फॉलोअर

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

अल्याड-पल्याड

विस्तीर्ण वाळवंट, उष्ण हवेचे झोत,उडणारी भुरभुरीत वाळू.....विराजसनी डोळे उघडले.क्षणभर आपण कुठे आहोत ह्याहीपेक्षा आपण जिवंत आहोत का??... हा प्रश्न त्याला स्पर्शून गेला. त्याने थोडीशी हालचाल करण्याचा प्रयत्न केलाय आणि जाणवल्या त्या अंगभर धावणाऱ्या वेदना, ... कुठे आणि किती जखमा झाल्या आहेत तेही न जाणवावे ... इतक्या वेदना!जेव्हा मेंदू वेदनेने दिलेल्या बधिरतेतून बाहेर पडला तेव्हा विराजसला काही सुसंगत घटनांची जाणीव झाली...

"आपण... आपण तर काल घर... बाडमेर... मिग 21... जैसलमेर..."

त्याला कालच्या घटना विस्कळितपणे आठवत होत्या...मेंदूवर ताण देऊन त्याने सर्व घटनांची सुसंगती लावली. तो Air Force मध्ये गेली दोन वर्षे पायलट ह्या पदावर काम करत होता. राजस्थानातील जैसलमेर पलीकडच्या काही भागात मोठ्या प्रमाणात घुसखोरी आणि आतंकवादी कारवाई झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे विराजसला तातडीने त्याच्या छोट्याश्या टीमसह बाडमेरच्या Air force base ला रवाना व्हावे लागले. लगेचच तो मिग-21 ह्या लढाऊ विमानात बसून घटनास्थळाकडे रवाना झाला. पाकिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या ह्या वाळवंटी प्रदेशातून ह्यापुर्वी फारशी आक्रमणे झालेली नसल्याने , फार खबरदारी न घेता, जरा तातडीनेच ही मोहीम आखण्यात आली होती.... नंतर बॉम्बचे आवाज, विमानाची घरघर, मिगचे पेट घेणे आणि रों रों वाहणारा वारा... ह्यापलीकडे काही केल्या त्याला आठवेना..... हळूहळू विराजसच्या मेंदूला पुन्हा एकदा बधिरता आली.

त्यानंतर बराच वेळ विराजस तसाच वाळूत पडलेला असावा... किती वेळानंतर कुणास ठाऊक? तो उठून बसला. संध्याकाळची वेळ असावी...उन्हे अंधाराने हळूहळू गिळायला सुरुवात केली होती. दूरवर फक्त वाळूचे ढीग दिसत होते... अवाढव्य, बेढब, अक्राळविक्राळ दैत्यासारखे! चटका देणारी वाळू आता गारव्याकडे सरकू लागली. 

"या भयाण निर्जन वाळवंटात आपण एकटे आहोत... आता जिवंत असणेही मेल्यागतच म्हणायचे" ....

असा विचार आला अन् जाणवली ती थंड हवेची झुळूक... अगदी बर्फ़ाइतकी थंड झुळूक... पार आरपार जाणारी. ... अन् हसण्याचा मंजुळ किणकिणाट. त्या आवाजासरशी त्याने चटकन मागे वळून पाहिलं.एक राजस्थानी स्त्री.. तरुण असावी..., गोड हसत त्याच्याकडे पाहत म्हणाली ,

"बाबू! रेत में खो गये क्या ??"

थोडीशी राजस्थानी ढंगातील तिची हिंदी ऐकून त्यालाही हसू आलं. त्याहीपेक्षा एव्हढ्या विस्तीर्ण वाळवंटात आपण एकटे नाही, कुणाची तरी सोबत आहे, आता काहीतरी करता येईल हा विश्वास त्याला आश्वासक हास्य देऊन गेला. राजस्थानी मळकट लालसर रंगाचा तिचा पोषाख असावा... अंधारात स्पष्ट दिसत नव्हते .. मनुष्याकृती तेव्हढी ठळक दिसत होती. तिकडच्या पद्धतीप्रमाणे पांढरे कडे पार दंडापर्यंत घातले असावेत... कपाळावर टप्पोरं काहीतरी.. दागिना असावा चमकत होतं... 

"एव्हढ्या लांबच लांब पसरलेल्या वाळवंटात तू एकटीच कशी??.. "

हा प्रश्न विराजसच्या मनात आला... आणि सहेतुक हातातल्या पाण्याच्या घड्याकडे बोट करत ती म्हणाली...

