फॉलोअर

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

संसारसुख

                        विभावरी, वेदांती आणि वेदिका तिघी बहिणींपैकी वेदिका माझी वर्गमैत्रीण, बालमैत्रीण किंवा अगदी जीवाच्या आतली पक्की मैत्रीण म्हणा हवं तर..
माझं आणि तिचं घर समोरासमोर, माझी आई आणि तिची आई एकाच शाळेत शिक्षिका , माझा आणि तिचा वाढदिवस एकाच महिन्यात, आम्ही दोघी घरातले शेंडेफळ... एव्हढे सगळे साम्य असल्यामुळे... स्वभावाने टोकाच्या विरुद्ध असलेल्या आम्ही जिवलग मैत्रिणी सहज झालो.एकतर मी तिच्याकडे किंवा ती माझ्याकडे पडीक असायचीे. त्यात मी फार कमी बोलणारी, फार भोचक प्रश्न कधी न पडणारी... म्हणून मी वेदिका उर्फ वेदू च्या दृष्टीने सोयीची होते.आमच्या घरात आहेत तसे बाबा तिच्या घरी का नाही? आम्हा सगळ्यांसोबत दादा-दादी तिच्याकडे मात्र नाना-नानी असे का? वर्गातल्या इतर मुली करायच्या असल्या पंचायती मी केल्या नाहीत कधीच... वेदू धीट ,स्पष्टवक्ती मी मवाळ नि बुजरी... आम्ही मोठ्या होऊ लागलो तसतसे एकमेकींना आपापली सारीच गुपिते सांगू लागलो. विभावरी ताई दहा वर्षांनी आणि वेदांती ताई आठ वर्षांनी मोठी... तश्या बऱ्याच मोठ्या होत्या... विभावरी ताई मोठ्ठी बहीण असावी तशी शांत... फार सोसलं असावं तिनं ,असं वाटावं इतकी गरीब. वेदांती ताई जराशी हट्टी पण सगळ्यात कळस माझी वेदू... भांडकुदळ, आपलं तेच खरं करणारी...आली अंगावर अन घेतलं शिंगावर अशी.तिच्या ताईला बघून शिट्टी मारणाऱ्या मुलाला तिनं एकदा जाम बडवलं... तेव्हापासून सगळे तिला फटकून असायचे.
                ह्या त्रयमूर्तीची आई विद्या मावशी अर्थात आमच्या देव बाई. देव बाई म्हणजे मूर्तिमंत प्रेम मात्र ते विद्यार्थ्यांसाठी.... इतर वेळी तिची करारी नजर आणि खांद्यावरचा पदर कधी ढळला नाही. देव खरंतर त्यांच्या वडिलांचे आडनाव...त्यांना जवळपास अक्खा गाव ओळखायचा...त्यांनी मुख्याध्यापक म्हणून जवळजवळ  20 वर्षे काम पाहिलेले, अनेक मुलांना त्यांनी घडवलं.. अनेकांना शब्द टाकून नोकरी व्यवसायास लावलं. गावातल्या एकुलत्या एक शाळेतले ते मोठे सर म्हणून सगळेच त्यांना मान देत. त्यांची मुलगी म्हणून विद्या मावशीला सगळे देव बाईच म्हणत.तशी ती अगदीच अलिप्त असे...जुजबी बोलायची. बायकी म्हणाव्यात अश्या हळदीकुंकू ,बारसे वगैरे कार्यक्रमात कधीच नसायची. कुंकू आणि मंगळसूत्र मात्र असायचे. तिचा विषय संसारी बायकांमध्ये हमखास निघायचा.. मग बायका तिच्या 'नालायक' नवऱ्याला शिव्या देऊन बोटे मोडत... गाढवाला गूळ पचला नाही म्हणत. विद्या मावशी बद्दल सगळ्यांनाच माया होती. ती भाषेची शिक्षिका आणि मी भाषेत बरी... मग मी काहीबाही लिहिले की तिला नेऊन दाखवी... ती तपासून देई चुका सांगे. तिच्याकडे हमखास खाऊ मिळायचा. ती सुगरण होती... सतत नवीन पदार्थ करून पहायची. काहीतरी विणकाम भरतकाम करत बसायची. फुलझाडेही भरपूर लावली होती घराभवती ... गजरे करून आम्हा मुलींना देई पण स्वतः मात्र कधीच माळायची नाही.
