बाबांच्या पिंडाला लगेच काकस्पर्ष झाला.. तो तसा लगेच होणार ह्याची मला खात्री होती... कारण त्यांच्या कोणत्याही इच्छा बाकी राहिल्या नव्हत्याच... कुणाचीही काळजी करण्याच्या केव्हाच पलीकडे ते पोहोचले होते. आयुष्याच्या हिशोबातली त्यांची नफा तोट्याची गणितं वेगळी असावीत... ते अतिशय शांत, संयत वृत्तीचे आणि जे मिळाले त्यात समाधान मानणारे होते. कशासाठी हटून बसणे त्यांच्या स्वभावात नव्हतेच .. ते अखेर तरी कसे होईल. मुळात कुणाची अडवणूक करणे हे त्यांच्यासाठी अशक्य होते... कदाचित म्हणूनच त्यांच्या दुखण्यातून सुटका व्हावी यासाठी ते सतत धडपडत होते... त्यामागे त्यांचे आमच्यावरील आत्यंतिक प्रेम हेच कारण ! आपल्या आजारपणामुळे सगळ्यांची आयुष्ये वेठीला धरल्या गेली आहेत... असा एक दुखरा कोपरा त्यांनी आपल्या हृदयात निर्माण करून ठेवला होता... त्या कोपऱ्यात रोज रोज.... अखंड ते निराशेची पणती तेवत ठेवायचे.
बाबांनी आयुष्यभर संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसावर प्रेम केलं, सगळ्यांना जीव लावला.. त्यांनी अक्षरशः माणसं प्रेमाने बांधून ठेवली. कुणालाही मदत करतांना ते मागेपुढे पाहत नसत... त्यांचा मित्रपरिवार मोठा होता... आणि मैत्री कित्येक दशकांची. अगदी माझ्या जन्माआधी कधीतरी चिखलीला असतांना त्यांचे सहकारी मित्र अजूनही संपर्कात आहेत... विशेष म्हणजे ते आजारी पडल्यावरच्या काळात अत्यंत आपलेपणाने त्यांचे मित्रमंडळ येऊन भेटून गेले होते... जो तो आपापल्या सोयीप्रमाणे आला पण एक समान दुवा म्हणजे... त्यांना भेटायला म्हणून येणारे सगळे मित्र मस्त ऐसपैस बसायचे गप्पा मारायचे ,जेऊन जायचे तिथे कुणी डॉक्टर आहे, मोठ्या पदावरून निवृत्त झालाय की कुणी व्यावसायिक ह्याने फरक पडत नव्हता. ते खास बाबांसाठी म्हणून इतक्या लांब यायचे... दिवस सोबत काढत, जुन्या आठवणींना उजाळा देऊन परतायचे. अश्या वेळी गाल खोल खोल शिरून खप्पाड झालेला बाबांचा चेहरा आगळ्या तेजाने उजळून निघायचा. ह्या तीन वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहिला तो तेव्हाच.
बाबांच्या उजव्या बाजूकडील मेंदूला रक्तपुरवठा अत्यल्प होता... हळूहळू घटत जाऊन तो 40% इतका कमी झाला. मात्र डावीकडील स्मृती आणि भाषेची केंद्रे उत्तम शाबूत असल्याने ते बोलू शकत होते ... स्मरण देखील अगदी उत्तम होते .ते शेवटपर्यंत व्यवस्थित बोलत होते मात्र बरेचदा दोन वाक्यांमधील कोरिलेशन संपले होते... एकूणच उजव्या बाजूकडील अनेक कंट्रोलिंग युनिट उध्वस्त झाल्याने हात उचला म्हटले की पाय उचलला जाणे, कुशीवर वळता न येणे, मान उचलण्यास वेळ लागणे ... दोन महिने त्यांना अन्न चावता येणे सुद्धा जमत नव्हते तेव्हा नळीने अन्न द्यावे लागे.... मात्र सुदैवाने हळूहळू तोंड हलवून घास चावणे त्यांना जमू लागले... असे बरेच गुंतागुंतीचे प्रकार झाले होते...त्यातली सगळ्यांत गंभीर बाब म्हणजे नैसर्गिक युरिन पास होण्याचे सिग्नल्स बंद होणे... बाबांची ह्यामुळे अक्षरशः फरपट झाली. 4 प्रकारच्या तज्ञांना दाखवल्या नंतर आणि ढीगभर टेस्ट केल्यानंतर त्यांच्या किडनी उत्तम आहेत, प्रोस्टेट ची समस्या नाही तर सिग्नलिंग बंद झाले आहे .. हे कदाचित कधीच सुरू होणार नाही ह्या निकषावर आम्ही आलो... शेवटचे दीड वर्ष ते इंटर्नल कॅथेटर वर होते. जिवंतपणी नरकयातना भोगणे काय असते हे याची डोळा पाहिले आहे... प्रचंड तगमग , जीवघेणी तळमळ .... बाबा गेले आणि वेदनेची परिक्रमा संपली. बाबांसारख्या सहृदय माणसाच्या, आयुष्यात कधीही स्वार्थीपणा न केलेल्या, दुसऱ्याबद्दल वाईट विचार सुद्धा मनात न आणलेल्या व्यक्तीच्या वाट्याला एव्हढे भोग.... पांडुरंगा! माझ्या तर पापांच्या राशीच आहेत.