"हम वैसे भी तो अकेलेही आते जाते है ना बाबू!"

म्हणत पुन्हा एकदा आपलं किणकिणाटी हास्य पसरवून टाकलं. त्या हास्याचा आवाज काचेच्या बंगड्यांसारखा होता.. विराजसला आठवलं...आई घालायची हिरवा चुडा.. किणकिण! किणकिण! त्याच्या कानात तोच नाद रेंगाळत राहिला.

विराजसने आपला परीचय करून देताच तिनं आपलं नाव सांगितलं... "रज्जो!"
अचानक चमकून त्यानं विचारलं...

"हा पाकिस्तान तर नाही ना! त्यापेक्षा मेलेलं बरं!"

आता मात्र रज्जो गंभीर होत म्हणाली..

"रेत का कोनो मुल्क ना होवे बाबू! हवासी बहे है... जहॉं हवा ले जावे । "

तिच्याकडे चमकून पाहताना विराजसला जाणवलं ते तिचं तरल व्यक्तित्व, जणू काही ती धुकं आहे. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत एक सुप्त गूढ आकर्षण आहे आणि चेहऱ्यावर मात्र निरागस बालकाचं तेज. तो भारावल्यासारखा तिच्यापाठी चालू लागला .. जणू ती त्याला ओढून नेतेय कुठंतरी पार दूर दूर.. प्रत्येक पावलाला ठणकणारी वेदना मस्तकात जात होती; पण या वेदना आनंददायी होत्या.. कारण अभावितपणे प्रत्येक अवयव जिवंत असल्याची साक्षच त्या देत होत्या.

रज्जो चांगलीच बडबडी होती . त्यामुळे विराजसला आपण कुठं नी किती चाललोय काsही कळत नव्हतं. अतीव वेदनांनी देहभान खरंतर केव्हाच मागे पडलं होतं. आता फक्त ओढ होती बाहेर पडण्याची... रज्जो अचानक म्हणाली,

"बाहर कहॉं जाएंगे बाबू??"

भानावर येत विराजस म्हणाला,

"तुला ग कसं कळलं माझ्या मनातलं?"

रज्जो आपले काळेभोर डोळे रोखीत म्हणाली,

"सभी को बाहर जाणा है बाबू!...बस हमें लगता है की पहुचनें का ठिकाना अलग है। "

साधीशी खेडवळ रज्जो जीवनाचे गंभीर तत्वज्ञान देऊ लागायची तेव्हा तो अविश्वासाने पाहत रहायचा.

पडणाऱ्या दाट काळोखासोबत रज्जोचं अस्तित्व अधिक गडद होत जाणारं त्याला जाणवलं. तिच्या घड्याकडे पाहत तो म्हणाला,..

"पाण्यासाठी फारच लांब चालावं लागतं तुम्हाला... मैलन् मैल चालल्यावर घडाभर पाणी... पीके नाहीत... बंजर जमीन...नुसती रेती. काय हाल आहेत इथे?? कसे काय जगता तुम्ही लोक?"

चार पावलं पुढे चालणाऱ्या रज्जोने पाठमोर पाहिलं... आता तिच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले होते त्याच्या जागेवर एक खुनशी भाव उमटला आणि ती म्हणाली,

"आप के हवाईजहाज ने तो हवा में ही उडा दिया होता बाबू! ... रेत ने बचा लिया। उसी रेत सें बैर काहे का??"

तो मुकाटपणे तिच्यापाठी चालू लागला. दूरवर कुठेतरी दिवे लुकलुकत होते. चिवट जिद्दीने स्वतःला ओढत ...एकेक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत ... विराजस तिच्यापाठी चालत राहिला. ती कुठेही न थांबता संथ गतीने चालत होती. "जरासं टेकावं ..." हा विचार विराजसच्या मनात आला आणि त्याच क्षणी रज्जो जरा चढ्या सुरात ओरडली..

