तल्लख मेंदू लागतो राव ! एरागबाळ्याचे हे काम नोहे.हे सारे कौशल्य तिच्या संसाराची किती वर्षे झाली यांवर अवलंबून असत.
          माझ्या पेक्षा संसाराचा रथ काही वर्षे अधिक ओढलेल्या एका सखी जवळ मी सहज बोलून बसले " अग ! वर्षभर तर आपण घर स्वच्छच ठेवतो ना ! मग दिवाळीची वेगळी ती काय स्वच्छता असते ??"  मला उभ्या उभ्या कच्चीच खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत ती उच्चारली .." तुझ्यासारख्या xxx मुळे स्त्रियांच्या कष्टाचे कौतुक होत नाही. तुम्ही रोज पुस्तक चिवडताच ना ?? मग दिवाळी अंक काय वेगळा वाचता ?? विचारतो आम्ही कधी ??"  तिचा तो रुद्रावतार स्मरून मी पुन्हा दिवाळीची स्वच्छता यांसारख्या नाजूक विषयावर बोलणे टाळतेच न जाणो एखादे आयुध माझ्या पाठी बसायचे.  
           खरेतर पुर्वी केवळ सणासुदीला घर आवरणे ,स्वच्छ करणे, मातीच्या भिंती लिंपणे शक्य असायचे घरात माणसांचा गोतावळा अधिक असे , वावर अधिक असे म्हणून ही कामे षठी साहामाशी होत असावीत. शिवाय दैनंदिन कामांचा व्याप स्त्रियांभवती एव्हढा होता की त्यांना वेळही नसे. काळ बदलला,  जीवनपद्धती बदलल्या, काळ काम वेगाची सारीच गणिते बदलली.
            आता सर्रास घरोघरी रोजचा झाडू पोछा , pest control , महिन्यातून एकदा जाळी काढणे, (जमल्यास तेही pest control च्या मार्फत) असे सारे नित्याचेच आहे ... आता flats किंवा bunglow ला पोटमाळेही नसतात ... बरं ... आमची पिढी अनेक वस्तू मोठ्या भावंडांच्या वापरायची ... गेला बाजार मावस चुलत मामे भावंडाचे पाळणे , पांगुळगाडे,  सायकली आम्ही वापरत असल्याने पुढे कामी येतील म्हणून त्या हक्काने माळ्यावर वर्षोंन वर्षे असायच्या ... आता मुळात use n throw चा जमाना ... काही म्हणून काही second hand चालतच नाही ... मग आवरतात काय बरे ??
            बरे ! कपडे आवरणे म्हणावे तर तो काही दिवाळीच्या स्वच्छतेचा भाग नाही ... तसेही ते इतके उदंड असतात की हनुमंताची शेपूटही गुंडाळण्यास तोकडी पडावी ... विखूरलेल्या वस्तू आवरता येतात पण गरजेहून अधिक वस्तू करणार काय ?? साड्यांनी ओसंडणारे कपाट पाहिले की त्याचे दार लावणे हाच योग्य आणि एकमात्र उपाय असतो
          दिवाळीची एव्हढी स्वच्छता कशासाठी ??याचे उत्तर देतांना लग्नाला ५० वर्षे झालेल्या माझ्या जेष्ठ आजी कम मैत्रीणीने विचारले.... " तू कधी अहोंकडून पाय चेपून घेतलेस का ग ? " माझे वासलेले तोंड पाहून पुढे विचारले " गेला बाजार हात ..." " नाही " ..." अरेरे! तुम्ही खरडा कागद फक्त !आग लागो तुमच्या त्या शिक्षणाला !!!!!xxx "
एखादा बिचारा या दिवसांत सकाळी मिसळीचे पार्सल किंवा संध्याकाळी पावभाजी नेत असेल तर समजावे ... आज इसकी खैर नही l बापुडवाणे नवरे office मधून आल्यावर घरात पाऊल ठेऊ की नको या नववधूच्या पोज मध्ये खोळंबलेत किंवा मुळची धटिंगण पोरे मांजरीच्या पिल्लागत म्याऊ करत एका कोपऱ्यात बसलीअसतील तर समजावे ... आज वो कयामत का दिन है l  .. जेव्हा गृहस्वामिनीने चंडीका होत घराचे रणांगण करून टाकले आहे.
