फॉलोअर

बुधवार, १९ मे, २०२१

अदृष्य भिंती


डॉ. अनुप्रिता आज सकाळच्या नाश्त्यापासूनच खूप disturb झालेल्या असाव्यात.. रोज सकाळी न्युजपेपर चाळत चहा, नाश्ता करायची सवय त्यांनी गेली 20 वर्षे जोपासली होती .. एकतर नंतर त्यांना उसंत मिळत नसे आणि पेपरही हाती लागत नसे. आज त्यांनी पेपर उघडला आणि स्वप्नालीच्या आत्महत्येची बातमी दिसली आणि मन विदीर्ण झाले... मात्र त्यांना नवल वगैरे मुळीच वाटले नाही. उलट हे कधीतरी होणे अपेक्षितच होते नाही का? 

डॉ. अनुप्रिता  होमिओपॅथिक डॉक्टर होत्या, मानसिक आजारांवर उपचार हा त्यांचा विशेष अभ्यासविषय असून गेली वीसेक वर्षे अनेकांना त्यांच्या औषधाने उत्तम गुण आला होता. त्या एक उत्तम कॉन्सिलर नक्कीच होत्या त्यामुळे सतत पेशन्ट्सची गर्दी असायची... शिवाय अनेक दुखण्यांच्या मुळाशी मानसिक ताणतणाव असतात विशेषतः जुनाट दुखणी, त्वचेच्या समस्या, ऍलर्जी ह्यावरही त्यांची उत्तम पकड होती. डॉक्टर अनुप्रिता सहृदयी, प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्व... पेशन्ट्सना त्यांच्याविषयी लगेच आपलेपणा निर्माण व्हायचा. स्वतःला पेशन्टमध्ये गुंतू द्यायचे नाही... असे कितीही ठरवले तरी शेवटी त्या देखील एक माणूसच.... कधी कधी एखाद्या पेशन्ट बद्दल जिव्हाळा वाटायचाच. स्वप्नाली त्यातलीच एक होती.

दोनेक आठवडे नेहमीच्या सगळ्या रुटीनमध्ये गेले... एखादा माणूस गेला की त्याला विसरणे तसे सोपे असते. फारसा बदल न करणारा रोजचा दिवस होता.. दुपारी पेशन्टस् ची गर्दी उसळली होती... डॉ. अनुप्रिता नेहमीच्या गोडव्याने पेशन्टची चौकशी करत होत्या... त्यांना मानसिक समस्येच्या मुळांशी पोहोचण्यासाठी बराच वेळ पेशन्टला द्यावा लागे... बहुतेक पेशन्ट नेहमीचे जुनेच .. फॉलो अपसाठी आलेले होते. नयना जामखेडकर आल्या आणि स्वप्नालीची आठवण मनाला टोचून गेली. नयना जामखेडकर त्यांची खूप जुनी पेशन्ट ... पायावर उमटलेल्या एलर्जीसाठी म्हणून डॉ. अनुप्रितांकडे आली आणि नंतर इतका विश्वास बसला त्यांच्यावर की कोणत्याही लहान मोठ्या दुखण्यासाठी ती डॉक्टरांकडेच येऊ लागली... स्वप्नाली तिची शेजारीण आणि दूरच्या नात्यातली भाची किंवा पुतणी असावी. स्वप्नालीला डॉ. अनुप्रितांकडे नयना जामखेडकरच तर घेऊन आली होती.आता स्वप्नालीचा विषय निघणे अटळ होते... नेहमीची औषधे त्या तयार करून देत असतांना नयनाने विषय काढलाच...

"मॅम , स्वप्नालीच कळलं असेलच तुम्हाला... फार वाईट झालं..."

डॉ.अनुप्रिताने होकारार्थी मान डोलावली...

नयनाने डोळ्यांना पदर लावला..
"काय वेडेपणा केला ह्या पोरीने!... सगळं कित्ती छान होत.. राणीसारखं राज्य होतं... सासूला काय कौतुक होतं... तुम्हाला सांगते थकत नव्हती बाई! सारख स्वप्नाली स्वप्नाली जप करायची...इतक गोड पिल्लू होतं. नवऱ्याचं तर इतकं प्रेम होतं ... काय सांगू तुम्हाला..."

नयनाच्या खांद्यावर हात ठेवून डॉ.अनुप्रिता शांत बसल्या.. आणि तिला बोलू दिलं

"एक बोटभर चिठ्ठी नाही की कुणाला काही सांगणं सवरणं नाही .. सकाळी उठलो तर हिने फाशी लावून घेतलेली.... तरी किती म्हणून नशीबवान आहे ही... नवऱ्याने वचन दिलं दुसरं लग्न करणार नाही.. तेव्हा कावळा शिवला पिंडाला."

