फॉलोअर

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

अनादी निर्गुण प्रकटली भवानी

"अनादी निर्गुण प्रकटली भवानी"
           
            नवरात्र किंवा दसऱ्या नंतरच्या काळात घराघरात अचानकपणे भवानी माता प्रकट झालीए ही अनुभूती प्रत्येकाला येतेच . अस्वच्छता नामक राक्षसांचा पराजय व्हावा म्हणून ही माता सिद्धहस्ता झाडू, जळमटांचा दांडी फडा , फडके आदी आयुधांनी सज्ज होऊन स्टूल/ घोडी (उंच स्टूल  )/ फोल्डींग शिडी यांवर स्वार होत " दिवाळीची स्वच्छता " या रणांगणात उडी घेते. या रणांगणात कुटुंबवत्सल पुरूष देवतांना लढताना पाहण्याचा योग अम्मळ दुर्मिळच म्हणावा लागेल. स्त्रियांनी वर्चस्व प्रस्थापित केलेल्या या क्षेत्रात स्त्रिया हिरीरीने प्राण कंठाशी वगैरे आणत लढत असतात.
           त्यातही भांडेवालीला सर्वात आधी गाठणे , जमल्यास तिला किंवा तिच्या ओळखीच्या कुणाला मदतीला धरणे ,शिताफीने घरातील प्रत्येक डबा आणि भांडे बाई कडून लख्ख घासून घेणे, अगदी कचऱ्याची टोपली देखिल घासावी ह्या साऱ्यासाठी तल्लख मेंदू लागतो राव ! एरागबाळ्याचे हे काम नोहे.हे सारे कौशल्य तिच्या संसाराची किती वर्षे झाली यांवर अवलंबून असत.
          माझ्या पेक्षा संसाराचा रथ काही वर्षे अधिक ओढलेल्या एका सखी जवळ मी सहज बोलून बसले " अग ! वर्षभर तर आपण घर स्वच्छच ठेवतो ना ! मग दिवाळीची वेगळी ती काय स्वच्छता असते ??"  मला उभ्या उभ्या कच्चीच खाऊ की गिळू अश्या नजरेने बघत ती उच्चारली .." तुझ्यासारख्या xxx मुळे स्त्रियांच्या कष्टाचे कौतुक होत नाही. तुम्ही रोज पुस्तक चिवडताच ना ?? मग दिवाळी अंक काय वेगळा वाचता ?? विचारतो आम्ही कधी ??"  तिचा तो रुद्रावतार स्मरून मी पुन्हा दिवाळीची स्वच्छता यांसारख्या नाजूक विषयावर बोलणे टाळतेच न जाणो एखादे आयुध माझ्या पाठी बसायचे.  
           खरेतर पुर्वी केवळ सणासुदीला घर आवरणे ,स्वच्छ करणे, मातीच्या भिंती लिंपणे शक्य असायचे घरात माणसांचा गोतावळा अधिक असे , वावर अधिक असे म्हणून ही कामे षठी साहामाशी होत असावीत. शिवाय दैनंदिन कामांचा व्याप स्त्रियांभवती एव्हढा होता की त्यांना वेळही नसे. काळ बदलला,  जीवनपद्धती बदलल्या, काळ काम वेगाची सारीच गणिते बदलली.
            आता सर्रास घरोघरी रोजचा झाडू पोछा , pest control , महिन्यातून एकदा जाळी काढणे, (जमल्यास तेही pest control च्या मार्फत) असे सारे नित्याचेच आहे ... आता flats किंवा bunglow ला पोटमाळेही नसतात ... बरं ... आमची पिढी अनेक वस्तू मोठ्या भावंडांच्या वापरायची ... गेला बाजार मावस चुलत मामे भावंडाचे पाळणे , पांगुळगाडे,  सायकली आम्ही वापरत असल्याने पुढे कामी येतील म्हणून त्या हक्काने माळ्यावर वर्षोंन वर्षे असायच्या ... आता मुळात use n throw चा जमाना ... काही म्हणून काही second hand चालतच नाही ... मग आवरतात काय बरे ??
            बरे ! कपडे आवरणे म्हणावे तर तो काही दिवाळीच्या स्वच्छतेचा भाग नाही ... तसेही ते इतके उदंड असतात की हनुमंताची शेपूटही गुंडाळण्यास तोकडी पडावी ... विखूरलेल्या वस्तू आवरता येतात पण गरजेहून अधिक वस्तू करणार काय ?? साड्यांनी ओसंडणारे कपाट पाहिले की त्याचे दार लावणे हाच योग्य आणि एकमात्र उपाय असतो
