फॉलोअर

बुधवार, १६ डिसेंबर, २०२०

नावात काय आहे??

       
           "नावात काय आहे?"  हे जगातील सर्वाधिक भाषांमध्ये भाषांतरीत , सर्वाधिक वापरले गेलेले ,सर्वाधिक प्रसिद्ध वाक्यांपैकी एक ...असे वाक्य. शेक्सपिअरच्या रोमिओ-ज्युलिएट नाटकातील ज्युलिएटच्या तोंडी ... "नावात काय आहे? गुलाबाला जरी दुसरे नाव असते तरी त्याचा सुगंध तसाच राहिला असता." .. अश्या आशयाचे वाक्य आहे...  बाई ग ज्युलिएट तुझं गुलाबाचं ठीक आहे ग पण नावात इथं बरंच काही असतं... आता तुमच्याकडे नावांचा तसा तुटवडाच आहे पाचवा हेनरी आणि दहावा फिलिप..😂 आमच्याकडं अस नसते गो बाय!... इथं नुसत्या नावावरून अख्खी कुंडली मांडतात... भूत भविष्य वर्तमान एव्हढंच काय मागचा पुढचा जन्म पण कळतो. ते कुंडलीचं जरा साईडला ठेवलं तरी नुसत्या नावावरून आमच्याकड म्हंजे हिथ भरतवर्षात जात, धर्म, लिंग, प्रांत, भाषा, वय वगैरे वगैरे अशी लै माहिती मिळती. गंमतीचा भाग सोडला तरी प्रत्येक व्यक्तीचं नाव ही त्याच्याबद्दलची माहिती पुरविणारी एक किल्लीच असते.. तुम्ही केवळ नावावरून अनेक ठोकताळे, वेगवेगळे अंदाज बांधू शकता.. आणि ते बऱ्याच अंशी खरे सुद्धा ठरतात.
           प्रत्यक्षात आपलं नाव काही आपण निवडलेलं नसतं ... कुणीतरी धोंड म्हणून ते गळ्यात बांधलेलं असतं जे सर्वसाधारणपणे तुमच्या हयातीत आणि त्यानंतरही तुमच्या अस्तित्वाचा भाग बनतं. आता ह्यात मुलींना लग्नानंतर नाव बदलण्याची संधी असते... काही लोक मोठं झाल्यावर आपलं नाव आपल्या मर्जीने बदलून घेतात...(मध्यंतरी अनेक नकुशी नावाच्या मुलींची नावे सरकारनेच बदलून घेतली).. पण त्यांचा अपवाद सोडला तर लोक आपल्याला आयुष्यभर ज्या नावाने नावे ठेवतात त्या नावाशी आपला संबंधच नसतो. त्यामुळे नावात आणि प्रत्यक्ष व्यक्तीत होणारे साधर्म्य हा केवळ योगायोग समजावा. इथे केतकी नावाची मुलगी काळी ठिक्कर असू शकते आणि श्यामला नावाची गोरी पान... माधुरी नावाची कर्कशा असू शकते आणि अबोली नावाची बडबडी.... मुलांच्या नावांबद्दल तर बोलूच नये कारण पुढे त्यांनी गुण दर्शविले तर नाव सार्थ होतं आणि उधळले तर कृतार्थ.. थोडक्यात काय तर नावाला काही अर्थ वगैरे असतो हे येथील दरबारे आम ला मंजूरच नाही. वानगीदाखल काही नावे सांगते ते ठेवण्यामागे माय-बापाचा हेतू काय असतो कोण जाणे...अमर, मानव आणि कहर म्हणजे "प्रणय" .. मुलींचीही नावे आरक्ता , संप्रेषणा, प्रकल्पा ... देवा रे! नावात काही अर्थच नाही . माझी आई शिक्षिका होती , तिच्या वर्गातील एका मुलीचे नाव चक्क "अमेरीका" होते.. ह्यात काहीच 'मन की बात' नाही 100% सत्य.. आईने हे सांगताच ..मी ती अमेरीका शाळेत जाऊन पाहून आले☺️.. तिच्या भावाचे नाव बहुदा चीन/ जपान असावे असे माझ्या मनातही आले.. प्रत्यक्षात काय होते कोण जाणे. भूगोलाचे शिक्षक असावेत तिचे तात..
           नावात काहीच अर्थ नसू देत हो! पण हे "नाम महात्म्य" भल्याभल्यांची बोबडी वळवते.. आता चार पिढ्यांपासून जरा सुस्थितीतील घरातले सगळे पोमेट जरा परवडायला लागलं की फेअर अँड लव्हली आणत .. घरातल्या लहानथोरांचे ते सरसकट क्रीम असे .. अंघोळ झाल्यावर चेहऱ्यावर हेच क्रीम थापून वर पॉंड्सचा डब्बा उधळला की आपण सुंदर दिसतो असा साक्षात्कार अनेक पिढ्यांनी अनुभवला. घरातल्या खाश्या स्वाऱ्या दाढी केल्यावर हेच लावत पण 2/4 वर्षांपूर्वी अचानकपणे ही फेअर अँड लव्हली "लडकियो वाली क्रीम"  झाली... आणि पुरुष लव्हली असूच शकत नाहीत हा साक्षात्कार झाला.. मग फेअर अँड हँडसम नावाखाली तेच क्रीम विकले जाऊ लागले. पुढे ह्या क्रीमच्या नावातील 'फेअर' शब्द म्हणे रेसिझमचा, वर्णभेदाचा पुरस्कार करत असल्याचा जावई शोध डस्की (उर्फ काळ्याकुट्ट) शेलिब्रिटींनी लावला...  मग त्या क्रीमचे "ग्लो अँड लव्हली" असे बारसे झाले. मला एक कळत नाही "क्यूकीं मेरा रंग मेरी पहचान नहीं" हे वाक्य सुनेची निवड करतांना सासूला आणि बायकोची निवड करतांना लग्नाळू मुलांना का आठवत नसावे?? ह्यालाच म्हणतात "नाव मोठं आणि लक्षण खोटं"... 
           नावावरून आपल्या मनात त्या व्यक्तीची एक प्रतिमा निर्माण होते... बरेचदा ती जुळतेही पण कधीकधी ही नावे सॉल्लिड दगा देतात. सोसायटीत नव्याने रहायला आलेल्या कुटुंबातील नावे नलिनी, निलेश आणि नचिकेत अशी 'न' च्या बाराखडीतील होती. सोसायटीच्या एका  कार्यक्रमात हे लोक जरा उशिराने आले आणि खुर्च्या मिळेना... लहान पोर उभं राहून कंटाळलं असेल म्हणून एका प्रेमळ काकींनी ,"नचिकेत ये राजा! बस माझ्या मांडीवर." असा प्रेमळ आग्रह केला... त्या कुटुंबातील पोर बापाकडे पाहू लागलं... बाप कावराबावरा झाला.. आणि नलिनी रागाने आपल्या ह्या प्रेमळ शेजारणीकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली... कुटुंबातील नवऱ्याचं नाव नचिकेत आणि पोराचं निलेश होत🙄😂 निलेश काहीसं जुनं नाव तर नचिकेत मॉडर्न... त्यामुळे हा घोटाळा झाला... भर शंभर लोकांत नलिनीच्या नवऱ्याला मांडीवर बसायचा प्रेमळ आग्रह करणाऱ्या काकू पुढे सोसायटीतील ब्रेकिंग न्युजचा भाग झाल्या. माझ्या मिस्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका वर्कर कडे एकदा काही महत्वाच्या निमित्त ते गेले असतानाच प्रसंग.. तो तर घरी नव्हता पण त्याचे वडील होते.. आणि त्यांनी आदराने या बसा वगैरे म्हटले चहा घेता घेता माझ्या मिस्टरांनी लगे हात त्यांच्या चिरंजीवांची तक्रार करून टाकली, "अमोल अतिशय कामचुकार आहे... अमोल कामांची टाळाटाळ करतो" अश्या आशयाचे बरेच काही ते बोलले. दुसऱ्याच दिवशी काही कागदपत्रांवर डिटेल्स भरतांना त्यांनी "अमोल अनिल मोहिते" असे नाव लिहिले.. जे पुढे त्या वर्कर ने चुकले असल्याचे सांगितले म्हणजे तो "अनिल अमोल मोहिते" होता... हे राम! म्हणजे माझे मिस्टर अमोल समोरच बसून त्यानेच दिलेला चहा पीत त्यालाच कामचुकार आळशी वगैरे म्हणून आले होते. साधारण अनिल आणि अमोल ह्यात अमोल मुलगा असावा असेच वाटणे सहाजिक नव्हे का? तो वर्कर देखील हसून म्हणाला , " ..असा गोंधळ बऱ्याच लोकांचा होतो मलाच माझा बाप समजतात" 😂
            नावं आपल्या बरोबर आपला सर्वसाधारण कालखंड दर्शवितात.. जसे सचिन म्हटले की 90 च्या दशकात जन्मलेला एखादा मुलगा डोळ्यांपुढे येतो.. गंगा , सिंधू ही नावे माझ्या आजीच्या पिढीतली तर साधना हे नाव सत्तरच्या दशकातील.. पुढे पूनम 80 ते 85 दरम्यान जन्म झालेल्या.. असा ढोबळ अंदाज बांधता येतो. मात्र श्रीराम आणि कृष्णा ही नावे सर्व पिढ्यांत आजोबा ते नातू प्रवास करताहेत.. फक्त आजोबा कृष्णराव असतील तर नातवाच्या पिढीत क्रिश होईल.एकेका बॅचला एकेक नावे गाजतात.. त्या नावाची वर्गात इतकी मुले असतात की त्यांचे अख्खे नावच वर्गशिक्षिकेला घ्यावे लागते... अशीच एक पिढी स्मिता आणि प्रशांत ह्या नावांनी गाजविली. माझ्या बॅचला सहा शीतल होत्या.. आणि शाळेतून कॉलेज, ग्रॅज्युएशन आणि पुढे प्रत्येक कॉलेजमध्ये शीतल नावाची मुलगी माझी मैत्रीण होती.. त्यामुळे बोलतांना शीतल जोशी भेटली किंवा शीतल पाटील म्हणाली .. असे सांगावे लागते... ह्या शीतल वरून आता माझ्या वयाचा अंदाज सहज बांधता येईल 😜. माझ्या यजमानांचे अनेक मित्र अभिजित नावाचे आहेत.. आणि लेकीच्या वर्गात 6 अनन्या आहेत. 'मानस-मानसी' सारखंच सद्या 'आद्य-आद्या' ही जोडनावं धुमाकूळ घालत आहेत. किरण, मृणाल, कोमल, सुहास ही नावे मात्र उभयलिंगी.. त्यामुळे तो आणि ती दोघांची असू शकतात.. मात्र आमच्या वर्गात जेव्हा स्नेहल नावाचा मुलगा आला तेव्हा त्या बिचाऱ्याची आम्ही चिडवून चिडवून पुरेवाट केली. काही नावे इतकी वापरली जातात की शंभर लोकांत खडा फेकून मारला तरी त्याच नावाच्या व्यक्तीला लागावा... मनीषा हे त्यात सर्वोच्च स्थानी असलेलं नाव.. सुभाष, संदीप, सोनाली त्या खालोखाल आढळतात. आमच्या एका फॅमिली फ्रेंडच्या घरी नवरा बायको दोघांचेही सख्खे भाऊ मंदार, चुलत मावस भाऊ आणि बहिणींचे नवरे पकडून अगदी जवळच्या नात्यात एकूण डझनभर मंदार.. संवाद साधतांना कोणत्या मंदार बद्दल बोलताहेत हे दोघांना कसं कळतं कोण जाणे?
            नावांचा उगम अनेकविध भाषांमधून आणि विशेषतः विशेषणांमधून होतो.. उदाहरणार्थ शालिनी, मुग्धा, विनय, आदर्श. काही नावे कृती दर्शक असतात.. जसे आरती,प्रसाद. मराठीत मूळ मराठी नावांव्यतिरिक्त हिंदी आणि संस्कृत मधील नावांची देखणी सरमिसळ आढळते... खुशी, मुस्कान, मोहित.. ही हिंदी नावे तर सौरभ, क्षिप्रा, चारुहास, वेधस वगैरे संस्कृत .. उर्दू भाषेतील काही नावे अतिशय सुरेख अर्थपूर्ण आहेत जसे झरीना .. झऱ्यासारखी खळखळून हसणारी...मात्र ती धर्मसूचक वाटल्याने मराठीत तितकीशी रुळली नाहीत. मूळ बंगाली नावे अत्यंत अर्थपूर्ण असतात.. आणि तितकीच सुमधुर देखील. निवेदिता, अनुराग , अनुप्रीता ही बंगाली नावे मराठीत बेमालूम मिसळली. काही नावे जातील तिथं आपल्या बरोबर प्रांत सुद्धा घेऊन येतात... हितेशभाई आणि कोकीलाबेन गुजराथी तर रबडी, जिलबी , लड्डूमल अशी  खाण्याच्या पदार्थांची नावे बिहारी.. साऊथ इंडियात नावांचा तुटवडा असावा कृष्णमूर्ती ,नारायण स्वामी आणि लक्ष्मणा, मूरुगना पलीकडे वेगळी नावे दिसत नाहीत... अर्थात त्यांच्या भल्यामोठ्या नावामध्ये त्यांचं नाव (first nane)नेमकं कोणतं ??हा प्रश्न मला नेहमीच पडतो. सध्या शौर्य, धैर्य, रुद्र, आद्य, ओवी ही पिटुकली नावे ठेवण्याची पद्धत आहे ... देवांच्या नावांचाही ट्रेंड इन आहे पण त्यात रुळलेली नावे न ठेवता अगदी विष्णू किंवा गणपतीची सहस्त्र नामावली धुंडाळून क्लिष्ट , कुणाला फारशी माहिती नसलेली नावे नव्याने शोधून ठेवली जातात.. ह्याच गटातले आर्चीस हे विष्णूचे तर स्वरणीम हे गणपतीचे नाव. ट्रीशा, तीतीक्षा, पर्युक्ता कुठून आले कोण जाणे??
            नाव कसे असावे तर अर्थपूर्ण आणि ऐकल्यावर कानाला गोड वाटणारेही. .. इतकेही कठीण नाव असू नये की वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत आपल्या लेकराला ते नीट सांगताच येऊ नये. त्याचबरोबर पुढे चालून त्या पोराला लाज वाटेल असेही काही नाव ठेऊ नये .. पूर्वी नवसाने झालेल्या मुलांची नावे भिक्या, कचरू, उकंडा ठेवत असत.. किती वाईट आहे हे? मुलीचे नाव नकोशी, आसवा, पाचवी,  किती क्लेशकारक आहेत. कुंडली/ पत्रिकेतील जन्माक्षरावरून नाव ठेऊ नये ते वेगळे असावे.. अर्थात काही अक्षरे नाव ठेवण्यागत नसतात.. खो, षो,डो, पो .. काय नाव ठेवणार..☺️ मात्र ते नाव वेगळे असावे असे मानले जाते. माय-बापाच्या नावाची तोडफोड करून काहीतरी निरर्थक नावे ठेवू नयेत.. जसे शशांक आणि उर्वीची लेक शर्वी ... काहीच गरज नाही ह्याची.. तुमचे अपत्य दोघांचे आहेच.. दोघांचेही नाव ते लावणार आहे.. पुढे "रोशन " वगैरेही जमल्यास करणारच आहे.. मग त्याचे नाव तरी त्याचे त्याचे स्वतंत्र असू द्या ना! तसेच नाव ऐकल्यावर प्राणी किंवा पक्षी समोर येईल अशीही नावे ठेऊ नयेत.. असे माझे मत जसे पोपटराव, मैनावती, टायगर, वगैरे. ल्युसी, मोती, मौंटी म्हटले की मुलगा असेल की कुत्रा हे कन्फ्यूजन निर्माण होतं. काही लोक एकदम सहा सात नावे ठेवतात शेवटी त्यातले एक शाळेत घालतात. .. मग जन्मदाखल्यावर एक आणि शाळेच्या टी.सी. वर भलतेच आणि घरात हाक मारतात तिसऱ्याच नावाने हा घोळ होतो. सध्या कागदपत्रांच्या वैधतेची आवश्यकता लक्षात घेता एकच नाव पुरेसे आहे तेही जन्माआधीच ठरवून ठेवावे जेणेकरून birth certificate पासून तेच सगळीकडे कायम राहते... मग भलेही तुम्ही तुमच्या लाडक्याला झिंगुर, मुंगूर काहीही म्हणा घरी. इंटरनेटच्या कृपेमुळे हल्ली ढिगाने नावे अर्थासहित सहज उपलब्ध आहेत... तरीही लोक अमुक अक्षराचे नाव हवे म्हणून मला शोधून दे अशी विनंती करतात ... त्यांना नवीन आणि छान नाव हवेच असते..मी आपली प्रामाणिकपणे पाच सहा नावे, अर्थ वगैरे  काढून पाठवते.. आणि शेवटी भलतेच पांचट नाव त्यांनी ठेवलेले असते.. अश्या वेळी मी माझ्या मुर्खपणावर फक्त चरफडत बसते. "नाव ठेवणे" ही क्रिया "नावे ठेवण्याकडे" वळणार नाही एव्हढी काळजी घ्यायलाच हवी.
            थोडक्यात काय तर... "नावात काय आहे?" असे म्हणत शेक्सपिअरच्या नावाने खापर फोडण्यापेक्षा.. ठेवतानाच नाव नीट ठेवावे.. बाकी पुढे आयुष्यभर नावे ठेवायला लोक असतातच. 
तर अशी ही... 

🌹।।नाम महात्म्य सांगणारी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ।।🌹.. 