"रुकना नहीं है बाबू! .... रेत निगल जाती है। आप आज रुक गये तो समझ लो ऐसा ही एक रेत का टिला कल आप के उपर होगा । "

अतीव थकवा , ग्लानी त्याला ओढत होती आणि त्याच वेळी जगण्याची चिवट जिद्द त्याला खेचून नेत होती. आता तो काहीही न बोलता रज्जोच्या पाठीमागे निघाला... काहीकाळ निःशब्द शांततेत गेला... रों रों हवेचा आवाज आणि त्यात वाळूची रेशमी सळसळ... एव्हढाच काय तो आवाज. आता रज्जो ने बोलायला सुरुवात केली... ती अस्खलित बोलत होती... त्यातला काहीच भाग विराजसच्या कानातून मेंदूपर्यंत पोहोचत असावा...

"शहरी बाबू!..जिंदगी रेत की तरह तो होती है... मुठ्ठी में पकड नहीं सकते, छूट जाती है। कोई नहीं पकड सकता, फिसल जाती है। कुछ नहीं उगाती बंजर है... जिंदगी  भी कहॉं कुछ देती है बाबू ??.... पानी पकडती नहीं ये रेत... पानी जो सबसे जरुरी है ...छोड देती है । हमारी जिंदगी भी सबसे जरुरी सब कुछ तो यहीं छोड ही देती है... ।"

मध्यरात्रीच्या मिट्ट काळोखात तिचे डोळे काजव्याप्रमाणे चमकले. बऱ्याच वेळाने विराजसने विचारले,

"जीवन रेतीसारखं म्हणतेस तर मग रेती तुला फारच प्रिय दिसतेय."

खळखळून हसत रज्जो म्हणाली,

""ये बात समझने तक तो जिंदगी हीं प्यारी थी बाबू! आपकी भी होगी ना..??"

तिच्या ह्या प्रश्नासरशी त्याला त्याची "जिंदगी"... ज्याला तो आयुष्याचा अविभाज्य भाग मानत होता ते सगळे आठवले. त्याला आठवले त्याचे आईबाबा... प्रसन्न निर्मळ चेहऱ्याचे. धाकटा भाऊ तेजस बरोबरची दंगामस्ती, त्याचा मित्रपरीवार, त्यांची मौजमजा. त्याला आठवला नुकताच झालेला त्याचा साखरपुडा... प्राजक्ता त्याची प्रेयसी आता त्याची भावी पत्नी..... त्याच्या हृदयात अनेक सुखाच्या, आनंदाच्या क्षणांच्या आठवणींचे कारंजे उसळत राहिले. जीवनाची ओढ आता अधिकच तीव्र झाली.जोरकसपणे पावलं टाकत तो चालू लागला.

रज्जो मागे वळली, क्षणभर थबकली आणि म्हणाली,

"मैं तो आपके तरफ की णा होऊ...नाही आप मणे जाणो है...तो काहें पीछे पीछे चल दिये बाबू!"

तो सुद्धा जरासा विचारात पडला आणि म्हणाला...

"तू मला पलीकडे घेऊन जाशील असा विश्वास वाटला मला."

"इस पार से उस पार..."

म्हणत रज्जो खळखळून हसली. हळूहळू उजाडायला लागले होते. अख्खी रात्र तो रज्जोच्या पाठीमागे चालत होता. उगवणाऱ्या दिवसाबरोबरच रज्जो हळूहळू जणू विरळ होत जातेय, असं त्याला वाटू लागलं. अतीव श्रमाने किंवा वेदनांमुळे असे भास होत असावे... असंही त्याला वाटून गेलं.

एका ठिकाणी जणू थबकल्यासारखी थांबत रज्जो म्हणाली...

"जाओ बाबू उसपार..! आपका इसपार का कारवाँ  यहीं से खत्म । "

तो भारावल्यासारखा आज्ञाधारकपणे चालत राहिला. काही पावलांवर त्याला एक छोटीशी वस्ती, एक गाव काही माणसं दिसली... त्याला भरून आलं. मन जड झालं डोळे भरून अत्यानंदाने वाहू लागले... तो माणसांच्या जगात होता... निरोप घ्यायला म्हणून तो पाठमोरा वळला... तर.. तर .. हवेत विरून जाणारी रज्जो त्यानं पाहिली... धक्क्याने तो जागीच कोसळला.... 