          दिवाळीची एव्हढी स्वच्छता कशासाठी ??याचे उत्तर देतांना लग्नाला ५० वर्षे झालेल्या माझ्या जेष्ठ आजी कम मैत्रीणीने विचारले.... " तू कधी अहोंकडून पाय चेपून घेतलेस का ग ? " माझे वासलेले तोंड पाहून पुढे विचारले " गेला बाजार हात ..." " नाही " ..." अरेरे! तुम्ही खरडा कागद फक्त !आग लागो तुमच्या त्या शिक्षणाला !!!!!xxx "
एखादा बिचारा या दिवसांत सकाळी मिसळीचे पार्सल किंवा संध्याकाळी पावभाजी नेत असेल तर समजावे ... आज इसकी खैर नही l बापुडवाणे नवरे office मधून आल्यावर घरात पाऊल ठेऊ की नको या नववधूच्या पोज मध्ये खोळंबलेत किंवा मुळची धटिंगण पोरे मांजरीच्या पिल्लागत म्याऊ करत एका कोपऱ्यात बसलीअसतील तर समजावे ... आज वो कयामत का दिन है l  .. जेव्हा गृहस्वामिनीने चंडीका होत घराचे रणांगण करून टाकले आहे.
           फळीवरील एकूण एक डबा मोरीत घासण्यासाठी शहीद झालाय , त्यातील जिन्नस एखाद्या परातीत अथवा ताटात मुंड्या पिरगळून फेकून दिलेले आहेत , घरातील सर्व काचा , पंखे एव्हढेच नव्हे तर भिंतीनाही यथेच्छ आरक्त स्नान घातले आहे ... माळ्यावरील प्रत्येक वस्तू फरपटत  खाली आणत तिच्यावर पोछाचा रट्टा हाणला आहे सगळ्या घराचे रणांगण करत या रणरागिणी भांडेवालीची वाट पाहत .. महिषासुरमर्दिनीच्या आवेषात फेऱ्या घालत आहेत कोणत्याही पुरूषोत्तमाला धडकी भरावी असे दृष्य....
अश्या वेळी समंजस जाणते नवरे चहा काय पाणीही मागत नाहीत .
          स्वच्छता असलीच पाहीजे नक्कीच पण ते दैनंदिन काम असले तर .... बघा ह्म्म ... अघोर अचाट कामे का ?? कशासाठी?? केवळ दिवाळी आहे म्हणून की इतर करतात म्हणून.....???  आजकाल घरात एखादीच कर्ती स्त्री असते तिच्यावर सगळे घर अवलंबून असते ... अश्यात आपण धडपडलो किंवा आजारी पडलो तर सण होइल का साजरा. स्वच्छता करा पण दमाने सोईने आणि मुख्य म्हणजे आपापल्या शक्ती नुसार . माळ्यावर अनेक वर्षे पडून असणारे पण न लागणारे भांडे विकून टाका नाहीतर देउन टाका , अनावश्यक कपडे ??मोह टाळा. अजूनही लागेल कधीतरी म्हणून जपून ठेवलेले वातींचे स्टो , पेट्रोमॅक्स चे कंदील ,बंद पडलेल्या बॅटरी दिव्यांच्या माळा सत्कारणी लावा
          घरकाम करणारी बाई मनुष्य आहे हे विसरू नका. वस्तूंची जागा बदलणे किंवा पुसून माळ्यावर फेकणे म्हणजे घर आवरणे का ?? हे स्वतःला विचारा एकदा...
थोडासा वेळ मनातील ताणतणावाची जळमटे  काढायलाही द्या ना !
सण आनंदासाठी असतो तर थोडा आनंद स्वतःच्या वाट्यालाही येऊ देत की ...    
              नवऱ्याच्या हातात हात गुंफून त्याच्या आवडीची साडी घे , दोघ मिळून मुलांना कपडे घ्या , तू रांगोळी काढतांना त्यान कौतुकाने बघाव ,तो आकाशदिवा लावतोय तर तू बघावस ... या साऱ्या क्षणांसाठी ताजीतवानी हो ! मनापासून सजून नटून तयार हो स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या दिवाळी साठी...
" दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!"
© यशश्री रहाळकर
          नाशिक
( हा लेख माझा आहे माझ्या नावासकटच forward करावा धन्यवाद! )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!