फॉलोअर

रविवार, २ जून, २०१९

प्रेषिअस स्टोन

                  'बॅचलर्स पॅराडाईज क्लब' नावाप्रमाणेच उच्चभ्रू रिटायर्ड तरीही एकाकी म्हाताऱ्या पण मनानं तरुण स्वच्छंदी लोकांचा क्लब ... याचे बहुतांश मेंबर अविवाहित होते.शिवाय विधुर ,घटस्फोटीत वगैरे सिंगल्स येथे दिवसरात्र पडीक असत.कॅरम, रमी, चेस सतत मांडलेले असे.....क्लबच्या मालकाने खाण्यासोबत पिण्याचीही सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था केलेली होती.....त्यामुळे अनेक उच्चपदस्थ रिटायर्ड म्हाताऱ्यांची येथे वर्दळ असे.
                            या सगळ्यांची अत्यंत आवडती व्यक्ती म्हणजे रणजीत वाघमारे.......रणजीत साहेब सी.बी.आय.मध्ये आयुष्य काढलेले आणि अत्यंत नावलौकिक प्राप्त केलेले प्रामाणिक अधिकारी... ह्या चटोर म्हाताऱ्यांच्या क्लबला दर शनीवारी संध्याकाळी ते जरा बदल म्हणून भेट देत. रणजीत साहेब अजूनही नियमित व्यायाम वगैरे करून चपळाई राखून होते.. त्यामुळेच त्यांच्या वयाची दहा वर्षे वजा होत फारतर पन्नाशीचे ते वाटत.. उमदं व्यक्तिमत्व प्रसन्न चेहरा आणि प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी ... क्लबला सगळे त्यांची वाटच पाहत. एकदा ते आले की सगळे त्यांच्याभवती कोंडाळ करीत नी एखादी त्यांनी सोडविलेली केस सांगण्याचा आग्रह करीत. रणजीत साहेबही एखादी कथा सांगावी तसे काही गुन्ह्यांच्या कथा सांगत ... सगळे रंगून जात.त्यांच्या गुन्ह्याच्या उकलीपूर्वी "कोण बरं असावा गुन्हेगार?"असं कोडं ते विचारीत.. मग तेथील म्हातारी डोकी लावत बसत... चषक उंचावले जात. टाळ्या नी हश्यात सारेच बुडून जात.
                      अश्याच एका शनीवारी सगळ्यांना रणजीत साहेबांच्या भेटीचे वेध लागले होते... नेहमीप्रमाणे पाच वाजता ते आले नी सगळ्यांनी जोशात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं... welcome drink चा एक राऊंड झाला नी सगळे उत्सुकतेने कथेची वाट बघू लागले.रणजीत साहेब गंभीरपणे सांगू लागले,"कधीकधी गुन्ह्याची उकल करणे दुरापास्त होऊन जाते..विशेषतः खुनाची ... कोणताही खून सिद्ध करायला दोन गोष्टींची गरज असते...." त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सारे म्हातारे एकसुरात उत्तरले,"हेतू आणि हत्यार"...रणजीत साहेब खुश होत म्हणाले,"बरोब्बर! जमलं राव तुम्हाला."पुन्हा मूळ कथेकडे वळत म्हणाले,"आज मी सांगणाराय त्या खुनाच्या केस मध्ये ना गुन्हेगाराचा उद्देश कळत होता ना गुन्ह्याचे हत्यार.माझ्या आयुष्यातील अत्यंत किचकट केसेस पैकी एक म्हणजे मालपाणी मर्डर केस."