                     आम्ही आठवीत होतो तेव्हाची गोष्ट... वेदू पाय आपटत आमच्या घरी आली. रागाने बेभान झाली होती... एका पानावर तिने स्वतःच पूर्ण नाव लिहिलं ' वेदिका इंद्रजित वेलणकर' आणि त्या कागदाचे बारीक चिटोरे केले. संतापाने धगधगती वेदू अंगार ओकत होती," ह्या माणसाचं नाव सुद्धा नकोय मला... तू पहाच मी.. मी नावच बदलून घेईन." अपमान तिरस्काराने दुखावली होती वेदू... वेदांती ताई आणि तिचा काहीतरी फुसकट वाद झाला अन् "वेदीका तुझा जन्म झालाच नसता तर बरं झालं असतं. तू आली नी बाबांनी घर सोडलं... तू पनवती आहेस"असं जहरी ताई बोलली होती. त्या रात्रभर वेदू घरी परतली नाही, माझ्याजवळ रडत बसली.नंतर घरी गेली ते मन मोडलेलीच .. विद्या मावशीने ताईला तिची माफी मागायला लावली पण वेदू ऐकणारी नव्हतीच. स्वतः च्या अठराव्या वाढदिवसाला तिने स्वतः चे नाव बदलून 'वेदिका विद्या देव ' असे करून घेतले.तिच्या मनातला वडीलांबद्दलचा संताप दिवसागणिक वाढत गेला. तिच्या ताईंसारखी करियरची वाट तिने मोठ्या देव सरांच्या सल्ल्याने निवडली नाही... तिचे निर्णय ती बेफिकीर पणे घेऊन मोकळी व्हायची. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घेतली हे तिने घरी फक्त घोषित केले... मोठे सर खूप चिडले...एकतर हे मुलीनं निवडावं असं क्षेत्र नव्हतं आणि त्यातही त्यांचे मत वेदूने विचारलंच नव्हतं...सर संतापात बोलून गेले, "विद्या... बघ बघ तुझ्या बेलगाम पोरीकडे... बापाचं रक्त रंग दाखवतंय" झालं वेदूची दुखरी नस दबली पण गप्प बसेल ती वेदू नाहीच,आजोबांच्या समोर हातवारे करत वेदू गरजली,"तेच मान्य नव्हतं ना पण त्या नीच माणसाला.. ," आजोबांनी सटकन वेदूच्या थोबाडीत लगावली.तिथून पुढे वेदू कुटुंबापासून अधिकाधिक तुटत गेली. मला म्हणाली, " रक्तच काय त्या नीच माणसाचे dna वेगळे करता आले असते ना तर तेही मी केले असते." वेदू औरंगाबादला राहून शिकू लागली... ती पार्ट टाइम जॉब करायची जमेल तसे फी, पुस्तके वगैरे साठी लागलेले मावशीचे पैसे परत करायची... विद्या मावशीला ते मुळीच आवडत नव्हते... पण वेदू ऐकणार नाही म्हणून एक अकाउंट उघडून त्यात ती बिचारी ते जमा करायची. अगदी दसरा दिवाळी पुरती वेदू घरी येई... माझ्या मात्र ती अखंड संपर्कात होती. दोन्ही ताईंची योग्य वयात सुस्थळी लग्ने झाली... आजोबांच्याच पुढाकाराने झाली... वेदूने आपल्याच एका कलीगशी लग्न केलं... तो बंगाली बाबू असूनही देव सरांना आवडला. ते तासनतास गप्पा मारत बसत.कुणाच्याही लग्नात त्यांचे बाबा इंद्रजित वेलणकर आलेच नाहीत... लग्नातच काय ते कधीच परत फिरकलेच नाहीत.
