फॉलोअर

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

वयं मोठं खोटं

😳 ll वयं मोठं खोटं ll 😱
★★★★★★★★★★★★
          तिला वय विचारू नये म्हणतात ... पण मी माती खाल्लीच . माझ्या घरी कुमारिका पूजनाकरिता जिला बोलवायचे होते तिच्या आईला मी बोलून बसले  " सहा वर्षां ची आहे म्हणजे सौम्याला 26 नं फ्रॉक बसेल ना ग ??" सौम्या तीव्र फणकाऱ्याने किंचाळली " काहीही काय सांगतेस मम्मा.. अजून 2 months आहेत म्हणजे 60 days नंतर मी 6 yrs ची होईन ग ! "
देवा रे ! एकदा का आत्म्याने  ' स्त्री ' देह धारण केला की तिला वय विचारायचं नसतं... हे अगाध ज्ञान वेगवेगळ्या अनुभवा अंती मला प्राप्त झालंय. या कायम लहान असावे असे वाटण्यामागे काय बरं कारण आहे माहीत नाही पण कोणत्या का वयाची असेना तिला वय किंवा संबंधित प्रश्न विचारायचे नाही हे आता मला पुरतं कळून चुकलंय.
           कीटी असो किंवा गेट टूगेदर स्त्रिया चढाओढीने ' मी कशी इवली न मी कशी बाहुली ' हे सांगत असतात . कोणत्याच सोशल मीडियावरील प्रोफाइल मध्ये खरे वय त्या लिहितच नाहीत . म्हणजे 35 वय असेल तर 30 आणि 30 असेल तर 25 असा ढोबळ रेषो सहज खपून जातो हो ! पण कधीकधी प्रत्यक्ष आणि काल्पनिक वयातील तफावत काळ, काम, वेगाची सारी गणितच बदलून टाकतात. 
           गंमत सांगते ... माझ्या एका काकूची लेक 24 वर्षांची आहे .. (हे मी इतके खात्रीने सांगतेय कारण तिचा जन्म बरोब्बर माझ्या 9व्या वाढदिवसाला झाला होता ) परवाच्या एका घरगुती कार्यक्रमात काकूने ती माझ्यापेक्षा फारतर एक दोन वर्षांनी मोठी असल्याचे विधान केले 😆 मी इरेला पेटत तिच्या गणिताची शाळा घेतली " काकू तुझा तर बालविवाहच म्हणायचा ग ! पण 10 व्या वर्षीच तुला मुलगी झाली हे मात्र आश्चर्यच म्हणायचे " माझा हा स्पष्टवक्ते पणाचा खटाटोप अंगलट आला ... आता ती काकू भेटेल त्याला मी कशी वाया गेलीये उद्धट उर्मट??? आहे हे चवीने रंगवून सांगते. खरे बघायला गेलं तर ती काकू माझ्या पेक्षा वर्षांने मोठी झाल्याने मला काहीही फरक पडणार नव्हता ... पण माझा एक सद्गुण म्हणा की दुर्गुण आड येतोच मला जन्मतारखा वर्षे हे उत्तम लक्षात राहतात .
              "मी किती वर्षांची असेल ग ??" हा भिशीतील माझा अत्यंत नावडता😏 खेळ आहे. कारण मी मूर्खांसारखी माझं खरं वय सांगून बसले की बाकीच्यांचा माझ्याहून लहान होण्याचा अट्टाहास माझ्या डोक्यात जातो . " अय्या इंजिनियरींग फायनल ला आहे माझा पिंट्या .. वाटत नाही ना ?? अग लग्न लवकर होत आमच्या वेळी ..." वगैरे वगैरे ऐकून घेण्यात मला काडीमात्र रस नसतो . माझेच शब्द गिळतां ना मला ठसका लागतो ..अग बयो  लहानपणी म्हणजे पाचव्या वर्षी झालाय का लग्न? बरं तेही मान्य पण सातव्या वर्षी मूल झाले असे कसे होईल .
             91 वर्षांच्या आजीनेही मला वय ओळख विचारले तरी मी माझ्याहुन दोन वर्षांनी लहान असेच उत्तर देते 😂पण येथेही तुम्ही फसताच  साठीच्या पुढच्या स्त्री चे वय उर्ध्वगमन करीत असते . म्हणजे वाढत्या वयाबरोबर वयाचा आकडा वाढता असतो .. आता तिला तिचे वय झपाट्याने वाढवायचे असते .... "मी कशी तरणी " पेक्षाही " मी कशी हरणी " यात तिला प्रचंड रस असतो . मग पासष्टीची आजी वयाचा आकडा अंमळ वाढवून सांगते " अग सांगतेय काय ? सत्तरी गाठली न मी गेल्या महिन्यात .. आता सगळीे कामं करते  , हिंडतेय फिरतेय म्हणून वाटत नाही हा भाग वेगळा " ..... कृष्णा! तुझ्या बायकांनी आमच्यात कोण लहान असा पेच कधी टाकला का रे बाबा ?? नसावाच तरीच तू निवांत बासरी वाजवत बसला असावा.
