फॉलोअर

रविवार, ३ जानेवारी, २०२१

"पुरुषस्पंदन" कथा १० :- साजूक तुपातला


MRA :- Mens Right Associatio विषयी आपल्याला माहीत आहे का? भारतासारख्या पुरुषप्रधान देशात ह्या सारख्या पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांची गरज तीव्रतेने जाणवू लागली आहे.... बहुतेक सगळे कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी निर्माण झाले असले तरी त्याचा गैरवापर करण्याचे प्रमाण देखील दुर्लक्ष करण्याजोगे नक्कीच नाही.अन्यायग्रस्त बिचारी स्त्री आणि अन्याय कर्ता  क्रूरकर्मा पुरुष असेच गृहीतक आजवर मांडले गेलंय... पण बरेचदा ह्या उलट असू शकतं.. शक्यता कमी असली तरी अजिबात नाही असंही म्हणता येत नाही. एखादा निरपराध सरळमार्गी पुरुष देखील फसवला जाऊ शकतो, त्याच्यावरही लैंगिक अत्याचार होतात, त्यालाही खोट्या केसेस टाकून निष्कारण छळले जाते... होय! सतत बेगडी पुरुषत्वाचं चिलखत घालून अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारा तो दुबळा, भित्रा  असू शकतो...  मात्र हे समाजमनाच्या पातळीवर मान्य होणारे नसते.

आता मी मांडत असलेली कथा लिहिणं माझ्यासाठी खूपच अवघड होतं... कारण ही कथा एका अत्यंत जवळच्या व्यक्तीची असल्यानं थोडीशी भावनिक गुंतवणूक होतीच... "विप्लव"... माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीचा.. वरदाचा धाकटा भाऊ. आमची नर्सरीपासूनची दाट मैत्री.. एकमेकींकडे जाणं येणं.. त्यामुळे मी विप्लवला अगदी एक वर्षांचा असल्यापासून चांगला ओळखते. एका रविवारी विप्लवने माझं बरचसं लेखन वाचलं आणि मला कॉल केला.. माझं लेखन खूप आवडल्याचं त्यानं नमूद केलं मात्र त्याच वेळी माझं लेखन केवळ एकच बाजू अधोरेखित करतंय "स्त्रियांची" ... "पुरुषांवर स्त्रियांकडून अन्याय होतो का? " त्यानं थेट प्रश्न विचारला... आणि खऱ्या अर्थानं "पुरुषस्पंदन" चा जन्म झाला. आज त्याचीच कथा ह्या सदरात मांडतांना दुःख, राग, वेदना, त्रागा  नेमकं काय काय होतंय माहीत नाही. गेली आठ वर्षे विप्लव कोर्टाच्या फेऱ्या मारतो आहे त्याही कुठल्याश्या आडवळणाच्या गावातल्या... त्याच्यावर अनेक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत... तो आणि त्याच्या घरातले सगळेच वेठीला धरले आहेत... अगदी वरदाला देखील दोनेक महिन्यांतून एकदा जावेच लागते... आणि हे सारे अश्या लग्नासाठी जे आठ महिनेही टिकले नाही😢

विप्लव घरातला एकुलता एक पुरुष.. वडील तो 5 वर्षांचा असतांनाच गेले . वडिलांच्या जागी आई नोकरीत लागली आणि तिने दोघांना लहानाचे मोठे केले. घरी 76 वर्षांची आजी आणि आत्या.... वरदाचे लग्न होऊन ती तिच्या सासरी रुळलेली तिचं घरही अगदी हाकेच्या अंतरावर. विप्लवची आत्या लग्नानंतर माघारी आली ती कायमचीच... तिचा नवरा तिचा करत असलेला छळ, मारहाण अगदी बालपणीच विप्लवनी अनुभवलेली... एकूणच सगळ्या महिला मंडळात वाढलेला असल्याने तो कमालीचा प्रेमळ आणि मायाळू... अगदी मुंगीही न मारणारा इतका हळवा. काहीही संकट आलीत तरी घरातील वातावरण प्रसन्न असायचं कायम .👍 प्रत्येक जण उद्योगी आई ,आत्या नोकरी करायच्या ..आजी देखील हास्यक्लब, मंडळे ह्यात गुंतवून घ्यायची... 4 बेडरूमचा मोठ्ठा फ्लॅट .... घरी लादी-पोछा, भांडी, कपडे अगदी पोळ्यांनाही बाई लावलेली. विप्लव हुशार ,मेहनती तर होताच..  IT इंजिनियर झाला आणि चांगल्या कंपनीत उत्तम पॅकेज घेऊन नोकरीतही लागला... 3 वर्षांत उत्तम रुळला .. हल्लीच्या ट्रेंड प्रमाणे कंपनी बदलत अधिक पगाराच्या अधिक वरच्या पोस्ट मिळवता झाला. मात्र तो करत असलेलं काम, तिथलं वातावरण आणि त्याचा स्वभाव ह्यांची सांगड जुळेना. सरळमार्गी , पापभिरू , ड्रिंक्स न घेणारा, पार्ट्यांना न जाणारा आणि मुख्य म्हणजे काम प्रामाणिकपणे करणारा विप्लव ... सगळ्यांच्या चेष्टेचा विषय होता... त्याला सगळे "साजूक तुपातला" असे चिडवत... विप्लवला ह्यानी फार फरक पडत नव्हता... मात्र त्याचं सरळमार्गी असणं त्याचा घात करून गेलं.

