फॉलोअर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

उपास

                तुम्ही कधी स्वतःचा OLSM स्कोर चेक केलाय का हो ? माझा 12 तासांचा साडे सहा हजार होता.एका दिवसाचा ,अर्ध्या दिवसाचा, गेला बाजार एका तासाचा सुद्धा काढता येईल..... अत्यंत महत्वाचा झालाय हल्ली ...Off Line Social Media Score. कुठला रेकॉर्ड, कॅश बॅक, गिफ्ट वगैरे साठी नाही हो!  आत्मपरीक्षणासाठी.... तुम्ही सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह राहता ह्याचा हा पुरावा. अगदी सोप्प आहे ... काही तास तुमचा मोबाईल इंटरनेट किंवा डेटा कनेक्शन ऑफ करून ठेवायचा... हाताला सहजी लागणार नाही असा हं! .... वाटतं तितकं सोपं नाही हे... बेवडा बाटलीकडे धाव घेतो तसे हात शिवशिवतात... सतत मोबाईल सॉरी सेल म्हणायचे आता☺ एखाद्या अवयवासारखा देहासोबत वागवत असतो आपण... फार जड जातं हे स्वानुभवाचे बोल.मी हा प्रयोग करायचं ठरवलं ... एक दिवस झाले ऑफलाईन सकाळी 6 ते संध्याकाळी 6... संध्याकाळी6 ला शार्प नेट ऑन केले ... साडेसहा हजार मेसेज होते इनबॉक्स ला...  त्यातले थेट मला जास्तीत जास्त  20 मेसेज होते... त्यातही माझ्या कामाचे फार तर 5/6 बाकी सगळे ग्रुप चॅट... निरर्थक /फॉरवरडेड ....याचा अर्थ काय होतो??माहितीये ... माझा दिवसाचा कितीतरी वेळ मी निरर्थक मेसेज वाचण्यात घालविणारी रिकामटेकडी आहे.
                  ह्या व्हर्चुअल जगाची मोहिनीच इतकी तीव्र आहे की एकदा चक्रव्यूहात अडकलो की अभिमन्यू व्हायचाच... यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याला कुठे सांगितलाय?? माझ्या 7 वर्षांच्या लेकीचे आणि तिच्या काही मैत्रिणींचे भातुकली खेळतांना कडाक्याचे भांडण झाले... कुणालाही खेळात आई व्हायचे नव्हते.सगळ्याच मुलींना लहान मूल व्हायचे होते... मोठं मजेशीर भांडण ... आम्ही लहानपणी खेळतांना आई होण्यासाठी भांडायचो... त्यांना समजवायला गेले तर सगळ्या एकासुरांत म्हणाल्या," आई झाले की खूप वेळ सेलफोन घेऊन एकाच जागी बसावे लागते ना! उड्या मारता येत नाही" सणसणीत चपराक ..... आवाजा शिवाय. मोबाईलचा अतिवापर कसा वाईट? असे मुलांना कोरड्या उपदेशाचे धडे देतांना मात्र आपण 24 तास ऑनलाइन असण्यासाठी धडपडत असतो.
                      दिवसरात्र आपण सगळ्यांच्या "touch" मध्ये राहण्यासाठी धडपडत असतो.... पण हे सगळे कोण आहेत ह्याचा लेखाजोखा मांडायला हवाच. न पाहिलेले ,कधीही न भेटलेले हजारो आभासी मित्र , कित्येक वर्षांपूर्वी शाळेत सोबत होतो पण त्यानंतर कधीच न भेटलेले... जगाच्या नकाशावर असणाऱ्या कुठल्यातरी देशात राहणारे वर्गमित्र, पाय खेचणारे नातेवाईक आणि तुमच्या सुखावर उगाचच जळणारे शेजारी....... प्रत्येकाची यादी साधारणपणे अशीच असणार. या व्यतिरीक्त वेगवेगळ्या प्रयोजनांचे ग्रुप... जसे ऑफिस/बिझनेस चा ग्रुप, कॉलनी ग्रुप किंवा मुलांच्या शाळा विविध क्लासेसचे ग्रुप, ढिगभर भिशीचे नी मंडळांचे ग्रुप.......ही यादी दररोज मारुतीच्या शेपटी सारखी वाढणारी असते. मध्यंतरी ऑनलाइन साड्या नी दागिने विकणाऱ्यांनी आपापल्या ग्रुप मध्ये ऍड करत माझ्यावर साड्या नी दागिन्यांचा पाऊस पाडला... शेवटी माझे स्वीस बँकेत खाते नाही असे सांगून मी माघार घेतली. यातल्या खरंच कितीजणांच्या touch मध्ये राहणे गरजेचे आहे...?? या ग्रुप वरील चॅट क्लिअर करणे हे टॉयलेट ला जाण्याइतके नेमाने करावे लागणारे कार्य... अन्यथा खूप काही साठून साठून मोबाईल मान टाकतो. काही ग्रुप असे सतत फ्लश करावे लागताहेत का? ह्याचा विचार करा की....