                        साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वीची ही केस...मालपाणी कुटुंबातील धाकट्या सुनेला एका सकाळी नोकर नेहमीप्रमाणे बेड टी द्यायला गेला तर ती उठलीच नाही.... पुढे सगळे सोपस्कार पार पाडत .....ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. झोपेतच हृदय बंद पडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ह्या साऱ्याला सासरच्या मंडळींचा जोरकस पाठिंबा असला तरी सूनबाईंच्या आईवडीलांनी मुलीचा खून झाला तसेच सासरच्यांची संशयास्पद वागणूक नमूद करीत गुन्हा दाखल केला. मालपाणी हे हिरे आणि मौल्यवान रत्ने ह्यांच्या उद्योगातील अत्यंत प्रसिद्ध कुटुंब, मोठे राजकीय लागेबांधे म्हणूनच ही केस अधिक संवेदनक्षम मानली गेली. त्यात मृत सूनबाईंचे वडील मेहता बिल्डर हेही मोठे प्रस्थ... मग काय मीडियाला ऊत आला. पेपरमध्ये वाट्टेल ते छापून येऊ लागलं... अखेरीस ती केस अधिक तपासासाठी सी. बी. आय.कडे सोपविण्यात आली.. पर्यायानं माझ्याकडे आली. तपासाची चक्रे फिरू लागली....
                         मृत आभा राजेश मालपाणी ,वय 34, कुठलाही गंभीर आजार नाही,तब्येत उत्तम 4 महिन्यांची गर्भवती...??? पोस्ट मॉर्टेम मध्ये ठोस काहीही हाती आलं नाही.. मृत्यू रात्री 2 वाजता हृदय बंद पडून झाला होता... कुठल्यातरी गोष्टीची सौम्य ऍलर्जी असावी.... मात्र कोठेही विषबाधा/वळाचे/माराचे डाग नव्हते.पोटात किंवा मेंदूत विष आढळले नाही. मृत्यू नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.कागदोपत्री माहिती आणि फोटोंचा नीट अभ्यास करून मी मृत आभाचे आईवडील मेहता बिल्डर ह्यांची भेट घेतली.सर्वसाधारणपणे एकुलती एक लेक गेल्यानं जी काही अवस्था होते आईवडिलांची इथे तशीच होती. मेहता पती पत्नी पार कोलमडून गेले होते.त्यांच्याशी संवाद साधतांना काही गोष्टी मी नमूद केल्या... मृत आभा विवाहाच्या 13 वर्षांनंतर गर्भवती होत्या, त्या ही बातमी समजताच खूप खुश होत्या.त्या त्यांचे सासरे धनेश मालपाणी यांची लाडकी सून होत्या.धनेश मालपाणी यांना त्यांच्या जोतिष्याने आभाला मुलगा अर्थात घराण्याचा वारस होईल ... असे सांगितले होते. ...त्यामुळे दोन्ही कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता.
              या सगळ्यातून एक महत्वाची गोष्ट मी नमूद गेली की ..इतके वर्षांनी गर्भवती असल्याने आनंदात असणारी स्त्री आत्महत्या करूच शकत नाही. त्यामुळे हा पर्याय संपला.मी मेहता पतीपत्नीचा निरोपघेण्यापूर्वी त्यांना कुणावर संशय आहे का ?असे जुजबी विचारले...एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर त्यांचा संशय नव्हता मात्र त्यांची लेक मृत्यूपूर्वीच्या संध्याकाळी दोघांना भेटून, गप्पा मारून आनंदात गेली होती.....तिचा असा अचानक मृत्यू संशय निर्माण करणारा होता.तेथून निघतांना मिसेस मेहता निरोपाचे बोलल्या,"आभाच्या जावेचा राग होता तिच्यावर...जावेला 3 पोरीचं ...त्यात आमची आभा सुंदर ,हुशार ,सासऱ्यांची लाडली..."