ते सातत्याने सुटकेचे विचार बोलून दाखवायचे... आमच्यासाठी हे नवे नसले तरी ज्या कुणाला फोन केला ती व्यक्ती घाबरून जात असे... नाईलाजाने त्यांचा फोन आम्ही काढून बंद करून ठेवला. ह्यातही आम्ही त्यांना कुणाशी बोलू देत नाही असा सोईस्कर अर्थ अनेकांनी घेतला... मला हल्ली माणसांचा राग येत नाही त्यांची कीव वाटते... बाबांच्या आजारपणातील हिमनगाचं टोकही माहीत नसलेल्यांनी मला कितीही बोधामृत पाजले तरी काय फरक पडतोय? जाणारा माणूस निघून जातो आणि त्याच धारेवर लोकांचे मान अपमान, इगो तासले जातात हे मला नवीन नाही. बाबा गेले आणि आभाळच फाटलं... आता लहान मोठ्या इवल्या भोकांची पर्वा मी करत नाही. बाबांना मेहकरला जायची ओढ सुरुवातीच्या काळात होती , बऱ्याच लोकांनी त्यांना मेहकरला आणल्यावर बरे वाटेल असे सुचवले. त्याप्रमाणे आम्ही त्यांना नेलेही पण ते घर वर-खाली असल्याने त्यांना वावरणे अवघड वाटू लागले आणि दोनच दिवसांत "मला नाशिकच्या घरी न्या" असा हट्ट त्यांनी धरला. एप्रिल महिन्यापर्यंत बाबा घरात चांगले चालायचे... मात्र नंतर त्यांची स्थिती खालावत गेली.
बरेचदा सोडियम कमी झाल्याने किंवा युरिन सॅच्युरेट झाल्याने ...त्यांना भास होत असत ... पुढे पुढे त्याचे प्रमाण इतके वाढले की ते 70 ते 80 आता दशकात कुठेतरी जगायचे... आई आणि मी त्यानंतरच्या आयुष्यात आलेलो... त्यामुळे आम्हीच शेवटी हद्दपार झालो 😢 ते बरेचदा त्यांच्या आईशी म्हणजे माईशी गप्पा मारत बसलेले असायचे. जिला जाऊन पाच वर्षे जास्त झाली ती माई त्यांच्या पलंगाशी बसलेली असायची, "ही काय माई इथे बसलीये..." एका विशिष्ट जागेकडे बोट करून ते म्हणायचे. अतीव वेदनांच्या प्रवासात आईची आठवण येणं साहजिकच होतं... त्यातही त्यांनी आयुष्यात सर्वाधिक प्रेम कुणावर केलं असेल तर माईवर. "काय म्हणतेय माई?" असा प्रश्न विचारला की ते भरभरून बोलायचे वाटायचे खरेच माई येऊन गेली असावी....
"माई म्हणाली.. अनारसे तळू लागतो का? अधिक महिना आलाय प्रभा येईल.. तिला वाण द्यायचं आहे. मी तिला म्हणालो तिचे वेगळे काढ आणि लपवून ठेव... नाहीतर उरणार नाहीत."
प्रभा त्यांची पाठची बहीण ... माई खालोखाल जीव असणारी ही दुसरी व्यक्ती... तिचे सतत नाव असायचे. मात्र तेही भूतकाळात कुठेतरी... "प्रभा अभ्यास करतेय चहा करून देतो "...म्हणून धडपडत उठायचे. "प्रभा उन्हाळ्यात आली की मी आंबे आणतो." .. किंवा माईला सांगत असायचे, " प्रभाला साडी आधीच घेऊन ठेऊ नको ती आली की मी दुकानात नेईन तिला.." काय गंमत असते ना माणसाच्या मनाची... वर्तमान नकोसा झाल्यावर भूतकाळाचे हवे ते पान उघडून बसायचे. दुनिया इकडची तिकडे झाली तरी प्रभा आत्या भेटून जाणार आणि माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हणणार ,"माझाही बाप होता ग तो..." ह्याची मला सूर्यप्रकाशाईतकी खात्री होती. तिचे आणि माझे दुःख फार वेगळे नाहीच...