                 ह्या व्हर्चुअल टच साठी मी प्रत्यक्षातले कित्येक टच अक्षरशः गमावते आहे हे मला ऑफलाईन झाल्यावर उमजलं.मैत्रिणीशी टाळी देत केलेल्या गप्पा, घरातल्या वृद्धांचा मायेचा स्पर्श असू दे किंवा लेकीशी मस्ती करतांना मारलेली गळामिठी... हे सारेच स्पर्श अनमोल आहेत... उद्या ते कदाचित माझ्या वाट्याला येणार नाहीत....आणि त्याहून महत्वाचं ते खरेखुरे आहेत.पार्कमध्ये मुलांना खेळायला सोडून मोबाईलमध्ये डोकं घालणाऱ्या पालकांची कीव कराविशी वाटते... घसरगुंडी किंवा झुल्यावर दंगा करणारी ही पिल्लं.. चार दोन वर्षांनी मोठी झाली एकदा की हे दृश्य दिसणार नाहीये..पर्यटनाला जा लोक ऑनलाइन, काही जण तर लॅपटॉप उघडून लगेच ऑनलाइन....accident झाला लोक ऑनलाइन ... पाठव फोटो, पाठव विडिओ.... काय हे??     
                    आजकाल एक गंमतीशीर बाब सर्रास गार्डन मध्ये पाहायला मिळते....पूर्वी झाडाझुडपा आड असणारे प्रेमी युगुल हल्ली सगळा वेळ केवळ सेल्फी काढण्यात आणि ते अपलोड करण्यात अक्षरशः वाया घालवतांना दिसतात. ह्या अनलिमिटेड नेटपॅक चा वापर भविष्यात लोकसंख्या नियंत्रणाचे साधन म्हणून होईल ,कदाचित.☺ दिवसाला पाच ते दर तासाला एक याप्रमाणें dp  बदलणारी माणसे सुद्धा आहेत... एव्हढे फोटो सतत आपण झळकवत असतो जेव्हढे एखाद्या वॉन्टेड डॉनचे... फोटो काय असावे याला सुमार नाहीच.. पण लावा बाबांनो हवे तेव्हढे असे म्हणावे तर अखंड वेडेवाकडे फोटो काढण्यासाठी धडपड सुरू असते...कुणासाठी कशासाठी करतो हे? व्हर्चुअल Likes साठी ...प्रत्यक्षात गल्लीतल्या काळ्या कुत्र्याला तू न का आवडे... fb वर 1लाख like. त्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या चार प्रत्यक्षातल्या जिवंत लोकांना आपण आवडायला हवे हे कुणालाच वाटत नाही.
                     सोशल मीडियाच्या बाबतीत आपण साक्षर झालोय पण सुशिक्षीत नाही हे खेदाने मान्य करावेच लागेल.... ज्या प्रयोजनासाठी ग्रुप ची निर्मिती केली आहे त्याच साठी त्याचा वापर व्हायला हवा.मात्र शुभ प्रभात आणि शुभ रात्री चे मेसेज इतके असतात... की कंटाळा येऊ लागतो. त्यातही काही लोकांना सुविचार पाठवायचे व्यसन असते... हे सुविचार कम good thoughts कम quotes वाचून असे वाटू लागते की या जगातील सर्वांत नीच, वाया गेलेला , उडानटप्पू  मनुष्य म्हणजे 'मी' च.... काही लोक गुरुदेवांचे/बाबा लोकांचे संप्रदाय follow करीत असतात... जरूर करा ना राव तुम्ही ! पण आमच्यावर ते गुरुवचन वाचण्याची सक्ती कशाला? तुमच्या बाबा/महाराजांचे मार्केटिंग कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करा रे!