नावे ठेवण्याची मनस्वी आवड असणारी... नाव ठेवणे ह्या क्रियेत विलक्षण रुची असणारी आणि नुसत्या नावावरून नावांचे पहाड उभारणारी..  "नाम है मेरा यशश्री और प्यार से लोग मुझे यश कहते है!"😂
✒️   यशश्री रहाळकर        
            

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ९ :- जवळीक


गोष्ट तशी जुनीच म्हणायची... साधारण 25 वर्षे झाली असावीत. आमचं गाव लहान, जुन्या वळणाचं आणि लोकवस्ती कमी... त्यातही लोकांना भरपूर रिकामा वेळ त्यामुळे सगळ्यांचं सगळं जगजाहीर व्हायचं... कुठे खुट्ट झालं तरी त्याचे पडसाद गावभर उमटत. गेल्या काही दिवसांत गावाबाहेर पडणाऱ्या एकुलत्या एक रस्त्यावर टवाळ पोरांची आणि आंबट शौकीन म्हाताऱ्यांची गर्दी अचानकपणे वाढलेली दिसली... सगळ्यांना फिरायला जाण्याचे एकदम वेड लागले कसे?? तेही संध्याकाळी?? जेष्ठ स्त्रियांनी ह्यात लक्ष घातले तेव्हा वेगळीच बाब समोर आली. एक तरुण जोडपं त्याच दिशेला फिरायला जातं , त्यांची सलगी आक्षेपार्ह असते.. अंधार पडू लागतो तसतशी त्यांची जवळीक वाढत जाते.... असले काहीबाही कळू लागले. तो काळ म्हणजे ह्या असल्या विषयांवर कुजबुजत बोलण्याचा होता.. हल्ली सारखे कानाकोपऱ्यात मिठ्या मारून बसलेले कपल तेव्हा नव्हतेच आणि त्यातही एका क्लीकवर  दिसणारे 'हवे ते' पहायला मिळणेही दुर्मिळच असावे... म्हणून तिकडे गर्दी उसळली होती.कुणाचे तरी कुणाशी लफडे असावे असा अंदाज बांधत, काही जबाबदार लोकांनी ह्यात लक्ष घातले आणि एकदा त्यांना धरलेच... मात्र ते नवरा-बायको निघाले. पर्स बाईचा मुलगा दिन्या आणि सून शालिनी.... घोर कलियुग म्हणत लोक परत फिरले.

पर्स बाईंचे खरे नाव काय होते .. आठवत नाही. सारा गाव त्यांना पर्स बाईच म्हणायचा... पर्स बाई अखंड स्वतःजवळ एक पर्स घेऊन फिरत , ती त्या छातीशी घट्ट धरून ठेवत. त्या पर्समध्ये त्यांचे सगळे दागिने आणि बरीच रोकड घेऊन फिरतात अशी वदंता होती. खरे खोटे देवास ठाऊक! मात्र त्या 24×7 ती पर्स उराशी घट्ट धरून असत... त्यांची भिरभिर नजर मला आजही तशीच्या तशी आठवते. चंचल , अस्थिर नजर, सतत भेदरलेल्या, सतत इकडे तिकडे पाहत चाहूल घेणाऱ्या पर्स बाई पाहिल्या की गंमत वाटे. पाहताक्षणीच त्यांच्या मनातील घालमेल आणि विचारांचे वादळ सहज दिसायचं.. त्या आमच्या झेड पीच्या 6 नं शाळेत शिक्षिका होत्या. बहुदा नवरा गेल्यावर त्या जागी लागल्या असाव्या. त्यांना मुळीच शिकवता येत नसे त्यात ती पर्स .. एक ध्यानच दिसायचं... त्या म्हणजे आमचा चेष्टेचा विषय. आई म्हणायची... " त्यांना हसू नका,बिचारीने फार सोसलंय." पर्स बाईंना त्यांच्या सासूने फारच छळले होते. त्यांचे यजमान ऐन तारुण्यात , एका अपघातात निर्वतले ह्यामुळे त्यांना जबर मानसिक धक्का बसला होता.  दोन मुले ..दिनेश साडे आठ वर्षांचा तर धाकटा रुपेश सात वर्षांचा... दोघांत अगदी वर्ष -दीड वर्षाचे अंतर. नवऱ्याच्या जागी नोकरी करणाऱ्या तरुण विधवा सुनेवर सासूने सतत संशय घेतला... आणि घराची छळछावणी केली. एकदा कधीतरी घरात चोरी झाली आणि लहानसा दागिना गेला,  त्याचेही खापर सासूने पर्स बाईंवर फोडले.. म्हणून पर्स बाई सतत पर्स घेऊन कवटाळून फिरायच्या.... तो काळ असा होता की माणसे सहृदयी होती.. कळपात एखादे लंगडे वासरू खपून जाई... समवयस्क स्त्रियांनी त्यांना होत्या तश्या आपल्यात सामावून घेतलं. पुढे सासू सासरे निर्वतले.

मोठा दिन्या अगदी मातृभक्त होता.. आपल्या आईने खूप सोसले ह्याची गरजेहून अधिकच जाणीव त्याला असावी.. आईला तो देवाच्या ठिकाणी मानायचा आणि तिचे वाक्य त्याच्यासाठी प्रमाण असे. त्याने गावातच बुक स्टोअर टाकले तो मार्गाला लागताच त्याचे लग्न झाले... शालिनी गोरी पण चारचौघींसारखी सामान्य.. त्यात तिला जाडाजुडा चष्मा.. पण चहा पोह्यांना दोघेही एकमेकांना आवडले ... मुख्य म्हणजे ती पर्स बाईंना आवडली. तिचे MA सुरू होते, वडील एस टीत कंडक्टर होते, आई नव्हतीच. वागून बोलून शालिनी चांगली होती ... सगळ्या जेष्ठ स्त्रियांची तिच्या बाबतीतली मते चांगली होती, ती वळणदार आहे असे साऱ्यांना वाटत असतांना...त्या नवरा बायकोची खुलेआम आक्षेपार्ह जवळीक सगळ्यांनाच खटकली.  

"बाई बाई! नाव शालिनी आणि गुण पहा!" 

बायकांची दबल्या आवाजात खुसुखुसू चालत असे. कोणत्या तरी भोचक भवानीने अखेर पर्स बाईंच्या कानावर घडला प्रकार घातला असावा... दिन्या आणि शालिनीचं ते 'तसलं' फिरणं बंद झालं... पुढे काय झालं कुणास ठाऊक? सारखे खटके उडू लागले.. पर्स बाई जरा विक्षिप्त असाव्यात पण सुनेला छळतील ह्यावर कुणाचाच विश्वास नव्हता.. एकदा कसलीशी शिक्षा म्हणून भर मे महिन्यातील दुपारभर त्यांनी शालिनीला उन्हात उभे केले.. संध्याकाळी ती अखेर घेरी येऊन पडली... शेवटी तिचे बाबा आले.. कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले...त्यांनी दिन्याला आपल्या गावी चलण्याविषयी विचारले.. सगळ्यांची सहानुभूती पर्स बाईंच्या बाजूनेच होती. अखेर वर्षभर वाट पाहून दिन्याच्या सासऱ्यांनी घटस्फोटासाठी प्रयत्न सुरू केले.... दिन्याचा जीव शालिनीत अडकला होता पण आई म्हणाली, "नको ही असली पोर." आणि दिन्याने मुकाट्याने घटस्फोट दिला.

धाकटा रुपेश हुशारच म्हणायचा.. त्याने दुसऱ्या गावात नोकरी शोधली, तिकडे जरा जम बसताच स्वतःचे स्वतः लग्न जमवून मोकळा झाला... पर्स बाईंना हे मुळीच आवडले नसावे पण रुपेश न बोलून शहाणा होता. दिन्याच्या आयुष्याचा खेळ झालेला त्याने पाहिला होता.... पहिल्या लग्नानंतर लगेच घटस्फोट झाल्यामुळे दिन्याचे दुसरे लग्न काही जमेना... त्याहीपेक्षा येणाऱ्या प्रत्येक मुलीला पर्स बाई काहीतरी उणे काढून नाकारत गेल्या. चार पाच वर्षांत दिन्याने लग्नाचा नाद सोडला तो कायमचाच.. आई किंवा संसार ह्यात एकाचीच निवड करता येईल हे त्याला नेमके कळले असावे... त्याने आईची निवड केली.... त्याची आई जी होती जशी होती त्याच्यासाठी सर्वस्व होती.

 "दिन्याने बाईंच्या कलाने घेत आयुष्याची माती करून घेतली."
लोक म्हणायचे. 

सहा-सात वर्षांचा काळ उलटून गेला असावा... अचानक एके दिवशी एका गावातल्याच लग्नात शालिनी दिसली... तिच्या चुलत दिराचे वऱ्हाड होते. त्याच गावात कशी येऊ? हा खेद ना खंत नव्हती चेहऱ्यावर... सुरेखच दिसत होती आराश्या! दोन मुलांची आई झाल्याने जरा सैलावलेली पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज आणि तृप्तता. जुन्या ओळखीच्या बायकांशी अदबीने आणि मोकळेपणाने बोलली. घटस्फोटानंतर तिने BEd केले आणि शिक्षिकेची नोकरी लागली.. त्याच शाळेतील एका सरांशी तिने लग्न केले... ती खूप खूप सुखात असल्याचेही म्हणाली. त्या लग्नानंतर आधीच करपलेला दिन्या नंतर तोंडात मारून  घेतल्यागत खालमानेने चालायचा... आपण खूप काही गमावल्याचा पश्चाताप त्याच्या डोळ्यांतून दिसायचा. काही दिवसांतच शालिनीशी खास गट्टी असणाऱ्या काकूंनी,  शालिनीने सांगितलेली.... दिन्याच्या लग्नाची खरीखुरी भानगड समोर आणली. पुढे बायकांच्या नेटवर्क मधून ती कथा खुलेआम पसरली.

दिनेश आणि शालिनीचे लग्न झाले तसे पर्स बाईंनी त्यांना एकांतच मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या खोलीत झोपणे, रात्ररात्र रडणे, दिन्याला जीव देण्याच्या धमक्या देणे असे अनेक प्रकार विक्षिप्त बाईंनी केले. दोघेच परगावी फिरायला म्हणून निघाले तर छातीत दुखण्याचे कारण काढून जाऊ दिले नाही. एकदा काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या पर्स बाई जरा लवकरच परतल्या... नवीनच लग्न झालेल्या दिन्या आणि शालिनीची जवळीक त्यांना इतकी खटकली की त्यांनी तिला दिवसभर भर उन्हात उभं केलं... दोघे फिरायला जात पण हेतू मात्र चोरट्या स्पर्शाचा असावा.. तेही गावातल्या लोकांनी बंद पाडलं... अखेर सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर शालिनीने वडिलांना बोलावलं ..पर्स बाई शालिनीच्या वडिलांना म्हणाल्या,

"माझा धाकटा मुलगा अगदी बरोबरीचा आहे. हे दोघे एकत्र आले तर त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल.."

शालिनीचे वडील तावातावाने म्हणाले, 

"एव्हढे होते तर दोघांचे लग्न एकत्रच करायचे.. "

शब्दाने शब्द वाढत गेला... कडाक्याचे भांडण झाले आणि ते शालिनीला घेऊन गेले... त्यांनी दिन्यालाही  सोबत चलण्याविषयी विचारले पण त्याने नकार दिला. 
प्रत्यक्षात अगदी तारुण्यात वैधव्य आलेल्या , अनेक वर्षे छळ सहन केलेल्या पर्स बाईंना मानसिक उपचारांची गरज असावी.. मुलाचे कारण पुढे करत पण प्रत्यक्षात त्यांनाच भिंतीआड दोघांनी जवळीक साधली असावी, अशी शंका सुद्धा नकोशी होती. अजब विकृतीचा प्रकार होता...
 ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या असल्या तरी कल्पनेतसुद्धा विचार करवत नाही...

ह्या सगळ्यांत कुणाची चूक होती?? दिन्याने पत्नीची साथ दिली नाही आईची बाजू घेतली... ही चूक नव्हती ? .. पर्स बाईनी चार जवळच्या व्यक्तींजवळ आपली अडचण मांडली नाही हेही चुकलेच नाही का?
पण मी तर म्हणेन सगळ्यांत मोठी चूक होती आपल्या परंपरेच्या पगड्याची... आई - वडील ह्यांना देव मानत असतांना आपण त्यांचं मनुष्य म्हणून असणारं अस्तित्व नाकारत असतो. ते चुकू शकतात, तेही आजारी असू शकतात हे मान्यच नसतं. त्यांची दुखणी विशेषतः मानसिक दुखणी झाकून ठेवणे हीच दिन्याची सगळ्यांत मोठी चूक होती... बिचारा दिन्या! मातृभक्त असल्याची केव्हढी मोठी किंमत मोजली त्याने... अजूनही तो एकाकी आणि निरर्थक आयुष्य रोज ढकलतो आहे..😢 

✒️ यशश्री रहाळकर



शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

पुरुषस्पंदन कथा ८:- एकांडा

तुम्ही कदाचित "एकांडा शिलेदार" हा शब्द ऐतिहासिक पुस्तकांत वाचला असेल.. तशीच ही कथा एका एकाकी पडलेल्या.. एकटाच जगण्याचा संघर्ष करणाऱ्या "विश्वा"ची... विश्वेश्वर आता विश्वा म्हणून हाक घालावी अश्या वयाचा उरला नव्हता...गेल्याच श्रावणात त्याच्या देहानी 69 वर्षे पूर्ण केली होती.... तरी सगळे गाव त्याला विश्वा म्हणायचे . पिकल्या केसांनी "ए विश्वा" ऐवजी "अहो विश्वाभाऊ" झाले होते इतकंच.त्याच्या वयासारखाच त्याचा वाडाही आता बरीच पडझड सहन करत उभा होता.. तसे होते नव्हते भाडेकरू केव्हाच सोडून गेले होते...पण विश्वा कुठे जाणार? त्याला ह्या वाड्याशिवाय दुसरे जगच नव्हते..
जन्माला आल्यापासून ह्याच वाड्याचं पांघरूण करून त्याला ऊब मिळाली होती.. घरात पहिला वहिला मुलगा म्हणून जन्म झाल्यावरचे पेढे आणि तेव्हढेच काय ते मधुर क्षण त्याच्या आणि ह्या वाड्याच्या नशीबात असावे. सगळ्यांचे करून सवरून उतारवयात अखेर तो एकटाच उरला होता आणि वाडाही अनेक कुटुंबे मार्गाला लावून पडझडीच्या काळात एकटाच बाकी होता... मात्र दोघेही अजूनही तितकेच ताठ उभे होते..... एकमेकांची सोबत करत.

विश्वा घरातला पहिलाच मुलगा.. त्याच्या पाठीवरची सहा भावंडे गेली .. धाकट्या 3 बहिणी मात्र जगल्या. उत्तम मार्कांनी मॅट्रिक झाल्याझाल्याच विश्वाला लगेच वडिलांनी पोस्टात चिकटवला.... आपल्या अवघ्या संसाराचा भार विश्वावर सोपवून त्यांनी कायमचे डोळे मिटले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे घरातील मोठी भावंडे वडिलांची संपत्तीचं नव्हे तर वडिलांचे कर्ज आणि त्यांनी जन्माला घातलेला पोरवडा गपगुमान सांभाळायचे. पोसता येत नव्हते तर जन्माला कश्याला घातले ? असले प्रश्न त्यांनी कधी विचारलेच नाहीत.. नव्हे त्यांना ते कधी पडलेच नसावेत. वडील गेले आणि वर्षभरात आईचे डोळेही गेले .. आता घर आणि प्रपंच सगळाच भार विश्वावर होता. पहाटे उठून स्वयंपाकपाणी एखाद्या गृहिणीसारखं आवरून तो बहिणींना डबे वगैरे देऊन शाळेत सोडायचा आणि पोस्टात जायचा. बदलीच्या धाकाने त्याने प्रमोशनही स्वीकारले नव्हते.. आई जमेल तसे स्वतःचे आवरायची , आणि बसल्या बसल्या जमतील ती कामे करायची... पाच सहा एकर जमीन होती तिचाही हातभार लागे. विश्वा 21 वर्षांचा झाला आणि सगळ्यांनी त्याला आता घर नीट सावरायला लग्न करण्याचा सल्ला दिला. आई ही अशी अंधळी त्यात 3 पोरी ... उद्या विश्वाची बायको त्याला घेऊन वेगळी झाली, त्याला संसाराची चटक लागली , पुढे त्याची मुलेबाळे झाल्यावर त्याने जबाबदारी झटकली तर ..तर... आईला भीती वाटू लागली. शेवटी 'स्वार्थ' ही आत्यंतिक प्रबळ भावना आहे त्यापुढे मातृत्व वगैरे फोलच म्हणायचे.

तारुण्य असतं, जोम असतो आणि प्रत्येकाला महान व्हायचं असतं... मग काय भीष्म जन्म घेतात ते ह्यातूनच. त्याग माणसाला महान करतो मात्र त्याच वेळी एकटा सुद्धा करत जातो. विश्वाने बहिणींचे संसार मार्गी लागेपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय केला आणि आईचा जीव भांड्यात पडला. आंधळ्या आईला विश्वाने थोडीथोडकी नाही तर 42 वर्षे प्रेमानं एकहाती सांभाळलं... आपण विश्वावर अन्याय केल्याची खंत सोबत घेऊनच माउलीने 'राम' म्हटले. विश्वाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपली नोकरी पूर्ण केली. गावात त्याचे नाव लोक आदराने घेत. दरम्यानच्या काळात तिघी बहिणींचे विवाह त्याने सुयोग्य स्थळी मोठ्या थाटामाटात लावून दिले... होती नव्हती ती पुंजी म्हणजे शेतजमीन ,एकेका बहिणीच्या लग्नात विकावी लागली. सर्वांत धाकटीचे लग्न होता होता त्याचे केस पिकू लागले आणि आता ह्या वयात लग्न करून काय करायचे असा विचार करून त्याने "एकटा जीव सदाशिव" राहण्याचे निश्चित केले. बहिणींची त्याच्यावर माया होती..वर्षे सरली तसे त्यांचे संसार बहरले तरी त्यांनी भावाकडे दुर्लक्ष केलं नाही... तिघीही आलटून पालटून येत विश्वाला काय हवं नको पाहत असत, कोरडा खाऊ आणून ठेवत, गोडाधोडाच भावाला करून घालत आणि आपापल्या घरी जातं.... विश्वाच्या तरी फार अपेक्षा कुठे होत्या आयुष्याकडून...... तिघी बहिणींचे एक वाक्य समान असायचे...

"दादाने खूप खूप केलं आमच्यासाठी... आम्ही अगदी कातड्याचे जोडे करून घातले ना तरी त्याचे कर्ज फेडू शकणार नाही."

बहिणींच्या ह्या प्रेमाने विश्वा भारावून जाई .. त्याचे डोळे भरून येत... आपल्या आयुष्याचं कृतकृत्य झाल्याची भावना त्याला सुखावून जाई. त्याचं सुफळ संपूर्ण झालेलं उर्वरीत आयुष्य तो नेमस्तपणाने जगत होता. भल्या मोठ्या वाड्यातील मोजक्या 2 खोल्या आणि ओसरी ताब्यात ठेवून त्याने बाकीच्या खोल्यांत बिर्हाडे ठेवली होती... त्यांचे येणे जाणे , मुले बाळे ह्यांनी वाड्यात सतत चैतन्य असायचे.  गेली कित्येक वर्षे ज्या साचेबद्ध पद्धतीने तो जगत होता तोच क्रम त्याने रिटायर्ड झाल्यावरही कायम ठेवला. सकाळी उठून झाडलोट करायची, आन्हिक उरकून अंगणातल्या झाडांची भरपूर फुले तोडून  मनसोक्त देवपूजा करायची. एव्हाना दुधाचा रतीब येई मग चहा आणि थोडासा नाश्ता करून गावदेवीच्या मंदिराची वाट धरायचा. आपल्या आयुष्याची नौका गावदेवीच्या कृपेनेच पार लागली असा विश्वास त्याला होता. तिथेच दोनेक तास मजेत घालवून तो घरी परतायचा मग स्वतःपुरता स्वयंपाक करून जेवायचा... एकट्या जीवाला लागणार तरी किती? मग वामकुक्षी आणि संध्याकाळी फेरफटका...असेच निवांत आयुष्य जात होते. 

