फॉलोअर

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

आयनवमी


 
" मेल्यांनो! कुठे फेडाल ही पापं.... इतकीे वर्षे बाई आठवत नव्हती ह्यांना, जिवंत असतांना नाही आणि गेल्यावर तर ....काय केलं ... पाहिलं हो जगानी ! आता ती झपाटतेय म्हणताहेत... आता पान लावायला , श्राद्ध घालायला सुचतंय का?"

रामप्रहरी आजीच्या तोंडाचा अखंड पट्टा सुरू होता. मी खुणेनेच काय झालं असं विचारलं त्यावर आईने देशमुखांनी आयनवमीच्या प्रसादाला बोलावले असल्याचे सांगितले. आजीचा सात्विक संताप लाव्ह्यासारखा आवेगाने कोसळत होता. तिला आवरण्यात अर्थ नाही हे जाणून आम्ही सगळे आपापल्या कामाला लागलो. जावे तर लागणारच होते..... नानासाहेबांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आमच्या 3 पिढ्या दबून घुसमटून गेल्या होत्या. घरातील कर्त्या पुरुषांनी नोकरी धंद्याचे कारण पुढे करत आजी ,आई आणि काकी ह्या स्त्री मंडळाला जायला सांगितले. कुणालाही खरेतर तिथं जायचंच नव्हतं... पण तोंड दाबून बुक्क्यांचा मार... आई आणि आजी बरोबर आमची स्वारी निघाली.... देशमुखांचा पेठेत भला मोठ्ठा महालच होता .. म्हणजे 3 मजली 20 खोल्यांचे प्रशस्त घर ... मी त्याला महाल म्हणायची. आज तीन की चार वर्षांनी आम्ही तिथे जाणार होतो.
                     पेठेतले नानासाहेब देशमुख म्हणजे मोठं प्रस्थ 2/3 वाणसामानाची दुकाने, शेती,  बिछायत, केटरिंग, मंगल कार्यालय आणि असे कित्येक मला माहित नसलेले यशस्वी व्यवसाय त्यांच्या कुटुंबाचे नावे जमा होते. घरी गडगंज संपत्तीचा ओघ, माणसांचा राबता आणि श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा सोस ... तसे सगळे कुटुंब आत्मीयतेने प्रेमाने वागणारे... कुणाचा अपमान करायचे नाहीत. नानासाहेब तर सढळ हातानी प्रत्येक अडल्या नडल्याला साह्य करत. माझे आजोबा निर्वतल्यावर तीन पोरे पदरी घेऊन निराधार झालेल्या माझ्या आजीला त्यांनी त्या काळात मोठी मदत केली होती. बाबा आणि काकाच्या शिक्षणाचा खर्च , आत्याच्या लग्नाचा बराच भार त्यांनी उचलला होता. अर्थात माझ्या स्वाभिमानी आजीने जमेल तसे ते परत केलेच पण तरीही संकटात सहाय्य करतो तो मोठाच नाही का! हे देशमुख कुटुंब आमचे खरेतर जवळचे नातेवाईक... नानासाहेब देशमुखांची प्रथम पत्नी बाई आजी म्हणजे माझ्या आजीची सख्खी बहीण. पण मला आठवते तशी ही बाई आजी एका पुतळ्यागत शून्यात नजर लावून बसलेली असायची. तिचे वयाच्या 14 व्या वर्षी नानासाहेबांशी लग्न झाले  वर्षभरात एक लेक झाली नि कुठल्याश्या आजाराने म्हणा, बाळंतरोगाने म्हणा किंवा आघाताने म्हणा ती दगड झाली. पुढ्यात ठेवलेले अन्न खायची तेही दिले तर "बाई अंघोळ करा" म्हटले की अंघोळ उरकायची पण सगळ्यात असूनही नसल्यागत परकी , एकटी, विमनस्क. तिची अवस्था पाहता नानासाहेबांनी दुसरे लग्न केले... लेकीलाही गरज होती आणि घरालाही... त्यात नानासाहेब म्हणजे कर्तबगार माणूस , पदरी गडी माणसे, आले गेले सगळे पहायला हवे म्हणून गृहिणी सुद्धा हवीच होती. गोदाक्का त्यांच्या द्वितीय पत्नी .. त्या सुद्धा आमच्या आजीची मावस बहिणच होत्या. त्यांना 4 मुले 3 मुली झाल्या परिवार वाढला... सगळे एकमेकांना धरून होते... मात्र सगळ्यांना बाई आजीची लाज वाटे .. तिला पुढे येऊ देत नसत, कुठल्याही कार्यक्रमात ती शून्यात नजर लावून अडगळीच्या खोलीत बसून असायची... तिच्या लेकीचं कन्यादान सुद्धा गोदाक्कांनी केलं... "पोटची पोर निरोप घेतांनाही बाईच्या डोळ्यांत पाणी नव्हतं" आजी सांगायची. 
                     देशमुखांच्या घराचा भला मोठा हॉल ओलांडून मागील अंगणात जाऊन आम्ही हातपाय धुतले. भल्यामोठ्या स्वयंपाकघरात सोवळ्यात पक्षाचा स्वयंपाक सुरू होता... खीर, वडे , कढी... ह्यांचे वास घरभर दरवळत होते. मधल्या खोलीत... तर्पण विधी सुरू होते... तिथून डावीकडे घरातल्या स्त्रियांची कुजबुज ऐकू येत होती. आम्ही तिकडे जायला वळलो... बाळंतिणीची खोली ओलांडली आणि अडगळीची खोली लागली .. क्षणभर आजी थबकली... आतल्या भकास वस्तूंमध्ये तिला बाई बसलेली दिसत असावी ... आजीने हात जोडले. त्या अडगळीच्या खोलीत फार कुणी जात नसावे... ज्या अस्तित्वाची जिवंतपणी कुणी दखल घेतली नाही त्या अस्तित्वाला अचानक मृत्यूपश्चात महत्व प्राप्त झाले होते.  आम्ही महिला वर्गाकडे वळलो... शांतपणे मिळेल तेव्हढ्या जागेत बसून घेतलं. गोदाक्का आजीच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागली.... कधीकाळी दागदागिने घालून , उंची साड्या नेसून मिरवणाऱ्या खळखळून हसणाऱ्या लेकी सुनांच्या पांढऱ्या फटक कपाळाकडे पाहून चर्रर्र झाले... मी आणि आई एकदमच एकमेकींकडे पाहिलं... गेल्या काही वर्षांत देशमुखांची बरीच वाताहत झाली होती. बाई गेल्यावर महिनाभरात नानासाहेब अचानक एके रात्री गेले... मध्यरात्री भीतीने पांढरा फटक पडलेला त्यांचा मृतदेह सकाळी मागच्या दाराशी पडलेला सापडला... तेच दार जिथून बाई आजीला कधीकाळी शेवटचे नेण्यात आले होते. आमची आजी आतडी पिळवटून सांगत राहिली पण कुणी तिचं काहीही ऐकलं नाही... 