          मागच्या पिढीत एक बरं होतं नवरा बायको पेक्षा फारतर चार सहा वर्षांनी मोठा असायचा . आताच्या नवीन ट्रेंड  नुसार  सर्रास 20 वर्षे लहान किंवा 20 वर्षे मोठे नवरे केल्याने ... वय काय हवे ते सांगता येते 👍 म्हणजे " आप्पा आहेत ग साठी चे पण मी 39 म्हणजे मी ईशा अन आप्पा म्हणजे विक्रांत सरंजामे " 😇
       31 डिसेंबर ला सारे जग नववर्षाचे स्वागत करत असताना माझी एक मैत्रीण अत्यंत दुःखी असते .. तिचा वाढदिवस नेमका त्याच दिवशी असल्याने नवीन वर्षात आपले वय वाढलेलं असल्याची खंत तिला आहेच शिवाय केवळ एकच  दिवसामुळे आपले जन्मसाल बदलल्याचं अतीव दुःख तिला आयुष्यभर भोगावे लागणार आहे . 😖
            आपला देश शून्याचा शोध लावणारा..  अनेक नामवंत गणितज्ञ आपल्याच देशातले ... एव्हढेच काय भारतीय माणसे जगभरात त्यांच्या स्टॅटास्टिक च्या  ज्ञाना करीता नावाजली जातात ..आपले dna गणितीय कामांकरीता सगळ्यात योग्य मानले जातात ... हे सगळं खरं हो पण वय सांगताना हेच dna कुठे झक मारायला जातात कोण जाणे ??
         उद्याचा दिवस कॅलेंडरचेच नाही तर तुमचे माझे सगळ्यांचेच वय वाढवणारा आहे .... पण हरकत नाही  वाढू देत वाढले तर . येणारे नववर्ष अनेक सुखद क्षणांची , मधुर भेटींची , हव्याहव्याश्या व्यक्तींची अन अनेक दिवस वाट पाहिलेल्या यशाची भली मोठठी पोतडीच घेऊन येणार आहे ..... या सगळ्यांच्या मोबदल्यात वय थोडस वाढतंय खुशाल वाढू देत... किती ?? ते मात्र विचारू नका .😊👍
🎊Happy New Year 2019 🎊

©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
        30/12/18

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

मधल्या फळीची शिलेदार

👩मधल्या फळीची शिलेदार👱
        गेल्या काही दिवसांत कुटुंबव्यवस्था आणि जेश्ठांचे प्रश्न हे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत. कुटुंबातील लहान मुलांन प्रमाणेच जेष्ठ व्यक्तींना काळजी आणि प्रेमाची निश्चित गरज आहे ... याबाबत दुमत नाहीच . पण आज मी जिचे प्रश्न मांडणार आहे ती आहे घरातील कर्ती स्त्री ... सून. गेले काही दिवस सोशल मीडियावर जिचा उद्धार जाहीरपणे 😈 राक्षसी दुष्ट चेटकीण असा केला जातो .... तिच ही बाई . हो ना ! कुटुंब व्यवस्था नष्ट होणार कारण सूनेला वळण नाही... संसार मोडताहेत कारण सूनेच्या आईची ढवळाढवळ , वृद्ध वृद्धाश्रमात जातात कारण सूनबाई ... मुलांना वळण नाही कारण हिच दुष्ट बाई... यांच्या श्रावणबाळांना जादूने भुरळ घालून तोडणारी हिच ती चेटकीण..... असे काहिसे चित्र मनात तयार व्हावे अशी प्रतिमा हेतूपूर्वक रेखाटली जातेय. आजकाल मुलींपेक्षा सासू लोकच सूनेच्या आगमनापूर्वी धास्तावलेले असतात... जणू आपण घरात एक निखारा आणतोय आणि तो पेटून कधीही घरादाराची राख करेल .
         दुसरी कडे कथा कादंबरी आणि सिरीयल्स मधून आजही आदर्श सूनबाईची प्रतिमा उंचावली जातेय. तुळशीला पाणी घालणारी , उठसूट देवापुढे दिवे लावणारी , कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणे याशिवाय दुसरी कोणतीही महत्वाकांक्षा नसणारी .... नवऱ्याचे वाट्टेल तसे वागणे सहन करणारी So called पतीव्रता. या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असणारी खरतरं सून ही माणूस आहे हे मात्र सारेच विसरून जातात.
      मुलींच्या आईने तिला अमुक ढमुक वळण लावावे... थोडक्यात तिला संसार बिनबोभाट करण्या योग्य मटेरीयल बनवावे ..एव्हढा एकच मार्ग प्राचीन महानतम अश्या आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांना माहित असावा. यात माझा रोल काय असावा असा विचार किती घरातील जेष्ठ करतात? तिचे एकटीचेच खांदे पेलणार का सारे ?? यावर काही महान लोक आम्ही तर तिला अगदी मुलीसारखी वागवतो असा आव आणतात .... प्रत्यक्षात हे शक्य नाही, या ड्रामेबाजी पेक्षा तिला माणूस म्हणून वागवता का ? हेही तितकेच महत्वाचे ती superwomen नाही हे तुम्ही मान्य करता का ?
