फॉलोअर

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

सवाष्ण


गोदाक्का चाळीशीच्या घरातील.... गोरीपान, ठेंगणी, गोल चेहऱ्याची ... एक पाय किंचित खुरडत चालणारी. नाशिकच्या सोमवार पेठेतील जुनाट ढासळत जाणाऱ्या अखंख्य वाड्यांपैकी एक .. गायधनी वाड्यात माडीवरल्या खोलीत राहते.... तशी ती तिथेच गेली कित्येक वर्षे राहत असावी. खरंतर ती गायधनी नाही ती सौ. गोदावरी गंगाधरराव जोशी. तिचं सासर सातारकर जोशी हे एक बड प्रस्थ...पण..? हा पण मोठा जीवघेणा असतो. कधीकधी हा "पण" इतका मोठा विराम असतो की अवघं आयुष्य निघून जातं त्यातच.गोदाक्कांचे तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी आईवडिलांना लग्न लावून दिले.एव्हढे श्रीमंत जोशी पण लेक आणि नारळ घेतला ना फक्त.... आणि लग्नाच्या बरोब्बर तिसऱ्या दिवशी गोदाक्का माहेरी परतली... परतली ते कायमची.

गोदाक्कांना त्या काळानुसार पाच -सहा भावंडे होती पण...त्यापैकी जगल्या त्या एकट्या गोदाक्का. अहो! गोदावरी म्हणून त्यांना आजवर कुणीही हाक घातली नाही , सगळा गाव त्यांना गोदाक्का म्हणूनच ओळखतो. वयोमानाने त्यांची आई गेली. लोक म्हणतात...

"गोदाक्कात जीव अडकला होता हो! किती दिवस धोसरा लाऊन होती म्हातारी... प्राण सुटतच नव्हते."
खरं खोटं देवास ठाऊक! पुढे काही वर्षांत वडीलही गेले पण जाण्यापुर्वी गायधनी वाड्यातील राहती खोली आणि दोन बिऱ्हाडकरूंचे भाडे गोदाक्कांना मिळेल असी सोय लाऊन गेले. गोदाक्कांचे दोन चुलत भाऊ आणि त्यांचे कुटुंब त्याच गायधनी वाड्यात राहते. दोघांचे पौरोहित्य उत्तम चालते... तश्या त्यांच्या बायका पोरेही सालस.. गोदाक्कांना सणावाराला जेऊ घालतात,प्रेमाने विचारपूस करतात, दुखणं खुपण काढतात... पण!

"पण हे सारे वाड्यातल्या जागेसाठीच.."

असं गोदाक्का ठासून सांगतात..

"शेवटी चुलत ते चुलतच. .. त्यात नाळेची माया नाही."..... इति गोदाक्का.

तर अशी ही गोदाक्का .. सकाळी आन्हिक उरकून दोन तीन मंदिरे पालथी घालून घरी यायची मग जेवण आणि वामकुक्षी झाली की पुन्हा मंदिर दौरा. मायेचं प्रेमानी विचारपूस करणारं कुणी माणूस नाही... तसं नाही म्हणायला एक जिवलग मैत्रीण सुधा पाठक मागच्याच आळीत रहायची. सुधा आणि गोदा अगदी जिवाभावाच्या बालमैत्रिणी शिवाय दोघीही माघारी आलेल्या.... समदुःखी. सुधाचा नवरा अनेक वर्षांपूर्वी परागंदा झालेला डोक्यावर छप्पर, पदरात दोन मुले अन् पाठीवर कर्जाचा पसारा टाकून... सुधा चार घरी स्वयंपाक करून भावाच्या आधाराने मुले वाढवत होती. दोघी मैत्रिणी दोनेक दिवसांआड सवडीने भेटत असतं...  अर्थातच सुधाच्या. गोदाक्कांना तर सवडच सवड होती. मग अश्या भेटीत दोघी मैत्रिणींचे हितगुज चाले.

