फॉलोअर

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

बायकांची जात

मुलगी ह्या वयोगटातून बाहेर पडल्यावर "बायका" ह्या गटात जाणे क्रमप्राप्तच होते.बायका, बायकांच्या गप्पा आणि बायकांचे ग्रुप्स.... सोशल मीडियावर यथेच्छ टिंगल करण्याचं हक्काचं गिऱ्हाईक (त्यात  बऱ्याच अंशी तथ्य आहे हे खरे!) वेगवेगळ्या कारणांसाठी, वेगवेगळ्या वयोगटातील , अगदी वेगळी जडणघडण असणाऱ्या बायकांच्या ग्रुपमध्ये सामील होताच मला एक साक्षात्कार झाला तो असा की "इथे तुमचा आत्मविश्वास आणि आनंद सुरुंग लावून त्याहीपेक्षा Dynamite लावून उडवून टाकण्यात येणार आहे." बहुतांश बायका एकमेकींना भेटल्यावर उणीदुणी काढणे, निरर्थक स्पर्धा करणे, अकारण टीका टिप्पणी करणे आणि अनावश्यक टोमणेबाजी करत आपला वेळ अक्षरशः फुकट घालवत असतात..( मी तरी ह्या क्षणी वेगळं काय करतेय म्हणा😂) बरं! हे सगळं केवळ मैत्रिणींच्या ग्रुप पुरतेच मर्यादित नाही तर कालिग्स,बहिणी, जावा, नणंद भावजय,आणि कोणत्याही नात्यातल्या स्त्रियांच्या ग्रुप मध्ये हे असेच सुरू असते. "बाईच बाईची शत्रू असते" हे विधान सुद्धा टीका टिप्पणीला कंटाळलेल्या एखाद्या बाईनेच केले असावे. सुरवातीच्या काळात मला ह्या साऱ्या वागण्याचा भयंकर त्रास व्हायचा नंतर मात्र ही बहुतेक बायकांची सहज प्रवृत्ती आहे हे माझ्या लक्षात आलं.

अगदी सहजपणे जेव्हा एखादी म्हणते,

"अग काय हे .. पांढरे झालेत तुझे केस.."

"अग काय हे .." ह्या पंचलाईनने तर धडकी भरते हल्ली... ह्या तीन शब्दांतून आपली काळजी असल्याचा सूर लावत पुढच्या क्षणी स्वतःला गॅलिलिओ किंवा न्यूटन समजत नवीन शोध लावतोय जणू असा आव आणायचा... अग बाई.. नसेल जमले तिला डाय करणे आणि पांढरे झालेत केस ,हे चारचौघात ओरडून सांगायची काय गरज ? तिच्याकडे आरसा आहे म्हणजे ती बघत असणारच ना! अगदी तसच एखादीच वजन वाढलंय किंवा कमी झालंय हे तिला तिचे दोन डोळे आणि तिचे कपडे सांगतच असतात, ते वेगळं कुणी सांगायची गरज असते का? एखाद्या छान तयार होऊन प्रसन्न चेहऱ्याने आलेल्या व्यक्तीचा कोणतातरी डाग बरोबर दिसतो, कुणाच्याही व्यक्तीगत समस्या अनावश्यक चर्चिल्या जातात, एकमेकींचे फॅशन सेन्स, कपडे दागिने तोलून पाहिले जातात... खरंच ह्याची गरज असते का? 

कितीही निर्मळ मन आणि प्रांजळपणाचा आव आणला तरीही "वजन वाढलंय का ग तुझं?" ह्या प्रश्नात काही निरागसता नक्कीच नसते. मुळात असे प्रश्न विचारणे ज्यांची उत्तरे माहीत आहेत हे शुद्ध मूर्खपणाचे लक्षण नाहीये का? त्या प्रश्नाच्या विचारण्याने ना तुमची काळजी जाणवते, ना उत्सुकता दिसून येते .. दिसतो तो केवळ भोचकपणा .. एखाद्या छान प्रसन्न चेहऱ्याचे 12 मात्र वाजतात. हाच किंवा तत्सम प्रश्न स्वतःला विचारला तर आवडेल का? हा साधा विचारही बायका करत नाहीत... अस समजू नका की फक्त गृहिणीच हा आगाऊपणा करतात अगदी उच्चशिक्षित मोठ्या पदावर काम करणाऱ्या बायका सुद्धा अपवाद नाहीत. आपल्या छान टापटीप काम करणाऱ्या एखाद्या कलीगला कसा कपड्यांचा सेन्स नाही, ह्यावर यथेच्छ चर्चा केली जाते. 