पुढच्या सगळ्या घटना वेगाने घडत गेल्या... गावातील चावडीवरचे लोक त्याच्या मदतीला धावले, त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, एअर फोर्स बेस बाडमेरला संपर्क साधण्यात आला, त्यांच्या विशेष रेस्क्यू एअर अम्ब्युलन्स हेलिकॉप्टरने तो सुखरूप त्याच्या जगात पोचलाही. विराजस जिवंत असणे हा नक्कीच एक चमत्कार मानण्यात आला....एकूण परिस्थिती पडताळून पाहता तो जिवंत असण्याची...  किंवा अगदी त्याचे प्रेत सापडण्याची आशासुद्धा सोडून देण्यात आलेली होती... अगदी विमानाच्या स्फोटातून तो वाचला असता तरी वाळवंटात कुठेतरी निर्जन जागी गाडला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती ... हवालदिल झालेल्या त्याच्या आप्तेष्ट आणि कुटुंबियांसाठी त्याचे पुनरागमन सुखद धक्का होता. त्याची मोडलेली हाडे सांधण्यासाठी आणि जखमा भरून शरीर पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा अवधी गेला. 

विराजसला आजही त्या प्रसंगाची कल्पना करवत नव्हती... रज्जो खरंच  होती की भास होता त्याचा?? रात्रभर तो एका भुतासोबत होता का?? ते भूत होते किंवा अमानवी शक्ती म्हणूया किंवा... वाळवंटातील एखादा वाटाड्या ... असेल कदाचित. तिने त्याला त्याच्या जगात परत आणलं होतं... स्वतःशी समजल्यागत हसत विराजस म्हणाला...

"रज्जो... म्हणजे जीवनेच्छा !पल्याड गेलेल्याला परत अल्याड आणणारी."

विषम परिस्थितीत ...आपल्या माणसांच्या आठवणी, आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपल्याला जगण्याची उमेद देतात... हाच रज्जू हाच रेशमी धागा आपल्याला जीवन -मरणाच्या सीमारेषेवर जीवनाच्या बाजूकडे बांधून ठेवत असतो ... "रज्जो!"   ... रज्जो आणि तिच्या गप्पांमधून उलगडलेलं आयुष्याचं गणित त्याला जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन देऊन गेलं. खरंच तर होतं तिचं...

"जिंदगी रेत की तरह है बाबू! पकडके रखना चाहोगे तो छूट जायेगी...।"

✒️ यशश्री रहाळकर




रविवार, १ ऑगस्ट, २०२१

एकुलतीचं डबोलं

"तिला काय जातंय सगळं करायला...सगळं डबोलं तर तिचंच आहे नंतर.."

नेहमीची तिखट जळजळीत प्रतिक्रिया आली... आताश्या वाईट वाटेनासं झालं होतं. बाबा गेल्यानंतर भेटीला आलेल्या कुणालातरी आई ,"माझ्या लेकीने किती नीट सगळं केलं" असं अभिमानाने सांगत होती... त्या सगळ्या कौतुकावर ह्या "डबोल्याने" बोळा फिरवला. एकुलत्या एक अपत्यांसाठी हा जन्मभराचा शापच आहे... आम्ही काळीज जरी काढून दिलं तरी ते त्या "डबोल्यासाठी" असतं ,असा सोयीस्कर समज लोक करून घेत असतात आणि त्यातही ते अगदी निलाजरेपणाने हे बोलूनही दाखवतात. एकुलता एक मुलगा असेल तर त्याच्या बाबतीत जरा सहानुभूती असते ... "बिचारा एकटाच करतो /एकटा किती धावपळ करतो/ एकटा सगळं सांभाळतो "..वगैरे वगैरे... पण तो मुलगा असल्यानं ते सो कॉल्ड "डबोलं" त्याच्याच हक्काचं असतं ना!... इथे गोची असते एकुलत्या एक लेकीची. तिच्या लग्नानंतर सासर माहेर सगळे व्याप सांभाळून जर ती आईवडिलांच प्रेमाने करतेय तर ते केवळ ह्या डबोल्यासाठी...😢

बँकेच्या/पोस्टाच्या गर्दीत आपण उभे राहून वयस्कर आईला बसायला खुर्ची दिली तरी साधारण प्रश्नांची तोफ अशी असते...
 
 "तुम्ही कोण?"
 
"रहाळकर.. मुलगी त्यांची"

"मग केतकर कोण?"

"आई माझी... तिथे बसली आहे"

"बोलवा त्यांना..." ... जोरात ओरडत... "हल्ली म्हाताऱ्यांना पोरं चुना लावतात नी मग भांडतात आमच्याशी "

रांगेत उभे असणारे ओळखीचे कुणीतरी फिस्स हसत म्हणते...