समोर केलेलं पाणी घटघटा पिऊन संपवल्यावर..

"कपडे म्हणू नका, दागिने म्हणू नका... नवरा काही कमी करत नव्हता. पण हल्ली काय झालं होतं कोण जाणे...? तुमच्याशी काही बोलली होती का? काय प्रॉब्लेम होता? "

डॉ. अनुप्रिता शांतपणे म्हणाल्या...
"सहा महिने झाले... तिने यायचे बंद केले होते. आणि तिच्या ट्रीटमेंट बद्दल तर मी काही बोलू शकत नाही आमचे इथिक्स त्याला परवानगी देत नाहीत."

दिवसभराचे सगळे काम पूर्ण करून , खूप थकलेल्या असूनही त्यांना झोप अज्जिबात येत नव्हती... सतत डोळ्यांपुढे स्वप्नालीचा चेहरा तरळत होता... "आपण वाचवू शकलो असतो का हिला ??आपले प्रयत्न कमी पडले का??"त्यांनी स्वतःला विचारलं... मग त्यांचंच दुसरं मन त्यांना म्हणालं... "काय करणार होतीस तू ?? ह्यापेक्षा जास्त काही करता येणार होतं का तुला?" त्यांचं मन भूतकाळात शिरलं...

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट असेल...  एका दुपारी नयना जामखेडकरांनी नवीन पेशन्टसाठी नंबर लावला... 32/33 वर्षांची त्यांची शेजारीण स्वप्नाली... ही मुलगी तरुण होती पण तारुण्याचं कोणतंही लक्षण नसलेली... डोळ्यांखाली काळी वर्तुळे... देह जरासा अस्ताव्यस्त झालेला... बोलण्यात उत्साह संपलेला ... मासिक पाळीच्या तक्रारी घेऊन ती डॉ.अनुप्रितांकडे आली होती.तिला बोलतं करण्याचे सगळे प्रयत्न फसले होते... अखेर त्यांनी काही हार्मोन्सच्या टेस्ट्स आणि सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली... ते रिपोर्ट्स घेऊन पाच सहा दिवसांनी बोलावलं. वरवर पाहता समस्या दिसत नसली तरी नक्कीच खोलवर काहीतरी दडले होते... एक गोष्ट मात्र निश्चितपणे त्यांनी टिपून ठेवली ती म्हणजे स्वप्नाली डिप्रेशनने ग्रासलेली होती... आणि ही नक्कीच धोक्याची घंटा होती.  नंतर एक आठवड्याने स्वप्नाली आली  .. आली म्हणण्यापेक्षा नयना तिला बळजबरी घेऊनच आली... नजर शून्यात हरवलेली, निस्तेज स्वप्नाली... तिचे रिपोर्ट्स पाहिले आणि धक्काच बसला... बत्तीस वय आणि मेनोपॉज ची लक्षणे होती.... हार्मोन्सने अक्षरशः बंड केले होते... बाकी pcod वगैरे बहुदा नसावे. डॉ. अनुप्रिता आता गंभीरपणे तिची हिस्ट्री टिपून घेऊ लागल्या... नयनाला त्यांनी बाहेर बसायला सांगितले... त्या प्रश्न विचारत होत्या आणि स्वप्नाली तेव्हढं उत्तरच फक्त देत होती एक शब्दही अधिक उणा नाही.

कुठल्याश्या खेडेगावात तिचं माहेर होतं घरची परिस्थिती बरी म्हणावी अशी वडील पोस्टमन होते... घरी आई,वडील आणि बराच धाकटा भाऊ .... स्वप्नाली ग्रॅज्युवेट झाली आणि त्याच वर्षी वडील गेले. वडिलांनी कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली होती..... वडिलांचे असे जाणे आघात करणारे नक्कीच होते.घाईगडबडीतच तिचे लग्न गडगंज ठिकाणी मागणी घातली म्हणून लाऊन देण्यात आले... तिच्या परवानगीचा प्रश्नच नव्हता. तसे लोक खूपच चांगले होते... तिचे लाड कोडकौतुक मनात येईल ती खरेदी..." एका गरीबाच्या मुलीला अजून काय हवं असतं" स्वप्नालीचे हे उत्तर डॉ अनुप्रितानी विशेष नोंद करून घेतले. भावाच्या शिक्षणाचा सगळा खर्च सासरच्यांनी उचलला. भाऊ इंजिनियर होत होता... आईलाही गरजेनुसार मदत केली जात होतीच. मुलगा झाल्यावर तर तिला कुठे ठेऊ कुठे नको असं झालं सगळ्यांना... तिचं खूप कौतुक होतं, आवश्यक स्वातंत्र्य होतं, फार ताण असण्याचं कारण तर नव्हतं.... पण ताण नक्कीच होता. माणसे खरेच खूप चांगली असावीत... असा एकूण अंदाज त्यांनी बांधला.स्वप्नालीच्या आईची मासिक पाळी 48 वर्षांपर्यंत नीट नैसर्गिक होती... मग अशी अनुवंशिकता असताना स्वप्नालीला असा त्रास होण्याची शक्यता कमीच होती... तिच्यावर नेमका ताण कसला आहे हे मात्र ती बोलू इच्छित नव्हती.