           फळीवरील एकूण एक डबा मोरीत घासण्यासाठी शहीद झालाय , त्यातील जिन्नस एखाद्या परातीत अथवा ताटात मुंड्या पिरगळून फेकून दिलेले आहेत , घरातील सर्व काचा , पंखे एव्हढेच नव्हे तर भिंतीनाही यथेच्छ आरक्त स्नान घातले आहे ... माळ्यावरील प्रत्येक वस्तू फरपटत  खाली आणत तिच्यावर पोछाचा रट्टा हाणला आहे सगळ्या घराचे रणांगण करत या रणरागिणी भांडेवालीची वाट पाहत .. महिषासुरमर्दिनीच्या आवेषात फेऱ्या घालत आहेत कोणत्याही पुरूषोत्तमाला धडकी भरावी असे दृष्य....
अश्या वेळी समंजस जाणते नवरे चहा काय पाणीही मागत नाहीत .
          स्वच्छता असलीच पाहीजे नक्कीच पण ते दैनंदिन काम असले तर .... बघा ह्म्म ... अघोर अचाट कामे का ?? कशासाठी?? केवळ दिवाळी आहे म्हणून की इतर करतात म्हणून.....???  आजकाल घरात एखादीच कर्ती स्त्री असते तिच्यावर सगळे घर अवलंबून असते ... अश्यात आपण धडपडलो किंवा आजारी पडलो तर सण होइल का साजरा. स्वच्छता करा पण दमाने सोईने आणि मुख्य म्हणजे आपापल्या शक्ती नुसार . माळ्यावर अनेक वर्षे पडून असणारे पण न लागणारे भांडे विकून टाका नाहीतर देउन टाका , अनावश्यक कपडे ??मोह टाळा. अजूनही लागेल कधीतरी म्हणून जपून ठेवलेले वातींचे स्टो , पेट्रोमॅक्स चे कंदील ,बंद पडलेल्या बॅटरी दिव्यांच्या माळा सत्कारणी लावा
          घरकाम करणारी बाई मनुष्य आहे हे विसरू नका. वस्तूंची जागा बदलणे किंवा पुसून माळ्यावर फेकणे म्हणजे घर आवरणे का ?? हे स्वतःला विचारा एकदा...
थोडासा वेळ मनातील ताणतणावाची जळमटे  काढायलाही द्या ना !
सण आनंदासाठी असतो तर थोडा आनंद स्वतःच्या वाट्यालाही येऊ देत की ...    
              नवऱ्याच्या हातात हात गुंफून त्याच्या आवडीची साडी घे , दोघ मिळून मुलांना कपडे घ्या , तू रांगोळी काढतांना त्यान कौतुकाने बघाव ,तो आकाशदिवा लावतोय तर तू बघावस ... या साऱ्या क्षणांसाठी ताजीतवानी हो ! मनापासून सजून नटून तयार हो स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या दिवाळी साठी...
" दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!"