" भरल्या कपाळाने गेली रे बाई... हळदी कुंकाचे सडे घाला, मळवट भरा हिरवा चुडा कोरी साडी नेसवून निरोप द्या....."

तेव्हा तिचं बोलणं कुणी मनावर घेतलं नाही... बाई आजी असून नसल्यासारखीच होती. ती नकोशी झाली असावी... तिच्या वेडेपणाचा कधी कुणाला त्रास झाला नव्हता... मात्र तिच्या प्रेतावर देशमुखांनी अन्यायच केला... मागच्या अंगणात जिन्याखाली एक दार होते... गडी माणसे नोकर चाकर वगैरेंना येण्याजाण्यासाठी... एव्हढ्या मोठ्या वाड्याची मालकीण ... आयुष्यात कधीही तिने कुणाला काही मागितले नाही... तिला शेवटचे नेले ते त्या मागच्या दाराने... घरातले नकोसे समान बाहेर काढून घ्यावे तसा फार कुणाला न कळवता तिचा अंत्यविधी उरकला... दिवसवाऱ्यांना अन्नदान, संस्थांना देणगी देऊन मोकळे झाले देशमुख... काय तर म्हणे तिला सख्खा मुलगा कुठे होता? एकुलती एक लेक तिच्या सासरी सुखात होती... 

"घर तर होते ना रे तिचे... घरातल्या मुक्या गाईलाही कुणी असे नेत नाही रे! काय पाप होतं तिचं तिने जन्मभर शिक्षा भोगली... पण आता तरी सद्गती मिळू द्या तिला...." 