एके दिवशी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्यावर मंदिराचे विश्वस्त गावदेवीच्या उत्सवासंबंधी चर्चा करत होते. विश्वा आपसूकच त्यात सामील झाला. हल्ली परगावहून येणारे भक्तमंडळी बरेच वाढले होते... बरेचदा ज्यांचे कुणी नातेवाईक नसत अश्या लोकांचे खूपच हाल होत... हॉटेलवाले मनाला येईल ती किंमत आकारत शिवाय स्वच्छता, सोयीसुविधा ह्यांचा अभाव असे. त्यामुळे मंदिराने पुढाकार घेऊन भक्तनिवास बांधायचे ठरले... बांधकामाला आवश्यक निधी आणि देणग्या उभारणे मंदिराला सहज शक्य होते मात्र प्रश्न होता जागेचा... पन्नास खोल्यांचे भक्तनिवास बांधायचे तर बरीच मोठी जागा हवी शिवाय जागा विकत घेतो म्हटले तर बांधकाम करणार कश्याने? हा प्रश्न होताच. एखाद्या धनिकाने स्वेच्छेने जागा मंदिराला दान दिल्यास हा प्रश्न सहज सुटणार होता. अशी जागा मिळाल्यास ह्याच उत्सवात भक्तनिवासाची घोषणा करून टाकू.. अशी सगळी चर्चा रंगली होती. 

विश्वा नेहमीच्या सवयीने दर्शन घेऊन आला पण आज त्याच्या मनात खळबळ माजली होती... घरी येऊन त्याने आपले साठवलेले पैसे pf वगैरेचा हिशोब केला ... बरीच मोठी रक्कम होती. आता आपलं काय राहिलंय ? त्याचे मन म्हणाले .. भक्तनिवासाला आईच्या नावे देणगी देण्याचं त्याने निश्चित केल... त्याचा दिवस आनंदात गेला. आजवर त्याने स्वतःच्या आनंदासाठी एक रुपयाही खर्च केलेला नव्हता. दिवसभर तो भक्तनिवसाचाच विचार करत होता... अचानक देवपूजा करतांना त्याला वाटलं आपण हा आपला वाडाच भक्तनिवासासाठी दान दिला तर... स्वतःच्या कल्पनेवर तो खूप खुश झाला. दुसऱ्याच दिवशी तो मंदिराच्या विश्वस्तांना भेटला.. त्याने आपली इच्छा आणि अडचण दोन्ही व्यक्त केले... विश्वा आपली वाड्याची संपूर्ण जमीन भक्तनिवासाला दान करणार होता मात्र तो जिवंत असेपर्यंत दोन खोल्यांची त्याची मालकी अबाधित राहणार होती... कुणाचाच ह्यावर आक्षेप असण्याचे कारणच नव्हते.. लगेच गावदेवीच्या उत्सवात मंत्रीमहोदयांच्या हस्ते थाटात भूमिपूजन झाले... आयुष्यात पहिल्यांदाच विश्वाचा जंगी सत्कार झाला. सगळ्या पेपरमध्ये दानवीर म्हणून बातम्या झळकल्या.. भाडेकरूंना जागा सोडण्याविषयी नोटीस देण्यात आल्या.

चारच दिवसांत सगळ्यांत धाकटी बहीण हजर झाली.. तिच्या मते ह्या व्यवहारात वरवर दान दिल्याचे नाटक करण्यात येत असून बदल्यात विश्वाला रग्गड रक्कम मिळणार होती... तिची समजूत काढता काढता विश्वाची पुरेवाट झाली.  तिने जातांना स्पष्टच केले तिला घरातील तिचा वाटा हवा होता बाकीच्यांचे त्यांनी बघावे. मोठ्या दोघी तिच्यापेक्षा जरा नरम होत्या पण तिने वाटणीचा विषय काढताच त्यांनीही आपापला हिस्सा मागितला... आजवर देवदूत म्हणून मिळविलेल्या विश्वाच्या प्रतिमेस मोठा तडा गेला... हा धक्का त्याला खोलवर घायाळ करून गेला. घर वडिलांच्या नावे होतं.. आणि प्रत्येकाचा त्यात वाटा होता... विश्वाचा त्याग , त्याने आयुष्यभर केलेले कष्ट ह्या सगळ्याशी कायद्याला घेणे देणे नव्हते. मग सुरू झाला संघर्ष त्यागाचा स्वार्थाशी.. बहिणींचा भावाशी. बहिणींनी घराच्या व्यवहारावर स्टे ऑर्डर आणली.. आपणही ह्या घराचे वारसदार असून विश्वाला ते दान देण्याचा हक्कच नाही , असे त्यात नमूद होते. गावात विश्वाची छी थु झाली.. लोक त्याची टिंगल करू लागले..

" हे पहा ! हे दानशूर कर्ण.. चालले दान करायला."

"अहो ! अंथरूण पाहून पाय पसरावे .. आपण कोणते शेठ आहोत का मारवाडी?"

"पण मी म्हणतो आपलं नाही ते दान करायचं कशाला?"

"बहिणींचा वाटा असतो हे काय माहीत नव्हते याला.."

असे कित्येक कुजकट तीर तो रोज पचवायचा. त्याचा बहिणींच्या शब्दांवरचा विश्वास नडला खरेतर! कातड्याचे जोडे करणाऱ्या बहिणी वेळ आली की सहज आपल्यासाठी सही करतील हा फाजील विश्वास त्याचा घात करून गेला. अखेर त्याने कोर्टात बहिणींविरुद्ध केस टाकली.. शेतीतील वाटणी , त्यांची लग्ने , इतर खर्च.. सगळेच काढावे लागले..व्यवहारातील आकडे समोर येताच प्रेम संपून गेले. आजवर त्याचं कौतुक करणाऱ्या बहिणी तळतळाट शिव्याशाप देऊ लागल्या... विश्वा वाड्यात आता एकटाच राहतो .. गेल्या पावसात वाड्याची बरीच पडझड झाली आहे, तो नेमाने कोर्टात जातो... कोर्टात रोज नवी तारीख पडते.... असे हे वर्षानुवर्षे सुरू आहे. दरम्यान गावांत टोलेजंग भक्तनिवास उभा राहिला आहे.. हल्ली विश्वा कोर्टाव्यतिरिक्त फारसा बाहेर पडत नाही...लोक म्हणतात ह्याचे आता काय राहिले आहे? पण विश्वा मानत नाही , तो थकत नाही त्याची एकट्याची लढाई सुरू आहे.. ..  ह्यातच एक दिवस त्याचा शेवट होणे अटळ आहे. कधीकधी स्वार्थी माणसे सुखोपभोग घेऊन मस्तमौला आयुष्य जगतात आणि त्याग करणारा महान नव्हे तर मूर्ख ठरतो!😢 दुर्दैव दुसरं काय?
✒️ यशश्री रहाळकर




बुधवार, २ डिसेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ७:- अगतिक


प्रशांतचा मध्यरात्री 2 वाजता फोन आला... अर्धवट झोपेतच मी तो उचलला..

"मामा! मामा .. please असशील तसा ताबडतोब निघून ये.मला तुझ्या मदतीची गरज आहे..."

मी बसल्या जागीच उडालो काय झालंय काय नेमकं? मध्यरात्री प्रशांतचा फोन आला की भास झालाय.. ह्या विचारात सावरून बसलो तर "ही" सुद्धा जागीच होती..

"अहो! एव्हढ्या रात्री एकटे नका जाऊ मी सुद्धा येते."
ही म्हणाली आणि हे खरं असल्याची खात्री पटली.. आम्ही तडक गाडी काढून प्रशांतच्या सोसायटीत शिरलो.. वॉचमनच्या हजार प्रश्नांना पार करत.. 8व्या मजल्यावर पोहोचलो... पाहतो तर प्रशांत अपराध्यासारखा बाहेर उभा...... तेही शॉर्टस आणि बनियन वर... ....

प्रशांत माझा एकुलता एक भाचा.. लहान गावात शेतकरी कुटुंबात दोन बहिणींच्या पाठीवर जन्माला आलेला.. माझ्या ताईचा हा लेक .. अतिशय हुशार ,मेहनती. स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेतलेला ... अर्धवेळ नोकरी करून इंजिनिअरिंग पूर्ण केलेला प्रशांत चांगल्या नोकरीत लागला.. आता पुण्याला रहायचे म्हणजे घर हवेच..मग आम्ही दोघे मामा-भाचे त्याच्यासाठी घर शोधत फिरू लागलो.. सगळं आयुष्य सरूनही मी अजून स्वतःचं घर घेऊ शकलो नव्हतो. शेवटी होम लोन आणि ताईचे चार दागिने ह्यांची जुळवाजुळव करत हा फ्लॅट प्रशांतने घेतला... 2BHK असला तरी स्वतःचा होता त्याचा आनंद निराळाच होता. आता आम्ही प्रशांतसाठी सुयोग्य मुलगी शोधू लागलो... तसेही स्वतःचे स्वतः जुळविणाऱ्यांतला आमचा प्रशांत नव्हताच. ताईचे म्हणणे पडले.. 

"तुमच्या पुण्याची पोरगी नको बाबा...आपल्या गावाकडची बघ. शिकलेली बघ, तुला पटेल तशी कर पण इकडची नको..... प्रशांत! आमच्या काही अपेक्षा नाही तुझ्याकडून... आम्ही आमचे तिकडेच राहू पण कधीमधी येता येईल चार दिवस अशी मुलगी बघ. सणवार निगुतीने करणारी , माणसं सांभाळून घेणारी असू दे म्हणजे झालं. "

योग जुळून आले की सगळं जुळून येतंच.. म्हणतात ना! अगदी तस्स झालं. ताईच्याच गावचे ठिकाण चालून आले ... वडील शिक्षक, तिघी बहिणी त्यातली मुक्ता धाकटी. तिच्या मानसी आणि माधवी ह्या दोघी बहिणींचे लग्न होऊन वर्षे लोटली होती.. देशपांडे दाम्पत्याचे वय पाहता..मुक्ता त्यांना अगदी उतारवायात झाली असावी. मुक्ता सुद्धा इंजिनिअर आणि कंपनीत चांगल्या नोकरीत होती.पत्रिका 32 गुणी जुळली... साधेपणाने साखरपुडा झाला... तिच्या साखरपुड्यात फक्त दोघी बहिणी कुटुंबाविना एकट्याच आल्या हे जरा खटकलं.. बहिणी मुक्ताच्या मानाने सुमारच होत्या, जेमतेम बारावी शिकलेल्या , शेजारच्याच खेड्यात लग्न करून गेलेल्या त्यामुळे मुक्ता अधिकच उठून दिसत होती.  बोलायला मोकळी आणि आत्मविश्वासाने बोलणारी मुक्ता सगळ्यांनाच प्रभावित करून गेली.

साखरपुड्याला उपस्थित एक शेजारी मला बाजूला घेत खाजगीत म्हणाले,

"ही मुलगी भाच्यासाठी करतांना विचार कर बाबा! सर भला माणूस आहेत..पण आई म्हणजे आग रामेश्वरी आहे पोरगी बंब सोमेश्वरी नको निघायला."

लहानसं गाव , हळूहळू काहीबाही कानावर येऊ लागलं.. विशेषतः मुक्ताच्या आईविषयी लोक वाईट बोलत.. म्हणजे बाई कजाग आहे, कुणाशी पटत नाही, नवऱ्याचा अगदी बैल केलाय वगैरे वगैरे .. मनांत प्रश्न निर्माण झाले की काय करावे आता? प्रशांतच्या मनात मुक्ता भरली असावी, सर्वार्थाने दोघे एकमेकांना अनुरूप होते... प्रशांत म्हणाला..

"मामा! मुलीच्या आईशी काय करायचं आहे .. मुलीबद्दल तर काही वाईट ऐकलं नाही ना?? झालं तर मग.."

मग आम्ही ह्या चर्चेला विराम दिला. ताई आणि मी दोघेच भावंड, आईबाबांच्या नंतर आम्हीच एकमेकांना होतो... त्यामुळे आम्ही चांगले पंधरा दिवस आधी लग्नाच्या तयारीला गावी गेलो. योगायोगाने शेजारच्याच गावात शिक्षक असणारा माझा मित्र बसमध्ये भेटला आणि प्रवासभर आमच्या गप्पा सुरु झाल्या. प्रशांतच्या लग्नाविषयी त्याला सांगितलं आणि आग्रहाचे आमंत्रणही देऊन टाकलं... देशपांडे सरांची मुलगी आहे हे कळताच त्याचा चेहरा खर्रर्रकन उतरला.. थोडा वेळ स्वतःशीच विचार करत तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला...

"नीट चौकशी केली आहे ना तुम्ही? म्हणजे आता बोलू का नको तुझ्याजवळ.."

मीच त्याला काय ते स्पष्ट सांगण्याची विनंती केली...
" माझ्याच घरमालकांची सून म्हणजे देशपांडे सरांची मोठी लेक मानसी... आईचा प्रचंड पगडा होता मुलीवर.. सर तर थरथर कापायचे बाईला... बाई जमदग्नीचा अवतार. पहिल्यांदा माहेरहून आली तर मानसीच डोकं बिथरलं होतं... प्रकरण खूप चिघळलं.. अगदी टाकून देण्यापर्यंत वेळ आली..मग मध्यस्थाने लक्ष घालून मिटवलं.. दुसरीही लेक चार वर्षे माहेरीच होती .. तेही मॅटर नुकतंच मिटवलं सरांनी... दोन्ही जावई एव्हढेच काय सासरचे कुणीच देशपांडेंकडे जात येत नाही.. अतिशय भयंकर बाई आहे..."

माझ्या पायाखालची जमीनच सरकली... वर तो म्हणाला..

"तुझा भाचा तो माझाही भाचा .. म्हणून काळजीपोटी सांगितले बाबा.. मात्र माझं नाव मध्ये घालू नकोस ..ती बाई आमच्याकडे तमाशा करायची... गल्लीत सगळ्यांशी भांडली आहे म्हणे ती..."

मी उदास मनानेच घरी परतलो.. ताई आणि भावजींना सगळी परिस्थिती समजावून सांगितली... "हे लग्न मोडावे" असे स्पष्ट मत सुद्धा मांडले.. आता काही दिवसांवर लग्न आले असतांना प्रशांत ते मोडायला तयार नव्हता.. शिवाय सांगोवांगी गोष्टी कितपत खऱ्या असतात?? लग्न मोडायला ठोस कारणही नव्हतं... अखेर लग्न झालं... प्रशांत आणि मुक्ता आनंदात होते..मुक्ता गावी आली की चांगली वागायची ...दोघांचं बरं चाललं होतं.. हे बघून माझ्या जीवनात जीव आला.

पुण्यालाही आमचे एकमेकांकडे येणे जाणे होतेच... मुक्ताच्या स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पना जरा गडद होत्या .. म्हणजे पुण्याच्या घरी दोघांची कामे अगदी वाराप्रमाणे वाटून घेतलेली होती.. बाकीच्यांना ह्याचे नवल वाटत असेल पण दोघे नोकरीत म्हटले की हे ओघाने आलेच.. तशी प्रशांतला सगळ्या कामांची सवय होतीच. सहा सात महिने आनंदात गेले... स्त्रियांना होम लोनचा एक टक्का कमी व्याजदर लागतो म्हणून प्रशांतने मुक्ताचेही नाव घरावर जोडून घेतले... पहिले वर्ष सणवार , गावी जाणे येणे, फिरणे ह्यात सहज निघून गेलं. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करायला प्रशांतने उटीचे बुकिंग केलं... आणि निघण्याच्या आदल्या दिवशीच सासू सासरे घरात हजर... मुक्ताच्या आईचा पाय मुरगळला असे क्षुल्लक निमित्त पुढे करून ते आले होते..प्रशांतने , 

"त्यांना राहू दे आपण ठरल्याप्रमाणे चार दिवस  फिरून येऊ असे सुचवले."

मात्र मुक्ताने स्पष्टपणे नकार दिला...

"माझ्या आईच्या जागी तुमची आई असती तर..."

"तरीही मी हेच म्हटलं असतं..." प्रशांत उत्तरला शब्दाला शब्द वाढत गेला आणि कडाक्याचे भांडण झाले...

उटीचे बुकिंग रिफंड होणार नव्हते.. पैसे वाया जाऊ नये म्हणून प्रशांतने ते मला आणून दिले... मधल्या मध्ये आम्हीच दोघे उटी फिरून आलो... एव्हाना चार दिवसांत भांडण आणि अबोल्याने रौद्र रूप धारण केले होते... मी कसेबसे दोघांची समजूत घालून आलो... कुरबुरींना सुरुवात झालीच. मुक्ताची आई काय शिकवायची कोण जाणे पण मुक्ता सतत रुसून तरी बसायची किंवा भांडत तरी असायची .. दोन महिने झाले तरी सासू सासरे गावी परत जायचं नाव घेईनात तेव्हा प्रशांतने विषय काढला असता..

"मुक्ता आमची मुलगी नसून मुलगाच आहे.. आम्ही तिच्या शिक्षणासाठी एव्हढा खर्च केला... " 

वगैरे मुक्ताच्या आईने बोलून दाखवले.. चार महिन्यांनी तर त्यांनी गावाकडच घरच विकायला काढलं.. प्रशांतच्या घरात शांतीपूजा न झाल्यानेच असे होते आहे असे आमच्या ताईसाहेबांना वाटल्याने तिने पूजेचा घाट घातला... सगळे पाहुणे जमले.. आतापावेतो मुक्ताचे डोके फिरून गेलेले होते... एक बेडरूम तिच्या आईवडिलांनी बळकावून ठेवली होती .. सासूबाई मुळीच तिथून हलत नसतं.. आमची बिचारी ताई स्वतःच्या लेकाच्या घरात किचनमध्ये झोपायची.. सकाळी घाईघाईने आंघोळ उरकून पूजेला बसायला निघालेल्या प्रशांतने...  त्याच्यापाठी आंघोळीला जाणाऱ्या मुक्ताला आपले बनियन अंडरवेअर पिळून टाकण्यास सांगितले.. मुक्ताने सगळ्यांच्या देखत डस्टबिन मध्ये ते पेटवून दिले..
आणि पहिला झटका बसला... आम्ही सगळेच अवाक झालो.. मुक्ता टोकाच्या शांतपणे म्हणाली..