विप्लवचा स्वभाव पाहता एखादी मुलगी गटवणं त्याला जमणार नाही हे लक्षात घेऊन वेळीच घरच्यांनी मुली बघायला सुरुवात केली... पण पाच वर्षे झाली लग्न काही जमेना... एकदा काकू (वरदा विप्लवची आई) मला एका कार्यक्रमात भेटल्या..

"काकू लाडू कधी देताय?? "

त्यांनी मला कोपऱ्यात घेत म्हटलं..

"तूच बघ ग ओळखीतली एखादी, योगच नाही येत आहे ह्याचा"

"त्याला एखादी आवडली असेल तर चालवून घ्या तुम्ही..आजकाल चालतं"

मी जरा अंदाज घेत म्हणाले.

"तसं असतं तर फार बरं झालं असतं बाई.."😢
काकूंचे डोळे भरून आले .. मुलाच्या लग्नासाठी हवालदिल झालेली पहिलीच आई मी पाहिली होती... धबधबा कोसळावा तश्या त्या आपले अनुभव सांगत सुटल्या. विप्लवचे शिक्षण आणि क्षेत्र पाहता IT मधील मुली, उच्चशिक्षित मुली त्याला सांगून येत तर काही ठिकाणी हे स्वतः approach झाले... काही मुली विवाह मंडळात तर काही लग्न जुळवणाऱ्या ऑनलाईन sites वर देखील पाहिल्या.....अक्षरशः शेकड्याने पहिल्या... सगळीकडे अत्यंत विचित्र अनुभव आले. बहुतेक मुलींना आई, आजी, आत्या .. हे जंजाळ नको होते. वेगळं घर घेऊन रहाण्याच्या अटीवर त्या तयार होत्या... काहींची तर त्याला घरजावई करून घेण्याची मानसिकता होती... विप्लवला अर्थातच हे मान्य होणार नव्हते. त्याहीपलीकडे काही मुलींना तो टिपिकल IT कल्चर मधला असणे अपेक्षित होते.. पब, पार्टी  हा त्या जीवनावश्यक भाग मानत असाव्यात. काहींनी तर स्पष्टपणे सिगरेट ओढते, रविवारी ड्रिंक्स घेते हेही सांगितले... काकूंच्या चेहऱ्यावर भयंकर काहीतरी अनुभवल्याचे भाव होते... त्यावर मी म्हणालेही..

"आधीच सांगताहेत हे उत्तम नंतर वाद नको."

प्रत्यक्षात साध्या सरळ विप्लवची एका  सहचराची , जोडीदाराची अपेक्षा चुकीची नव्हती. संसाराची आवड असणारी घरात रमणारी, त्याच्या घरच्यांसकट त्याच्यावर प्रेम करणारी बायको... मात्र साधेपणा हल्ली out dated झालाय... कसे काय कोण जाणे पण विप्लवचे लग्न जुळले... त्याच्या reception चे आमंत्रण द्यायला आलेली वरदा जरा नाराज वाटली... विप्लवने पत्नी म्हणून खूपच सामान्य मुलगी निवडल्याची बोच तिच्या शब्दांत जाणवली... 

"शेवटी काय तो आनंदात असणे महत्वाचे ना!" ... 

....हेही तिला मान्य होतेच तरीही कुठेतरी आनंदावर विरजण पडले असावे. रिसेप्शनला गेलेल्या मला चटकन वरदाची नेमकी बोच जाणवली.. मुलगी उंच धिप्पाड, दिसायला सामान्य होती... जेमतेम ग्रॅज्युएट.. सरपंच किंवा तत्सम गावातील पुढाऱ्याची कन्या... एकंदर गावठी कारभार वरदाला नक्कीच आवडला नसणार... पण विप्लवने तिच्यात काय पाहिले कोण जाणे?? त्यांच्या गुरूंच्या परिवारातील म्हणून हे स्थळ आले आणि घरगुती वळणाची पोर म्हणून होकार दिला.