          आजही कुटुंबात येणाऱ्या सूनेसाठी सोळाव्या शतकातील अपेक्षा केल्या जातात . त्या वेळी ८/९ वर्षांची मुलगी असायची आता ती २५ ते ३० या सर्रास वयोगटातील असते हे आपण का विसरतो?? ती काही संस्कारक्षम वगैरे नसते उलट पूर्ण वैचारीक बैठकअसणारी स्वतःची स्वतंत्र मते असणारी असते. एक किंवा फारच झाले तर दोन अपत्ये असणाऱ्या घरात लाडाकोडात वाढलेली असते ... या सत्याचा स्विकार सर्वाधिक महत्वाचा आहे. याचा अर्थ ती बिघडलेली आहे असा होत नाही तिची जगण्याची स्वतःची पद्धत निश्चित असणार आहे आयुष्याचा मोठ्ठा टप्पा तिने पार केला आहे.
          बरेचदा लोकांच्या अपेक्षांमध्येही कमालीची विसंगती आढळते... जसे भरपूर पगार असणारी मोठ्या पदावर नोकरी करणारी सून हवी पण तिने आमचे सगळे सणवार  सोवळे ओवळे सुट्ट्या काढून केलेच पाहिजे ... आता जवाबदारीच्या पदावर असणाऱ्या सूनेने दर वेळी सुट्टीचे कसे जमवाने?  हा विचार व्हायला हवा. अप्रतिम सुंदर वाह अगदी ह्या कॅटेगरीत मोडणारी सून आहे पण ती बहुतांश वेळ पार्लर आणि जिमला घालवते याची तक्रार करायची.... खूपच कष्टीक टापटीप संसार करणारी सून हवी पण ही कशी गबाळी आहे काकूबाई आहे म्हणून बोटे मोडायची. एकाच व्यक्तीत दोन विरोधाभासी गोष्टींची मूळात अपेक्षाच चूक नाही का??
           कित्येक स्त्रियांना आपण घरात सून नसून कामाचा घरगडी आणतोय असे वाटते ... तोही हसतमुख ... वंशवृद्धी करणारा शक्यतो मुलाला जन्म देणारा ... त्यांना व्यवस्थित वाढवणारा ... आपली सेवा आनंदाने करणारा शिवाय नोकरी करून पगार हसत हसत घरच्यांना सोपवणारा अक्कलशून्य घरगडी...😃😃 मान्य सगळे मान्य ...... पण तुमचे काय ? सूनेची भूमिका तिच पुरातन जेष्ठांची मात्र आधुनिक.... असे कसे? आजकाल सगळ्या सिनियर सिटीझन्स ना मस्त enjoy करायचय .... उत्तम आहे जरूर करा पण घरातील नातवंडे तुमचीही आहेत ना !
            जेष्ठांना वृद्धाश्रमाचा रस्ता सून दाखवते असा जो सर्रास आरोप केला जातो तो धातांत खोटा आहे. त्या वेळी आपण २५/३० वर्षे संस्कार केलेले आपल्या पाच सात पिढ्या उद्धरणारे पुत्ररत्न काय भूमिका बजावते हा प्रश्न कुणालाच पडत नाही. कोणत्याही घरात नविन येणारी मुलगी आपल्या पतीचे सर्वप्रथम पाणी जोखते. तोच आपला जोडीदार आहे त्याला आपलेसे केलेच पाहीजे हिच भावना तिची असते. त्याच्या आवडीनिवडी आत्मसात करते. त्याला आपल्या आई वडीलां विषयी प्रेम आदर आहे हे लक्षात आल्यावर ती त्यांचा अपमान करण्यास धजावत नाही. मात्र स्वार्थी मुलांचा विचारच होत नाही ... त्यांना मुळातच आई वडीलांचे प्रेम नसेल तर सून काय जादू करणार हे तिच्या पथ्यावरच पडते. मूळात घरातील काडीही बदलायचे स्वातंत्र्य जिला नाही ती काय सासू सासऱ्याना कुठे पाठवणार??? या बाबतीत तुमचे संस्कार आणि मुलाची भूमिका हिच गोष्ट सर्वाधिक महत्वाची आहे. वेळ आली तर बायको सोडू पण आईवडीलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही ही ठाम भूमिका ते घेत नाही ... असे का ?? हे कोणीच विचारत नाही.
          उलट ज्याना मी मधल्या फळीची शिलेदार म्हणतेय त्या सामान्य असल्या तरी  असामान्य कर्तृत्व करणाऱ्या आहेत . आपली घरे संसार ... सासूसासरे सारे व्यवस्थित सांभाळत असतांनाच त्या आपल्या आईवडीलांचा आधार बनल्या आहेत. कुठे केवळ एक अपत्य म्हणून तर कुठे केवळ बहिणीच आहेत म्हणून.... त्याहीपलिकडे जाउन नाकर्त्या भावांनी जवाबदारी झटकली म्हणून ... ह्या मुली आहेत ज्या सासूसासरेच नाहीत तर आईवडीलांचाही भक्कम आधार बनल्या आहेत. स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा एकदा सून पाठवू शकते वृद्धाश्रमात .... तिला देतोय का तेव्हढे अधिकार ?? स्वतःच्या नाकर्त्या जबाबदारी पासून पळ काढणाऱ्या मुलांना झाकण बंद करा.