"पूजा तुझ्या आईला करायची आहे प्रशांत, कपडेही तुझेच होते...यापुढे मला अशी अपमानास्पद वागणूक दिली तर उद्या कपड्यांच्या जागी मी स्वतःला पेटवून घेईन... तुम्हा सगळ्यांना आयुष्यभरासाठी तुरुंगात सडवत ठेवण्याची व्यवस्था करून..."

तिचा एकेक शब्द आम्हाला हादरवून सोडत होता...आपल्या मुळे लेकाच्या संसारात अडचण नको म्हणून ताई आणि कुटुंबीय लगेच गावी परतले... दिवसेंदिवस प्रशांत आणि मुक्ताच्या नात्यामधील ताण वाढत गेले... एक दिवस खंगलेला, दाढी अस्ताव्यस्त वाढलेला प्रशांत माझ्याकडे येऊन रडू लागला..

"मुक्ता अंगाला हात लावू देत नाही. सतत भांडते, सतत जीव देण्याची धमकी देते...मुक्ता रोज उशीखाली सुराच घेऊन झोपते..."

बिचारा प्रशांत हल्ली हॉलमध्ये झोपायचा..मी शेवटी देशपांडे सरांशी ह्या विषयावर सविस्तरपणे चर्चा केली.. आणि त्यांनी गावी परत जावे अशी विनंती केली... माणूस सगळे जाणून होता.. इतके वर्ष मुलींकडे पाहून त्यांनी त्या भांडकुदळ बाईशी जुळवून घेतले होते.. त्यांनी गावी परत जायचे घरी डिक्लेअर केलं आणि मुक्ता आणि तिच्या आईने रौद्ररूप धारण केलं... पोलीस स्टेशनला जाऊन मुक्ताचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार त्या नोंदवून आल्या.. प्रशांतला चौकशीला पोलीस स्टेशनला बोलवून चांगलाच दम देण्यात आला... कसंबसं मी त्याला सोडवून आणलं.. घरी येताच विकृत हसत मुक्ता म्हणाली..

"काय मामा! झाला का पोलिसांचा पाहुणचार .. पुन्हा माझ्या वडिलांना दम देऊन गावी जायला सांगितले तर तुमच्या भाच्याला आयुष्यातून उठवेन .."

आम्ही दुसऱ्याच दिवशी तडक वकील गाठला... मानसिक छळाचे कारण पुढे करत... मुक्ताला डिव्होर्सची नोटीस पाठवली... असे भेदरून दडपणाखाली प्रशांतने कसे जगावे ? आणि किती दिवस? नोटीस मिळताच... मुक्ताने शांतपणे सांगितले..

"प्रशांत तुझ्यासारख्या बुळ्या बरोबर मला संसार करण्यात काडीचाही रस नाही.. तू घर सोडून जा मी लगेच सह्या देते... मग तू मोकळा मी सुद्धा मोकळी.."

ज्या घराचे हप्ते प्रशांत भरत होता त्यासाठी ताईने दागिने मोडले ते घर प्रशांतने का सोडायचं.. आम्ही उलट तिलाच घर खाली करण्याची नोटीस दिली.. त्या रात्रीही भांडण वाढत गेले आणि तिने अंगावर रॉकेल ओतून घेतले.. 

"लावू का काडी?? लावू.. लावू ? ..." 

म्हणत प्रशांतला घराबाहेर काढलं. .. नेसत्या कपड्यानिशी...त्या मध्यरात्री प्रशांतला मी माझ्या घरी घेऊन गेलो ... आता आम्ही त्याचे घर त्याला मिळावे म्हणून प्रयत्न करत आहोत... मुक्ताने डिव्होर्स द्यायला नकार दिला आहे.. तिच्या मते प्रशांतने घरी येऊन रहावे... तिला भाऊ नसल्याने वृद्ध आईवडील तिची जबाबदारी आहेत आणि ह्याची तिने लग्नापूर्वीच कल्पना दिली असल्याचेही तिने कोर्टाला सांगितले... कोर्टाने प्रशांतला त्याच्या घरी जाण्याचा हक्क दिला पण प्रशांत मुक्ताच्या मानसिक छळाला आणि जीव देण्याच्या धमक्यांना अतिशय घाबरून गेला आहे... त्याला मुक्ता आणि तिच्या आईवडिलांनी घर रिकामे करून द्यायला हवे आहे....  मात्र हे डिव्होर्स होईपर्यंत शक्य नाही त्यात मुक्ताचेही नाव घरावर लागले असल्याने ती हक्क सोडत नाही तोवर घर तिचेही आहेच...
असा हा सगळा गुंता होऊन बसला आहे....
कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय प्रशांत?? साधं सरळ असल्याची की बायकोचं नाव घराला जोडल्याची...??? की
चौकशीत अनेकांनी विरोध करूनही लग्न केलं त्याची...??

✒️ यशश्री रहाळकर




रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ६ :- अनाहूत


स्पृहा आणि सौमित्र गेली सात आठ वर्षे एकमेकांचे परिचित.. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाले तर गेली सहा वर्षे दोघेही सिरीयस रिलेशनशिपमध्ये होते. हल्ली ह्या just chill, time pass किंवा move on प्रकारच्या casual relationship असतांना ... स्पृहा आणि सौमित्र मात्र त्यांच्या नात्याबद्दल खूपच गंभीर होते. एका पार्टीत "कॉमन फ्रेंड" च्या माध्यमातून पहिल्यांदा भेटलेले दोघे हळूहळू एकमेकांचे चांगले मित्र झाले नि वर्षभरात एकमेकांच्या प्रेमात पडले.. खरेतर दोघांचे स्वभाव टोकाचे भिन्न..स्पृहा प्रॅक्टिकल, सडेतोड , रॅशनल... थोडीशी फटकळ. तर सौमित्र हळवा, इमोशनल, जरा बुजरा आणि शक्यतो कुणाला न दुखावणारा भिडस्त.... कसं कोण जाणे पण दोघांचं जमलं.उंच, सडपातळ सावळीशी स्पृहा फार सुंदर नसली तरी कमालीची आकर्षक होती.. सौमित्र तुलनेनं गोरापान आणि देखणा.. जरासे सुखवस्तूपणाचे मूठभर मास चढलेला होता... C.A.पूर्ण झाल्यावर जरा जम बसेपर्यंत सौमित्रने वेळ घेतला... आणि लगेच स्पृहाला प्रपोज केलं... डान्स स्पेशल घेऊन M.A. झालेली स्पृहा जरासे वेगळे करियर निवडलेली स्वतंत्र मुलगी होती... सौमित्रने लग्नाचा विषय काढताच तिने वेळ मागून घेतला. तिचे भरतनाट्यमचे कार्यक्रम, देश विदेशातले दौरे ह्यासाठी तिला आवश्यक स्वातंत्र्य गरजेचं होतं.. जरा घाईघाईने सौमित्रने त्यांच्या दोघांच्या घरच्यांची भेट घालून देण्याचं ठरवलं.

स्पृहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाकडाची लेक... एव्हढेच नव्हे तिचे आईवडील सुद्धा एकुलते एक अपत्य.. त्यामुळे मावशी, काका, आत्या असे नातेवाईक नाहीत.. लहानसे कुटुंब.. घरी दोन आज्या आणि हे तिघे.... मॉडर्न विचारांचं टिपिकल उच्च मध्यमवर्गीय घर. सौमित्रच्या घरचे लोक मात्र ह्याच्या अगदीच दुप्पट.  सौमित्रला दोन मोठे काका. काका आणि त्याचे वडील अश्या तिघांनी मिळून एका मोठ्या प्लॉटवर तीन मजली बंगला बांधलेला... म्हणायला वेगळे पण दिसायला एकत्र. मोठ्या काका-काकीला मुलबाळ नसल्याने सौमित्रवर त्या दोघांचा विलक्षण जीव...सौमित्रची आई बँकेत नोकरीला असल्याने त्याला मोठ्या काकूनेच सांभाळलं. दुसऱ्या काकालाही दोन मुलीच.. त्याही त्यांच्या सासरी सुखाने नांदत होत्या. सौमित्र त्यांचा लाडका भाऊ. झालंच तर दोन आत्या, शेतीवाडी, येणारा जाणारा ह्यांचा घरात सतत राबता असायचा. घरचे प्रचंड गडगंज.. पण तितकेच कर्मठ रीतीभाती जपणारे. सौमित्रची आई सातारकडची... तिकडे मोठा जमीन जुमला, साखर कारखाना... 80 च्या आसपास वय असणारे आईवडील पण कर्ते सगळीकडे वचक असणारे. सौमित्रला एकूण चार मामा... त्याची आई सगळ्यांत धाकटी आणि तितकीच लाडकी... त्यामुळे सगळ्या बाजूंनी सौमित्र लाडका होता... त्याच्या लग्नाची मोठी स्वप्ने सगळे पाहत होते... त्याचे त्यांनी जमवल्याचे कळताच जरासे नाराज झाले पण "होऊ दे त्याच्या मनासारखं!"   म्हणत उत्साहाने तयारीला लागले. पहिल्यांदा पहायला म्हणून आले तर सौमित्रकडचे 30 लोक... स्पृहाची आई बावरून गेली. एकदम एव्हढी माणसं.. बापरे!

साधीशी साडी नेसून आलेली, फार चमचमीत मेकअप न केलेली... मोकळं बोलणारी स्पृहा सगळ्यांना पाहताक्षणीच आवडली.थोड्या ओळखी वगैरे उरकल्यावर थेट विषयाला हात घालत मोठे मामा म्हणाले,

"हल्ली पोरं आपापसांत जमवतात.. आपण काय आनंदाने स्वीकारायचं... थाटात बार उडवून देऊ काय म्हणता?"

स्पृहाच्या आईला सौमित्र आवडला होता मात्र ह्या इतक्या लोकांमध्ये आपल्या लेकीने जाणं आणि तिचं तिथे निभण म्हणजे अवघड वाटत होतं... त्यांनी आढेवेढे न घेता स्पष्टच आपली बाजू मांडली..

"आमच्याकडे फार माणसे नाहीत एव्हढ्या माणसांमध्ये रहायची, निगुतीने करायची माझ्या लेकीवर वेळच आली नाही... तशी तिला कामे सगळी येतात पण आजवर जबाबदारी कधी पडली नाही."

"आम्ही कश्याला आहोत मग? लेकीसारखं सांभाळून घेऊ.."
सौमित्रची आई प्रेमाने म्हणाली.

स्पृहाने आपले करियर, डान्सचे कार्यक्रम ह्याबद्दल स्पष्टपणे सांगून टाकले...त्यावर मोठ्या काकी अगदी मायेनं म्हणाल्या..

"तुझ्या सासूचं सगळं करीयर लग्नानंतरचे बरं! तिने बँकेच्या परीक्षा दिल्या पुढे पुढे जात राहिली.. आम्ही कुणी कधी आडकाठी केली नाही... तुझं काम म्हणजे तुझी नृत्यसाधना.. जरा वेगळं आहे मान्य पण कुणी अडवणार नाही कधीच तुला..."

"प्रत्येकाला स्वतःची प्रगती करायचा हक्क आहेच की.."
सौमित्रची बाबा म्हणाले.

स्पृहासाठी हेच ठिकाण अगदी योग्य आहे ह्या मतावर स्पृहाचे बाबा आले आणि लग्न ठरले. फार काही अपेक्षाच नव्हत्या कुणाच्या... पण एकंदर सौमित्रचे कुटुंब आणि भरपूर माणसे पाहता मुलीकडच्यांना सोय करणे सोपे नव्हते म्हणून त्यांच्या गावी पारंपारीक पद्धतीने लग्नसोहळा करण्याचे ठरले. खर्चाचा वाटा स्पृहाच्या वडिलांनी स्वेच्छेने द्यावा ..;  मात्र सगळ्यांचे मानपान त्यांनी करावे हेही निश्चित झाले. स्पृहा त्यांचीही एकुलती एक लेक त्यामुळे त्यांनी साखरपुडा थाटामाटात आपल्याकडे करायचा प्रस्ताव मांडला... उभयपक्षी तो मान्य झाला आणि तारीख सुद्धा ठरली.

स्पृहाच्या वडिलांनी ग्रँड रॉयल हॉटेल बुक केले ... आपली मोजकी जवळची माणसे त्यांनी आमंत्रित केली. आपल्या एकुलत्या एक लेकीसाठी त्यांनीही काही स्वप्ने पाहिली होती... सौमित्र आणि स्पृहाने अगदी थोडक्यात रिंग सेरेमनी करायचं ठरवलं.... सौमित्रच्या घरच्यांनी देखील साखरपुडा त्यांच्या पद्धतीने होऊ देत म्हणून तयारी दर्शवली.... लग्न विधीवत होणार होतेच. स्पृहाला waterfall बॅकग्राऊंडला हवा होता त्याप्रमाणे स्टेज design झाला.. तिने फिश कट वन पीस ... सियांन रंगांच्या रंगछटा वापरून खास बनवून घेतला... त्यावर मोजके नाजूक डायमंडचे दागिने... तिने अंगठीही निलमची निवडली होती. सौमित्र देखील गडद निळा सूट घालणार होता... आधुनिक प्रथेप्रमाणे दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या.. मग त्यांच्यावर फुलांची बरसात आणि खास थीम केक... समुद्र आणि शंख शिंपल्यांचा... सगळी ऑर्डर नक्की झाली... साखरपुड्यासाठी खास मेकअप आर्टिस्ट बोलावून स्पृहा तयार होत होती... एव्हढ्यात सौमित्रच्या आजोळचे सगळे लोक दाखल झाले.. सावळी मुलगी बघून सौमित्रच्या मामींनी नाके मुरडली...सौमित्रची आजी येतांना नातसुनेसाठी महागडी पैठणी आणि चांगले ठसठशीत दागिने घेऊन आली होती... तिने आपल्या लेकीची चांगली खरडपट्टी काढली..

"ते लाख म्हणतील ग ! तुला कळत नाही का? असे झगे घालून का साखरपुडा होतो... नव्या सुनेचे पाय धुवावे ओटी भरावी ... हे काय ? आपल्याच धर्माचीच आहे ना पोर?? तिला म्हणा तिचे तिच्या घरी ठेव"

आजीचा सूर चांगलाच चढला ... भराभर सगळे स्वरूप पालटले... चौरंग मांडण्यात आला आणि स्पृहाला साडी नेसून येण्याचे फर्मान निघाले... स्पृहाचा चांगलाच हिरमोड झाला.. तिचा उतरलेला चेहरा पाहून आई म्हणाली..

"बघ ! म्हणून तुला म्हणत होते एव्हढी माणसं म्हणजे प्रत्येकाशी जमवून घ्यावे लागेल... माझं पटतं का काही तुम्हा बाप लेकीला?"

स्पृहा हट्टाने तशीच उदास बसून होती.. शेवटी सौमित्र येऊन गयावया करू लागला...

"थोडा वेळ साडी नेस स्पृहा ... please माझ्यासाठी...💝आजीचे किती दिवस राहिलेत.. तिच्याही मनाने होऊ दे... फक्त थोडा वेळ... नंतर लगेच आपण रिंग सेरेमनी करूयात..."

कशीबशी स्पृहा तयार झाली... विधीवत साखरपुडा झाला... तिला पुन्हा साडी बदलून पैठणी नेसून येण्यास सांगितले...  ह्या सगळ्या सगळ्या घडामोडीत बराच उशीर झाला... सगळ्यांना जोडीने नमस्कार मग प्रत्येकासोबत फोटो ह्या वेळात सगळे आमंत्रित जेवून परतले सुद्धा... स्पृहाला तिचा वन पीस घालायला सवडच मिळाली नाही तसेच पैठणीवर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. रिंग सेरेमनी चा विधीवत वाङ्निश्चय झाला... आजीबाई खुश झाल्या... पण स्पृहा मनांतून चांगलीच दुखावली गेली असणार... हे तिला चांगलेच ओळखणाऱ्या सौमित्रच्या नजरेतून सुटले नाही... एकाही फोटोत तिने साधी smile सुद्धा दिली नाही... केवळ उपचार म्हणून तिने सगळे उरकले. रात्री घरी परतल्यावर त्याने स्पृहाला सविस्तरपणे माफी मागणारा मेसेज केला... तिने त्याच्या शब्दाचा मान राखून साडी नेसली ह्याबद्दल देखील तिचे कौतुक केले... वेळेला ती त्याला आयुष्यभर साथ देईल ही खात्री असल्याने तो स्पृहाच्या अधिकच प्रेमात पडला असल्याचेही त्याने text केले...  आता ती काही दिवस तरी रुसून बसणार, ह्याची त्याला खात्रीच होती. सौमित्रने तिला शांत व्हायला थोडा वेळ देण्याचं ठरवलं.

लग्न दोन महिन्यांवर येऊन ठेपलं होत... पुन्हा प्रवासाची दगदग नको म्हणून आजी बाईंनी सौमित्रकडेच तळ ठोकला होता.... शिवाय जातीने सगळ्या बारीकसारीक गोष्टींत लक्ष घालून त्या ती अगदी नीटनेटकी करणार होत्या. लहान मोठ्या गोष्टी लगेच स्टेटस वर अपडेट करणाऱ्या स्पृहाने आठ दिवस झाले तरी सोशल मीडियावर आपल्या एंगेजमेंटचे अपडेट केलेलेच नव्हते.. सौमित्रनेच मग fb वर त्यांचा अंगठ्या घालतांनाचा फोटो शेअर केला आणि स्पृहाला टॅग केलं.  थोड्याच वेळात स्पृहाने तो टॅग remove केलेला त्याला दिसला... तो मनातून खूप दुखावला पण स्पृहाची नाराजी त्याला कळत होती. हल्ली तिने त्याचे फोन घेणे सुद्धा कमी केले होते... स्वतःहून फोन करणे तर तिनेच केव्हाच बंद केले होते... जेव्हढ्यास तेव्हढं कामापुरतंच ती बोलायची. सौमित्रने अनेकदा तिला फिरायला जाण्याविषयी किंवा डिनरला जाण्याविषयी विचारले पण ती वेळ नसल्याची सबब पुढे करायची..... दागिन्यांच्या खरेदीच्या वेळी स्पृहाला फोन केला असता ..

"मला काय कळतंय त्यातलं? तुम्हीच आवडीप्रमाणे घ्या."