                         प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या गतीने सरकत होतं. देव सर ,नंतर वर्षभरात त्यांच्या पत्नी निर्वतल्या... वेदूची मोठी ताई मुंबई दुसरी पुण्यात होती... आमचेही आयुष्य मार्गी लागले... एकमेकांशी फोनवर ऑनलाइन आम्ही सतत संपर्कात असायचो.माझ्या पतीदेवांची बदली औरंगाबाद ला झाली आणि मी पहिला फोन केला तो वेदुला... लगेच तिने रेंटने फ्लॅट पाहून दिला... तिच्या घराजवळचा. माझ्या दोन्ही मुलांच्या ऍडमिशन तिच्या मुलाच्या शाळेत करून घेतल्या.... दोन दिवस सुट्टी टाकून माझं घर मस्त लावून सुद्धा दिलं.... मी साधी ग्रॅज्युवेट गृहिणी पण वेदू कंपनीत मोठ्या पोस्ट वर... ही दरी आमच्या मैत्रीच्या आड आली नाही... वेदूने येऊ दिली नाही. जेव्हढ्या हक्काने गाडी काढून खरेदीला न्यायची तेव्हढ्याच हक्काने जेवायला येतेय अमुक पदार्थ कर म्हणूनही सांगायची. तिची आई विद्या मावशी आपल्या तिन्ही लेकींकडे आलटून पालटून जायची... कुणाला भार नको म्हणून पैसेही द्यायची. खरेतर तिन्ही लेकींचे तिच्यावर खूप प्रेम होते.अधून मधून सेवाभावी संस्थेतही सेवा द्यायला जायची.वेदूकडे असली की बराच वेळ माझ्याकडे यायची... मग भाजी निवडत काहीतरी विणत आमच्या गप्पा रंगायच्या. वेदू गंमतीने म्हणायची सुद्धा ,"आता तू माझी मैत्रीण कमी अन आईची जास्त झाली आहेस." खरंतर सगळं असून मावशी बरेचदा एकटी पडलीये असं वाटायचं. एकदा सहज बोलून गेली .. ,"मला ना मस्त मनापासून संसार करायचा होता तुझ्यासारखा..मात्र नशिबात नव्हता . नोकरी काय नाईलाजानं केली ग!" हळूहळू मावशीचं येणं कमी होत गेलं हल्ली ती बराच वेळ सेवा सदन ला असते असं कळलं..... आणि आणि एक दिवस त्सुनामी घेऊन आला.मावशीनं घर घेतलं होतं स्वतःच आणि त्यात तिने नवा संसार मांडला होता.... जुन्याच नवऱ्यासोबत इंद्रजित वेलणकर सोबत नवा संसार.... हे सारं तिनं स्वतः मला फोन करून सांगितलं... मी थंडगार झाले. "माझं घर पहायला ये",म्हणून आग्रहाने बोलावलं सुद्धा.
                     वेदूने तिच्या दोन्ही ताईंची तातडीची बैठक बोलावली... त्या माणसासोबत राहणार असेल तर आई मला मेली हेही सांगितले. तिघी बहिणींचा चांगलाच पारा चढला होता. विशेषतः एरव्ही शांत असणारी विभावरी ताई भयंकर संतापली होती. या साऱ्या कौटुंबिक वादात खरंतर मी त्रयस्थ पण सारेच माहीत असल्याने कदाचित  प्रत्येकाला मी जवळची वाटत असावी.इंद्रजित वेलणकर हा माणूस बाप आणि नवरा म्हणून नीच होता.... प्रचंड संशयी, संतापी. विद्या मावशी सारख्या सात्विक सोज्वळ बायकोला तो मारहाण करायचा.. प्रसंगी बांधून ठेवायचा. वेदूच्या वेळी दिवस गेल्यावर तर हे मूल माझे नाहीच म्हणून मोकळा झाला...एका संध्याकाळी मावशीला  इतकं मारलं की तिचे वडील देव सर कशीबशी तिला जिवंत घेऊन आले. पुढे इंद्रजित वेलणकर कधीही परतला नाही ना त्यांचा कधी घटस्फोट झाला. त्यांनी कुणाशीतरी लग्न केलं मुलगा आहे असे मोघम त्रयस्थाकडून कळले होते. सेवा सदन मध्ये तो विद्या मावशीला भेटला असावा... त्याची सेवा करता करता काय झालं काय ठरलं त्या दोघांनाच माहीत पण त्यांनी पुन्हा संसार सुरू केला. वेदू आणि ताईंनाच काय जगातल्या कोणत्याच मुलांना हा विचित्र संसार पटणारा नव्हता. विभावरी ताई तर म्हणालीही, "पुन्हा मारहाण करून, हातपाय मोडून परत पाठवले नाही म्हणजे मिळवलं. राक्षस आहे तो ..." बरं अजूनही ते दोघ कायदेशीर पतीपत्नीच ... त्यामुळे तीही वाट बंद झालेली. अखेर मी जाऊन भेटून परिस्थितीचा अंदाज घ्यावा असे ठरले.
