फॉलोअर

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

आडनाव बंधू

           
   लग्न होऊन सासरी आले अन एक बाब लक्षात आली की माझ्या आडनावाच्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती नाशकात राहतात. त्यांच्याशी थेट असे माझे कोणतेही नाते नसले तरी नाव सांगितले की लोक विचारतातच ... " कारंज्या जवळचे रहाळकर कोण ?" माझा नकार. "मग सोडा वॉटर वाले कोण?" माझी पुन्हा नकारघंटा. "मग सायकलवाले, CA, संस्थाध्यक्ष...??" माझे यांच्याशी खरेच नाते नाही. मग मात्र उत्साहाने विचारणारा चेहरा पाडून..." म्हणजे तुम्ही आडनाव बंधू म्हणायचे" असे खिन्नतेने म्हणायचा आणि मी कोणत्यातरी एलीयन प्रमाणे अवकाशातून टपकली असावी...असे मानून "मग कोणत्या गावचे म्हणायचे तुम्ही?" असा त्रासिक प्रश्न. आता ह्याची इतकी सवय झालीये की मी ओळख करून देताच पहिल्याच प्रश्नाला "आम्ही इथले नाही... सगळे आडनाव बंधू " असे स्पष्ट सांगून टाकते."खरंतर या साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींना भेटायची तीव्र इच्छा मनात अजूनही तशीच आहे. एकच आडनाव घेऊन जगणारे, एकाच गावात राहणारे ,एकाच कुलगोत्राचे अनेक जण अपरिचित असतात...असे लोक आडनाव बंधू. कुठल्यातरी जुन्या नातेसंबंधांच्या पोकळ बंधनाने ते कदाचित बांधले असू शकतील मात्र.... त्या नात्यांची बांधणी कमकुवत झालेली असते... गाठीभेटी नसल्याने  विरळ झालेली असते. मात्र आता घरोघरी तुम्हाला असे आडनाव बंधू सहज सापडतील.
                 गंमत आहे ना! एकाच घरात एकाच कुटुंबातील आडनाव बंधू... होय !कारण त्यांच्यातील परस्पर संबंध आडनाव बंधू प्रमाणेच दुराव्याचे आणि विरळ होत चाललेले असतात. सध्या घरोघरी एकाच कुटुंबातील माणसे दिसत नाहीत तर असे हे "आडनाव बंधू " पहायला मिळतात. घराघरांचे घरपण स्पेस च्या नावाखाली संपल्यातच जमा आहे आणि उरलीयेत ती ह्या आडनाव बंधूंची हॉस्टेल्स... माफ करा ... माझं विधान तुम्हाला टोकाचं तीव्र कदाचित वाटलं देखील असू शकेल पण सत्य कटू असतं हेही तितकंच खरं! परवाच एका जरा दुरच्याच नात्यातल्या घरी कामानिमित्त जाण्याचा योग आला. हल्ली लॉकडाऊनमध्ये कुणाच्या घराची बेल वाजवली तरी लोक बाहेर दरोडेखोर तर नाही अश्या नजरेने दार किलकिले करून पाहतात.... साधे दार वाजले तरी दचकायला होते म्हणूनच  आधी घरातील गृहिणीला कॉल करूनच मी गेले... मात्र दार घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने उघडले आणि भूत पुढे उभे राहिल्यागत प्रतिक्रिया झेलावीच लागली... मला जेमतेम घरात घेऊन ती व्यक्ती तत्काळ दिसेनाशी झाली... बरं! आतील स्त्री ला आवाज देऊन सांगितलेच नव्हते.. मी आपली वेड्यागत निलाजरेपणाने बसून होते.. शेवटी आवाज दिले तर ,"अगगोबाई! तू कधी आलीस ? म्हणत बाईसाहेब प्रकटल्या... नात्यातलीच माणसे.. जुजबी चौकशीने सुरुवात केली. ...

"दादा काय म्हणतोय ? झाली का डिग्री? कुठे असतो हल्ली?"

"असतो नाशकातच... पण नेमका कुठे असतो ते नेमकं सांगता यायचं नाही . अधून मधून येतो घरी बाकी मित्रांच्या खोलीवर ... परतलाय गेल्याच महिन्यात पुण्याहून .. नोकरी करणार की काही बिझनेस त्याचे त्यालाच माहीत."

माझा आश्चर्याने चेहरा बदलला असावा ... त्या लगेच म्हणाल्या..

"मी फार पडत नाही त्यात. हल्ली मुलांना प्रश्न विचारलेले आवडत नाही."