माझी आजी देशमुखांशी भांडली.... तिच्या बहिणीसाठी... बाई आजीसाठी... आमची आर्थिक परिस्थिती, त्यांचे उपकार, आमचं नातं कसला कसलाही मुलाहिजा न बाळगता.... कुणीही तिचे ऐकले नाही. एखाद्या निराधात शवासारखे बाई आजीला मागच्या दाराने नेऊन जाळून टाकले... कुणाच्याही डोळ्यांत दोन अश्रू नव्हते उलट बारी सुटली असेच सारे म्हणत होते... तिची सख्खी लेक तेव्हढी रडली... मात्र ना तिला 13 दिवस ठेऊन घेतलं ना दुखवटा काढला ना रडकी बोळवण केली... दोन आश्रमांत पावत्या फाडल्या आणि देशमुखांचं बाई प्रती कर्तव्य संपलं. आजी अद्वातद्वा बोलून देशमुखांच्या घरातून बाहेर पडली आणि संबंधांमध्ये कायमची कटुता निर्माण झाली..... घरी येऊन आजी धाय मोकलून रडली...

"मागच्या दाराने नेताय सवाष्णीला आता  त्या घरातल्या सगळ्याच माघारतील... सगळ्याच माघारतील..."

आजीच्या त्या जाणिवेचा , त्या शब्दांचा नेमका अर्थ काळाने उलगडून दाखवायला सुरुवात केली. बाई आजी नंतर महिन्याभरात नानासाहेबांचा विचित्र परिस्थितीत अपमृत्यू झाला... त्यानंतर काही महिन्यांतच धाकटा लेक बाळू काका ऍक्सिडेंटमध्ये जागीच ठार झाला. व्यवसायाची पकड सैल झाली... आश्रित म्हणून आलेल्या चुलत्यांनी दुकान आणि घराचा वरचा मजला बळकावला... कोर्ट कचेऱ्या सुरू झाल्या.... दोन जावई अचानक दगावले.... लक्ष्मीला उतरती कळा लागली... आता बरेचदा बाई कुणाकुणाला दिसू लागली... बाईचा आत्मा असण्यापेक्षा तिच्यावर केलेल्या अन्यायाची भीती अधिक वाटत असावी. एका गड्याला विहिरीजवळचे झाड कापताना विहिरीत बाई आजी दिसली... त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडून गेला... पुढे हे प्रकरण दाबायला देशमुखांना मोठी किंमत मोजावी लागली... पोलीस, त्या गड्याच्या घरचे, डॉक्टर कुणाकुणाची तोंडे बंद करावी लागली... थोरल्या लेकाला काय झाले कोण जाणे त्याने त्याच अडगळीच्या खोलीत फास लावून घेतला. एका लेकाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला तर एकाचे तर त्याहून दुर्दैव.... त्याची बायको मित्राचा हात धरून संसार टाकून पळून गेली... होती नव्हती सगळी इज्जत उधळल्या गेली.... घरभर पांढऱ्या कपाळाच्या दुःखाने पिळवटून निघालेल्या लेकी सुनांची आक्रोश भरून राहिले....  बाईच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कोणातरी जोतिष्याने आय नवमी करण्याचा सल्ला दिला ... आयनवमी किंवा अविधवा नवमीला पितृपक्षातील सवाष्ण स्त्रीच्या पितृकार्याचा दिवस... खरेतर पतिनिधनानंतर आयनवमी करण्यात अर्थच नसतो मात्र... बाई आजीचे कोणतेच कार्य सुवासींनीचा मान सन्मान लाभून झाले नव्हते म्हणून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी हा विधी सुचवण्यात आला असावा... 11 वर्षांचा गोदाक्कांचा नातू तर्पण करत होता... गुरुजी त्याला म्हणायला सांगत होते...

"आमच्या चुकांना पोटात घे आमच्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली माफ कर... शांत हो !"

त्या मंत्रांच्या अनाहूत नादाने घर भारलं गेलं होतं..... बाई आजीच्या नावाने एक गरजू स्त्री सवाष्ण म्हणून बसली होती.... तिला हिरव्या बांगड्या साडी चोळी, सोन्याचे मणीमंगळसूत्र, देऊन ओटी भरली.... कपाळी कुंकू लावताच ती साधारण बाई तेजस्वी दिसू लागली.... तिचे हावभाव फरक जाणवण्या इतपत बदलले... डोळ्यात बाई आजीची झाक... काही वेळ ती तशीच शून्यात बघत राहिली... अचानक ती सारे सामान बाजूला सारत उठली आणि माझ्या आजीजवळ येऊन तिला कडकडून गळामिठी मारली... सगळे अवाक होऊन पाहत राहिले... कोण कुठली ही बाई ना ओळख ना पाळख थेट गळ्यात काय पडतेय..... देशमुखांकडची एकुलती एक सवाष्ण असणाऱ्या बाई आजीच्या लेकीला  माझी आजी शांतपणे म्हणाली...