      काही दिवसांपुर्वी चीन मधील कुटुंबसंस्था या विषयावरील लेख वाचनात आला . लोकसंख्या नियंत्रणासाठी तिकडे एकच अपत्य सक्तीचा कायदा गेली काही दशके होता. आता या एकुलत्या एक अपत्याचे लग्न झाले की दोघांचेही आईवडील आणि त्यांचे पिल्लू असे सात जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. काय हरकत आहे असा विचार आपल्याही कडे करायला ?  या मधल्या फळीला आजमावून तर पहा! शिलेदार सज्ज आहेतच. 👍🏻
🔏© यशश्री रहाळकर
          नाशिक
( आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत 🙏धन्यवाद ! )

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

तिचं कपाट

👩 तिचं कपाट  🗄
〰〰〰〰〰〰〰〰
        ' Minimalism ' अर्थात किमान चौकट प्रबंधन नावाची एक झक्कास concept वाचनात आली.नाव जरासं बोजड असलं ना तरी अर्थ अगदी सोपा .... केवळ जीवनावश्यक वस्तू बाळगणे बाकी सामानाची हकालपट्टी .... गरजेपुरते कपडे, फर्निचर, शूज वगैरे... अत्यंत उत्साहाने मी नवऱ्याला लगेच वाचून दाखवली . अत्यंत शांतपणे माझ्या कपाटाकडे बोट दाखवून तो म्हणाला  " minimalism ची  इथूनच कर सुरूवात . "  मी minimalism पेपरमध्येच गुंडाळत .. शहाजोगपणे बाजूलाच असणाऱ्या सिल्क साडी सेल वर लक्ष केंद्रीत केले .
           खरचं , एकदा पहायला हवय ह्म कपाटाकडे , ओसंडून वाहणारे मुंगीलाही शिरायला जागा नसणारे माझे कपाट डोळ्यासमोर आणत मी मनाशी म्हणाले . " आता साडी घेण्यापूर्वी आधी कपाट घे !  " असे दिवाळीपूर्वीच्या आवरासावरीच्या वेळी नवऱ्याने ऐकवले होते. तरीही मी फक्त तीनच साड्या घेतल्या दिवाळीला . एखाद्या ऑक्टोपस सारखे माझे कपडे नवरा ,लेक आणि सासूबाईंच्या कपाटात आपले पाय पसरवत होते . माळ्यावरच्या सूटकेस तुडुंब भरल्या होत्या ... माझ्या कपाटाची जी स्थिती तिच थोड्याफार फरकाने प्रत्येक " तिच्या  कपाटाची " असते . याचा अर्थ आम्ही स्त्रिया आळशी असतो किंवा हावरट असतो असे मुळीच नाही.
             प्रत्येक तिच्या कपाटात तिचं सारं जग सामावलेलं असत . इतक्या चमत्कारीक वस्तू भरून असतात की एखाद्या प्रदर्शनातही हे वैभव पहायला मिळणार नाही . आता माझ्या कपाटात माझ्या मुंडावळ्या अजून आहेत , लग्नाला दहा वर्षे झालीत तरी त्या मी जपून ठेवल्यात . त्या पाहिल्या की अजूनही हळवं कातर व्हायला होतं ...  ड्रेस वरील चांगल्या ओढणी मी जपून ठेवते ... त्या पुढे जन्मात कधी कशावर वापरत नाही हा भाग वेगळा . एक नावडत्या कपड्यांचा खण ज्यात मी देणाऱ्याने प्रेमानी दिलेय म्हणून साठलेले कपडे आहेत . झालेच तर कधीकाळी बारीक होऊ या स्वप्नपूर्तीसाठी ठेवलेल्या जुन्या जीन्स, स्कर्ट ... आणि असंख्य पर्सेस हॅंड बॅग्स ... वगैरे
              प्रत्येक ' तिच्या ' कपटात तिच्या सगळ्यात मौल्यवान ठेवी दडलेल्या असतात . आई, आजी  हयात नसतील तर त्यांच्या स्पर्शाची आठवण म्हणून ठेवलेली साडी , नवऱ्याने मनापासून " हा गुलाबी रंग तुझ्यावर खुलून दिसतो " अशी पहिल्यांदा दाद दिली ती खास साडी , लग्नातला शालू नुसता हात फिरवला तरी सगळे क्षण मनाच्या कॅमेरात उलडणारा , मामा मामीचा आठव देणारी.. आजोळीची धमाल आठवायला लावणारी अष्टपुतळी, पहिल्यांदा गोड बातमी कळली तेव्हाची साडी , कधी नव्हे ते सासूबाईंनी घेतलेली साडी , आजेसासूबाईंची लाडकी नातसून म्हणून  वारश्याने मिळालेली पैठणी  , लेकानी पहिल्या पगारात घेतलेली साडी नी लेकीने तुला हाच रंग छान दिसतो म्हणून हट्टाने घ्यायला लावलेली  भडक मॉडर्न साडी , विहीणबाईंने दिलेली भारी साडी अन झळकणारा अभिमान .... साऱ्या साऱ्या केवळ कपडे किंवा  वस्तू म्हणून मर्यादित नसतात तिच्यासाठी . तर तिच्यापुरता मांडलेला भावनांचा खजिनाच असतो . प्रत्येक कपडा तिच्यासाठी आठवणींचे भांडार घेउन आलेला असतो . ती बांधायला पाहते  ते क्षण....  जपायचा प्रयत्न करते त्या आठवणी .