"अहो त्यांच्या बाबतीत काही घोर नाही... तेव्हढी एकच आहे त्यांना.. सगळं डबोल मिळाल्यावर चुना कशाला लावेल कुणी?"

त्यांच्या ह्या विनोदावर चार टाळकी टाळ्या देत हसली.

आताश्या मला एकुलत्या एक लेकीचे अवतारकार्य केवळ डबोलं मिळवणे हेच आहे असे वाटू लागले आहे. कुणाला चार भावंड आहेत कुणाला दोन... काय रोल आहे ह्या सगळ्यांत तुमचा? शून्य... असलीच तर तुमच्या आईवडिलांची आणि परमेश्वराची कृपा माना. 😂😝 आम्ही काही एकुलते एक म्हणून जन्म घेणारे स्पेशल कॅटेगरी आत्मे नसतो. कधी आर्थिक, कधी शारीरिक समस्या किंवा कधी तसा सुस्पष्ट साधक बाधक निर्णय  आमच्या तिर्थरूपांनी घेतल्याने आम्हाला भावंडे नसतात. त्यामुळे लगेच डोक्यावर शिंगे येत नाहीत आमच्या किंवा मागे शेपूट देखिल नसते.. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जो तो उद्धार करतो.. प्रचंड नकारात्मकतेने. माझ्या लहानपणी घरटी साधारण दोन/तीन भावंडे असायची... मग सगळ्या सवंगड्यांच्या आया आपापल्या मुलांना दम द्यायच्या... 

"तिचे काही सांगू नका.. ती एकुलती एक आहे. तिच्यासारखे सगळ्यांचे करायचे तर विकावे लागेल घरदार.."

एकुलती एक असणे म्हणजे काय हे नेमके कळायच्या आधीपासून हा असा उद्धार कानावर पडत गेला. पुढे समवयस्क मैत्रिणी, नातेवाईक ह्यांच्यातील इर्षा सुद्धा पदोपदी अनुभवली... अगदी कुजकट स्वरात..
"तुझं काय बाईsss" ची आळवणी असो किंवा आजीने मला बांगड्या न घेता आत्याच्या मुलीला घेतल्या म्हणून पसरलेले भोकाड असो... सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी उत्तर एकच... "तू एकुलती एक आहेस ना मग आधीच कौतुक होत असणार तेव्हढं खूप आहे... मग बाकीच्यांनी कशाला करा??" पुढे लग्न जुळवताना काही दिडशहाण्या मुलाच्या बापांनी ..भाऊ नाही म्हणून स्पष्ट नकार दिला... थोडक्यात हिच्या आईवडिलांचं सगळं आमच्याच मुलाला करायचे आहे तर... ही भूमिका. अश्या १८व्या शतकात जगणाऱ्या जुनाट बुरसटलेल्या शतमूर्खांशी पाला पडलाच नाही , हे बाकी भाग्य म्हणायचे. सगळ्या समाजाची गफलत अशी होते की मुलाच्या आईवडिलांची जबाबदारी सुनेचीच पण सुनेच्या आईवडिलांची जबाबदारी मात्र आमच्या मुलाची असूच नये. किती छान सोयीचा भाग आहे ना! इस्टेटीत मात्र मुलीचा असणारा समान वाटा तिच्या सासरच्या सगळ्यांना हवाच असतो... तसा कायदा आहे ना! 😂 पण जबाबदारी/ कर्तव्यात मात्र वाटा नकोच.

आज मी तुमच्यासमोर "एकुलतीचं डबोलं" उघडून बसणार आहे... तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत अश्या भन्नाट गोष्टी ह्यात आहेत. लहानपणी तुमच्या आजूबाजूची भावंडे जेव्हा मारामाऱ्या करत असतात, खेळत , मजामस्ती करत असतात तेव्हा तुम्ही मुकाट्याने "एकटेच" आपापली चित्रे रंगवत असता किंवा एखाद्या कोपऱ्यात पुस्तक वाचत असता. एकुलती एक मुले एकलकोंडी नसतात पण त्यांना some how एकटे राहून enjoy करणे जमवावे लागते. आईवडिलांचे 101% लक्ष एकवटलेले असल्याने तुम्हाला good girl असावेच लागते. प्रचंड मोठ्या अपेक्षांचे ओझे पाठीवर लादलेले असते आणि त्याच वेळी तुमचे आईवडील अतिकाळजी करतात. एकवेळ अशी येते की त्या काळजीचा प्रचंड मोठा ताण तुम्हाला वागवावा लागतो. होय! हे खात्रीने सांगतेय की एकुलत्या एक अपत्यांचे आईवडील त्यांच्या बाबतीत अधिक हळवे, अधिक protective असतात. चुकूनही चूक करण्याची मुभा नसते एकुलत्या एकीला... कारण जराशी चूक आईवडिलांसाठी मोठा धक्का असू शकते प्रसंगी ते कोसळू शकतात. 