"वसू मळवट भर आईचे...."

थरथरत वसू आत्याने त्या बाईचा मळवट भरला. आजी पुढे तिचा हात धरून तिला अडगळीच्या खोलीत घेऊन गेली.... तिच्या पाठीवर मायेनं हात फिरवत तिला म्हणाली...

"बाई पुढल्या दाराने जा हो!  आता मनात काही ठेऊ नको." 

बाईने मान डोलावली... समोरच्या दारात हळदी कुंकाचे सडे घातले ... त्यावरून चालत चालत ती बाई घराबाहेर पडली... क्षणभर थांबून मागे वळून पाहिले आणि लख्खकन काहीतरी निघून जावे तशी ती  सवाष्ण म्हणून बोलावलेली स्त्री घेरी येऊन कोसळली... झाल्या प्रकाराने जेवणाची इच्छाच संपलेली होती... शास्त्राला प्रसाद घेऊन आम्ही घरी परतलो....माझ्या मनांत प्रश्नांचे भांडार होते...

वयाच्या बावीसाव्या वर्षी ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या... आणि नवऱ्याच्या माघारी मुले मोठी करणाऱ्या माझ्या आजीला मी निलाजरेपणाने विचारले...

"खरंच का ग सवाष्ण जाण इतकं भाग्याचं असतं... इतकी शक्ती असते का सवाष्ण बाईत?? "

माझ्या प्रश्नावर किंवा स्वतःच्या दुर्दैवावर जरासा विचार करत आजी म्हणाली...

"नवरा किंवा बायको पैकी एक आधी एक नंतर कुणीतरी जाणारच.... त्यात भाग्य दुर्भाग्य असं काही नसतं ग.... पण एक सांगते तुला ...आयुष्यभर लक्षात ठेव... प्रत्येक जीवाला आदराने सन्मानाने वागावं. वेडा असू दे, मुका असू दे किंवा कुणीही... त्याच्या हक्काचं त्याला मिळायलाच हवं.... "

मला कितपत समजलं असं वाटून आजी पुढे म्हणाली..

" आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाचे कर्जदार असतो... कुणाचं क्षणांचं कर्ज असतं, कुणाचं धनाचं, कुणाचं कष्टाचं, कुणाचं कर्तव्याचं.... आज मी माझ्या कर्तव्याच्या कर्जातून मुक्त झाले... बाई असशील तिथे सुखी रहा ग! " 

म्हणत आजीने पदराने डोळे पुसले.

🔏©️ यशश्री रहाळकर





७ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर कथा ...शेवट तर खूपच छान .... गूढकथा पण शेवटी शिकवून जाणारी 🙏👍

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर गं !
    आपण ज्या विश्वात राहतो, मूलतः ज्या समाजाचे जाती , धर्म , वंश , रूढी ,परम्परा यांचे lable लाऊन जगतो असेच म्हणूयात त्या सर्वांचेच आपण काहीतरी देणे लागतो. कुठल्याही व्यक्तीचे वजा मानवाचेच व्यंग , स्वभाव , गुण-दुर्गुण , शारिरीक क्षमता आणि इतरही बरेच अशा तराजूत बसवून कधीच तोलू नये. जर आपण कुणाला प्रशंसा, आदर मायेच्या ओलाव्याचे चार शब्दही देऊ शकत नसेल तर त्या व्यक्तीचा अपमान जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही आपण करू शकत नाही. खरंच लाख मोलाचा संदेश.
    आस्तिक, नास्तिक, तंत्रज्ञान, अंधश्रद्धा या वादात न पडता अगदी भाबडया मनानेच म्हणेन मी की , जिवीत किंवा मृत कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्यानंतरचा भयावह परिणाम व त्याच भावनांचा आदर व जपणूक करून मिळणारे वरदान यांचा समतोल किती रंजकतेने मांडलास तु .
    बहिणीची व लेकीची माया याला कुठेच तोड नाही याचेही वर्णन कळत न कळत खूप काही सांगुन जाते.
    माणुसकीपुढे गडगंज वैभव पण किती मातीमोल असते याची शिकवण देत काळीज पिळवटून टाकणारी ही कथा लवकरच गगनभरारी घेईल.
    खूप खूप शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम... डोळ्यसमोर सगळं तसंच उभ राहिले बघ

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!