असे उत्तर तिने दिले. कपडा खरेदीच्या वेळेलाही वेळ नाही ही सबब पुढे केली. दोघांचं काहीतरी नक्कीच बिनसलं आहे हे फक्त सौमित्रच्या मोठ्या काकींच्या लक्षात आलं... बाकी सगळे लग्नाच्या गडबडीत व्यस्त होते. स्पृहाच्या नृत्यसाधना अकॅडमीचा कार्यक्रम एका आंतरराष्ट्रीय महोत्सवात बँगकॉकला ठरला आणि ती त्या धावपळीत व्यस्त झाली... जाण्यापूर्वी भेटीला म्हणून आलेल्या स्पृहाला आजी म्हणाल्या..

"काय नाच गाणं बाकी असेल ते करून घ्या... मग आयुष्यभर आमच्या सौमित्रच्या तालावर नाचायचं आहे."

स्पृहा काहीही उलट न बोलता... शांतपणे घरी परतली. खरेतर लग्न अगदी तोंडावर आले असतांना.. हा कार्यक्रम तिने टाळावा असे सौमित्रच्या घरच्या मंडळींचे मत होते.. पण तिने परवानगी मागितली कुठे होती?ती थायलंडला रवाना झाली आणि नंतर तिने सौमित्रशी असणारा उरला सुरला संपर्कही तोडून टाकला... तो वेड्यापीश्यागत सैरभैर झाला... तो सतत तिला कॉल करायचा आणि ती शांतपणे त्याचा कॉल कट करायची... व्हाट्स अँप वर त्याने मेसेजेसचा रतीब घातला पण तिने उत्तर दिलेच नाही. एके दिवशी सकाळी तिने त्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचा बांध फुटला.. आपल्या काकींच्या मांडीवर डोके ठेवून एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो रडू लागला.. काकीने त्याला समजावले .. की त्या बोलतील स्पृहाशी ,समजावतील तिला...

"काय रे तुम्ही ही हल्लीची मुले !"

म्हणत त्यांनीही कॉल करण्याचा प्रयत्न केला पण स्पृहाने उत्तर दिले नाही.. फक्त एक मेसेज पाठविला

"परत आल्यावर सविस्तर बोलूया!"

सहा दिवसांसाठी गेलेली स्पृहा परतली नाही उलट तिथूनच ती बालीला फिरायला निघून गेली. हेही सौमित्रला त्यांच्या एका कॉमन फ्रेंड कडून कळले... ती बालीला गेल्याचे आणि तिथे एन्जॉय करत असतांनाचे ढीगभर फोटोज् तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हा काय प्रकार आहे? हे त्याला कळेना.. कारण लग्नानंतर आठ दिवसांनी दोघांनी बालीला हनिमूनला जाण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार सगळे बुकिंग वगैरे करूनही झाले होते. स्पृहाला समुद्र खूप आवडायचा म्हणून त्या दोघांनी मिळून हे ठिकाण नक्की केलं होतं.स्पृहा आपल्याला टाळतेय का? सौमित्रला काही सुचनासं झालं... सगळीकडे वाटलेल्या लग्नपत्रिका, तिच्यासोबत पाहिलेली आयुष्याची स्वप्ने, तिच्या आवडी , दोघांच्या गप्पा सारं सारं त्याला खूप हवंहवंसं वाटत होतं... स्पृहाच्या मनात काय आहे हे तिनं घडाघडा बोलून टाकावं , आपण माफी मागू हवं तर आणि सगळं सुरळीत व्हावं एव्हढंच त्याला वाटत होतं. पाच सहा दिवसांनी स्पृहा परत आली.. हेही त्याला कळवण्याचे कष्ट तिने घेतले नाही... लग्न आठ दिवसांवर आलं.. व्याही भोजनाचं आमंत्रण करायला मोठे काका-काकी निघाले...

"आज काय ते स्पष्टच बोलतो.."

असे मनाशी ठरवून सौमित्र देखील त्यांच्याबरोबर निघाला.
स्पृहाच्या घरी अगदी शांतता होती आठ दिवसांवर लग्न आले असल्याची, लग्नघरातील धावपळ गडबड काहीच दिसत नव्हते... स्पृहा अगदी शांतपणे बाहेर येत टोकाच्या कोरड्या आवाजात म्हणाली..

"मला नाही वाटत हे लग्न करून मी सुखी होईन... "

तिने पैठणी, दागिने आणि साखरपुड्याची अंगठी परत केली.. काका मटकन खालीच बसले...
स्पृहाच्या बाबांकडे पाहत म्हणाले ...

"अहो काय समजायचं काय आम्ही? आठ दिवसांवर लग्न आलंय.. सगळीकडे पत्रिका वाटल्या गेल्या आहेत..."

त्यांना शांत राहण्याची खूण करत काकी समजावण्याचा सुरात म्हणाल्या..

" स्पृहा बेटा! अशी घाईने निर्णय घेऊ नकोस. सौमित्रच खूप प्रेम आहे तुझ्यावर.. त्या दिवशी तुला जबरदस्तीनं ही पैठणी नेसावी लागली... आमचं चुकलं .. हवं तर मी माफी मागते... आपण बोलूया शांततेनं..."

तटकतोड पणानं स्पृहा म्हणाली...

"प्रेम माझंही होतच ना! पण म्हणून मी त्याच्यावर काहीही लादलं नाही. त्या दिवशी सौमित्रने माझी बाजू घ्यायला हवी होती.. प्रश्न पैठणी किंवा वन पीस हा नव्हताच प्रश्न होता साथ देण्याचा..."

सगळे मूग गिळून गप्प बसले होते.. एखाद्या तोफेतून आगीचे लोळ बाहेर पडावेत तशी स्पृहा बोलत सुटली..

"आजीचे म्हणाल ना तर मलाही दोन्ही आजी आहेत .. आणि मी त्यांचं मन जपते योग्य वेळी.. पण म्हणून माझ्या जोडीदाराने ते जपत का बसावे?? त्या दिवशी आजीचे मन मोडायला नको म्हणून सौमित्रने मला ऍडजेस्टमेंट करायला सांगितली.. उद्या अजून कुणासाठी , पर्वा अजून कुणासाठी... मला हे शक्य नाही..
मी पूर्वीच त्याला सांगितलं होतं .. अगदी स्पष्टपणे."

एव्हाना सौमित्रचे डोके भणाणू लागले होते... आवाज वाढवत तार सप्तकात तो ओरडला..

"इतके दिवस तुला हेच समजवून सांगायचं प्रयत्न करतोय ना! पण तुला बोलायचं नाहीच आहे... तुझी इतके वेळा मी माफी मागितली... तू म्हणशील ती शिक्षा मला मान्य आहे त्यासाठी..."

"माझ्याशी आवाज चढवून बोलायचं नाही सौमित्र ! मी तुझी बायको झालेली नाही... आणि खरं सांगायचं तर मला व्हायचंही नाही... तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन ? असा मूर्ख प्रश्न मला पडला होता.. तोच सोडवायला मी मस्त एकटी फिरून आले... तुझा फोन नको, मेसेज नको आणि आठवणही नको...
And see... मी खूप मज्जेत ...आनंदात आहे."

काका-काकींनी तिच्या आईबाबांशी बोलून ह्यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला... त्यांनी स्पृहाला समजावून सांगावे असेही त्यांनी सुचवले... तास दोन तासांच्या चर्चेनंतर स्पृहा ठामपणे म्हणाली..

"मला नाही वाटत आता काही बोलायचं उरलं आहे.. माझ्याकडून हे लग्न मोडलं..."

आणि ती तरातरा आतल्या खोलीत निघून गेली.नाईलाजाने काका-काकी आणि सौमित्र जायला निघाले.. स्पृहाच्या आईने ,"पैठणी दागिने आणि अंगठी वगैरे नीट पाहून घ्या नंतर वाद नको " असे सुचवले.काकीने जड मनाने ते उचलले.. सगळे घरी आले.. नेमकं काय झालं कुणाला कळेना.. पैठणी आजीसमोर भिरकावत सौमित्र म्हणाला..

"झालं तुम्हा सगळ्यांच समाधान... माझं लग्न मोडलं आहे... पैठणी नेसवताहेत.. नेसवा अजून नेसवा ..." 

म्हणत वाट्टेल तसं बडबडत तो त्याच्या खोलीत निघून गेला.पुन्हा घरी तोच विषय सगळे संतापले होते.. मामा तर म्हणालेही .....

"त्या पोरीला काय सोनं लागलंय का तिच्याहून सरस मुलगी मिळेल सौमित्रला.."

सौमित्रची काकी मात्र मनातून हादरली होती... सौमित्र ह्या मुलीत खूपच गुंतला असल्याचं तिला पुरतं माहीत होतं.. सकाळपर्यंत सौमित्रने खोलीचे दार उघडले नाही... सगळ्यांचीच मनःस्थिती बरी नव्हतीच.. शेवटी जेवायच्या वेळेला बोलवायला म्हणून गेलेल्या काकी घाबरत म्हणाल्या..

"तो दार उघडत नाहीये.. दार तोडा मला वेगळीच भीती वाटतेय..."

त्यांची भीती खरी होती.. दार तोडल्यावर सौमित्र अर्धमेल्या अवस्थेत सापडला.. खोलीभर त्याने त्याचे आणि स्पृहाचे फोटो पसरून ठेवले होते... स्पृहाशिवाय जगणेच मान्य नसल्याचेही त्याने चिठ्ठीत नमूद केले होते.. झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली रिचवल्याने त्याचा मेंदू बधिर झाला होता.. हॉस्पिटलच्या ICU मध्ये त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टर करत होते...तोंडात मारल्यागत आजी देवापुढे हात जोडून बसली होती...नेमकं कुणाचं चुकलं होतं माहीत नाही? पण अनाहूतपणे आलेल्या ह्या वादळाने सारं घर उध्वस्त झालं होतं.

✒️ यशश्री रहाळकर


शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ५ :- विदीर्ण


जवळपास सहा वर्षांनंतर ...अभिषेक व्यसनमुक्त होऊन केंद्रातून बाहेर पडला तेव्हा त्याचं वय 25 वर्षे होतं, शिक्षण अपूर्ण .. मॅट्रिक नापास.. केंद्रात थोडे फार काम करवून घेतले होते. त्यातूनच त्याला गाड्या दुरुस्त करण्याची आवड निर्माण झाली होती... मालती ताईंनी शब्द टाकून त्याला एका ITI कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून दिली होती. सकाळी कॉलेज असायचे, दुपारी 2 ते 7/ 8 वाजेपर्यंत तो एका गॅरेजला काम करायचा.. रात्री थकून झोप चटकन लागायची... आणि थोडे पैसेही मिळायचे... तसा प्रश्न पैश्यांचा कधी नव्हताच. उलट गरजेहून जास्त मिळालेल्या पैश्यांचा होता... मालती ताईंनी त्याच्या आईवडिलांना ,

"अभिला पैसे पाठवून मारण्यापेक्षा विष का देत नाहीत तुम्ही? "

असा थंड डोक्याने प्रश्न विचारल्यावर त्याच्यावर होणारा पैश्यांचा पाऊस थोडा घटला होता.. पण आता त्याला ते पैसेच नको होते. केंद्रातून बाहेर पडल्यावर औरंगाबादला आजीच्या जुन्या घरात रहायचा निर्णय त्याने कळवून टाकला. आजी ... त्याच्या वडिलांची आई ...; एकटीच तर राहत होती तिनेही होकार दिला ... तशी थोडी भीती तिलाही वाटली असेल पण नातवाच्या प्रेमापुढे कदाचित तिची भीती दुबळी ठरली. दोघांनाही एकमेकांची सोबत झाली.. तशी अबोल सोबत म्हणायची कारण अभि फारसा बोलत नसायचा .. मात्र आजी सांगेल ती सगळी कामे चटाचटा करायचा..भाजी आणून देणे, दळण आणणे, बिल भरणे वगैरे वगैरे. दर पाच दिवसांनी मालती ताईंचा फोन यायचा तेव्हा मात्र अर्धा तास मोकळेपणाने बोलणे व्हायचे.. मालती ताई सप्रे म्हणजे त्याच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका... स्वतःचा तरुण लेक व्यसनाला बळी पडल्यानंतर तरुण मुलांच्या व्यसनमुक्तीला सर्वस्व वाहून घेतलेली प्रेमळ माऊली. अभिषेक नेहमी मालती ताईंना म्हणायचा..

"तुम्ही माझ्या आई का नाही हो झालात?"

त्यावर मालती ताई म्हणायच्या, "तू ज्या दिवशी व्यसनमुक्त होऊन नीट आयुष्य जगू लागशील त्या दिवसापासून मी तुझी आई असेन!"

आता ह्या माऊलीच्या शब्दांखातर तो नीट वागू लागला.. पौगंडावस्थेत जडलेल्या व्यसनावर त्यानी मोठ्या धैर्याने मात केली.. एक चांगलं आयुष्य जगायचे वचन मालती ताईंना देऊन तो केंद्रातून बाहेर पडला. त्याचं आयुष्य साचलेलं डबकं असलं तरी ह्या सहा सात वर्षांत सगळ्यांची आयुष्ये धावत पुढे गेली होती.. आधीच त्याच्या आयुष्याची काय कमी फरपट झाली होती ?? ..आता त्याला कुणाच्याच पाठी धावायचे नव्हते तर स्वतःच्या गतीने एक शांत आयुष्य जगायचे होते. आई किंवा बाबा कुणाचाही फोन आलाच तर तो न बोलता आजीकडे देत असे... स्वतःला शांत आणि आनंदी ठेवायचे सगळे प्रयत्न तो करणार होता.. तसं त्याने मालती ताईंना वचनच दिलं होतं. 

रविवार मात्र त्याच्या अंगावर येई.. मग तो सरळ वाट फुटेल तिकडे चालून थकला की परत येई... बाकी बाह्य जगाशी त्याने फारसा संबंध ठेवलाच नव्हता, त्यापेक्षाही त्याला तो नकोच होता... नको ती स्पष्टीकरणे, नको ते प्रश्न आणि नको ते त्याच त्याच जळजळीत जाणिवांचे न सुटणारे कोडे.
जळजळीत भावनेसरशी त्याला आतडी जाळून टाकणाऱ्या दारूची तीव्र तलफ आली.... थोडी थोडकी नाही तर गेली आठ नऊ वर्षे तो ऍक्टिव्ह अल्कोहोल ऍडिक्ट होता... हळूहळू कमी करत करत त्याने बऱ्याच निग्रहाने त्यावर नियंत्रण मिळवले होते पण संयम बरेचदा डगमगायचा. अश्या वेळी तो मालती ताईंना फोन करायचा, अधून मधून केंद्रात जाऊन व्यसनमुक्तीच्या प्रवासातील आपले अनुभव सांगायचा. बरेचदा अदालत रोडवर चालत निघायचा आणि फॅमिली कोर्टातील एखाद्या सेशनला जाऊन बसायचा. 

"टी. व्ही. / सिनेमातील खोटी खोटी पात्रे पाहण्यापेक्षा ही खरीखुरी पात्रे अधिक मनोरंजक असतात .." 

असे नेहमीच त्याच्या मनात यायचे... तशीही आयुष्यातली बरीच वर्षे त्यानेही कोर्टात खेटे घालून घालूनच संपवली होती. तिथे त्याला एकप्रकारे उबदारपण जाणवे... सगळ्या मनाच्या आठवणींनी पार चिंध्या केल्या की त्या गोळा करून तो परत येई. हे ऐन पौगंडावस्थेत भोगलेलं हलाहल  आतपर्यंत जाळत गेलं की त्याची दारूची तलफ आपसूक भागत असे.

आजही तो असाच उध्वस्त मनाने फॅमिली कोर्टात येऊन कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसता झाला... दोन मुलांच्या कस्टडीची केस होती... आई आणि वडील विभक्त झाले होते, दोघांनाही लग्ने करायची होती आणि ही मुले नावाची ब्याद कुणालाच नको होती.. दोघेही त्यासाठी पैसे मोजायला तयार होते... अभिला गलबलून आलं... मनाचा दगड झालेल्या त्या 8/9 वर्षाच्या मुलाकडे त्यानं पाहिलं... बिच्चारा! मुलांना कुणाकडे जायचं आहे असे कोर्टानं विचारलं... ह्या प्रश्नाचं उत्तर किती कठीण असतं...? नवरा बायकोचे वाद टिपेच्या सुरात वाढले आणि कोर्टाने पुढील तारीख दिली. अभिषेक बाहेर पडला.. गेट शेजारच्या टपरीवर चहा पिऊ लागला.. त्या निष्पाप पोराच्या जागी तो स्वतः उभा असल्याचं त्याला दिसलं... चालत घरी परत निघाल्यावर त्याचं मन मात्र कधीच भूतकाळात चालतं झालं होतं.

तो लहान असतांना... किती छान ,गोड ,सुखी संसारासारखं चित्र होतं त्याच्या घराचं... त्याचे आईवडील दोघेही उच्चशिक्षित मोठ्या पदावर कार्यरत.. घर कसलं भला मोठा बंगला, गाड्या , नोकर चाकर सारं वैभव जन्मजात त्याला मिळालं. वडील ऑर्डीनन्स फॅक्टरीमध्ये अधिकारी तर आई LIC मध्ये चांगल्या पोस्ट वर.... एकुलत्या एक अभिषेककडे सगळे सगळे होते फक्त आईबाबांचा सहवास सोडून...दोघेही त्यांच्या कामांच्या व्यापात मिटींगमध्ये बुडालेले... दोघांचे वाद भांडण कधीही  झाले नाही ...पण जोपर्यंत चोपडे साहेब प्रकरण उद्भवले नव्हते.... फक्त तोपर्यन्त.

शहरातल्या उच्चभ्रू पालकांची मुले जायची त्या शाळेत अभिषेकला घातले होते. लहानपणापासून आपल्याला छान मार्क मिळाले ,बक्षीस मिळाले की मम्मी पप्पा खुश होत असत हे त्या चिमण्या जीवाला कळले होते... त्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असायची.  सरळमार्गी अभिषेक घर, शाळा, क्लासेस मध्ये व्यस्त असायचा... अधून मधून सुट्टीत तो औरंगाबादला जायचा किंवा आजीआबा त्याच्याकडे येत. 