एकट्या जीवाला कितीसे लागणार हो! गोदाक्का जमेल तशी सुधाला मदत करायची. कधी लेकरांना खाऊ दे , कधी शाळेची फी भर.. तर कधी एखादे पुस्तक वही घेऊन दे. तशी गोदाक्का निर्मळ मनाची कुणाच्या अध्यात न मध्यात... आपले वाट्याला आले तसे जीवन जगायची. कधी उणा शब्द नाही, नाराजीचा सूर नाही की कधी भांडणतंटा नाही. तिचं निष्पाप निर्मळ मन चेहऱ्यावर प्रतिबिंबित व्हायची. तिची आयुष्याबद्दल फक्त एकच तक्रार होती..तुम्ही म्हणाल मुलबाळ किंवा संसार वगैरे पण नाही, नाही! तर तिची खंत वेगळीच होती. गोदाक्का नेहमी सुधाजवळ आपली खंत व्यक्त करताना म्हणायची ..

"गो सुधे!मला मेलीला कुणी मानाने जेऊ घालत नाही गो! मलाही वाटते छान साडी ल्यावी, हातभर बांगड्या नी कपाळाला ठसठशीत कुंकू लाऊन सवाष्ण म्हणून कुणीतरी आदराने बोलवावे जेवायला. वेणी द्यावी, विडा द्यावा , नमस्कार करावा..... रोज पांडुरंगाला हात जोडून एव्हढंच मागणं मागते हो!.... रोज काळ्यारामाला हेच सांगते...पण त्याला मायेचा पाझर काही फुटत नाही."

असं म्हणून गोदाक्का ठसठसा रडू लागे... सुधाचं मन भरून येई पण काय करेल बिचारी... तिची रोजची हातातोंडाची गाठ जेमतेम पडायची....

"माहेरवाशीण आली तर सारे घर हसे अन् माघारी आली तर तिला कोण पुसे?"

सुधा सुस्कारा सोडत म्हणायची. तसं नाही म्हणायला सुधानी थोडे प्रयत्न केले.गोदाच्या मोठ्या भावजयिनी जेव्हा सोळा सोमवारांचं उद्यापन केलं तेव्हा हळूच सुधानी खाजगीत तिला सुचवलं की गोदक्कांस एक सवाष्ण म्हणून बसव तर ती म्हणते कशी...

"अहो घरचं माणूस असं कसं चालेल सवाष्ण म्हणून उद्यापनाला..."

सुधानी त्यातही जोर लावत म्हटलं..

"तिला सोळाजणींत नको धरुस फारतर..पण कर ग तिचं सवाष्णी सारखं... फार खंत आहे तिची.... बिचारी सुखावेल जरा."

धाकटी भावजय फणकाऱ्याने म्हणाली,

"पोर न बाळ, नवऱ्यानी आल्या पावली परत पाठवली, ही हो कसली सवाष्ण? कुंकू लावलं मोठ्ठ नी चार काळे मणी गळ्यात बांधले की का होते कुणी सवाष्ण??"

नेमकं दारात उभ्या असणाऱ्या गोदक्कांनी हे ऐकलं... काळजावर अगदी खोल घाव झाला पण सांगताहेत कुणाला? सुधाच्या कुशीत शिरून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली ... झालं... आयुष्य चालत राहिलं.

अन् अखेर तो दिवस आला... गोदक्कांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस उजाडला... काळ्यारामाने त्यांचे गाऱ्हाणे ऐकले होते. झालं असं... सुधा कासलीवाल कुटुंबाकडे स्वयंपाकास जायची. त्या घरातील आजींचे निधन झाले. आजी 90 वर्षांच्या पण आजोबा 98 वर्षांचे ठणठणीत... थोडक्यात आजी अहेवपणी सवाष्ण गेल्या... वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर साधारणपणे 35 वर्षांतून एकदाच येणाऱ्या पर्वकाळात त्या गेल्या... त्यामुळे त्यांची सीट डायरेक्ट स्वर्गात पक्की झाली. इकडे कासलीवाल शेठजींकडे आधीच लक्ष्मीची वाहती गंगा.. त्यात कर्मकांडांना ऊत आला.कासलीवालांच्या पाचही सुना आपणही अहेवपणी सवाष्णच मरणार अशी स्वप्ने पाहत जो जो जे जे  सांगेल ते ते करू लागल्या.तेराव्याच्या दिवशी 13 सवाष्णींपैकी एक काही मिळेना.. पुणतांबेकर गुरुजींच्या नेहमीच्यापैकी एक सवाष्ण येऊ शकत नव्हती.मग काय स्वयंपाकिण बाई सुधाकडे त्यांनी आपली अडचण सांगितली... अन् सुधाने गोदाक्कांना निरोप दिला.