                चतुर्थी ला मोदकांचा फोटो पाठव, सोमवारी बेलाचा, एकादशीला तुळशीचा ... यातून आपण नेमकं काय साध्य करतो.... हाच तो touch का त्यासाठी दिवसाचे अनेक तास आपण वाया घालवत असतो.एखाद्या ग्रुप वर पाठविल्या गेलेल्या मेसेजची दखलही न घेता आहेरात मिळालेल्या साड्यांसारखे लोक धपाधप इकडून उचलून तिकडे मेसेज फेकत असतात.कधीकधी एक मेसेज इतका वेळ वारंवार एकाच ग्रुप वर येतो की गणितातील 'अनंत' ही संकल्पना आताच गवसली मला. एका receipe च्या ग्रुप वर टिप्स येत असत... त्यातली एक म्हणजे पोळ्या करण्या आधी लाटणं फ्रीज मध्ये ठेवा... कणिक चिकटत नाही ... (खरंतर हा शुद्ध मूर्खपणा आहे कोणत्याच पोळ्या नीट येणाऱ्या व्यक्तीची कणिक कधीच लाटण्याला चिटकत नाही.) ही पोस्ट त्या ग्रुप वर इतक्यांदा आली की अखेर ऍडमीननी "लाटण्याची पोस्ट पुन्हा टाकली तर डोक्यात लाटणे घालीन " अशी स्पष्ट धमकीवजा सूचना दिली.
             मुले किंवा विस्मरण झालेले वृद्ध हरवले आहे ह्या स्वरूपाच्या पोस्ट तर मूर्खपणाचा कळस गाठतात.अरे कुठून हरवला आहे, किती तारखेला हे न पाहताच आला की कर फॉरवर्ड....तरी सध्या ते देवाचे मेसेज कमी झालेत "अमुक इतके ग्रुप ना फॉरवर्ड करा नाहीतर वाईट होईल" type चे मेसेज कोण तयार करतं त्याचा जाहीर सत्कार करायला हवा.अमुक विद्यार्थ्यांचे कागदपत्र सापडले आहेत हे आवाहन सुद्धा मूर्ख शिरोमणींचेच ... त्या कागदपत्रांवर पत्ता असतो की राव .. किमान शाळा/कॉलेजचे नाव असतेच... करा ना संपर्क तिथेच थेट सतर्कतेचा इशारा देत वाट्टेल त्या बायकांचे फोटो चोर म्हणून किंवा मुले पळविणारी टोळी म्हणून फॉरवर्ड करतांना आपण हा विचार करतो का की यात तथ्य आहे की नाही? अनेक प्रसिद्ध जिवंत व्यक्तींना या व्हर्चुअल जगात मारून श्रद्धांजली वाहणारे महाभागही कमी नाहीत. आपण जबाबदार नागरीक किंवा विचारी माणूस म्हणून सोशल मीडियाचा वापर करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवाच  ...अनेक ग्रुप मध्ये जातीवाचक एकेरी उल्लेख करून एकमेकांना हिणवण्याचेही प्रकार घडतात... कशाला हे सारे... काय मिळतं ह्यातून ?दिवसभर वाद ,कागाळ्या, रडारड आणि दिवसाअखेर मनःस्ताप हाच का तो आपल्याला अपेक्षित touch??