तो दहावीला होता तेव्हाची गोष्ट... एक दिवस मम्मी घरी येतांना भला मोठा पिझ्झा बॉक्स घेऊन आली... तिच्यासोबत कुणीतरी साहेब होते... त्यांना ऑफिसचे महत्वाचे काम करायचे होते... आईने अभिला पाचशेची नोट देत ,"बाहेर फिरून ये , मित्रांसोबत मज्जा कर ." असे सांगितले. पहिल्यांदा त्याला काहीच वाटले नाही पण हळूहळू  हे असं बरेचदा घडू लागलं. अर्धवट वयात असणाऱ्या अभिला हे खटकत होतं पण नेमकं काय खटकतंय हेही कळत नव्हतं. पुढे त्या साहेबांचं नाव चोपडे साहेब असून.. ते नवीनच बदलून आल्याचेही कळलं.  काळा ,दांडगट रेड्यासारखा चोपडे त्याला अज्जिबात आवडला नव्हता.. त्याच्याकडे येणाऱ्या पाचशेच्या नोटांची संख्या हळूहळू बरीच वाढू लागली... तसे त्याच्या भवती फुकट्या, वाया गेलेल्या मुलांचे टोळके बनले... त्याचा बराचसा वेळ मॉल ,सिनेमा ,गेमझोन मध्ये जाऊ लागला. सहज उत्सुकता, गंमत म्हणून आणि खिशात बक्कळ पैसा खुळखुळत होता म्हणूनही अश्याच एका मित्रासोबत तो पबला गेला.. पहिल्यांदा त्याने दारू चाखली..... मग वाईन, बिअर, व्हिस्की, रम... नावं फक्त वेगळी.... अभिला दारूची चटक लागली. गंमत म्हणून खेळलेला जुगार , कसिनो, कार्ड्स तो सहज जिंकायचा.. मग काय अजून पैसे अजून दारू. सांभाळायची अक्कल नसतांना मिळालेला पैसा अधिकाधिक दुर्दैवाकडे फेकत जातो..अभि वाहावत गेला.

 एक दिवस जवळचे पैसे संपले म्हणून पैसे घ्यायला घरी परत आलेल्या अभिने त्याच्या जवळील लॅच की ने दार उघडले. घरांत कुणाचा तरी दबलेला आवाज त्याला ऐकू आला... म्हणून शोधाशोध करत असताना... त्याने चोपडे आणि त्याच्या मम्मीला नको त्या अवस्थेत पाहिले.
त्याच्या पायाखालची जमीन सरकली... आजवर मिळणाऱ्या पाच -पाचशेच्या नोटांचे अर्थ क्षणभरात त्याला कळले. हे सगळे पप्पांना कळू नये म्हणून पुन्हा नोटांवर नोटा त्याला मिळू लागल्या... त्याला स्वतःचीच किळस वाटू लागली... आणि तो अधिकाधिक व्यसनाच्या विळख्यात सापडला... अपेक्षेप्रमाणे दहावीला तो नापास झाला. कधीतरी वडिलांनाही चोपडे प्रकरण कळलं... आणि मग सुरू झाली धडपड एकमेकांना नामोहरम करण्याची. मम्मी त्याच्या पप्पांना डिव्होर्स द्यायला तयार नव्हती... आणि चोपडेला सोडणेही तिला मान्य नव्हते... फॅमिली कोर्टात केस उभी राहिली.. वडिलांनी आईवर व्यभिचाराचा आरोप केला होता.. तो खरा असला तरी त्याचे असे सार्वजनिक वाभाडे निघायला नको होते. तुफान पेपरबाजी झाली... ह्या आंबट बातमीला मसाला चोळून पुढे करण्यात आले... त्यात कधीतरी अभिने त्यांना रंगेहात पकडल्याचेही वडिलांनी पुढे केले... त्यालाही साक्षीला बोलवण्यात आले...

सतरा अठरा वर्षाच्या त्या पोराच्या मनाचे काय झाले असेल?? कुणीही विचार केला नाही. अभिच्या जगात तो टिंगलटवाळीचा विषय झाला होता... त्याची पाठ वळली की मुले "चोपडे कुठे आहे रे?"  असे ओरडायचे. एकदा तर एकाशी त्याची मारामारी झाली आणि तो मुलगा थेट म्हणाला..

"तुझ्या आईचे आधीचे बॉस पण घरी यायचे का रे?? तू तुझ्याच बापाचा आहेस ना?"

अभिने त्याला अर्धमेला होईपर्यंत तुडवला.. अखेर पोलिसांनी त्याला उचलून चार दिवस कोठडीत ठेवले. चार वर्षांनी डिव्होर्स झाला आणि आई वडिलांनी वाटा वेगळ्या झाल्या.. वडिलांनी दुसरे लग्न केले.. आईने तसेच राहायचे ठरवले... आणि अभिषेक बाटलीत बुडून गेला... विचारांच्या गर्तेत घर कधी आलं त्याला कळलंच नाही. घरात अंधार होता.. आजी म्हणाली,

"आपलेच लाईट गेले रे ! काही कळत नाहीये."

अभिने थोडी खटपट केली आणि दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघालं. त्याने आजीला प्रसन्न हास्य देत .. हातानेच थांबवलं 

"उशीर झालाय ना! आता काही करत बसू नकोस.. मी मस्त तुझ्या आवडीची पावभाजी आणतो." 

पिशवी घेत पायात चपला सरकवीत तो निघालाही. आजी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली... तिला अजूनही समुपदेशनाच्या वेळेचं त्याचं टाहो फोडून रडणं आठवत होतं..

"प्रत्येकासाठी आपली आई गंगा असते... पवित्र, सुंदर. तिची अशी गटारगंगा झाल्याचं पाहिलं आणि मी बाटलीत बुडत गेलो."

अभिषेकचे सुदैव म्हणायचे की त्याच्यासाठी मालती ताईंसारखी समुपदेशक होती, मार्गदर्शक होती.. पण सोन्यासारखं आयुष्य विस्कटलं .. त्याचं काय?

✒️ यशश्री रहाळकर

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा ४ :- काटेरी फुलांच्या वाटा


राघवचा पोलीस कोठडीतील आज दुसरा दिवस... आयुष्यात हातात बेड्या पडण्याची वेळ आपल्यावरही कधीतरी येईल... ह्याचा पापभिरू राघवने स्वप्नातही विचार केला नव्हता. बेदम माराने अंगाची रेषन् रेष ठणकत होती... नेमका कोणता अवयव सुजलाय हेही कळेनासं झालं होतं.... डोळा काळानिळा झालेला, पाठ हात-पाय बधिर झालेले... तहानेने कमी आणि भीतीने अधिक शोष पडलेला घसा... ग्लानीतच बिचारा झोपून गेला... दुसऱ्या दिवशी शनिवार म्हणजे अजून दोन दिवस तरी त्याला बेल मिळणार नव्हती. डोळे मिटताच त्याच्या डोळ्यांसमोर आयुष्यात पहिल्यांदा पैठणी नेसून सुरेख नटलेली आई आणि तिच्याच पैठणीला मॅचिंग कुर्ता घालून तयार झालेले बाबा उभे राहिले... काय काय स्वप्न असतील ना त्यांची? सुखी ,समाधानी ... आनंदाने उजळलेले त्यांचे चेहरे आठवले आणि राघव खाडकन जागा झाला... काय वाटत असेल त्यांना? कोणता नरक जिवंतपणी भोगत होते ते... आपणच ..आपणच ह्याला जबाबदार आहोत... क्षणभर त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार थयथयाट करून गेला... पुन्हा दुसऱ्या मनाने त्याला समजावले... आपला खरंच दोष आहे का? सुलक्षणाचं नेमकं काय झालं?? हे कळेपर्यंत मुक्ती नाहीच... त्याशिवाय सुटका शक्यच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तो रेडा सदृश्य हवालदार कोठडीत आला... त्याने ओढतच राघवला खुर्चीत बसवलं... कुणीतरी ऑफिसर आला असावा.. तो तुलनेने सभ्य होता... राघवला चहा दिला .. शांतपणे त्याच्याकडे पाहत पुन्हा तेच प्रश्न पण मवाळ सुरात विचारू लागला..

"हे बघा साहेब.. जंटलमन दिसता तुमी राव! एव्हढे शिकलेले हुश्शार... तुमचा त्रास आन आमची कटकट कायला वाढवता.. चटाचटा सांगून सोडा की .. काय केलंत त्या पोरीचं?? पोरीचा मॅटर हाय...लै डेंजर! "

राघव पुन्हा तेच सांगू लागला... कारण तेच सत्य होतं...

"सुलक्षणा कुठे गेली माहीत नाही. आम्ही सकाळी उठलो तर ती घरात नव्हती... तिने कसलीच चिठ्ठी, मेसेज, ई-मेल काहीही पाठवलेलं नाही... ती आत्ता कुठे आहे हे मला माहित नाही." 

साहेब वैतागला... इतका मार खाऊन सुद्धा ह्याचं उत्तर तेच ... रेडासदृश्य हवालदाराला खूण करून तो बाहेर पडला... हवालदाराने पुन्हा आपली काठी उगारत राघवच्या पार्श्वभागावर बडवणे सुरू केले. मार खातांनाही राघवला बालपणीची आठवण झाली.. त्याच्या आईने कधीही त्याला साधी चापटही मारली नव्हती... त्या मानाने धाकटे बंधुराज कृष्णाने बराच मार खाल्ला होता... कृष्णा तसा उपद्व्यापीच होता... शाळा , कॉलेजमध्ये देखील राघव पुस्तकी कीडा म्हणून ओळखला जात असे.. कुणाशी भांडणे , मारामारी तर दूरची गोष्ट साधे वाद घालणेही त्याला जमत नव्हते... आईवडिलांच्या कष्टाची त्याला पूर्ण जाण होती.. लवकरात लवकर पायावर उभे राहायचे आणि घरात हातभार लावायचा हीच सतत धडपड तो करत असायचा. पॉलिटेक्निक पूर्ण होताच.. त्याने मिळेल ती नोकरी धरली पुढे BE, MBA त्याने नोकरी करत करत पूर्ण केले. नवा 2 BHK फ्लॅट घेतला तेव्हा तर आईवडिलांना आभाळ ठेंगणे झाले... चाळीतल्या भाड्याच्या दोन खणी घरातून थेट हा प्रशस्त फ्लॅट म्हणजे त्यांच्या आयुष्याचे सार्थक होते. आयुष्यभर छोटेसे स्टेशनरी दुकान चालवणारे वडील आणि पडेल ती कष्टाची कामे करणारी आई... ह्यांच्यासाठी त्यांची दोन मुले राघव आणि कृष्णा सर्वस्व होते. हवालदाराची ड्युटी संपली असावी.. त्याने मारणे आवरते घेतले... नवा हवालदार आला तसे त्याने खुणेनेच "काय झालं?" असं विचारलं असता ..

"गेंड्याच्या कातडीचा निब्बार गडी हाय.. कालपासून बडवतोय.. पन उत्तर काही देत नाही..."

"काय रं बाबा! चांगल्या घरचा दिसतोय... बोल की पटापटा.." 
नवीन हवालदार म्हणाला..

दोघेही नकारार्थी मान डोलवत कोठडी बाहेर पडत तंबाखू मळू लागले.. अकरा वाजताच्या सुमारास राघवचे वडील डबा घेऊन आले ... पोलिसांच्या हातापाया पडून ..

"माझा पोरगा गरीब आहे साहेब.. सोडा त्याला आम्ही काही केलं नाही... त्याला जेवण तरी देऊ द्या म्हणून गयावया करू लागले..."

त्यांना शिव्यांची लाखोली मिळत होती... इकडे राघवच्या हृदयाचे पाणी पाणी झालं... सोमवारी खटपटी करून कृष्णाने बेलवर राघवला घरी आणलं... तेव्हा तो जेमतेम जिवंत होता.. तडक डॉक्टर गाठत उपचार सुरू झाले..
 कृष्णा भयंकर संतापला होता...
 
 "ही काय पद्धत आहे चौकशीची जिवानी जायचा एखादा.."

पंधरा दिवसांनी थोडा बरा होताच... राघवला कोर्ट गाठावं लागलं... रोज सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी द्यावी लागे.. त्याला शहराबाहेर पडण्यास मनाई होती. राघवची नोकरी गेली.. स्वप्नांचे घरकुल अखेर विकावे लागले... सारे होत्याचे नव्हते झाले... राघव ह्या साऱ्यात स्वतःला जबाबदार मानत होता तर त्याचे आईवडील आपलीच निवड चुकली म्हणत स्वतःला दोषी मानत होते.. हसत्या खेळत्या घरकुलात सगळे एकमेकांपासून डोळे चोरत होते.. प्रत्येक जण सुलक्षणाचा विषय काढायचे टाळत होते..मूळ समस्येपासून पळत होते... एकच व्यक्ती खंबीर तटस्थ मनाने ह्या साऱ्यात उभी राहिली.. ती म्हणजे राघवचा धाकटा भाऊ कृष्णा.. कृष्णाचे आपल्या दादावर विलक्षण प्रेम होते.. साधी माशी सुद्धा आयुष्यात मारली नाही तो आपला दादा ह्या प्रकरणात दोषी असूच शकत नाही ... आता हे प्रकरण उकरून काढण्याशिवाय पर्याय नाही हेही त्याने पक्के केले. घरात सगळ्यांना एकत्र बोलावून तो ठामपणे म्हणाला..

"दादा.. किती दिवस आपण हे असं जगायचं आहे?? ... आपला काहीही दोष नसतांना... आपण का भोगायचं??"

"नशीब फिरलं आपलं .."  म्हणत आईने पदर डोळ्यांना लावला.

"किती दिवस असं नशिबावर हवाला देऊन बसायचं??"

"हात दगडाखाली आहेत आपले... शांत राहा"
गरीब बिचारे बाबा काळजीपोटी कळवळून म्हणाले.

"मी ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे.. काय व्हायचे ते होऊ देत!.. तसंही आता याहून वाईट काय होणार म्हणा..."
कृष्णा तणतणत घराबाहेर पडला... कृष्णाची धडपड, त्याचं प्रेम आणि आत्मविश्वास ह्याने सगळेच भारावून गेले. राघव कृष्णाची वाट पाहत दारातच बसला होता.. तो येताच त्याने कडकडून आपल्या भावाला मिठी मारली.. आणि काळवेळ, वय,पुरुषी अहंकार सारे बाजूला ठेवत तो दोन महिन्यांनी पहिल्यांदा ढसाढसा रडू लागला... त्याला मोकळं..  शांत होऊ देत.. कृष्णाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला..

"मी आहे ना दादा! हे बघ आपला काहीच दोष नाहीये.. मात्र नेमकं काय झालं ह्याचा शोध घ्यायला हवा."

कृष्णा कागद पेन काढून बसला एकेका घटनेची संगती लावायला त्याने नोंद घेणे सुरू केले.. साधारण सहा महिन्यांपूर्वी सुलक्षणाच्या वडिलांनी रीतसर येऊन राघव आणि सुलक्षणाच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांना कुठल्याश्या मॅट्रीमनी साइटवर राघवचे प्रोफाईल मिळाले होते. ते बँकेत मॅनेजर..त्यांची आर्थिक स्थिती राघवच्या कुटुंबापेक्षा खूपच उजवी होती. सुलक्षणा त्यांची एकुलती एक लेक.दोघांच्या पत्रिका जुळल्या.. विशेष म्हणजे जातच नव्हे तर पोटजातही एकच असल्याने सुलक्षणाचे वडील खूप खुश होते.. ते अत्यंत कर्मठ म्हणावे असेच होते.पाहण्याचा कार्यक्रम झाला... आणि दोघांनीही पसंती दिली. राघवला सतत सुलक्षणाला कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत होतं. ह्यावर सुलक्षणाने लाजून "पूर्वजन्मी असेल" असे उत्तर दिले.. अत्यंत साधी राहणी , दागिन्यांची , मेकअपची फारशी आवड नाही.. अशी घरगुती वळणाची सुलक्षणा राघवच्या घरी सगळ्यांनाच पसंत पडली. लगेचच महिनाभरात सुलक्षणाच्या वडिलांच्या घरी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. आपली एकच लेक असल्याने लग्नाचा खर्च सुद्धा आपणच करणार असे ते म्हणाले.. त्यानंतर तीन महिन्यांनी लग्न होतं.. ह्या दरम्यान अनेकदा राघव आणि सुलक्षणा भेटत होते, फिरायला जात होते.

भवताली सगळे फोटो मांडत नीट निरीक्षण करत अचानक कृष्णाने विचारलं..

"तुमच्या ह्या भेटी दरम्यान तुला काही खटकलं का दादा? म्हणजे काहीही अगदी लहानशी गोष्ट असू शकेल बघ आठवून.."

राघव म्हणाला..
"तसं काही खास नाही पण मी तिला पूर्वी कुठेतरी पाहिलंय हे असं सतत मला वाटायचं.. आणि  आणि तिचं वागणं खूप दडपण असताना असतं ना तसं असायचं बरेचदा!"

"लग्नात तर किती खुश दिसत होती... अज्जिबात काही वाटलं नाही " आई म्हणाली.

"लग्नानंतर तुमचे काही वाद??" कृष्णाने विचारताच.. दोघांनी नकारार्थी मान डोलावली.

"लग्नानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे गोंधळ होता.. नंतर आम्ही त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो.. तिच्या माहेरी सुद्धा पूजा होती आपण सगळेच गेलो होतो की... ह्या सगळ्यात ती आनंदाने सामील झाली.. जराही शंका आली नाही....  की दुसऱ्या दिवशी सकाळी सुलक्षणा घरात नसेल." 

"तिला काही झालं तर नसेल की जीव दिला असेल की कुणी पळवून नेलं असेल... माझ्या तर डोक्याचा भुगा झालाय.." म्हणत राघव डोकं धरून बसला.

"त्यानंतर चार दिवसांनी तुम्ही दोघे उटीला जाणार होता .. बरोबर.. म्हणजे जे काही झालंय ते ह्या चार दिवसांत..."

अचानकपणे उभा राहत राघवचे दोन्ही खांदे हलवत कृष्णा म्हणाला... 
"ह्या चार दिवसांत ... रात्री काय झालं दादा? मला माहिती आहे हे खूप खाजगी आहे पण हे विचारण्याशिवाय पर्याय नाही."

थोडं संकोचत राघव म्हणाला.. 
"तिने तिचे पिरियड्स असल्याचे सांगितले.. मग काय काहीच नाही! तशी ती खूपच लाजाळू होती.. लग्नाआधीच्या आमच्या भेटीतही ती अंतर राखूनच वागायची. मला वाटले उटीला गेल्यावर जरा मोकळी होईल."

लग्नानंतर पाचव्याच दिवशी सकाळी नववधू सासरहून गायब होते.. तिचा कुठेच ठावठिकाणा लागत नाही.. ती परत येत नाही, कोणताच संपर्क करत नाही.. फोन सुद्धा घरीच ठेऊन जाते... मोठे अजब होते सगळे... सगळीकडे शोध घेऊन, सगळ्या नातेवाईकांना कळवून झाले पण सुलक्षणा काही सापडली नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदवली... त्यात हुंड्याची मागणी, शारीरिक मानसिक छळ असे काय काय जोडले.. त्यांना त्यांची लेक परत हवी होती आणि ती नेमकी कुठे आहे हे राघवच्या घरच्यांना माहीत नव्हते. मोठाच गंभीर प्रश्न होता.