© यशश्री रहाळकर
          नाशिक
( हा लेख माझा आहे माझ्या नावासकटच forward करावा धन्यवाद! )

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

डाळिंबी पैठणी

                 आज सासूबाईंचा दहावा दिवस ... प्रदीर्घ काळ सोबत राहून माणसं खरी उमगतात का? फोटोला हार घालतांना वसुधाच्या मनात आलं. गेली 42 वर्षे दिवस रात्र सावली सारख्या सोबत राहिलेल्या सासूबाई ...एक विचित्र पोकळी करून गेल्या....दुखणं नाही की आजारपण नाही वय 84 च्या घरात पण कष्टीक शरीर,नावाला औषध नाही .नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे सकाळी मंदिरात जाऊन आल्या... थोडा मऊ भात खाऊन झोपल्या ते कायमच्याच.. तश्या त्या दिवशी त्या अतिशय प्रसन्न होत्या देवाला मनापासून हात जोडत काय म्हणाल्या कोण जाणे? करड्या शिस्तीच्या, टोकाच्या तापट... छळ म्हणावा असं नसलं तरी बराच कठीण काळ वसुधाने निभावून नेला होता.... कदाचित म्हणूनच सासूबाई गेल्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलेच नव्हते. स्थितप्रज्ञागत भेटीला येणाऱ्या प्रत्येकाशी ती बोलत होती.
                        वसुधाचे वडील , वडील काय असतात ?हे कळण्यापूर्वीच वारले .. चौदाव्या वर्षी आई देखिल आजारपणाचे निमित्त होऊन गेली... जबाबदारी म्हणून अंगावर पडलेल्या ह्या पोरक्या वसुधाला मामाने जरा होतकरू मुलगा पाहून उजवायचे ठरवले. वसंतराव जोशींचे ठिकाण कळले..  मुलगा वसुपेक्षा 10 वर्षांनी मोठा , वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्याच जागी पोस्टात लागलेला , घरची बेताची परिस्थिती, पाठच्या दोन बहिणी आणि भावाची जबाबदारी.... असे असतांना मामाने वसुला उजवले. 17 वर्षांच्या वसुधाचा दोन खणी घरात संसार सुरू झाला... घरादारावर सासूबाईंचा प्रचंड वचक होता... सगळी मुलं त्यांच्या धाकात होती. प्रत्येक पैचा हिशोब त्या ठेवीत. अतिशय कष्टानं त्या जमेल ते काम करत हातभार लावीत.वाती वळत, लोणची मसाले करीत, वाळवण करीत. वसुधा देखिल साड्यांना फॉल पिको करू लागली .. हळूहळू शिवण शिकली. दिवस ढकलले गेले... दोन्ही नणंदांची सुस्थळी लग्ने झाली. दिर बंगलोरला नोकरीला लागला.. त्याचे लग्न ,घर संसार सारे नीट जमून आले. एकीकडे वसुधाच्या झोळीत मात्र निराशाच होती.लग्नानंतर तीन वेळा आपले बाळ तिला पोटातच गमवावे लागले ... अखेर लग्नानंतर 11 वर्षांनी वरदचा जन्म झाला... "सासूबाईंनी किती कडक उपास तापास केले होते त्याच्या वेळी.." वसुधाच्या मनात आठवणींची उजळणी सुरू होती.