मी माझ्या मूळ मुद्द्याकडे वळले... काम होताच बाईसाहेबांनी आमच्या भिशीच्या ग्रुप वर चर्चा सुरू केली. तो आमचा सामायिक ग्रुप त्यातल्या प्रत्येकीचे आतले बाहेरचे सगळे काही बाईंना इत्यंभूत माहीत होते.. त्यातली काही रसभरीत वर्णने ऐकवायलाही त्या उत्सुक असाव्यात... "बैस ग जरा." म्हणत त्या कॉफी करायला गेल्या तेव्हढ्यात त्यांचेकडे कुणीतरी अशील आले ... पतीदेव वकील होते. दाराबाहेरच्या माणसाचा आणि ह्यांचा संवाद साधारण असा..

"वकील साहेब कधी येतील? फार जरुरी काम आहे."

"माहीत नाही."

"कुठे ऑफिसात गाठ पडेल का? किती वाजेपर्यंत असतात ऑफिसला."

"मला नेमकं सांगता येणार नाही."

ती व्यक्ती चिवटपणे म्हणाली..
"मोबाइल नं द्या ना त्यांचा... विचारून घेतो."

"मोबाइल नं मला माहित नाही.... ऋषी ए ऋषी! पप्पांचा नंबर सांग रे!"

त्या वेळी तो ऋषीरूपी, केस आणि दाढी उभ्या जन्मात न कापलेला साक्षात ऋषी वरून पाय आपटत प्रकट झाला...

"मम्मी कितीदा सांगितलं तुला एका ठिकाणी लिहून ठेव पप्पांचा नं! ..."
हा दुर्वास ऋषी कागद पेन शोधून नंबर खरडू लागला... बाहेरचा बिचारा माणूस हा शाप देतो की काय म्हणून थरथरत उभा होता.

ऋषीनी त्या माणसावर कागदाचा चिटोरा भिरकावला... तोंडावर दार आपटले आणि दाणादाण पाय आपटत..

"पप्पांना सांग एकदा मोठी पाटी ठोकून घ्या स्वतःची घरावर...वैताग आहे राव! ह्यांच्या भिकारड्या वकिलीने कोण कोण येऊन डोकं खातं."