परवाच एक मैत्रीण भेटली तिच्या भावाने परस्पर ठरवलेल्या लग्नामुळे ती नाखूष होती... आक्षेप असा की ती मुलगी एकुलती एक ,तिचा ओढा आईवडिलांकडे असणार ना! मग आम्हाला कोण विचारणार?? खरं सांगते..😢 वाईट वाटलं. ओढा असतो म्हणण्यापेक्षा टोकाची काळजी असते त्यांची. चार दिवस तापाने फणफणलेली आई आवाज बदलून तुमच्याशी बोलते... कारण लांब राहून तुम्हाला काळजी वाटू नये. तसेही सासरहून कोणती मुलगी मनात आले की माहेरी निघू शकते??... शंभर प्रकारच्या ऍडजेस्टमेंट कराव्या लागतात. ही काळजी , ही भीती काय असते हे त्या मुली समजूत शकत नाहीत ज्यांच्या आईवडीलांची काळजी घ्यायला भाऊ असतो. एकुलती एक मुलगी माहेरी गेली तरी थकलेल्या आईला म्हणते, "बस ग तू जरा, मी करते स्वयंपाक"... कारण त्या माऊलीला स्वयंपाकघरातून रिटायरमेंट नसतेच ना! ह्या गडबडीत आम्ही मोठ्या खूप मोठ्या होत जातो मनानी...

त्यातही सुदैवाने लग्न होऊन तुम्ही एका गावात असाल किंवा पुढे आईवडील तुमच्या गावात स्थायिक झाले तरी नवी आव्हाने तुमची वाट पाहत असतात. आई किंवा वडिलांपैकी कुणी गंभीर आजारी पडलं तर आमचे दोन हात दहा हातांच काम करतात... आजारी पालकाला, ऍडमिट करणे, त्यासाठी पैश्याची जमवाजमव करणे, ऍडमिशन प्रोसेस त्यासाठीची कागदपत्रे, बाहेर बसलेल्या दुसऱ्या पालकाला धीर देणे, स्वतःच्या घरातील लहान मुले, वयस्कर माणसे ह्यांची सोय लावणे, वेळ पडल्यास दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये राहणे , अर्धा तासात धावत पळत जाऊन डबे करणे ... ही आणि अशी कित्येक कामे आम्ही अर्ध्या तासात करत असतो... अगदी एकखांबी तंबू सारख्या.... ह्या वेळी फोन करायला किंवा अगदी धावून येत खांद्यावर हात ठेवायला आमच्याकडे मोठी बहीण नसते. ... कधीतरी आम्हीही घाबरतो, थकतो पण "जा घरी! झोप थोडावेळ" म्हणणारे धाकटे भावंड नसते आमच्यापाशी. स्पेशालिस्ट डॉक्टर शोधणे, ऑपरेशन करणे हे असले निर्णय ICU बाहेर घेतांना, declaration form वर थरथरत्या हातानी सह्या करताना... डोळे कोरडे ठेऊन "सगळं ठीक होईल ग ! मी आहे ना!" असं आईला सांगताना तुमच्या शेजारी कुणीही नसतं. सुदैवाने तुमचा जोडीदार , घरची माणसं मोठ्या मनाची असतील तर सगळं समजून घेतात, सहकार्य करतात... पण त्यासाठी पूर्वजन्मीची फार मोठी पुण्याई लागते... मित्र परिवार, शेजारी, कुटुंब मदतीला नक्की असतात पण जबाबदारी असते ती तुमची एकटीची. आईवडिलांशीवाय दुसरे हक्काचे कुणी त्यांनाही नसते आणि एकुलत्या एक लेकीलाही नसते.... त्यामुळे बाजीप्रभूंसारखी आयुष्याची प्रत्येक खिंड तुम्हाला एकटीला लढावी लागते. तुमच्या स्वतःच्या समस्या तर स्वयंभू होत तुम्हालाच सोडवाव्या लागतात पण त्यांच्याही समस्या तुमच्याच असतात.