बरोब्बर महिन्याभराने तिच्या सोबत तिच्या सासूबाई सुद्धा होत्या... स्वप्नालीने हाताच्या नसा कापून जीव द्यायचा प्रयत्न केला होता. सासूबाईंच्या स्वरात काळजी होती... पण स्वप्नाली काहीही बोलायला तयार नव्हती ..तिचं एकच उत्तर कायम होतं... "मला जगावं वाटत नाही" पुढच्या वर्षभरात तिने अजून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. एकदा तिच्या फॉलो अप ला नवराही सोबत आला होता... अक्षरशः ढसाढसा रडू लागला... "स्वप्नाली तुमचं ऐकते.. तिला समजावून सांगा. मी तिच्यासाठी वाट्टेल ते करू शकतो ...." वगैरे त्याचं खरंच बायकोवर प्रेम असावं.. त्याच्या बोलण्यातून तिच्यासाठी काळजी, प्रेम सारं डोकावत होतं. आलटून पालटून बरीच औषधे देऊन झाली होती पण तिच्या नेमक्या व्यथेचं मूळ सापडत नव्हतं... त्यामुळे म्हणावा तसा फरक पडत नव्हता. तिच्याशी गप्पा मारून तिला योगाच्या क्लासला घालून काही पंचकर्म वगैरे उपचारांची जोड देऊन.. तोळाभर जेमतेम फरक पडायचा दहा पंधरा दिवस बरे गेले की स्वप्नाली पुन्हा शून्यात नजर लावून बसायची. स्वप्नालीला काय हवं होतं कोण जाणे??

साधारण दीड वर्षे ह्याचप्रकारे गेले तिची तब्येत कधी बरी असायची तर कधी नसायची.... म्हणजे शारीरिक दुखणे नसले तरी ती बरच नाही म्हणून तासन तास झोपून असायची. एक दिवस स्वप्नाली भर दुपारी त्यांच्या क्लिनिकमध्ये आली. कुठलीही अपॉइंटमेंट नव्हती ना फॉलो अप... तिची मनःस्थिती विचित्र असावी... डायरेक्ट केबिनमध्ये शिरत "तातडीने बोलायचे आहे पाच मिनिटे द्या" म्हणून ती विनऊ लागली.  ज्या पेशन्टतला आत घेतले होते त्यांचे काम पूर्ण करून त्यांनी स्वप्नालीला आत बोलावले... आता स्वप्नाली पुरती कोसळली होती... ती मोकळेपणाने रडू लागली... तिला मोकळं व्हायला पुरेसा वेळ देऊन त्यांनी पाण्याचा ग्लास पुढे केला आणि अर्धा तास कुणालाच पाठवू नको म्हणून रिसेप्शनला निरोप दिला.
स्वप्नाली मनात खूप काही साठवून होती... ते एकदम बांध फुटल्यागत बाहेर पडलं.

"एका सभ्य स्त्री ला शरीर सुखाची गरज वाटणं पाप आहे का मॅम?? सांगा ना!"

"नाही ! अन्न पाण्यासारखीच ती एक जीवनावश्यक बाब आहे." 
डॉ अनुप्रिता शांतपणे उद्गारल्या. तिच्या एका प्रश्नातच समस्या त्यांच्या नेमकेपणाने लक्षात आली होती... गेले कित्येक दिवस ह्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले होते त्यांचे... 

"माझ्या घरी सगळं किती छान आहे मी किती सुखात आहे सगळे म्हणतात... कुणाला काही बोलून दाखवता येत नाही... तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे... बरं! माहेरी इतके उपकाराचे ओझे आहे की तिकडे परतही जाता येत नाही... काय करू मी?? मला जगावं वाटत नाही "

मानसोपचारांची गरज स्वप्नाली पेक्षा जास्त तिच्या नवऱ्याला होती. त्याच्या मते, शरीर सुखाची मूल जन्माला घालण्यापलीकडे काहीही गरज नव्हती. लग्नानंतर लगेचच वर्षभरात त्यांना मुलगा झाला होता... आता ती गरज त्याच्या दृष्टीने संपली होती. स्वप्नालीची शारीरिक गरज सामान्य होती मात्र ती काहीतरी भयंकर आहे , ऍबनॉर्मल आहे असं सतत तिच्या मनावर तो बिंबवत होता. स्वप्नालीने स्वतःला घरकामात, मुलामध्ये ,वेगवेगळ्या पोथ्यांमध्ये आणि धार्मिक कार्यात गुंतवून घेतले तरी तिच्या मूळ उर्मी शांत होत नव्हत्या. पुरुषांच्या बाबतीत असे काही झाले  असते तर त्याच्याकडे कदाचित अनेक पर्याय उपलब्ध असते परंतु एका मुलाच्या आईने, एका सभ्य संसारी स्त्रीने त्यातही परपुरुषाचा विचारही जी पाप मानते अश्या स्त्री ने काय करायचे ?? डॉ. अनुप्रितांकडे ही खरंतर तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. 