                       एव्हढ्यात दारात कुरियरवाला आला... सौ. वसुधा वसंतराव जोशींचे कुरियर म्हणत भला मोठा बॉक्स देऊन निघून गेला... आता काय असावे हे?? सारे भवती गोळा झाले. बॉक्समध्ये अतिशय सुरेख डाळिंबी रंगाची पैठणी होती... जाऊ ,नणंदा नावे ठेवू लागल्या... हे का दिवस ? सुतकात कुणी पैठणी घेतं होय? सारं वसुधाच्या समजशक्ती पलीकडे होतं... तिनी काहीच मागवलं नव्हतं... आताच काय गेले 42 वर्षे तिने स्वतः साठी हट्टाने काहीच घेतलं नव्हतं. जे मिळेल जसं मिळेल त्यात ती खुश असायची.. तिच्या फार अपेक्षा नव्हत्याच कधी.. त्यात एव्हढी महागडी साडी कशाला मागवणार? वसंतराव सावरून घेत म्हणाले,"वरदने मागवली असेल हो ऑनलाइन! surprize का काय ते!"  त्यांचा लेक वरद हुशार मेहनती होता ... बँकेच्या परीक्षा देत अधिकारी झाला... त्याचेही लग्न या वर्षी करायचे होतेच. "नातसुनेचे तोंड सासूबाईंना पाहता तरी यायला हवे होते",वसुधाच्या मनात येऊन गेलं.वरद घरी येताच साऱ्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली... खरंतर त्यालाही ह्या पैठणी विषयी काहीही माहीत नव्हते.हे प्रकरण कमी की काय म्हणून दुसऱ्या दिवशी साठे ज्वेलर्स चा माणूस सोन्याची नथ देऊन गेला... त्याही पावतीवर वसुधाचेच नाव... झाले नणंदानी गळे काढले,"आमच्या आईच्या मरणावर टपली होती. तेरा दिवस तर थांबायचे रितीला.. डोळ्यात टिपूस नाही हो हिच्या..."वगैरे वगैरे. वसुधाला तर काहीच कळत नव्हते... आपण काहीही न मागता हे कुणी आणि का मागवले होते??दुसऱ्या दिवशी मोतीवाल्या पेठ्यांकडून मोत्याचा तन्मणी आला अन घरातील लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला. कधी नव्हे ते वसंतरावही त्राग्याने म्हणाले,"उद्या आईच्या तेराव्याला काय मागवलंस वसुधा ? तारुण्यात कधी काहीही घेतलं नाहीस आता म्हातारचळ लागलाय का? दोन तीन वर्षांत साठची होशील तू!" बिचाऱ्या वसुधाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता.
                       तेराव्याला सासूबाईंचे दूरचे एक बंधू देशपांडे वकील अचानक आले. सारे विधी वगैरे संपल्यावर त्यांनी एक लिफाफा काढून वसंतरावांच्या हाती सोपवला... त्याचे सर्वांदेखत वाचन व्हावे अशी अखेरची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. त्या लिफाफ्यात एक पत्र होतं... थरथरत्या हातांनी लिहिलेलं ... होय सासूबाईंचेच अक्षर! सारे कुटुंबीय गोळा झाले..वसंतराव पत्र मोठ्याने वाचू लागले.... "प्रिय वसुधा... तुला कधी सांगितलं नाही पण माझ्या घरात माप ओलांडून आलीस त्या दिवसापासून मला तू मनापासून आवडली होती.तुझे सात्विक वागणे, निरपेक्षपणा ..सर्वांना सामावून घेणे यांमुळे तू अधिकाधिक लाडकी होत गेलीस... मात्र प्रांजळपणे कबूल करते...आई म्हणून माझा स्वार्थ आड येत राहिला. कौतुकानं तू बिघडशील, कुठंतरी तू हाताबाहेर होशील आणि वसंताला वेगळी चूल मांडायला लावशील ... मग माझ्या पोरांचं काय होणार?? हा कोता विचार करत मी तुझ्याशी वाईट वागत होते...तुमचे नवलाईचे दिवस सुद्धा मी साजरे करू दिले नाही... तुझी कुठलीच हौसमौज वसंताला करू दिली नाही... तशी तू तृप्त समाधानी होतीस म्हणा... कधीच काही मागितलं नाही.....वसंता तुझीही अपराधी आहे रे बाबा! बायकोला गजरा आणला म्हणून केव्हढं बोलले तुला... आज शरम वाटते हो माझीच मला......" वसंतरावांचा गळा भरून आला. बहिणीने पाठीवरून हात फिरवला.. वसुधा शांतपणे कोपऱ्यात बसून ऐकत होती.