               माझ्या आधीच्या पिढीचं बरं होत .. तीनच प्रकार घरात नेसायची साडी , आलीगेली साडी ( म्हणजे साधारण बाहेर नेसून जायची )आणि लग्नाकार्यात नेसायची साडी ...बास. तेव्हा घरातले सगळ्यांचे कपडे एकाच कपाटात मावत असत . आता आमचे धेडगुजरी झालेय सारे म्हणजे दररोज बाहेर आम्ही साधारणपणे ड्रेस घालतो , त्यात जरा बदल म्हणून अनारकली घेतो ,  शिवाय सुटसुटीत म्हणून कुडते आणि लेग्गिंस वापरतो , आता पार्टी म्हटली की वनपीस हवाच , शिवाय मैत्रीणींबरोबर चील करतांना स्कर्ट किंवा केप्री हवाच हवा ... मूव्हीला जातांना म्हणून जीन्स तर for a change प्लाझो हवा . किटीची थीम traditional तर नऊवारी हवी , नवरात्रासाठी लेहेंगा गरारा हवा ,  क्लब पार्टीज ना लेटेस्ट डिझायनर साडी हवी ... हे सगळे का जवळच्या नात्यातल्या लग्नात घालणार मग साडी हवी ... मावसबहीणीच्या लग्नात नेसलेली का चुलत बहिणीच्या लग्नात नेसणार ?? शी कसं दिसेल ते ? म्हणून नवी साडी घ्यावीच लागणार . शिवाय दिवसभर मोकळं वाटावं म्हणून गाऊन नावाची कफनी हवीच , त्यासारखे सुख नाहीच .
      या साऱ्यामुळे  ' तिचे ' कपाट तुडुंब भरलेले असते ... नव्हे ती तिची नितांत गरज आहे . पुरूष बिचारे सुखी प्राणी कपड्यांचे प्रकारही फारसे नाहीत आणि काहीही घातले तरी चालते ... सगळ्या भावंडांची लग्ने ते एकाच ड्रेसवर निभावून नेतात.
             आई , मावशी , मैत्रीण , बहीण कुणाचेही कपाट पहा ... तिच्या सारसर्वस्वाचे प्रतिबिंब जणू आरशाआड लपवून बसलेले असते . तिच्या सुखाचे आनंदाचे ते मूलभूत परीमाण असते ... त्यातील वस्तूंची किम्मत बाजारभावावरून ठरवताच येत नाही. तिचं कपाट ही तिची हक्काची स्वतंत्र अलिखित जागा असते ज्यात कुणाचाही हस्तक्षेप नसतो ... धृवताऱ्यासारखी संसारात अढळ तपश्चर्या करून एक एक करत तिने साठवलेला तो खजिना असतो .. तो रीता करताच येऊ शकत नाही .
          कधीतरी तिची दुडूदुडू पावले टाकत बागडणारी लेक अचानक मोठी होते ...अन कॉलेज मध्ये साडी डे ला साडी हवी म्हणत तिच्या कपाटात शिरकाव करते ... " तुला हवी ती घे ग " ती म्हणते . लेक एक एक साडी उलगडून काढते  अन ती भूतकाळात रमत " ही ना तुझ्या बाबांनी आणली आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला.. surprize ह्म्म " तिचं कपाट गालातल्या गालात खुदकन हसतं .
©🔏यशश्री रहाळकर
           नाशिक
           26/12/18

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

इये नाशिकचीये नगरी

इये नाशिकचीये नगरी
        मी जन्मानं नसली तरी मनानं आता नाशिककर. लग्नापूर्वी शिक्षणाचे निमित्ताने दोन आणि लग्नानंतरची आठ अशी उणीपुरी दहा वर्षे मी 'नाशिककर' आधुनिकता आणि प्राचीन परंपरा यांचा हातात हात घालून जेथे प्रवास अहोरात्र चालतो त्या नाशिकशी माझे नाते दृढ केले ते रसनेनं...अहो, जिभेनं. खवय्या (शुद्ध खादाड), रसिक (उघडपणे हावरट) आणि गोडखाऊ; ज्याला शुद्ध नाशिक बोलीत 'गोड्या ' असे म्हणतात, ह्या कॅटेगरी मध्ये समावेश होऊ शकणाऱ्या सर्व मानवजातीसाठी नाशिक म्हणजे 'दि लास्ट डेस्टिनेशन', मक्का ,कैलास ...काय हवं ते म्हणा हो! यापेक्षा अधिक चवीने गोड खाणारे लोक विरळाच.