स्वप्नालीच्या आईने तर सोईस्करपणे आपले हात उचलले होते .त्यांच्या मते, 

"काही पुरुष बायकांचा किती छळ करतात शरीर सुखाच्या नावाखाली... तुझा नवरा तो तर करत नाही ना?? हवं ते विकत घेऊन देतो हौस मौज करतो आणखी काय पाहिजे...." 

ह्या "आणखी काय" मध्ये शरीरसुख येत असतं हे कुणाच्याच गावी नव्हतं. स्वप्नाली हा नाजूक विषय कुणाकडे काढून मन मोकळं करू शकत नव्हती... अवघड जागेचं दुखणं झालं होतं ते .... अर्थात जीव देणं हा ह्यावरचा पर्याय मुळीच नाही हे त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि पुढच्या वेळी "नवऱ्याला घेऊन ये" असंही बजावलं. स्वप्नालीच्या आनंदी जीवनासाठी तिच्या नवऱ्याला आता तिच्या कौन्सिलिंगचा भाग व्हायला हवे.... हे त्यांनी तिच्या नवऱ्याला उत्तम पद्धतीने पटवून दिलं. आता तोही तिच्या सोबत येऊ लागला... हळूहळू त्यांनी स्वप्नालीसोबत नवऱ्याने वेळ घालवणं कसं आवश्यक आहे? सोबत फिरायला जा, बाहेर गावी जा वगैरे पटवून दिले... स्वप्नाल्लीलाही आता त्यांच्या बद्दल विश्वास वाटू लागला होता... एक दिवस डॉ अनुप्रितांनी थेट मुद्द्याला हात घातला.. त्या स्वप्नालीच्या नवऱ्याला म्हणाल्या..

"तुमच्या बायकोला डिप्रेशनने ग्रासले आहे.. त्याचे मूळ कारण संसारीक सुखाचा अभाव हे आहे... खरेतर तिच्यापेक्षा जास्त तुम्हाला उपचारांची गरज आहे...मी माझ्या एका जेन्ट्स कलीग चा नंबर देते ... मला वाटतं तुम्ही पुरुष डॉक्टरांशी ह्या विषयावर अधिक मोकळेपणाने बोलू शकाल."

आतापर्यंत बायकोसाठी वाट्टेल ते करू शकणाऱ्या स्वप्नालीच्या नवऱ्याचा सूर बदलला... त्याचा सो कॉल्ड मेल इगो हर्ट झाला असावा. भयंकर संतापाने हाताची मूठ टेबलवर आपटत तो किंचाळू लागला...

"काय वाटलं तुम्हाला?? तुम्ही काय वाट्टेल ते बरळाल आणि मी ऐकून घेईन... माझी बायको आजारी आहे, वेड लागलंय तिला... ती काहीतरी बोलते आणि तुम्ही त्यातून असा निष्कर्ष काढता की मी पुरुष नाही... तुमच्या माहितीसाठी सांगतो... आम्हाला एक सुदृढ हुशार मुलगा आहे... तसं असतं काही तर मूल झालं असतं का मला??"

डॉ. अनुप्रितांचे उत्तर ऐकायला तो थांबला सुद्धा नाही... बायकोला तिथेच सोडून तरातरा निघून गेला. स्वप्नाली भीतीने थरथरत त्याच्या मागे धावत सुटली. हीच स्वप्नालीची शेवटची भेट नंतर ती कधीही डॉ. अनुप्रितांकडे आली नाही.... आली ती बातमी... तिने आत्महत्या केल्याची.... डॉ अनुप्रितानी चष्मा बाजूला ठेऊन डोळे कोरडे केले. त्यांच्या मनात आलं..." प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अश्या अदृष्य भिंती असाव्या बहुदा....बाहेरून पाहणाऱ्याला सुख, आनंद चकाचक दाखविणाऱ्या... आणि आतून कोसळून पडलेल्या मनाने दुःख, ताण एकट्याने पचवणाऱ्या .." त्या पुन्हा पुन्हा विचार करू लागल्या... "आपण कुठे कमी पडलो? वाचवू शकलो असतो का आपण स्वप्नालीला??"

✒️ यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!