                  पुढे ओल्या स्वरात ते पुढं वाचू लागले... "वसू ....माझ्या लेकी सासरी सुखात आहेत धाकटाही उत्तम आहे... सारे सुखात आहेत.. फक्त तुझी कोणतीच हौसमौज मी करू शकले नाही ही टोचणी अनेक वर्षे सलते आहे.... अनेक वर्षांपूर्वी , एकदा तुझ्याकडे फॉल पिकोला आलेली पैठणी लावून आरश्यात न्याहाळताना मी तुला पकडले... वाट्टेल तशी बोलले... तू गप्प राहून सारे सहन केले... तुझ्या वयाला साजेसेच तू वागत होतीस ... माफ कर पोरी! तू भलते हट्ट धरलेस तर ते परवडणारे नव्हते ग आम्हाला! पांडुरंगाकडे रडले त्या दिवशी मी ...त्याला सांगितलं एकदा अशी पैठणी तिला विकत घेऊन देऊ शकेन एव्हढे बळ दे! दिवसेंदिवस हे स्वप्न मला व्यापून टाकू लागले... मी तुला पैठणी घेणारच असे मनाशी निश्चित केले.हाती येणारे थोडे थोडे पैसे मी पोस्टात जमा करू लागली... गुपचूप बरका!अगदी दोन, पाच किंवा दहा रुपये सुद्धा. पैसे तर साठले पण डाळींबी रंग हवा तसा मिळेना... शेजारच्या गोगटे बाईंसोबत सारी साड्यांची दुकाने पालथी घातली. शेवटी येवल्याच्या विणकराशी संपर्क साधून हवी तश्शी बनवुनच घेतली.... डाळिंबी रंग अन मोराचे बुट्टे ...सुरेख दिसेल हो तुला! येईल एक दोन दिवसांत घरपोच... आणि अग !अगदी भारीतली पैठणी घेतली तरी पैसे बरेच उरले... मग माझ्या तरुणपणी डोळ्यांत भरला होता तसा डाळिंबी खड्यांचा सुरेख तन्मणी करायला दिला...मला म्हातारीला नव्हे ग तुलाच. सोन्याची नथ करायला दिलीये साठे सोनारा कडे ...ती मात्र नातसुनेला हो! वरदच्या लग्नाचे पाहताच आहात ... त्याच्या बायकोला गृह प्रवेशाचे वेळी द्या . आजेसासूने दिलीये सांगा तिला.
                       माझ्या दोघी लेकी आणि धाकट्या सूनबाईंच्या नाकावर राग आल्याचं दिसतंय हो मला स्पष्ट....आम्हाला कसे काही दिले नाही? पण खरं सांगू माझे अन वसू चे नाते वेगळेच होते....पोटची लेक नव्हती इतकेच.. माझ्या चारही अपत्यांपेक्षा कणभर अधिकच प्रेम मी वसूवर केले. वरदच्या लग्नात तुला या पैठणीत मिरवितांना पाहणे माझ्या नशीबात नाही .. आठवडा झाला पांडुरंग बोलावतो आहे... आता परतीच्या वाटेकडे डोळे लागले आहेत. ... वसू लवकरच तू माझ्या..म्हणजे  सासूच्या भूमिकेत शिरणार आहेस..वसू तू चांगली प्रेमळ सासू होशील हो!मात्र योग्य वेळी सुनेचे मनापासून कौतुक कर... माझ्यासारखी पत्रातून प्रेम व्यक्त करायची वेळ येऊ देऊ नकोस...सगळ्यांनाच खूप आशीर्वाद." पत्र पुरं होईतो सारे गंभीर झाले होते... तेरा दिवसांत पहिल्यांदाच वसुधाला सासूबाईंच्या जाण्याने झालेल्या पोकळीचा नेमका अर्थ उलगडला.अनेक क्षणांची बहुपदरी साखळी तिच्या डोळ्यांसमोर नाचू लागली...मायेचे क्षण, सावरून घेतल्याचे क्षण , एकमेकींना धीर दिला ते क्षण ......कपाटातून काढून डाळिंबी पैठणीवर मायेनं हात फिरवत ती धाय मोकलून रडू लागली...
©यशश्री रहाळकर