कुणी गेलेल्याच्या नावाची तसे तर तसे... म्हणत गोदाक्का मनापासून तयार झाली. पेटीतून आईचं ठेवणीतलं हिरवं नऊवार नेसून छान नेहमीपेक्षा थोडं मोठं कुंकू रेखत बरोब्बर बाराच्या ठोक्याला ती कासलीवाल शेठजींकडे हजर झाली. मूळची गोरीपान अन् चेहऱ्यावर समाधान असणारी ही सवाष्ण कासलीवालांना त्यांच्या गत आईची आठवण व्हावी इतकी आवडली..मग तिचे पाय धुवून तिला पंचपक्वान्नांचे जेवण देऊन उंची साडी चोळीने ओटी  भरण्यात आली. गजरा, विडा असं सगळं यथासांग झालं.आपल्या 101₹ दक्षिणेतील 21₹ पुणतांबेकर गुरुजींना देत यापुढेही असेच येण्याचे आश्वासन देत काळ्या रामाचा रस्ता धरला. तिला आज राम खरंच पावला होता.नेहमीच्या पांडे मिठाईतून पाव किलो पेढे नेत तिने मनापासून रामाचे आभार मानले आणि घरी परतली.

घरात भाऊ भावजयींनी रौद्ररूप धारण केलेले होते.भावांच्या मते गोदक्कांनी घराण्याला कलंक लावला होता.

"आम्ही काय तुला खायला कमी करतो का?"

थोरल्याने दरडावले..

"आपले गोत्र उच्च असून अश्या मर्तिक कर्मांना अन्न घेणे आपल्याला निषिद्ध आहे........"

असा बराच उपदेश त्याने केला. जोडीला वहिनींनी देखिल यथेच्छ तोंडसुख घेत असं कुणाच्या नावाने जेवायला जाणे कसे वाईट असते, आमच्या मुलाबाळांना पितृदोष लागेल वगैरे ऐकवले. गोदाक्कांनी शांतपणे आणि खंबीरपणे सांगितले...

"एकतर मी गायधनी नाही तर जोशी आहे त्यामुळे तुम्हाला पितृदोष लागणे शक्य नाही. दुसरे असे की गळ्यांत काळे मणी आणि कपाळावर कुंकू लावून का कुणी सवाष्ण होते? तुम्हीच नाही का म्हणत? मग तोही प्रश्नच मिटला.. तुम्ही मला सवाष्ण मानतच नाही मग घाबरताय कश्याला?"

गोदाक्का जीना चढू लागली. 

"खीर कढी खायचा सोस .. हावरट मेल्या!"

हे भावजयीचे शब्द मनातच गिळत गोदाक्काने आपले घर गाठले.

आता त्या पुणतांबेकर गुरुजींच्या ग्रुप मध्ये सामील झाल्या. नाशिकची गोदावरी नदी दक्षिण गंगा मृत्योपरांत कर्मासाठीचे तीर्थक्षेत्र... रोजच कुणीतरी सवाष्ण मरणार अन् त्यांना गरज लागणार सवाष्णींची... जी मृतात्म्याच्या नावाने जेवायला येणार. खरंतर हा एक प्रचलित गैरसमज आहे की मृतात्मा झोंबेल, पितृदोष लागेल... त्यामुळे पुत्रवती चांगल्या घरच्या स्त्रिया ह्या कामाला तयार नसत... पण अगदी गरजू स्त्रिया तयार होत.गोदाक्का पोटार्थी नसली तरी गरजू होतीच ना!... तिची गरज मायेची, आदराची, सन्मानाची होती आणि तिची ही गरज तिने आपल्या कुंकाभवती बांधून घेतली होती. असे कित्येक महिने, वर्षे चालले. गोदाक्का आता खुष होती... समाधानी होती.तिच्या मूळच्या रुपाला झळाळी चढली होती. ती आता आनंदाने हातभर चुडा भरून घेई. पैसे साठवून तिने नवीन नऊवारी घेतल्या. त्या पुणतांबेकर गुरुजींच्या ग्रुपमध्ये तिला नवीन मैत्रिणी मिळाल्या... डबापार्टी, भजने , भिशी होऊ लागल्या. सोबत मुख्य काम सुरूच होते... 'सवाष्ण जाणे'.... त्यातील काही भाग मोबदला म्हणून ती गुरुजींना देत असे.