                 ऋषी आले तसेच अदृश्य झाले. ज्या वकिलीच्या भरवश्यावर उभा जन्म तुकडे गिळलेत  आणि त्याहीपलीकडे जे ह्या अवतारकार्याला कारण झाले त्या मातृ पितृ देवतेचा जराही आदर करण्याचे संस्कार ह्या ऋषींवर झालेले दिसत नसावे. मी तर त्याच्या दृष्टीने अदृश्य असावी, कश्या आहात वहिनी? असा साधा प्रश्न विचारणे किंवा गेला बाजार तोंडदेखलं ओळखीचं स्मित सुद्धा झळकवणे त्याला जमले नाही. आपल्या पतीराजांचा नंबर देखील पाठ नसलेल्या त्या गृहस्वामीनीला कुणाच्या मुलीचे कुणासोबत लफडे सुरू आहे.... कुणाचा मुलगा बारावीला कोणत्या दोन विषयांत नापास झाला..... कुणाचे सासूशी अजिबात पटत नाही ह्या साऱ्यांचे अत्यंत सखोल ज्ञान होते. आपला नवरा किती वाजेपर्यंत त्याच्या ऑफिसमध्ये थांबतो, सध्या तो कुठे आहे हेही माहीत नसलेल्या बाईंना भिषितील कुणाच्या नवऱ्याचे कामवालीशी लफडे आहे, कुणाचा नवरा तिला घटस्फोट देणार आहे ह्याची मात्र व्यवस्थित माहिती होती. ह्या सगळ्यांत डोक्याला हात लावून मी घरी परतले. ह्यांसारख्या विचित्र कुटुंबाला काय म्हणणार तुम्ही?? कुणाचे कुणाशी घेणेदेणे नाही, कुणाला कुणाची पर्वा नाही कुणाला एकमेकांचा आदर नाही... कोणते बंध उरलेत ह्या नात्यांत?? उरले केवळ कोरडे रक्ताचे नाते.
                    घरातल्या खोल्यांची संख्या जसजशी वाढू लागली तसतसे माणसा माणसांतले अंतरही वाढू लागले. घरात एकत्र जेवणे बंद झाली, एकत्र येऊन गप्पा मारणे बंद झाले, एकत्र येत आनंदाने सणवार साजरे करणेही संपले. सगळ्यांना स्वतःची स्पेस हवी होती. घरातल्या खोल्यांच्या गुहा झाल्या.. जो तो आपापल्या गुहेत स्वतःला कोंडून घेऊ लागला... प्रत्येक जण सोशल मीडियाच्या जगात रमू लागला.. पण प्रत्यक्ष आजूबाजूला जी जिवंत माणसे वावरत आहेत त्यांचे काहीच घेणे देणे नाही. ज्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो घरी येणार, वाटेल तेव्हा जेवणार,  कधीतरी मध्यरात्री झोपणार... तरुण मुले-मुली कुठे आहेत? ह्याची आईला काळजी नसते... ती तिच्या किटी पार्टी आणि क्लबमध्ये मश्गुल... वडील तर घरातील त्रयस्थ उपरा मनुष्य. अश्या आपापल्या जगांत स्पेस शोधणारी, पण भरल्या घरांत एकटी ,एकाकी पडलेली कित्येक माणसे हल्ली भेटू लागली आहेत. एकट्या माणसाचे सुख कित्ती तोकडे असते आणि दुःख मात्र डोंगराएव्हढे... आपलं आपणच सहन करायचं. कुणाशी काही वाटायचं तर ह्या पिढीला जणू ठाऊकच नाही. माझ्या किंवा माझ्या पिढीतल्या सगळ्यांनाच आठवत असेल घरी फ्रीज येणं , टीव्ही घेणं हा सुद्धा सोहळा असायचा. शेजारी पेढे वाटून साजरा होतसे आनंद... वाढदिवसाला नवा ड्रेस घरभर दाखवत सगळ्यांना नमस्कार करत फिरतांना नजर न लागो म्हणून आजी कडकडा बोटे मोडायची. "माझी नात तर आज राजकुमारी दिसतेय" म्हणत आजोबा कौतुक करायचे... सगळ्यांचे प्रेम , सगळ्यांचे कौतुक .. आनंद वाढता वाढता वाढायचा. आजकाल आनंद सुद्धा वाटत नाहीत ... कमनशिबी लोक! दुःखाचा ,संकटाचा प्रसंग आलाच तर पाठीवरून हात फिरवायला ,धीर द्यायला हात असायचे. उठसूट घे झोपेच्या गोळ्या अन् दे जीव अशी भावना सुद्धा होत नसे. एकत्र जेवण म्हणजे एकमेकांची चौकशी असायची, काय नव्हते त्यात? वडिलांचे मुलांवर लक्ष, शिस्त, आईची पाठराखण, भक्कम आधार, नैतिक धाक... आणि आपल्यावरील आईवडिलांचे निरतिशय प्रेम.... हे सारे सारे होते त्या रात्रीच्या एकत्र जेवणात. थोडी भाजी कमी असली तर चटणी, लोणच्याशी सुद्धा जेवता येते हे नकळत शिकवले जायचे. नाही अपेक्षेप्रमाणे टक्के पडले, नाही होकार दिला आवडत्या मुलीने तरीही आयुष्य संपत नसते... दुसरे पर्याय असतात... ही मोलाची शिकवण आमच्या पिढीला त्या एकत्र जेवणानी दिली.
                  आजकाल एकाच घरात राहूनही खातांना एकमेकांना माणूस म्हणून विचारत सुद्धा नाहीत. माकडागत मिळेल ते ,आवडेल ते ओरबाडायचे... अन्न ग्रहणाचे संस्कार तर फारच दूरची गोष्ट. एका मैत्रिणीच्या दोन लेकी अगदी पाठोपाठच्या.. पहिली क्लासहून घरी आली तिला भूक लागली तशी तिने तिच्यासाठी मॅगी करून घेतली. संपूर्ण एका बाऊल मध्ये काढून ती एकटीच खाऊ लागली. तिची बहीण विडिओ गेम खेळत होती... अर्ध्या तासाने ती उठली तिनेही तिची तिची मॅगी करून खाल्ली... कुणीही कुणाला खातेस का ? किंवा तुला हवे का ? असे विचारले नाही.. आश्चर्याने माझी बुबुळे फक्त बाहेर पडायची बाकी होती. त्यांची आई म्हणाली, 

"दोघी स्वतंत्र असाव्या असाच मी प्रयत्न करते. कुणाचे कुणावाचून अडायला नको."