विशेष गंमतीचा भाग असा की बायकांना बहुतेक वेळेला सामाजिक, राजकीय, आर्थिक अगदी आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्यावर मात्र बोलायचेच नसते. म्हणजे अगदी युक्रेन-रशिया प्रश्नावर बोला असे म्हणत नाही मी पण कमीत कमी एखादे आवडते पुस्तक, एखादा आवडता सिनेमा ह्यावर बोलायला काय हरकत आहे? पण नाही! आम्हाला दिसेल त्या बाईतील दोष काढायची हौस तेव्हढी असते. एखादीचा उत्साहाने फुलून आलेला फुगा फटकन टाचणी लावून फोडला की आम्ही कृतकृत्य होतो. खरंतर ,आपल्याला शिक्षणाची संधी मिळण्यासाठी, एक व्यक्ती म्हणून  जगण्याचे सारे हक्क मिळण्यासाठी, समानतेसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी केवढा संघर्ष केलाय कित्येक पिढ्यांनी... आणि आपण काय करतोय ? एकमेकींच्या रेषा पुसून आपली रेषा मोठी करण्याचा उगाच प्रयत्न करतोय. 

काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेले असता "तुझा DP तुझाच आहे ना ग?" अशी खोचक प्रतिक्रिया ऐकून मी थक्क झाले... म्हणजे मी आधार कार्डचा फोटो dp म्हणून ठेवावा अशी तरी अपेक्षा असावी किंवा ऐन उन्हात 14 तास एक ट्रेन, दुसरी ट्रेन असा प्रवास करताना मी अगदी पार्लरमध्ये जाऊन आल्यागत दिसण्याचा चमत्कार घडावा ??... किती वर्षे अजून आपण ह्या वरवरच्या रंगरंगोटीवर बोलत (वाईटच) राहणार? अतिशय तरल नादमधुर लिहीणाऱ्या माझ्या लेखिका/ कवयित्री मैत्रिणी तरी ह्या साऱ्याला अपवाद असतील असे वाटले होते पण माझा साफ अपेक्षाभंग झाला. का आपण भेटल्यावर एखादी कविता, एखादी कथा ह्यांवर चर्चा करत नाही. "हे काय तू स्टेजवर ड्रेस घालून जाणार?" किंवा ही किती जाड झालीये आणि ती कशी काळवंडलीये ... पुरे करा यार! मानेवर देवाने डोकं नावाचा अवयव दिलाय तो फक्त आज काय भाजी करू हे ठरवण्यापुरताच का?

प्रत्यक्षात आपल्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळ्यांवर लढणारी योद्धा असते.. प्रत्येकीच रणांगण वेगळं मात्र युद्ध अटळ आहे. घराबाहेर हसतमुखाने पडणारी प्रत्येक स्त्री त्या चेहऱ्याआड काय काय लपवत असते हे तिचं तिलाच ठाऊक.. साधं हे सुद्धा समजून घेऊ शकत नसू तर बाईपण कसलं? साधारण माझ्या आजीच्या पिढीतील बायकांकडे सगळ्या समस्यांवरचे एकच शाश्वत उत्तर होते ,"बाईची जात म्हटले की हे सर्व आलेच." ही so called बायकांची नेमकी जात काय असते हे कळायला मला अर्धे आयुष्य घालवावे लागले. एकाच जातीच्या असूनही आपण बायका एकमेकींना आधार देऊ शकत नाही, कौतुक करणे तर दूरच पण सतत दूषणे मात्र देत राहतो. ह्या सततच्या टीकेमुळे एखादी 'ती' मनानी पार खचून जाऊ शकते... ह्याची जाणीवही आपल्या अगदी सहज?? विधानापाठी नसते.

आता हे सगळं वाचून झाल्यावर जर तुम्हाला "मी नाही बाई त्यातली!" असे वाटत असेल तर तुमचे मनापासून कौतुक आहे. "प्रत्येक स्त्री अशीच असते ",असे बेजबाबदार विधान मी नक्कीच करणार नाही मात्र बहुतांश स्त्रिया कळत नकळत असेच वागताना दिसतात... मला वाटत आपल्या शब्दांना आणि संवादांना सकारात्मक पद्धतीने वळवण्याची नितांत गरज आहे. 
#यशश्री_रहाळकर