...असे गोदाक्कांचे दिवस आनंदात जात होते अन् तो काळा दिवस उगवला.एका प्रेताची ओळख पटवायला म्हणून पोलीस गोदाक्कांच्या घरी आले. आदल्या रात्री झालेल्या भीषण अपघातात गंगाधरराव जोशींचा मृत्यू झाला होता. गोदाक्का आणि भाऊ जाऊन ओळख पटवून आले... इतक्या वर्षानंतरची नवऱ्याची भेट झाली ती ही अशी. मध्यंतरी कित्येक वर्षे संपर्क नसणारा त्यांचा नवरा राजकारणातील बडी आसामी बनला होता. मोठमोठे नेतेमंडळी, मीडियावाले ह्यांना ऊत आला. जो तो गोदाक्कांच्या भेटीस येऊ लागला. श्रध्दांजलीची भाषणे, पेपरला फोटो, गोदाक्कांचे सांत्वन करणारे फोटो , मदतीचे आव्हान वगैरेंचे फोटो सगळ्या पेपरला साद्यांत छापून आले.

दोन दिवसांच्या धामधुमीनंतर सुधा गोदाक्कांना निवांतपणे भेटण्यास आली. पांढऱ्या कपाळाची गोदाक्का सुधाच्या पदरात शिरून ढसाढसा रडू लागली. सुधानी समजुतीने चार शब्द बोलायचे म्हणून म्हटले..

"कश्याला रडतेस बयो? त्याने कधी तुला बायको मानले नाही. गेलीस तशीच परत आलीस. अंगावरची हळदही तशीच होती.. का ग टाहो फोडतेस त्याच्यासाठी??"

रडण्याचा भर ओसरू न देता गोदाक्का म्हणाली..

"तिकडे सातारला मरायचं ना ग त्याने... इथे येऊन जाहिरात करून माझं कुंकू पुसून गेला ग! आता मला सवाष्ण म्हणून नाही ग जाता येणार... तिकडेच परस्पर खपला असता तर इकडे कुणाला काही कळलं सुद्धा नसतं... आता मला कुणी सवाष्ण म्हणून नाही ना बोलावणार?? कुणी ओटी नाही भरणार... सांग ना सुधे!"

गोदाला उमाळा दाटून आला... आणि सुधाचे डोळे झरू लागले.

तिथून उठणाऱ्या भावजयींनी एकमेकींकडे पाहून डोक्यावर परिणाम झाल्याची खूण केली. जीना उतरणाऱ्या भावजयींचा संवाद गोदाक्का आणि सुधाला विषण्ण करून गेला. एक भावजय म्हणत होती..

"काय ग बाई ते हापापलेपण? कढीवडे आणि खिरीची नुसती चटक लागलीये जिभेला..."

दुसरी चुकचुकत म्हणाली ..

"नाहीतर काय! नवरा गेल्याचं मुळी दुःखच नाहीये या बयेला.. खिरपुरीचे कसे ह्याचीच चिंता..."

त्यांचे ते टाळी देत हसणे सुधाला आतापर्यंत पोखरत गेलं... ती भरल्या डोळ्यांनी गोदाक्कांकडे पाहत होती... गोठल्या डोळ्यांची भावविहिन गोदाक्का आता जो कधी नवरा नव्हताच अश्या नवऱ्याची विधवा होती... आणि तिचे सांत्वन करणारी सुधा ,परागंदा झालेल्या ... सोबत नसलेल्या नवऱ्याची सवाष्ण......
✒️ यशश्री रहाळकर








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!