लग्नाला जेमतेम महिना होत नाही तोच काहीबाही कुरबुरी कानावर येऊ लागल्या.  विप्लवची पत्नी सोनाली अत्यंत तापट आहे, भांडकुदळ आहे .. उठसुठ माहेरी निघून जाते ... एक ना अनेक गोष्टी अनेकांकडून कानावर येत होत्या. वरदाने स्वतःहून काही सांगेपर्यंत ह्या प्रकरणाबद्दल अवाक्षर काढायचे नाही असे मी ठरवले. एक दिवस अचानक वरदाचा फोन आला.. तिला बोलणं सुचत नव्हतं... ती रडतेय एव्हढंच काय ते कळत होतं... तिने मला ताबडतोब निरामय हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले तशी मी तिकडे धाव घेतली... पाहते तो काय?? विप्लव ऍडमिट होता त्याचं अंग काळं-निळं पडलं होतं... त्याला बेदम मारहाण झालेली असावी... वरदा काहीही सांगण्याच्या मनःस्थितीत नव्हती... विप्लववर प्राथमिक उपचार करून पेनकिलर वगैरे देऊन घरी घेऊन आलो... ह्या सगळ्यांत त्याची बायको सोनाली कुठेच दिसेना... घरी पोहोचताच काकू ...

"घात झाला ग ... चांडाळणीने माती केली माझ्या लेकराची" म्हणत  टाहो फोडला... काय झाले असेल ह्याचा मला नेमका अंदाज बांधता येत नव्हता.

थोड्या वेळाने एकेक घटना उलगडली आणि माझा ऐकतोय त्यावरचा विश्वास बसणे अवघड झाले... हे खरंय हे खरंय... मी माझ्या मनाला पटवून देत होती.

सोनालीच्या आयुष्याकडून निराळ्या अपेक्षा होत्या, तश्याच तिच्या जोडीदाराकडूनही असणाऱ्या अपेक्षा धडकी भरवणाऱ्या होत्या.... लग्नानंतरचे काही गुलाबी दिवस संपताच .. विप्लवला कामात झोकून द्यावेच लागले तो जबाबदारीच्या पोस्टवर होता... पण हे सगळे समजून घेण्याइतकी बौद्धिक पात्रता तिची नव्हतीच. तिने शहरातल्या मुळाशी लग्न केले होते कारण सोनालीला  हिंडणे, फिरणे ,हॉटेलिंग , खरेदी ह्याचेच वेड होते... ते होईना तसतसे तिचे रंग बदलले.. आपला नवरा काहीच कामाचा नसल्याचे ती वारंवार बोलून दाखवू लागली.. तो सतत काम करतो कारण तो वैवाहिक सुख देण्यास पात्र नाही इतके घाणेरडे आरोप होऊ लागले.. सतत भांडायचे, माहेरी निघून जायचे, मग ह्यांनी समजूत काढून परत आणायचे हा क्रम अखंड सुरू होता. सोनालीचा तापटपणा भयंकर होता ती संतापली की हाताला येईल ती वस्तू फेकून मारायची... ती ज्या माणसांमध्ये वावरली, ज्या वातावरणात वाढली तिथे सर्रासपणे बायकोला मारणे, शिवीगाळ करणे, एखाद्या गुलमागत तिच्यावर हुकूमत चालवणे हे नित्याचे होते.  यातले काहीच विप्लव करत नसल्याने तो खऱ्या अर्थाने पुरुषच नाही अशी तिची धारणा होती. तिच्या वडिलांकडे ह्याविषयी तक्रार केली असता त्यांनी जावयाला सल्ला दिला ....

"जावाई बापू! बायाची जातच हरामखोर अस्तीया.. त्याहिले गोड भाषा कळत नाही  . मधून मधून चार लाथा घालीत जावा... आरडली का कानाखाली जाळ काडा.. मंग बगा कशी सुतासारखी सरळ हुते.."