                        मावशीला फोन करून मी येणार असल्याचे सांगितले... तिचा आनंद शब्दांतून ओसंडून वाहत होता... गारखेडा परिसरातल्या तिच्या घराचा पत्ता तिनं दिला. सोबतीला बळ म्हणून यजमानांना बरोबर घेतलं...मी खरंतर भीती भीतच तिच्या घरी जाणार होते आजवर इंद्रजित वेलणकर बद्दल इतकं वाईट ऐकून होते की सगळ्या व्हीलनच्या जागी मी त्यांनाच पाहत असे.सुरेख प्रशस्त 3 bhk फ्लॅट होता ... दारावर सौ विद्या आणि इंद्रजित वेलणकर अश्या नावाची सुरेख पाटी... दारापुढे सुरेख रांगोळी. बेल वाजवतात मावशीनं दार उघडलं मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला... तिनं सुरेख निळी जरीची साडी नेसलेली, हातभर बांगड्या, मोजकेच पण चार दागिने आणि चंदेरी केसांवर सुरेख मोगऱ्याचा गजरा... ती प्रसन्न होती नेहमीसारखी गप्पा मारू लागली... इंद्रजित माणूसही वाटला तेव्हढा वाईट नव्हता... माझ्या यजमानांच्या अन त्यांच्या मस्त गप्पा रंगल्या. एखाद्या नवीन लग्न झालेल्या मुलीसारखं मावशीनं मला हाताला धरून घरभर फिरवलं. हे घर तिचं होतं तिच्या मनातलं तिनी नटवलेलं... तिने चार दुकान फिरून घेतलेले अबोलीे पडदे,नवीन designs भरलेल्या चादरी, देवघर ,टेरेस वर लावलेली फुलझाडं ,पुस्तकांचा कपाट वाचायची आरामखुर्ची आणि काय काय... हे सारं दाखवताना तिचा आनंद चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. अगदी सहज ती बोलून गेली,"आईचं घर तिचं होतं ग .. तो माझा संसार नव्हताच कधी" तिने जेवायचीच तयारी करून ठेवलेली...नवीन डिनर सेट मांडतांना हंसाच्या design चा डिनर सेट किती शोधला वगैरे गप्पा झाल्या. झक्कास खव्याची पोळी, कोथिंबीर वडी, कढी खिचडीचा बेत होता... हाताला तर चव होतीच तिच्या... लोणची चटण्या आवर्जून वाढल्या तिनं... त्याच्याही बरण्या देखण्या... भरभरून बोलत होती. इंद्रजित वेलणकर सुद्धा तिच्या नीटनेटकेपणा चं स्वयंपाकाचं भरभरून कौतुक करत होते.खरं सांगू, तिला जुन्या डागण्यांचे जाब विचारून दुखवावं वाटलंच नाही. निघतांना माझी ओटी भरली... गुपित सांगितल्या सारखं हलक्या आवाजात म्हणाली, "मुलींना म्हणा मला समजून घ्या... आई म्हणून नाही तर बाई म्हणून."
             घरी परततांना माझ्या मनात आलं तिचा निर्णय जगाच्या दृष्टीने चूक असेल, कदाचित व्यवहाराच्याही दृष्टीने बेजबाबदार असेल.... आता तिचा नवरा म्हातारपणी फुकटात सेवा करून घेतोय असेही वाटेल कदाचित....... तिच्या मुलींना विशेषतः वेदूला पटणार नाहीच... पण तरीही योग्य आहे. परतल्यावर मी वेदुला भेटले ... तिच्याच पद्धतीने स्पष्ट शब्दात तिला सांगितलं, " विद्या मावशी मजेत आहे. खरं सांगायचं तर सुखात आहे. इतके वर्षांत तिला जे हवं होतं ते तिला आता मिळतंय... तुमची सारी कर्तव्ये तिनं योग्य प्रकारे निभावली आहेत . तिच्या निर्णयाचा सन्मान करा...." वेदू नेहमीप्रमाणे तार सप्तकात ओरडली... ,"हवं ते मिळालं म्हणे! लाथा हव्या होत्या हिला त्या माणसाच्या... म्हातारचळ लागलाय का हिला? संसार करायचाय म्हणे?? काय कमी होतं ग हिला सांग ना!" मी तितक्याच शांतपणे उद्गारली," वेदू! प्रत्येकाच्या आनंदाची परिमाणं वेगळी असतात. त्यांना मनापासून संसार करायचाय ग! मागचं सगळं विसरून... मावशीचा आनंद आहे त्यात... शेवटी संसारसुख म्हणजे तरी काय ग! स्वतःचं इवल घर त्यात स्वतःचे स्वप्न भरून रंगवलेलं, नटवलेलं घरकुल... एकदा भेट तू मावशीला ,सुखात आहे ती... एक स्त्री म्हणून जमल्यास समजून घे तिला." माझं कर्तव्य मी पार पाडलं... वेदू कधीही जाणार नाही हे माहीत असून.प्रत्येक स्त्रीच्या हृदयाच्या कप्प्यात तिनं चितारलेलं संसाराचं चित्र असतं... ते अधिक उण वाट्याला येतं पण त्यातही ती समाधान मानते .एखादी क्वचित अशीही असते जिला उतारवयात संसारसुख अवचित लाभत...आनंदी राहण्यावर प्रत्येकाचा हक्क आहे ना!👍
🔏© *यशश्री रहाळकर*
                  

२ टिप्पण्या:

  1. कधी कधी चूक बरोबर बघण्यापेक्षा दृष्टीकोन आणि आपले सुख बघण महत्वाचं असत

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!