                   अनेकदा लोक निनावी पोस्ट फॉरवर्ड करतात ...हे खरेतर खूप चुकीचे आहे. निलाजऱ्यांच्या ह्या जगात ..करा काय करायचं ते... या मुद्द्यावर मी आलेय हल्ली... पण आपण फॉरवर्ड करत असलेल्या पोस्ट चा अर्थ आपण त्या विचारांशी सहमत आहोत ते आपल्याला पटलेले आहेत असाच थेट होतो... ह्याचा विचार करतोय का आपण?? धर की फेक मेसेज असा व्हर्चुअल कचरा आपण वाढवत आहोत केवळ... थांबा हो कुठेतरी?? अनावश्यक पोस्ट फॉरवर्ड करणे टाळा किमान फॉरवर्ड करण्यापूर्वी पोस्ट नीट वाचा त्यात काय म्हटलंय ते पहा... ज्या ग्रुप ला फॉरवर्ड करतोय त्या ग्रुप च्या विषयाशी सुसंगत आहे का ती?? उगाच व्यायामाच्या ग्रुप वर receipe पोस्ट कशाला करायची? त्या ग्रुप शी सुसंगत असेल आधी तिथे कुणी पाठवली नसेल तर पाठवा की पण सोशल मीडिया हल्ली मॅरेथॉन झाले आहे . कोणता मेसेज मी आधी फॉरवर्ड करून मिल्खा होणारेय का?☺ मध्यंतरी एका ग्रुप वरील कुणालातरी माझा वाढदिवस असल्याचा भास झाला अन माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला...शुभेच्छा देणे खूप सुरेख गोष्ट आहे ... गंमत वाटली... मात्र एकीची आई गेल्याची बातमी आणि RIP/श्रध्दांजलीचे शेकडो मेसेज .. आता त्या बिचारीची आई पाच सहा वर्षांपूर्वीच वारली होती म्हणून ठीक .. पण चुकीच्या वेळी चुकीचे मेसेज ह्या प्रकारे करणे म्हणजे मेंढ्या आहोत आपण ... घातली मान खाली की निघालो खड्डयात पडायला.
                   कोणतीही गोष्ट अती झाली की माती होणारच... मग उपाय काय ...अनेक गोष्टी गुंतल्यात ह्या जंजाळात . कदाचित आता पाऊल मागे घेऊन सोशल मीडिया संपूर्ण बंद करणे शक्य होणार नाहीये. अजीर्ण झालं कधी तर काय करतो आपण  " उपास" .. जेवणखाण कायमचं सोडून देता येत नाही ना! असाच सोशल मीडियाचा उपास करायची वेळ आली आहे.दिवसाचे काही तास, आठवड्यातील एक दिवस किंवा अगदी महिन्यातला एक दिवस ... करून तर पहा नेट बंद 👍सकाळी योगासने किंवा इतर व्यायामास जातांना फोन नेणे टाळा... आपल्या घरचं तासाभरात काही अडत नाही . तशी त्यांना आणि स्वतः ला सवयच लावा ... हा एक तास पूर्णपणे स्वतः च्या आरोग्याला द्या. मुलांशी खेळतांना त्यांनाच वेळ द्या...हातात आभासी जग नकोच... जोडीदाराबरोबर हातात हात घालून फिरायला जातांना फोन नेण्याचं टाळा... एकमेकांना द्यायचा साराच वेळ status आणि dp च्या फोटोसाठी वाया घालवू नका. मैत्रिणींच्या get-together ला मज्जा मस्ती धम्माल करा... सोशल मीडियावर आपण वाया घालवत असलेला वेळ सत्कारणी लावा. माझे एक काका अतीशय सहृदयी,हुशार आणि रसिक माणूस...रिटायर्ड झाल्यावर ते अतिशय सुरेख आयुष्य जगतात... फिरायला जातात,भरपूर पुस्तके वाचतात, आवडत्या कवितांचे अनुवाद करतात, आवडती गाणी गातात बासरी वाजवतात... मात्र कटाक्षाने ते सोमवारचा सोशल मीडियाचा उपास करतात. सोमवारी ते ऑफलाईन असतातच... हा वेळ त्यांना खूप काही देणारा निश्चित आहे. मी देखिल दिवसातले काही तास माझी प्रिय पुस्तके घेऊन वाचायला सोशल मीडियाला तात्पुरता आराम देईन म्हणतेय...वेळ आलीये स्वतःशी संवाद साधायची.... त्यासाठी सोशल मीडियाचा उपास करायलाच हवा. या नवरात्रीच्या निमित्ताने मन आणि कुटुंब प्रसन्न करणारे हे व्रत नक्कीच करून पहा 👍
© यशश्री रहाळकर

५ टिप्पण्या:

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!