धन्य तो बाप..त्याचीच लेक ती वेगळं काय वागणार... बेडरूममध्ये एकांतात सोनालीच्या मनाजोगी साथ मिळाली नाही की ती विप्लवला मारत असे...🙄 बापरे! भयंकर आहे हे... एखादी चापट एखादा गुद्दा बिचारा मुकाट्याने सहन करायचा.. कारण तिला मारणं त्याला जमणार नव्हतं आणि बाहेर कुणाला सांगणार तर लाजिरवाण.. लोक म्हणतील पुरुषांसारखा पुरुष बायकोचा मार खातो.. अगदी घरातल्या आई आजीलाही हे माहीत नव्हतं... मात्र त्या दिवशी तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या .. आई, आजी आणि आत्या वरदाकडे दोन दिवस मुद्दाम ह्यांना एकांत मिळावा म्हणून रहायला गेल्या.. तर सोनालीने रागाच्या भरात विप्लवला अक्षरशः अर्धमेला होईपर्यंत मारलं... तिच्या कौर्या पुढे त्याचा विरोध कुचकामी ठरला... पहाटे ती बॅग भरून माहेरी निघून गेली.. विप्लवने वरदाला बोलावून घेतलं..😢
ह्या सगळ्याची तात्काळ पोलीसांकडे तक्रार नोंदवा असा सल्ला मी देऊनही त्यांना तो मान्य झाला नाही.. अशी तक्रार नोंदवून आपलीच बदनामी होणार.. शिवाय विषय वाढवायला नको असेही वाटत असावे.

चारच दिवसांत सोनालीच्या गावावरून पोलीस आले आणि विप्लव आणि सगळ्या कुटुंबियांना अगदी म्हातारी आजी आणि वरदा सुद्धा...पकडून नेण्यात आले... कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास असे कित्येक आरोप त्यांच्यावर लावलेले असावे... वरदा, आजी , आत्या कश्याबश्या सुटल्या बेलवर पण विप्लव आणि काकूंना मात्र बरेच दिवस बेल मिळाली नाही.. त्या गावात त्यांचे अक्षरशः हाल हाल झाले... त्यानी नोकरी हातापाया पडून वाचवली पण पद गेलं..डीमोशन झालं. सगळीकडे छी थू झाली. लोक ह्यांच्याकडे सुनेला छळणारे राक्षस म्हणून पाहू लागले.. बिचाऱ्या वयस्कर आजीचे हाल काय सांगू?? त्यांचा हास्यक्लब, मंडळे बंद झाली.. ह्या साऱ्याला थोडीथोडकी नाहीत तर आठ वर्षे झाली... सोनालीने टाकलेल्या अनेक केसेससाठी त्याला सतत तिच्या तालुक्याच्या गावी जावे लागते.. अधून मधून आई, आजी, आत्या आणि वरदाला देखील जावेच लागायचे त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले होते.  एकदाचे काय ते पैसे देऊन मिटवून का टाकत नाहीस सगळं.. हा विचार मनात येतोच.. 
विप्लवने तेही प्रयत्न केले ... पण सोनालीला पैसे नकोच आहेत.. तिच्याकडे त्याच्या कित्येक पट जास्त पैसा आहे... तिला त्याच्याशी संसार करायचा आहे .. तेही तिच्या शर्तींवर...जे आता विप्लवला मुळीच मान्य नाही... त्याला फक्त घटस्फोट हवा आहे ह्या नकोश्या नात्यातून, ह्या क्रूर आठवणींतून....त्याच्यावर दबाब आणण्यासाठी ,तो मानसिक छळ करतो इथपासून ते तो पुरुष नाही इथपर्यंत सगळी कारणे तिने पुढे केली आहेत .. मात्र ती घटस्फोट द्यायला तयार नाही... लग्न नावाच्या व्यवस्थेची केव्हढी क्रूर थट्टा आहे ही.. लग्नानंतर जेवढे महिनेही ते एकत्र राहिले नाहीत तितकी वर्षे घटस्फोट घेण्यात वाया गेली आहेत.. हा प्रश्न आता सोनालीच्या इगो चा आहे .. ती मागे हटणार नाही.. आणि विप्लवसह घरच्या सगळ्यांची किती काळ फरपट होणार आहे कुणास ठाऊक?

लोक म्हणतात.. "हा बुळ्या साजूक तुपातला आहे. भेंडीची भाजीआहे नुसता ह्याच्यात काही दमच नाही.. चांगलं तुडवून काढायचं बायकोला .. हा पुरुष नसेलच..."
काय असतं हे "so called पौरुषत्व"???  लग्नाच्या बायकोला शिव्या देऊन, मारहाण करूनच बहुदा ते सिद्ध होत असावे... मुलाने साधे सरळ, हळवे, स्वभावाने गरीब जरूर असावे पण मारहाण सहन करण्याइतपत साजूक तुपातले नक्कीच असू नये.

✒️ यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!