                              तपासाच्या सुया आभाच्या जावेकडे वळवून आम्ही मालपणींच्या घरी गेलो. आभाचा मृत्यू झाला त्या रात्री तिचे सासरे धनेश मालपाणी परदेशात होते...त्यापूर्वी महिनाभर आधीच ते दुबईला कामानिमित्त गेले होते...चार पाचच दिवस आधी नवऱ्याला म्हणजे आशिष मालपाणी ला मुंबईला जावं लागलं...कामानिमित्तच .हा योगायोग जुळून आला होता की घडवून आणला होता?? घरातील सगळ्यांचे जबाब नोंदवून घेतले ...मालपाणी कुटुंबीय आभाचा मृत्यू नैसर्गिकच होता असे एकमताने म्हणत होते.आभाची जाऊ अगदीच गबाळी,अडाणी आणि अखंड घरकामांत बुडालेली अर्थात आभाच्या अगदी विरुद्ध होती...त्यात ती गरीब घरची.आभा मात्र उच्छभ्रू घरातील पार्टी, क्लब असे सर्व छंद जोपासणारी,सुरेख,नीटनेटकी... त्यातही दागिन्यांची आणि matching ची प्रचंड आवड असणारी होती. "आभाचे घरातील नोकर माणसांशी सुद्धा पटत नव्हते...शिष्ट ,हट्टी आणि पार बिघडलेली होती तीे"...जाऊबाई रागाने बोटे मोडीत सांगू लागल्या. गंमत म्हणजे आभाचे पती आशिष आणि दिर सोमेश यांच्यातही कमालीची तफावत होती...अर्थात दोन भावंडे सारखी असतात असे काही नसले तरी दोघांची खाण वेगळीच होती...एकंदर वागणूक,रूप आत्मविश्वास, या सगळ्यात आभाचा पती आशिष सरसच होता . त्यामुळे व्यवसायाची मुख्य जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती.
                             आम्ही तपास थांबवावा म्हणून मालपणींकडून दडपण आणले जात होते तर गुन्हेगार तात्काळ पकडलाच गेला पाहिजे म्हणून मेहता इरेस पेटले होते. मृत आभा मृत्यूपूर्वी 3/4 दिवस कुठे गेली काय केले याचा एक रिपोर्ट आम्ही बनविला...त्यात अनेक किटी पार्टी ,क्लब वगैरे होते.सगळीकडे अनेकांची भेट घेऊन आभाचे काही फोटोग्राफ्स मिळवले...काही लोकांचे जबाब नोंदवले ..आभा मृत्यूपूर्वीच्या दिवसांत खुश होती असेच निष्पन्न झाले.जे काही घडले होते ते घरातच...मग आम्ही नोकर मंडळींना परस्पर बाहेर भेटून तपास वेगवान केला.सोमेश आणि आशिष हे सावत्र भाऊ असून त्यांचे अजिबात पटत नव्हते.गावाला जाण्यापूर्वी आशिषचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले होते.आभाच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सासरे धनेश मालपाणी परत येणार होते.... त्याप्रमाणे ते आलेही.सर्वांत अखेरीस घरातील जुन्या नोकराने डोळे पुसत आपले मालक किती सद्गुणी दयाळू आहेत पण दुर्दैवी आहेत...नशिबात सुख नाही असे विधान केले.हा नोकर गेली 40 वर्षे धनेश मालपाणी ह्यांच्याकडे कामाला होता..."शेठजींच्या दोन्ही पत्नी अशाच एका रात्री झोपेत गेल्या...शापित आहे घर शांत करायला हवी." नोकराने सांगितले.....आम्ही उडालोच.
                           रणजीत वाघमारे साहेब कथा रंगत जात असतांना मध्येच थांबले...आपलं ड्रिंक संपवून सगळ्या श्वास रोखून थांबलेल्या म्हाताऱ्यांकडे पाहत म्हणाले...,"अनेकांकडे हेतू होताच आभाला मारण्याचा...कोण असेल बरं खुनी??" सारे म्हातारे सराईतपणे उद्गारले ,"खुनाचे हत्यार तर सापडू दे!" मोठ्याने गडगडाटी हसत रणजीत साहेब पुढील कथेकडे वळले.
क्रमशः......(खुनी कोण???पुढील भागांत)
© यशश्री रहाळकर
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!