एक वेळ अशीही येते की थकलेले आईवडील त्यांची सगळी पुंजी विश्वासाने तुमच्या हवाली करतात... त्यातला एक पैसाही तुमचा नसतो... असतो तो प्रचंड प्रगाढ विश्वास! एखाद्या विश्वस्तांनी करावे तसे मग त्या सगळ्याचे नीट नियोजन करावे लागते. त्याची नीट योग्य तशी गुंतवणून , त्यासाठी चार जणांशी चर्चा, त्यांच्या भविष्यातील आजारपणांची सोय, खर्चाची तरतूद वगैरे सगळ्या बाबी मग तुम्हीच सांभाळायच्या असतात. आईवडिलांचे मग तुम्ही स्वतः आईवडील होता... त्यांच्या आरोग्याची काळजी, डॉक्टरकडे नेणे, मेडिक्लेम, औषधे, त्यांच्या वेदना , त्यांचे प्रश्न सगळं सगळं तुमचं असतं. एक क्षण असाही येतो की तुमच्या स्वतःच्या कुटुंबावर ह्याचा परीणाम होऊ शकतो... तो क्षण फार अवघड असतो... इकडे तुमचा भूतकाळ आणि तिकडे तुमचा भविष्यकाळ दोन्हींची एकत्र गाठ मारत जमेल तसे वर्तमानात हात पाय मारत जावं लागतं. इतकं सगळं करूनही सगळ्यांचा सूर कडवट असतो... कारण आम्हाला ते so called "डबोलं" मिळालेलं असतं ना!😂  ते डबोलं उपभोगायला आम्ही कितपत शाबूत राहतो हे मात्र कुणालाच दिसत नाही.

गेल्या आठवड्यात मी माझ्याच वाटेवर खूप पुढे चालणाऱ्या , कैवल्याचे अंतिम शिखर गाठलेल्या, विरक्त सखीला भेटले. ही पठ्ठी सासर माहेर दोन्हीकडे एकुलती एक म्हणजे डबल डबोलं वाली 😝... गेली 22 वर्षे ती अखंड बेड रिडन पेशन्टची सेवा करतेय... हं हं! स्वतःचेच... आधी सासू मग बाबा, मग आई मग सासरे... शेवटी सगळे तारुण्याचे ,उमेदीचे दिवस अक्षरशः घरात काढल्यावर आता सगळेच गेलेत कोण माझे ? म्हणत आलेल्या भयाण पोकळीत जगते आहे. एक काळ असा होता की ही आणि नवरा जोडीने सिनेमालाही जाऊ शकले नाहीत... आता थकलेल्या गात्रांमध्ये ताकद आणि शिणलेल्या मनात उत्साहच उरला नाहीये जगण्याचा... 😢

हो !असतं ना सगळं आमचंच असतं ! दुःख, वेदना, आजारपणे, ताण... सगळं आमचं असतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्म घेणाऱ्या एकुलत्या एक लेकी लोखंडाचं बुलंद मन सुद्धा सोबत कवच करूनच आणतात... हा सगळा लेखनप्रपंच करण्याचा उद्देश हाच आहे की येत्या काळात बहुसंख्य मुले/मुली एकुलती एक असणार आहेत. अगदी तुमची मुलगी असेल किंवा तुमच्या घरात येणारी सून असेल कदाचित एकुलती एक... तिला समजून घ्या. तिला तुम्ही जे डबोलं देणार आहात त्याचे कमीत कमी ओझे कसे काय करता येईल ह्याची ज्याची त्याने सोय लावा. वृद्धाश्रम/केअर सेंटर/नर्सिंग होम ह्याच्या शेकड्याने सोयी असताना जीव टाकून जर एखादी आपल्या आईवडिलांचे सगळे बाणेदारपणे निभावत असेल तर समाजाचा एक प्रगत हिस्सा म्हणून तिचा आदर करा... बाकी तिचं डबोलं उचलण्याची आणि सांभाळण्याची ताकद तिच्या मनगटात असतेच... "एकुलती एक लाडाची लेक" असते की नाही माहीत ...पण "एकुलती एक लाखात एक"  नक्कीच असते.👍😊
✒️ यशश्री रहाळकर