           मुळात मुलांसाठी डाएट,लो कॅलोरी, व्हिटॅमिन्स वगैरे देण्यापुर्वीच्या काळात जन्मलेली माझी पिढी. कानात वारं शिरल्यासारखं भरपूर खेळायचं अन आईने कान धरून जेवायला आणल्यावर मिळेल ते चापून खायचं. आजीनं कितीही लपवून ठेवलेले लाडू आम्ही फार तर अर्धा तासात शोधत असू अन शिरा घरी होणार हे आम्हाला रव्याच्या वासानच कळायचं.थोडक्यात काय तर ,वाढत्या वयाबरोबर माझी ही मधुर आसक्ती भक्तीत रूपांतरित झाली.मला हवापाण्या इतकेच जीवन जगण्यासाठी गोड आवश्यक आहे हा साक्षात्कार मला याच नाशिक नगरीत झाला.माझ्या वजनकाट्याचे ऊर्ध्वगमन पाहून गोड न खाण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांना मी नुकतेच " त्यापेक्षा मी वजन करणेच सोडेन " असे बजावून आली.नवीन डॉक्टर होत असणाऱ्यांनी याची निश्चित नोंद घ्यावी....डायबेटीस नसणाऱ्या माणसाला गोड खाऊ नकोस हे सांगणं नाशकात ब्रह्महत्येच पातक मानलं जातं. खरा नाशिककर नाशिकात असे न म्हणता "आमच्या नाशकात " असेच म्हणतो. तर माझे आणि नाशकाचे जिभेचे नाते.
              खरा नाशिककर विशिष्ठ पदार्थ,विशिष्ठ वेळी,विशिष्ठ प्रमाणात आणि केवळ विशिष्ठ व्यक्तीनेच बनविलेला खातो.अर्थात त्यामागे पुणेकरांसारखी चितळे भक्ती दडलेली नसते तर असते केवळ जिव्हातृप्ती. 'उदरभरणं ' या हेतू व्यतिरिक्त 'रसानापोषणम ' हाही एक प्रमुख हेतू नाशिककर आवर्जून बाळगतात.जिलबी हा पदार्थ केवळ आणि केवळ बुधा हलवाईनेच बनवावा अशी यांची निष्ठा असते.त्याला नाशिककर 'बुध्याची जिलबी' असे म्हणतात. ही जिलबी खाल्यानंतर मनुष्यप्राणी पृथ्वीवरील अन्य कोणतीही जिलबी खाणार नाही इतका संमोहीत होतो. जुन्या नाशकात कुठल्याश्या अरुंद गल्लीत तीन चार पिढ्यांपूर्वीचे हे छोटेसे दुकान. या दुकानात कधीही गेलात तर रांगच लावावी लागते .असे रांगेत उभे राहून आपल्या समोरच कढईतून टाळली जाणारी देखणी जिलबीबाई newspaper रुपी फडक्यात गुंडाळून दिली जाते.ती कागदी खोके किंवा डब्यातून देणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर जणू संशय घेण्यासारखेच आहे.ही जिलबीबाई घरी दुसरे तिसरे दिवशीही तेव्हढीच  ताठयात असते;हे विशेष.थोडक्यात काय तर नाशिककर ऐवजी जिलबीकर म्हणावे एव्हढे हे प्रेम.
              नाशिकचे दुसरे गोड वैशिष्ट्य म्हणजे 'खुरचंदवडी' . बेसन,खवा,नारळ वापरून केलेली ही मिठाई फक्त नाशिकमध्येच खावी.ही खुरचंदवडी येथे प्रत्येक गल्लीत मिळते.एका राजस्थानी मिठाई वाल्याला खुरचंदवडी प्रकार माहित नसल्याने त्याला "चाळणीत पाणी घेऊन जीव दे मेल्या!" हे एका अस्सल नाशिककर आजोबांनी ऐकवल्याचेही मी पहिले आहे.गरम सामोसे किंवा  तिखट बटाटे वडे खाऊन झाल्यानंतर ही वडी एक प्लेट घेऊन खाण्याचा प्रकारही सर्रास सगळीकडे पाहावयास मिळतो.
         गोड दहीवडे हा दहीवड्याशी मुळीच संबंध नसणारा अतिगोड प्रकारात मोडणारा बालुशाही वर्गीय प्रकार केवळ जुन्या नाशकात खायला  मिळतो. वजनाकडे लक्ष देणाऱ्या मंडळींनी याकडे साधे पाहूही नये ... नुसते पाहूनही वजन वाढू शकते.जुन्या नाशकात जागोजागी इमरती आणि आटीव दूध असे कॉम्बिनेशन असणाऱ्या गाड्या/ठेले पाहायला मिळतील .अनेक आखाड्यांसाठी नाशिक प्रसिदध आहेच.अजूनही काही आखाडे अस्तित्वात आहेत काही नामशेष झाले पण टिकून आहे ही पहेलवान परंपरा......एक प्लेट इमरती खाऊन त्यावर एक ग्लास दूध मलाई मारके. हा रसिकपणाचा उच्चांक ;कोजागिरी ,गायनसंध्या आणि मध्यरात्री संपणारी नाटके यानंतर गाठायचा असतोच.बायकोला नाटकाला नेताना मोगऱ्याचा गजरा न माळणाऱ्या  नवऱ्यापेक्षाही हे आटीव दूध न पाजणारा नवरा अधिक कद्रू ठरतो.