अचानक वडिलांना काहीतरी आठवले... 
"सुलक्षणा गेली त्या दिवशी काय गाढ झोप लागली होती... काळझोपच म्हणायचे.. एरव्ही माझी झोप तशी सावध असते..."

कृष्णाच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली..आदल्या दिवशी रात्री खीर करून सुलक्षणाने आग्रहाने सगळ्यांना खाऊ घातली होती..तिने स्वतः मात्र खीर आवडत नाही,  सांगून खाणे टाळले. कृष्णा आणि राघवला खात्रीच पटली... काहीतरी गडबड नक्कीच आहे.... आठवडाभर जंग जंग पछाडत तिचा भूतकाळ त्यांनी उकरून काढला. राघवला एका सकाळी सुलक्षणाला आपल्याच ऑफिसच्या शेजारच्या एका ब्रँच मध्ये पाहिल्याचं खात्रीने आठवलं... मग तिथूनही शोध सुरू झाला.. त्यांच्या साऱ्या खटपटीला यश आलं... मात्र हाती लागलेलं सत्य भयंकर कल्पनातीत होतं.

सुलक्षणा गोव्याला मिसेस सॅली जोनाथन फ्लोरेन्स ह्या नावाने राहत होती. जोनाथन हा तिचा प्रियकर सहा वर्षांपासून त्यांचे अफेअर सुरू होते.. मात्र लग्नाचा विषय काढताच.. सुलक्षणाचे वडील तडकून उठले त्यांनी तिला जातीतच लग्न करण्याची अट घातली .. नाहीतर जीव देण्याची धमकीही दिली... त्याच वेळी मॅट्रीमनी साईटवर तिला राघवचे प्रोफाईल दिसले.. हा माणूस तिच्याच ऑफिसच्या शेजारी काम करायचा.. तिने महिनाभर त्याचे निरीक्षण केले... साधा सरळ आणि सहज वेड्यात काढता येईल असा राघव आपला बकरा आहे हे तिने निश्चित केलं. वडिलांना मुद्दाम ह्या स्थळाची लिंक पाठवली.. आणि पुढचा सगळा जमाव जुळून आणला... त्यांच्या लग्नाचा विषय काढण्यापूर्वीच तिने जोनाथनशी कोर्ट मॅरेज केलेले होते. हे सारे दडवून साळसूदपणे घरातल्या मंडळींना खिरीतून झोपेचे औषध देऊन तिने घरातून पोबारा केला. राघव सारखा नेभळट मुलगा आपला शोध घेऊच शकणार नाही असेच तिला वाटत होते... तिचा बाण वर्मी लागला.. लग्नानंतर पाचव्या दिवशी घरातून गायब झाल्याचे खापर वडिलांनी राघववर फोडले आणि त्याच्या मागे ते हात धुवून लागले... ह्या साऱ्यात आपल्या लेकीचा काही दोष असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नाही.

राघव सगळ्याच बाजूंनी उध्वस्त झाला.. त्याचं झालेलं लग्न कायदेशीर नव्हतंच.. तरीही बीजवर झाल्याचा डाग लागला... शिवाय बायको पळून गेली, केस झाली , मानहानी, मनःस्ताप, पोलिसांकडून मारहाण, नोकरी मिळाली पण पत गेली... हे सारं सारं त्याला भोगाव लागलं. ह्यात त्याचा दोष काय होता?? नशीब म्हणायचं आणि सोडून द्यायचं. आयुष्यातील काही वाटा प्रथमदर्शनी  फुलांच्या दिसत असल्या तरी ती फुले काट्यांची असू शकतात.
✒️ यशश्री रहाळकर

"पुरुषस्पंदन" कथा३ :- आकर्षण

"सोळावं वरीस धोक्याचं ग!" ही प्रसिद्ध मराठी लावणी षोडश वर्षातल्या निसरड्या वाटांवर सहज भाष्य करते. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या नवतरुणीला हे वेडं वय मोहात पाडतं .. भलतीच चूक नकळत घडू शकते... म्हणूनच हे वर्ष धोक्याचं सूचक. हेच गाणं एखाद्याच्या लग्नाला सोळा वर्षे होऊन गेली आहेत तर लागू होऊ शकेल काय?? आता तुम्ही म्हणाल पुरुष जात्याचं अनेक स्त्रियांमध्ये रस घेणारा असतो... त्यात प्रौढ वयात एखादीचे आकर्षण वाटले तर नवल ते काय? मात्र ह्या कथेत हेच तर अचंबित करणारं वेगळेपण आहे... लग्नाच्या सोळा वर्षांनी स्वतःचा सुखी संसार लाथाडून निघून गेलेल्या एका मध्यमवयीन स्त्रीची ही कथा. वयस्कर माणसे बोलताना, "कलियुगाचा महिमा बाबा! काय दाखवेल सांगता यायचं नाही." असं सतत म्हणतात .. त्याचा अश्या प्रसंगी प्रत्यय आल्याविना राहत नाही.


रुपाली नाव 100% शोभून दिसेल इतकी देखणी. रंग केतकी मधाच्या रंगाचे डोळे, इवलीशी नाजूक चण आणि सोनेरी लांब केस... देवानी भरपूर वेळ घेऊन घडवले असावे असं आरस्पानी रूप. मात्र हे माप पदरात घेता घेता आर्थिक बाजूचे गणित नशीबाने हुकलेले. वडील जेमतेम कमवत त्यातही कंपनी बंद पडली आणि नोकरी गेली. चार घरी पोळ्या करून आईने तिला वाढवलं. ग्रॅज्युवेट होताच मिळेल ती नोकरी धरली... पाठ मान मोडून खर्डेघाशी करावी लागे.. सगळीकडे रूपाची जादू चालत नाही. ... पण कधीतरी नशीब भरभरून कृपा करतं. तिची आई पोळ्या करायला जायची त्यांचीच मैत्रीण रूपाच्या लग्नासाठी विचारपूस करू लागली. जहागिरदारांच्या गडगंज श्रीमंत एकुलत्या एक मुलासाठी त्यांनी रुपालीला मागणी घातली. पैश्याला मुळीच कमी नव्हती, मुलगा श्रीकांत जहागीरदार गोरापान देखणा होता.. आपला वडिलोपार्जितील केटरिंग, मंगल कार्यालय वगैरे व्यवसायांचा व्याप तो उत्तम सांभाळत होता. तीन मजली प्रशस्त घरात फार माणसेही नाहीत.. फक्त आई आणि तो. बहीणींची योग्य वयात सुस्थळी रवानगी झाली होती. नाही म्हणायला एक उणीव होती.. श्रीकांत जेमतेम मॅट्रिक पास होता ... त्याचे वडील गेल्यानंतर व्यवसायाचा व्याप सांभाळून शिक्षण पूर्ण करणे त्याला जमलेच नव्हते.. एव्हढ्या एकाच कारणामुळे ...अनेक उपवर मुलींनी नन्नाचा पाढा वाचला होता. शिवाय व्यवसायाचा व्याप असल्याने घरी राहून सगळे नीट सांभाळणारी मुलगी त्याला हवी होती. रुपालीच्या घरच्या मंडळींपुढे त्याने स्पष्ट शब्दांत आपले  मत मांडले. लग्नाचा खर्च तो स्वतः करणार होता शिवाय मुलीच्या आईवडिलांचा आधार देईन हेही त्याने खात्रीपूर्वक सांगितले.... रुपालीच्या मनात काय होते कोण जाणे? मात्र प्राप्त परिस्थिती पाहता तिने होकार दिला.


मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला.... रुपालीची "सौ. राजश्री श्रीकांत जहागीरदार"  झाली. आपण दिलेल्या शब्दाला जागून श्रीकांतने तिसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांचे घर रुपालीच्या आईवडिलांना सन्मानाने दिले... जशी आपली आई तसेच पत्नीचेही आईवडील आपलेच हे सूत्र श्रीकांतने मनापासून जपलं... त्यांच्या अडल्या नडल्या वेळी मदत केली, वडिलांना ओळखीने काम मिळवून दिले. रुपाली आता खऱ्या अर्थाने "राजश्री" झाली होती... भारीच्या साड्या, दागदागिने ह्यांची बरसात तिच्यावर होत होती. सासू नणंदा ह्यांची तर ती प्रचंड लाडकी होती.तिच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होई अगदी रांगोळी काढण्यापासून ते स्वयंपाकपर्यंत. त्रयस्थाने पाहता क्षणी दृष्ट लागावी असा सुखाचा संसार सुरू होता. वर्षभरात पहिली लेक "ऐश्वर्या" जन्मली... सहा वर्षांनी तिच्या पाठीवर दुसरीही लेकचं.. "सौंदर्या" जन्मली. खरंतर श्रीकांत जरासा उदासच झाला होता... त्याला त्याची संपत्ती आणि व्यवसायाला मुलगा वारस हवा होता.. पण ह्यात लेकीचा काय दोष? त्याने मोठ्या थाटामाटात तिचं बारसं केलं... दोन्ही लेकी शहरातल्या टॉपच्या शाळेत शिक्षण घेत होत्या...  आई वडिलांच्या सौंदर्याचा वारसा घेऊन जन्मलेल्या दोघी लेकी काकणभर अधिकच देखण्या होत्या. मोठी ऐश्वर्या वयात आली असल्याने अधिकच सुरेख नक्षत्रासारखी दिसत होती. दोघी लेकींवर श्रीकांतचे खूप प्रेम होते... आपल्या ह्या देखण्या, हुशार लेकी पाहिल्या की त्याचं बापाचं हृदय गलबलून जाई...


"आपल्या बाबतीत झालं तसं लेकीच्या बाबतीत होता कामा नये, त्यांना हवे ते शिक्षण हवी तेव्हढी वर्षे घेऊ देत  .. त्यानंतरच मी त्यांचं एखाद्या राजकुमाराशी लग्न लावून देईन"


श्रीकांत स्वतःलाच पटवून द्यायचा... शेवटी लेक कितीही म्हटली तरी परक्याचं धन. घरी प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र कार...लेकींनाही शाळेत क्लासला सोडायला स्वतंत्र कार आणि ड्रायव्हर. सुखात सुखात म्हणता म्हणता सोळा वर्षे संसार झाला... आणि काय झालं कोण जाणे?? एकंदर श्रीकांतचे ग्रहच फिरले.... म्हणायचे.


राजश्री विनाकारण तणतणत असायची, मुलींशी नीट बोलायची नाही,  सतत काहींना काही कुरबुरी काढून भांडत बसायची.. कधी श्रीकांतशी तर कधी त्याच्या बिचाऱ्या म्हाताऱ्या आईशी.... घरातलं वातावरण पार ढवळून निघालं होतं. एकतर श्रीकांतवरचा कामाचा वाढलेला व्याप त्याच्याकडून आवरता आवरता दिवस संपून जायचा त्यात राजश्रीची सतत फणफण असायची.अनेकदा त्याला वाटायचं आपण हिला वेळ देत नाही म्हणून असेल किंवा तिच्याही काही गरजा असतील , इच्छा असतील ज्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याने अनेकदा स्पष्टपणे राजश्रीशी बोलण्याचा प्रयत्न केला... तिला नेमकं काय झालंय हेही ती सांगेना. एकदिवस अश्याच क्षुल्लक विषयावर भांडण उकरून काढले आणि ते इतके वाढले की राजश्री बॅग भरून घराबाहेर पडली... जातांना .."डोकं शांत झाल्यावर परत येईन", असे सासूला सांगून गेली. तिच्या आईने ती पुण्याच्या मावशीकडे गेल्याच सांगितलं... चार सहा दिवसांनी काहीच जणू घडलंच नाही असा आव आणत राजश्री परत आली. पुन्हा रोजचा दिनक्रम सुरळीत सुरू झाला.हळूहळू ह्याच प्रकाराची वारंवार पुनरावृत्ती होऊ लागली. कधी दोन तीन महिन्यांनी तर पुढे पुढे दर महिन्याला राजश्री पुण्याला जाई.. चार आठ दिवसांत परत येई. तिची मावशी तिथे रहायची.. मावशीच्या दोन लेकीही पुण्यातच होत्या... त्यामुळे राजश्री तिथं रमत असावी असा समज सगळ्यांनी सोईस्करपणे करून घेतला.


"तिथून आल्यावर ती शांत खुश असते ना ! झालं तर मग..."


असे आईला सांगून श्रीकांत आपल्या व्यापात लागला.मात्र श्रीकांतच्या आईच्या नजरेतून राजश्री मधील सूक्ष्म बदल सुटले नाहीत. तिने आपल्या बारीक अनुभवी नजरेने राजश्रीवर लक्ष द्यायला सुरुवात केली. एखाद्या नवथर तरुणीप्रमाणे ती हल्ली तासन तास फोनवर गप्पा मारत असते... "कुणाचा फोन ?" विचारले तर "मैत्रिणीचा" ...असे मोघम उत्तर देते. काहीतरी नक्कीच आहे ... त्यांचा संशय बळावत गेला. आपला संशय त्यांनी वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत जावेजवळ बोलून दाखवला. ह्या जाउबाई आणि त्यांचे कुटुंब कोकणातून आश्रयाला आलेले... दोन्ही मुले कष्टीक होती त्यांना श्रीकांतच्या वडिलांनी बरीच मदत केली होती. त्या दोघांची लग्ने सुद्धा त्यांनीच लावून दिली होती ... दोघांना चांगली कर्ती मुले होती .. मोठ्याचा मुलगा हैद्राबादला बँकेत लागला ,दुसरा बारावीला होता... तर धाकट्याचा मुलगा इंजिनिअर होऊन पुण्यात कंपनीत कामाला होता.. श्रीकांतच्या आईचे विचार जाऊबाईंना मुळीच पटले नाही .. त्यांच्या दृष्टीने राजश्री अगदी सोज्वळ स्त्री आणि आदर्श सून होती...


"माझ्या दोन्ही नातवंडांच्या लग्नाचं पाहतेय.. अगदी तुमच्या राजश्री सारख्याच नातसुना मिळायला हव्या हो!"


जाऊबाईंनी मांडलेल्या विचाराने श्रीकांतच्या आईचे मन थोडे स्थिर झाले. नेमका पुढच्याच महिन्यात एका नात्यातल्या लग्न समारंभात पुण्याला जाण्याचा योग आला... ह्या वेळी त्या मिठाई, भेटवस्तू वगैरे घेऊन आवर्जून राजश्रीच्या मावशीकडे भेटीला गेल्या. सहज बोलता बोलता विषय काढला असता,


"राजश्रीची गेल्या कित्येक वर्षांत भेटच नाही .."


असे मावशी बोलून गेल्या. श्रीकांतच्या आईचा अंदाज खरा ठरला.. घरी आल्यावर सगळा प्रकार त्यांनी श्रीकांतच्या कानावर घातला... राजश्रीला जाब विचारणार तर चोराच्या उलट्या बोंबा.. आक्रस्ताळेपणाने तिने भांडण सुरू केले..


"जाते मी माझ्या मैत्रिणीकडे .. काय चुकलं त्यात.. तुमच्याकडे तर माझ्यासाठी वेळच नसतो मी माझी एन्जॉय करतेय त्याचाही तुमच्या आईला त्रास होतोय.. माझं सुख डोळ्यात खुपतयं..."


शब्दाने शब्द वाढत गेला आणि मोठा तमाशा झाला दोन्ही लेकी भेदरलेल्या कोकरागत बघत होत्या. पुढे दोन महिने राजश्रीला पुण्याला जाण्याचे धारिष्ट्य झाले नाही... दिवाळी आली... सगळे घर पाहुणे नातेवाईक ह्यांनी भरून गेले... सुट्टीच्या निमित्ताने वरच्या चुलत घरचे दोघे नातूही आले होते... आता त्यांच्यासाठी मुली बघायला सुरुवात करायची होती. सगळ्या चुलत पुतण्यांचे, नणंदेच्या मुलांचे राजश्रीशी भलतेच मेतकूट होते. सुट्टीत त्यांच्यासोबत पत्ते खेळणे, कॅरम खेळणे ह्यात ती रमून जाई... वरचा चुलत पुतण्या स्वप्नीलशी तिचे अधिकच गहिरे नाते होते... तसा त्यात आक्षेप वाटावा असेही काही नव्हते. स्वप्नील तिच्याहून दहा वर्षे लहान होता ... शिवाय काकू पुतण्याचं नातं म्हणजे आईमुलागतच तर असतं.दिवाळी आनंदात पार पडली... एक दिवस स्वप्नील आपली काकू राजश्रीला केक बनवायला शिकवत होता... त्याला निरनिराळ्या रेसिपीज उत्तम येत असत... ह्या वेळी श्रीकांतच्या आईला त्या दोघांची जवळीक आणि लगट आक्षेपार्ह वाटली... आता तिने अधिकच तीव्रतेने डोळ्यांत तेल घालून राजश्रीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली..आणि एक दिवस होत्याचं नव्हतं झालं.


तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या राजश्रीच्या आईच्या घराची डुप्लिकेट किल्ली तिच्याकडेच असायची... दोघेही कामाला बाहेर पडल्यावर... राजश्री तिथे गेली आणि थोड्या वेळाने स्वप्नीलही गेला ... श्रीकांतच्या आईने दाराला गुपचूप बाहेरून कडी घालत ... सगळं घर गोळा केलं... कडी उघडून दोघांना राजरोस रंगेहात पकडलं. दोन वर्षांपूर्वी पुण्याला एका नात्यातल्या लग्नाच्या निमित्ताने स्वप्नीलच्या फ्लॅटवर उतरलेल्या राजश्री आणि स्वप्नीलच्या नात्याने सगळ्या सीमा पार केल्या होत्या... राजश्री सतत पुण्याला जाऊन स्वप्नीललाच भेटत होती. राजश्री आणि श्रीकांतच्या लग्नाच्या वेळी 14/15 वर्षांचा असणारा स्वप्नील  ...राजश्रीला पाहता क्षणीच वेडा झाला होता... कसेही करून हिला मिळवायचीच हा ध्यास त्याने घेतला होता... सतत तिच्या रूपाची स्तुती करत तिच्याभवती पिंगा घालत त्याने आपला हेतू उघडपणे व्यक्त केला होता.. मात्र ह्या साऱ्यात नवल हेच की राजश्रीचा पाय का घसरावा? ह्या वेळी तिला आपल्या वयात आलेल्या मुलीचा, संसाराचा, तिच्या आणि स्वप्नीलच्या नात्याचा विसर पडला होता.