बाबांना बरेचदा मोठी आई म्हणजे त्यांची आजी सुद्धा भेटायची... ती कधीच काही बोलत नसे फक्त प्रेमाने डोक्यावर हात फिरवून जाई. पुढे पुढे त्यांना अन्न पाणी काहीच नको असायचे त्याही वासनेतून ते सुटले होते.. आम्ही दिले तर दिले तेव्हढे ते खायचे पाणी सुद्धा स्वतःहून मागणे त्यांनी बंद केले होते. कसलीही चव किंवा अमुक पदार्थ हवा म्हणूनही ते मागत नसायचे. खाता का विचारले की ठाम नकार द्यायचे... मग आम्ही कुणाकुणाची नावे घेऊन खाऊ घालायचो.. " माई गरम पोळ्या करतेय तुम्हाला वाढायला सांगितले.." असे म्हटलं की लगेच पोळी खायचे किंवा काकूनी उकडपेंडी पाठवलीये, मावशी आलीये तिने सांजा केलाय म्हटले की आनंदाने खायचे... त्यांची काकू , त्यांची मावशी ही त्यांची अत्यंत आवडती मंडळी.. अधून मधून मावशी आली.. मावशी येणार असे ते बोलायचे..
"काकूचा माझ्यावर फार जीव आहे" असे त्यांनी कित्येकदा मला सांगितले असेल...
ते गेले त्याच्या दोनच दिवस आधी लाडू केले होते तो त्यांनी आनंदाने खाल्ला..
कसा झालाय विचारल्यावर हाताचा मोर करत म्हणाले..
"छानच झालाय..काकूनी केला.. चंदू येणार म्हणून..."
त्यांचा हा भाऊ पूर्वी एअर फोर्स मध्ये होता. सुट्टीत घरी यायचा... मी त्यांना जरासे चिडवत म्हणाले... तुमची काकू तुम्हाला एकट्यालाच बरे देते... त्यावर
"इतक्या सगळ्यांना देण्याइतके नसतील केले... मला मात्र घासातला घास काढून देते."
पुढे पुढे त्यातच त्यांचा आनंद आहे असे लक्षात आल्यावर आम्हीही त्यांना चालू काळात ओढत नसू. मग त्यांची भावंडे त्यांच्या कल्पनेच्या जगात भेटून गप्पा मारून जात... आणि ते खुश असायचे. कधीकधी बेमालूम खोटेही बोलायचो..
"गपिष्ट मिल्या आला पण माझ्याशी न बोलताच निघून गेला..."
असा त्यांनी एक दिवस नादच घेतला थोड्याथोड्या वेळानी ते हेच वाक्य म्हणायचे... आता ते मिल्या म्हणत असणारा माझा मिलिंद काका दोन नातवंडांचा आजोबा झालाय हेही त्यांच्या गावी नव्हते... शेवटी , " हे काय आत्तापर्यंत इथेच होता चहा घेऊन गेला. " असे सांगितले आणि ते शांत झाले.
त्यांचा सगळ्यांत धाकटा आता पन्नाशीच्या वर असणारा त्यांचा भाऊ मनोज काका... त्यांच्या जगात अजूनही छपरावर पतंग उडवत असायचा..
"पतंगाच्या नादी लागला की ह्या मन्टयाला भुकेचेही भान नसते... त्याला बोलावं जेवायला ...सांग बाबा थांबलाय..."
माझ्या बाबांना सगळे नातेवाईक आणि सगळा गाव "बाबा" म्हणायचा.... ऐन पितृपक्षात एके दिवशी त्यांनी आईला घाबरवून सोडले... त्यांना त्यांची आई, दादा आणि आजी दिसू लागले... ते सगळे बोलावताहेत असे ते सतत सांगू लागले....आई चांगलीच घाबरून गेली... पण खरं सांगू पितरांचे आत्मे येतात बोलावतात वगैरे सगळ्या मनाच्या समजूती... एक सलाईन आणि एक अँटीबायोटिकचे इंजेक्शन ह्यांनी सोडियम लेव्हल नॉर्मल झाली आणि ते वर्तमानात परतले..
पुढे घरी बाप्पाचे आगमन झाले..
हे सगळे दिवस त्यांनी अतिशय आनंदात काढले... मात्र एक सूक्ष्म बदल आत्ता मला जाणवतो आहे तो म्हणजे... ते कमालीचे शांत होत गेले. कुठला त्रागा नाही की चिडचिड नाही, संताप नाही, कधीकधी मूकपणे अश्रू ढाळत असायचे बास! अश्या वेळी पोटातून तुटायचे... पण लहान मुलासारखे त्यांना पोटाशी धरता येत नव्हते..
मला काहींना काही कामानिमित्त घराबाहेर जावेच लागायचे... ते आधीच तोळामासा त्यांना चुकूनही संसर्ग होऊ नये म्हणून मी अंतर राखून वागायचे...
हा कोरोनाचा धुमाकूळ नसता तर.... फार वेगळे झाले असते नाही चित्र! कदाचित ... कदाचित... असो!😢
क्रमशः
यशश्री रहाळकर