            दिवाळीनंतर श्रमपरिहार म्हणून किंवा घरातील कर्ती स्त्री आजारी पडली तर काय ? या प्रश्नाचे उत्तर "खापरावरचे पुराणाचे मांडे" असे ऐकून दचकू नका.येथे भरपूर खान्देशी मंडळी स्थायिक झाल्याने जागोजाग पुराणाचे मांडे येथे सहजी मिळतात.मग घरातील बाबा लोक त्याच्याबरोबर तिखट मसालेदार आमटी बनवून अत्यंत मनोभावे तिन्ही त्रिकाल मांडे खाण्याचा कार्यक्रम रंगतो.एखादा रसिक नवरा जोडीला खिचडी कांदाभजी असे देखील करतो."येथे खापराच्या मांडे शिकवले जातील " असे क्रॅश कोर्से असणाऱ्या पाट्याही तुम्हाला पाहायला मिळाल्यात तर नवल नाही.
            खरा नाशिककर हा गूळप्रेमीच.साखरेचे वावडे म्हणजे किती ? कि माझ्यासारख्या वैदर्भीय व्यक्तीने 'साखरेचे पुरण' हा शब्द उच्चारला तरी अंगावर पाल पडावी तसे दचकून दोघीचौघीनी गर्रकन वळून पहिले कि हो! एव्हाना मला कळून चुकलेय कि पुरण,शिरा,अनारसा आदी पदार्थ गूळाचेच करणे हे सुगरणीचे लक्षण आहे.जन्मानं नाशिककर असणारी स्त्री ओळखायची असेल तर पन्ह किंवा सरबत करण्यास सांगावे. मुळची नाशिकची मुलगी तेही गूळाचेच करेल.साखरेचा एकमेव पदार्थ नाशिककर आवडीने खातात तो म्हणजे 'पाकातले श्रीखंड' याच्याशिवाय गुडीपाडव्याची कल्पनाही ते करू शकत नाही.हे झिंगाट श्रीखंड भरपूर खरंतर प्रचंड जायफळ घालून केलेले असते.ते खाल्ल्यानंतर वामकुक्षी अनिवार्यच.
          सणावाराला गोड पदार्थ म्हणून रबडी बनवणे येथे कमीपणाचे मानले जाते.येथे चौकाचौकात कुल्फीच्या दुकानात रबडी वाटी विकत मिळते.येताजाताना कधीही प्रयोजन नसताना ती खाल्ली जाते.अगदी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या patient साठी बसून असणारे लोकही पाय मोकळे करण्यासाठी निघाले की रबडी वाटी खाऊन येतात.कॉलेज चे जुने मित्र भेटले की 'सलीम की चाय',मामा मुंगी स्टॉप चे किंवा पंचवटी हॉटेल वकीलवाडीचे पान,उपवासाला फक्त आणि फक्त सायंताराचा वडा किंवा बटाटा कचोरी,भेळ म्हणजे फक्त शौकीनची अशी व्याख्या म्हणजे नाशिककर .
             आषाढी कार्तिकी आणि शिवरात्रीला येथे मिळणार अद्भुत प्रकार म्हणजे'उपवास जिलबी'.खवा आणि बटाटा या दोन प्रकारात मोडणाऱ्या या जिलबीसाठी नाशिककर लांबच लांब रांगा लावतात.एकदा ही तोंडात विरघळली की तुमचा उपास सुफळ संपूर्ण.रांगेत सकाळी लवकर उभे राहून आपल्या लहानग्यांसाठी ही उपवास जिलबी मिळवून वाहून आणणारा पिता ,श्री कृष्णाला टोपलीत घालून नेणारा वासुदेव वाटावा जणूकाही.तेच पितृप्रेम तीच माया.उपवास जिलबी न नेणाऱ्या गृहस्थाच्या खिचडीत तिखटमीठ रागाने अंमळ जास्तच पडते हे निश्चित.
            नाशिकमध्ये नव्याने दाखल झालेल्या व्यक्तीला 'Dairy  Don 'नामक ठिकाणी घेऊन जाण्याचा येथील कालातीत प्रघात आहे.यांच्या विविध शाखांमध्ये सॉफ्टी आणि Thick  Shakes नवागतांना आवर्जून खाऊ घातले जातात.Softy अफाट भन्नाट.पण Thick  Shakes पिताना किंवा खाताना म्हणा हवे तर विचारच करावा. हे shakes खरंच Thick  असतात त्यात सुका मेवा भरपूर प्रत्यक्षात वापरलेला असल्याने ते पिणे एऱ्यागैऱ्याचे काम नोहे.बासरीवजा स्ट्रा मधून खेचून हे Thick  Shakes  पिणे हे गाल आणि छाती दुखावणारे निश्चित ठरू शकते.पिण्यापेक्षा हे Shakes  खाल्लेले उत्तम.