इतके सगळे महाभारत घडूनही श्रीकांतने आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार करता राजश्री समोर ... झालं गेलं विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र म्हणतात ना .. "कामातूराणां भयं न लज्जा।" गळ्यातील मंगळसूत्र श्रीकांतवर भिरकावत , भरल्या घरातून , सुखाचे माप लाथाडून राजश्री स्वप्नीलचा हात धरून चालती झाली.. पुढे अनेक वर्षे डिव्होर्स केस आणि कोर्टाच्या हेलपाट्यांत गेली... मुलींना विचारले असता त्यांनी वडिलांकडे राहण्याचे ठरवले... आयुष्यभरासाठी त्या दोन अश्राप लेकींवर ,"पळून गेलेल्या आईच्या मुली" हा  कधीही पुसता न येणारा ठप्पा बसला. आपल्या कष्टाने व्यवसायात भरभराट करणारा श्रीकांत जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा उरला नाही... आपल्या लेकींसाठी राजकुमाराची स्वप्ने पाहणारा बाप आता किमान सभ्य ठिकाणी आपल्या मुलींना पदरात घेतील का ? ह्या  विवंचनेत असतो.


काय दोष होता त्याचा?? तो जाईल तिथं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे लोकांच्या टिंगल टवाळीचा विषय झाला...


"अरे हाच तो! ह्याचीच बायको पुतण्याचा हात धरून पळून गेली."


✒️ यशश्री रहाळकर


मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

"पुरुषस्पंदन" कथा २ :- नाकर्ता


अश्विन आणि आशाचं लग्न बरंच उशिरा झालं. आशा 32 वर्षे पूर्ण तर अश्विनने पस्तिशी गाठली होती. आशा समाजशास्त्र विषयाची प्राध्यापिका ... बरीच वर्षे नॉन ग्रँट वर अक्षरशः विनावेतन काम केल्यावर तिच्या कॉलेजला ग्रँट मिळाली. मग मात्र तिची बॅक डेटेड अपॉइंटमेंट दाखवून सगळा पगार घसघशीतपणे हातात पडला. आता तिने Ph.D. साठीही प्रयत्न सुरू केले होते. तिच्या जातीच्या मानानं तिचं वय आणि शिक्षण दोन्हीही खूपच जास्त झालं होतं. त्यात आशाच्या मोठ्या दोघी बहिणींच्या गडगंज सासरी त्यांचे नवरे नित्यनेमाने दारू पिऊन मारहाण करायचे. ह्या साऱ्याची घृणा वाटून आशाने निर्व्यसनीच मुलगा असावा एव्हढीच एकमेव अट घातली... तो काही मिळेना. त्यात ही प्राध्यापिका म्हणजे कायम तिच्याच शहरात राहण्याची तयारी हवी... तेही शक्य होईना. दुसरीकडे अश्विन घरातला सगळ्यांत मोठा ... वडिलांच्या माघारी पाठच्या तीन बहिणींचे सुस्थळी विवाह करून मुक्त होईतो आईने राम म्हटले. तसा एकटाच उरलेला अश्विन निर्व्यसनी होता आणि ऍडजेस्टमेंट करणे ... त्याचा सहज स्वभाव होता. एका मध्यस्थाने पुढाकार घेतला दोघांची गाठ घालून दिली... आवश्यक ती बोलणी झाली आणि साध्या पद्धतीने लग्न पार पडले.

लग्नाच्या आधीच अश्विनने स्पष्टपणे आपल्या परिस्थितीची कल्पना आशाला दिली होती. अश्विन एका शिक्षण संस्थेत क्लार्क होता.. शिक्षणही जेमतेमच.. पगार पंधरा हजार. आईवडिलांचे होते नव्हते सारे बहिणींच्या लग्नात संपून गेले होते. ह्याउलट आशा प्राध्यापिका होती, महत्वाकांक्षी होती तिला प्रगती करत पुढे जायचं होतं, तिचा पगार लग्नाचे वेळी चाळीस हजारांच्या आसपास होता. पगाराची दरी सोडली तर दोघांनाही जोडीदाराची गरज होती आणि दोघेही सामंजस्याने संसार करत होते. फक्त आशा वाशीमला तर अश्विन यवतमाळला... नव्या नवलाईच्या दिवसांत सतत होणाऱ्या भेटीगाठी हळूहळू कमी होऊ लागल्या. प्रवासाचा कंटाळा येऊ लागला... सतत एकमेकांसोबत राहून , सुखदुःख वाटावेत , गप्पा माराव्यात अशी ओढ दिवसेंदिवस तीव्र होऊ लागली. त्यातच आशाला एकदा खूप ताप भरला... टायफॉईड असावा पण अंगावर काढल्याने दुखणं चांगलंच वाढलं. शनिवारी रात्री उशिरा नेहमीसारखा अश्विन घरी आला तर आशा तापाने ग्लानीत अर्धमेली होऊन तळमळत होती. तिला हॉस्पिटलाईज करावे लागले...पुढचे पंधरा दिवस अतिशय  कठीण होते . आशा अगदी देवाच्या दारातून परतली. अश्विनने खूप प्रेमाने तिची तब्येत अगदी नीट होईपर्यंत सारं सांभाळलं. मुळात एकटा राहत असल्याने नीटनेटकेपणा, स्वयंपाक, घर व्यवस्थित ठेवणे सारेच तो उत्तम करायचा. तो असेपर्यंत आशा निर्धास्त होती , मात्र तो जायला निघालो तसे तिने एकवटलेला सगळं धीर सुटला... 

"मला एकटीला रहायचं नाही .. अश्विन जाऊ नका ."
असे म्हणत ती रडायला लागली. अश्विनची पाऊलही जड झाली... त्यालाही आशाला सोडून जावे वाटत नव्हते पण सुट्टी तरी किती मिळणार ?? अखेर दोघेही परस्पर सामंजस्याने ह्या निर्णयावर आले की ,

"आता येथून पुढे आपण एकत्र जगायचे ... नाहीतर सगळे आयुष्य एकट्याने सरले की हाती काहीच उरणार नाही."

आशाची नोकरी स्थिर , पगार उत्तम. .... अश्विनने नोकरी सोडली आणि तो कायमचा आशा सोबत वाशीमला स्थायिक झाले. सुरुवातीला तिथेच मिळेल अश्या लहान मोठ्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण चाळीशीत कोण जॉब देणार? शेवटी त्याने घर सांभाळायचे ठरवले. लोकांनी यथेच्छ टिंगल केली... 

"हाऊस वाईफ सारखा हा हाऊस हजबंड आहे .."

इथपासून तर ..

"आशा मॅडमचा घरगडी ..!"

इथपर्यंत टोमणे त्याने शांतपणे पचवले. बाहेर जग काहीही म्हणो... आशा आणि अश्विनचा संसार दुधात साखर विरघळून जावी असाच होता... फक्त इतर उदाहरणात ही साखर स्त्री असते.. इथे मात्र ती भूमिका अश्विनच्या वाट्याला आली आणि त्यानेही ती उत्तम निभावली. आर्या आणि अनिषच्या जन्माने त्यांचा संसार दोनाचा चार झाला. आशाची डॉक्टरेट पूर्ण झाली... तिची काही पुस्तके, संशोधने प्रकाशीत झाली... उत्तम वक्ता म्हणून तिचं नाव झालं आणि ठिकठिकाणी आवर्जून तिला आमंत्रण दिलं जाऊ लागलं. कधी कुठली अभ्यास परीषद, कुठली कॉन्फरन्स , कुठले मंडळ, चर्चासत्र ... आशा वक्ता म्हणून जायची आणि अक्षरशः व्यासपीठ गाजवायची. आशा तिच्या संसारात समाधानी, तृप्त होती. त्यांचं छान टुमदार घर आणि उबदार घरकुल होतं. तिच्या साऱ्याच कर्तृत्वात अश्विनचा मोठा वाटा होता आणि हे ती प्रांजळपणे कबूलही करत असे. 

मुलांना अगदी तान्हे असल्यापासून अश्विननेच सांभाळले होते.. पुरुष असल्याने आई होऊ शकला नाही इतकेच पण आईच्या म्हणून असणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यानेच पार पाडल्या होत्या. आपल्या दोन्ही मुलांवर त्याची विलक्षण माया होती... स्वतःचे बाहेरचे जग नसल्याने त्याचं घर आणि कुटुंब हेच त्याचं संपूर्ण जग होतं. सकाळी मुलांना उठवणे, तयार करणे, शाळेत सोडणे, class ला नेणे आणणे, अभ्यास घेणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करणे... एव्हढेच नाही तर त्यांची दुखणी, आजारपणे काळजी घेऊन, रात्री जागून त्यानेच पार पाडली होती. आशा असतांना किचनचा भार त्याच्यावर फारसा पडत नव्हता पण आशा बाहेरगावी असली की किचनही तो उत्तम सांभाळायचा. कधी कामाची बाई आली नाही तर सिंक मध्ये खरकटी भांडी आशाची वाट पाहत पडलेली नसत ... कधीच अश्विनने ती घासून ठेवलेली असायची... त्यातही त्याला लाज , कमीपणा कधीच वाटला नाही. सकाळी उठून आवरून नाश्ता करून अश्विन सार्वजनिक वाचनालयात जायचा... तिथे तासभर बसून वाचन आणि पुस्तके बदलून आणणे .. ही कामे होत. तेव्हढाच त्याचा हक्काचा एक तास बाकी सगळा वेळ फक्त कुटुंबाचा. आशा आणि त्याच्यामध्ये  पुरुषी अहंकाराची दरी नव्हती आणि मी कमवती हा अभिमानाचा डोलाराही नव्हता. घरात येणारा पैसा कुणीही कमावला तरी तो सगळ्या कुटुंबाचाच आहे अशीच दोघांचीही भावना होती. आशाने तर सर्व आर्थिक व्यवहार अश्विनवर सोपवले होते... ते CA शी बोलणं, पैसे invest करणं, इन्शुरन्स, टॅक्स सगळं सगळं तिला भलतंच कटकटीचं वाटायचं. अश्विन हे सगळं जबाबदारीने पार पडायचाच आणि एक पै देखील उधळणार नाही हा दृढ विश्वास तर होताच.

हळूहळू आजूबाजूच्या लोकांसाठी ह्या जोडप्याचा विषय शिळा झाला. काळाच्या ओघात अशी तुरळक जोडपीही दिसू लागली... बायकोचं कमावणं नवऱ्याचं घर सांभाळणं ह्या विषयातलं नाविण्य संपलं. आयुष्य कुणासाठी थांबत नाही... आशा आणि अश्विनची लेक आर्या 18 वर्षांची झाली... बारावी तिने उत्तम मार्कांनी पास केलं पण एन्ट्रन्स एक्सामला स्कोर घसरला... मनाजोगं कॉलेज काही मिळेना... त्यामुळे नैराश्याने ह्या वयातल्या मुलांची होते तशीच तिचीही चिडचिड होऊ लागली... ह्या फुलपंखी वयात सारे मनाजोगे व्हायला हवे असते. त्यात आर्या म्हणजे लाडोबा.. अश्विनने तिला एखाद्या राजकुमारी सारखे वाढवलेले... जात्याचं बापाची लेकीवर अधिक माया आणि त्यात अश्विनसाठी आर्या म्हणजे जीव की प्राण. तिला ह्याहून उत्तम स्कोर नक्कीच मिळेल अशी खात्री आपल्या लेकीबद्दल त्याला होती म्हणूनच तो आर्याला पुन्हा एन्ट्रान्स एक्साम देण्याविषयी सतत समजावून सांगत होता...

"हे बघ पिल्लू.. तुला नक्कीच याहून चांगला स्कोर मिळेल.. तू एक वर्ष गॅप घे आणि झोकून देऊन प्रयत्न कर...खूप अभ्यास कर. मला खात्री आहे तुझा गव्हर्नमेंट कोट्यातून नंबर नक्की लागेल."

"पप्पा.. आयुष्यातलं एक वर्ष ... वर्ष किती मोठं असतं माहिती आहे?? वाया जाईल पप्पा.. आणि नाहीच मिळाला स्कोर चांगला तर...?"

"तू असा negative विचार का करतेस?? पिल्लू नक्की मिळेल तुला उत्तम स्कोर.. मला पूर्ण विश्वास आहे."

एकमेकांच्या विरोधाचे सूर लागले आणि संभाषणाला धार चढत गेली... आर्याच्या मते, तिच्या इतर मैत्रिणींसारखी भरमसाठ डोनेशन्स भरून तिला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन द्यावी तर अश्विनच्या मते, तिने एक वर्ष गॅप घेऊन पुन्हा प्रयत्न करावेत आणि गव्हर्नमेंट कोट्यातून प्रवेश घ्यावा. प्रकरण हातघाईवर आले.. बाप लेकीचं हे वाद अखेर आईच्या कोर्टात गेले...

"आई माझ्यासाठी तुझ्याकडे पैसेच नाही आहेत का? सगळं डबोलं तुझ्या लाडक्या अनिषसाठीच ठेवणार का?"

"आर्या काय बोलतेस तू.. पिल्लू आईशी नीट बोल.." अश्विनने दरडावले.

"हे बघ आई मी स्पष्टच सांगतेय माझ्या सगळ्या मैत्रिणी रग्गड डोनेशन भरून ऍडमिशन घेताहेत त्यांच्या ड्रीम कॉलेजला.. मलाही ऍडमिशन हवीय.. शिकेन तर त्याच कॉलेजला..."

तिचे बोलणे मध्येच तोडत अश्विन म्हणाला..

"पिल्लू तू त्याच कॉलेजला घे ऍडमिशन .. फक्त त्यासाठी थोडी मेहनत घे, मेहनतीने मिळवलेल्या गोष्टीतील आनंदच वेगळा असतो..."

"पप्पा मेहनती बद्दल तू बोलतोयस?? तू तर ह्या विषयावर बोलूच नकोस... आई मी तुला विचारतेय तुझ्याकडे माझ्यासाठी पैसे आहेत की नाहीत??"

आर्याने इतके तोडून बोलल्यावर, अपमान केल्यावरही अश्विन त्याकडे दुर्लक्ष करत  होता.. त्याला फक्त आपल्या लेकीचं भलं व्हावं वाटत होतं.. आर्याने कोणतेही शॉर्टकट्स वापरू नयेत. तिने मेहनत करावी आणि यश मिळवावं.. अशी प्रत्येक बापाची असते तशीच आणि तेव्हढीच अपेक्षा होती त्याची. आपला मुद्दा रेटत अश्विन पुन्हा म्हणाला...

"पिल्लू प्रश्न पैश्यांचा नाही .. तू मुद्दा लक्षात घेतच नाही आहेस... पैसे आहेत तुझ्या भविष्याची तरतूद सर्वांत आधी करून ठेवलीये आम्ही.. तुझं शिक्षण तुझं लग्न अगदी काही काही कमी पडणार नाही..."

आर्या पुन्हा तुटकपणे म्हणाली..

"आई मी तुझ्या पैश्यांबद्दल विचारतेय.. मी जॉब लागल्यानंतर तुझे पैसे परत करेन पाहिजे तर तसे लिहून घे.."

आर्याचं एकेक वाक्य आशाला नामोहरम करत होतं... सगळ्या जगभर कुटुंबसंस्थेची उत्क्रांती आणि सामाजिक सामंजस्यावर भाषणे देणारी आशा आज तिच्याच लेकीकडून पराभूत झाली होती. आत्तापर्यंत फक्त ऐकून घेत शांत बसलेली आशा कडव्या स्वरात म्हणाली..

"आर्या ! पप्पा काय म्हणताहेत ते एकदा समजून घेण्याचा प्रयत्न कर... ते शत्रू नाहीयेत तुझे... "

आर्या बेलगामपणे किंचाळली..
"ते कोण होतात ठरवणारे तू सांग.. पैसे तू कमावतेस ना... दीड दमडीही न कमावणाऱ्या कर्तुत्वशून्य माणसाने निर्णय घ्यायचा नाहीये माझ्या भविष्याचा.. मला ते चालणार नाही."

तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत आशाने काडकन कानाखाली जाळ काढला... 
"यापुढे एक अवाक्षर बोललीस ना तर बोलायच्या लायकीची ठेवणार नाही तुला.. स्वतःच्या वडिलांबद्दल असे अपशब्द बोलतांना लाज कशी वाटली नाही तुला? "
आशाचे डोळे आग ओकत होते.

"वाटली ना आई खूप लाज वाटली जेव्हा मला वर्गात कुणीतरी विचारायचं तुझे पप्पा काय करतात?? तेव्हा उत्तर नसायचं माझ्याकडे .... सगळे टिंगल करायचे.. सगळे हसायचे माझ्यावर .. तेव्हा खूप लाज वाटायची. माझ्या मैत्रिणींचे पप्पा पाहते ना तेव्हाही खूप लाज वाटते मला..लाज वाटते मला रिकामटेकडा नाकर्ता बाप असल्याची..."

आशा हतबुद्ध होऊन पाहत राहिली.. हे एव्हढं विष साचलं होतं हिच्या मनात... आपलं खरंच मुलांकडे दुर्लक्ष झालं आहे. दाणादाण पावलं आपटत आर्या तिच्या खोलीकडे वळली .. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आशा थक्क होऊन पाहत राहिली. क्षणभर तिला आपल्या खांद्यावरील पत्नी ह्या जबाबदारीचेही भान आले.. अश्विन पायात चप्पल घालून घरातून निघून गेले होते. आपल्याला जे शब्द काळजाला चटका लावून गेले ते अश्विनचं काळिजच जाळत गेले असणार ह्याची तिला खात्री होती. स्वतःच डोकं आणि मन शांत करायला अश्विन लांब चालत निघाला होता... लेकीचे "नाकर्ता रिकामटेकडा " हे शब्द घणाचे घाव घातल्या प्रमाणे त्याचं डोकं फोडत होते..

रात्री उशिरा दमून भागून थकल्या मनानं घरी परतलेल्या अश्विनची पावलं जड झाली होती... काळजीने अर्धमेली झालेली आशा दारातच आत बाहेर करत होती.. अश्विनला पाहताच तिच्या जीवात जीव आला. आशाच्या मांडीवर डोकं ठेवून अश्विनचं डोळे झरू लागले... त्याला ढसाढसा रडावसं वाटत होतं.. पण अखेर पुरुष होता तो रडणार तरी कसा?? आज तो खूप काहीतरी मौल्यवान हरवून बसला होता. आशा मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली..

"अर्धवट वय आहे तिचं.. ह्या वयात कळत नाही काय चांगलं काय वाईट... विसरून जा सगळं."

पाझरणाऱ्या डोळ्यांनी आशाचे हात हातात घट्ट धरत अश्विन म्हणाला..

"प्रत्येक बाप त्याच्या मुलीसाठी हिरो असतो.  मला नाही होता येणार का ग ??.. मी हा असा नाकर्ता.... माझ्या मुलांना माझी लाज वाटावी असं काही केलंय का मी??"

✒️ यशश्री रहाळकर