             नाशिककरांच्या गोडभक्तीचा मेरुमणी म्हणजे ''गोडी शेव" हि खास जुन्या नाशकातून दहा किंवा वीस रुपयांची पुडीत आणली जाते.खरा नाशिककर अत्यंत भक्तिभावाने आणि स्नेहार्द्र दृष्टीने प्रथम त्याकडे कटाक्ष टाकतो,नंतर प्रसादाचा तुकडा खावा इतपत मनोभावे आणि अगदी एव्हढ्याच प्रमाणात हि भडक लालरंगी शेव खातो.हि शेव भल्याभल्या गोड्याना अक्षरशः झोपवते......या पुढे काहीही नाही.जगाचा आदी अंत परमेश्वर जणू प्रत्येक कणात वसलेला आहे हे आध्यात्मिक चिंतनच ती शिकवत असते.याहून अधिक गोड पदार्थ पृथ्वीवर अस्तित्वात नाही, अखिल ब्रह्माण्डात भरलेला गोडवाच जणू एका शेवेच्या तुकड्यात उतरलेला असल्याचा साक्षात्कार तुम्हाला होतो.क्वचित गोड खाणाऱ्यांनी हि खाण्याची Risk घेऊच नये,अशी काही मिठ्ठी बसते तोंडाला की कारल्याचा रस पिणे गरजेचे वाटावे.
                नाशिकर खरा खवय्या.येथे कोणताही फूड फेस्टिवल ठेवा खच्चून गर्दी.भजी महोत्सव असो वा आनंद मेळा फूड स्टॉल मस्त फुललेले.अगदी सारस्वत मेजवानी पासून तांबड्या पांढऱ्या पर्यंत सगळे जीव लावून खाणारे नाशिककर.पण म्हणतात ना पाहिलं प्रेम विसरता येत नाही. नाशिककरांचा पाहिलं प्रेम म्हणजे 'मिसळ'."दोन महिने झाले हो मिसळ खाऊन..."असं जर स्टेटमेंट कुणी केलं तर लोक लगेच "आजीआजोबा बरे आहेत ना?"अशी चौकशी करतात.थोडक्यात घरी कुणीतरी गेलं तर नाही ना....कारण महिन्यात किमान एक रविवार खरा नाशिककर मिसळ खाणारच.येथेही गोडाची आवड जपत कॉम्प्लिमेंटरी म्हणून अनेक ठिकाणी लोक जिलबी देतात,मिसळीच्या बरोबरीनं.मिसळ तर महत्वाची पण गोडाविना कशी खायची? नाशिककरांना देवेन्द्राने अमृत पाजलं तरी "जोडीला जिलबी द्या की राव"म्हणणारे हे लोक.देवेंद्र देवांचा देव हो......गैरसमज नसावा.बाकी नाशिकला मिळतात ती गोड आश्वासनं.असो,तर मिसळी बरोबर 'भगोबा जिलबी" नामक बहारदार अप्सरा मिळते.हीच रंग रूप आफ्रिकन ब्युटी सारखं असलं तरी पठ्ठी बाजी मारते.भगोबा नामक मिठाईवाले किंवा आचाऱ्याने काही शेदीडशे वर्षांपूर्वी शोध लावलेली हि गुळाच्या पाकातील जिलबी .मिसळीच्या झणझणीत रश्याबरोबर हि जिलबी आवश्यक.
         अशा या गोड प्रिय नाशिककरांची जीभही गोडच; खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी सुध्दा."भामट्या,रताळ्या ,फिन्दड्या ...."यासारख्या अगम्य शिव्याही ते गोडीनेच देतात."माझी हाड घाल चुलीत."हे वाक्य नाशिकचा बाप पोराला रागावून म्हणतोय की प्रेमाने हे कळणारही नाही.रंगपंचमीच्या रहाड असो वा वीर नाचवणे,गणपतीची मिरवणूक असो वा पहाट पाडवा.....नाशिककर आनंदाने जाणार,उत्साहाने सामील होणार.आपलं वेगळेपण जपणार पण पुणेकरांसारखं त्याचंच कौतुक व्हावं हि अपेक्षा नाही.नेहमी मायेचा वर्षाव करणारी गोदामाई अचानक संतापून पोटात घेते तेव्हा 'नाशिककर पुन्हा लढण्यास सज्ज" म्हणून राजधानी करांसारखं त्यांचं कौतुकही  होत नाही.दोन अंश पर्यंत घसरणाऱ्या हाडे गोठविणाऱ्या थंडीतही ते आपला गोडवा अखंड टिकवून ठेवतात,कोणतीही तक्रार न करता.जणू सांगताहेत जगाला...........
"कडू घोट गिळता गिळता आयुष्य मी नव्याने शिकलो.. जिभेवर अन मनावर रेंगाळणारा गोडवा अखंड होत जगलो." 
-  यशश्री रहाळकर
     नाशिककर