देवा रे! हे असं गिधाड खाणं आम्हाला जन्मात कधी जमलं नाही.. आम्ही सगळे सख्खे चुलत गोतावळा एकत्र जमायचो ,असेल ते आनंदाने वाटून खायचो. मी आणि माझा दादा तर पातळ भाजीतले दाणे सुद्धा उधार घ्यायचो एकमेकांना.. आणि पुढच्या वेळी लक्षात ठेवून परत घ्यायचो..😂😂 सगळ्या माहेरवाशिणी जमल्या की कच्चा चिवडा व्हायचा नाहीतर मोठ्या परातीत भेळ केली जाई... आहाहा! काय स्वर्गीय चव होती त्याची. बरेचदा मी धाकट्या आत्याच्या ताटात लोणचं पोळी जेवायला बसायची...  आम्ही अगदी तुपाची बेरी सुद्धा वाटून घ्यायचो आणि आयुष्यभर कुणाचं कुणावाचून काही अडलं नाही. एक मात्र नक्की झालं..आजही पुरणपोळी खाताना धाकट्या काकाची आठवण काढून खाते, पाऊस पडला की "कांदा भजी करा रे कुणी" म्हणत स्वतः कांदा चिरणारा मधला काका हटकून आठवतो, फणस दिसला की काकूंना आवडते भाजी .. मनात येतेच. कढी गोळे केले की दादा आठवतो.... लोणचं म्हटलं की आजी, चहा म्हटलं की बाबा. पदार्थांसोबत माणसे जणू मनात घोळवून ठेवलीये . सगळ्यांच्या आठवणीने दोन घास जास्त जातात आणि सारेच पदार्थ अधिकच चविष्ट होतात. 
                 एका अतिशय सुखवस्तू अभ्यासू प्राध्यापिका, लेखिकेच्या घरात तिने स्वयंपाकघरात एक बोर्ड लावलेला मी पहिला. नेमकी सवयीने मी कप ठेवायला म्हणून आत गेले अन् मला दिसलाच. हा बोर्ड स्वयंपाक करणाऱ्या बाईंसाठी होता. घरात सहा माणसे आजी आजोबा, प्राध्यापिका बाई, त्यांचे यजमान आणि 20 आणि 22 वर्षे वयाची दोन मुले. प्रत्येकाने उठल्यावर आपण सकाळी आणि रात्री घरी जेवायला आहोत का ? ह्यानुसार आपल्या नावासमोर टिक करायची.. असल्यास किती पोळ्या तो आकडाही लिहायचा. त्याप्रमाणे स्वयंपाकाच्या बाई मोजून पोळ्या वगैरे करणार.

"मला अन्न वाया गेलेले अज्जिबात आवडत नाही"...

 मॅडम म्हणाल्या. मला कीव वाटली ...त्या घरातला संवाद किती संपला होता. कुणालाच कुणाशी बोलायचे ,काही विचारायचे नसावे.  साधे जेवणार की नाही हे सुद्धा सांगायला नको आणि कुठे जेवणार हे विचारायला नको...असेच आम्ही उभयता रिटायर्ड झालेल्या एका काकांकडे गेलो . काकू चहाचे तीनच कप घेऊन आल्या..

"काकू चहा बंद केलाय की काय तुम्ही?" 

मी चोंबडेपणानें विचारले. काकू शांतपणे बसल्या आणि चहा घेत म्हणाल्या....

"ह्यांना चहा त्यांच्याच हातचा आवडतो."

काका उठून आपला चहा करून घेऊन आले. हे दोघेच घरी , चहा मात्र रोज आपापला करून घेतात.. कुणालाच कुणाच्या हातचा आवडत नाही. आपल्या जोडीदाराच्या हातचा वेगळ्या चवीचा चहा सुद्धा कसला भन्नाट असतो, अगदी बिघडलेला सुद्धा👍 कधी आपल्याला हवा तसा करावा तर कधी दुसऱ्याला आवडतो तसा पिऊन पहावा.. त्यातही भलतीच गोडी असते. मात्र हल्ली व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनांचा इतका अतिरेक झाला आहे की कुणीही काहीही ऍडजस्ट करायलाच तयार नसते. बरं! आम्ही कसे अजिबात 0.5 % सुद्धा बदल सहन करत नाही..  ह्याचा कोण अभिमान असतो लोकांना. एखादी व्यक्ती ऍडजस्ट करतेय म्हणजे ती घोर अन्याय सहन करतेय असं चित्र मांडलं जातं.  खरंतर माणूस म्हणून जगणं इतकं अवघड आहे का? आपली कुटुंबसंस्था खरंच इतकी वळ उमटावी एव्हढी काचतेय का?
                   आयुष्यातील पाच वर्षे मी होस्टेलमध्ये काढली आणि जीवनाचं सर्वात मोठ्ठ तत्वज्ञान ह्या काळात मला मिळालं... , "माणसाला येईल त्या परिस्थितीत जगता आलंच पाहिजे. परिस्थिती बदलणे हातात नसते, आपल्या आजूबाजूची माणसे सुद्धा पर्यायांत उपलब्ध नसतात... ती स्वीकारता आली पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेता तेव्हा तेव्हा मिळणाऱ्या कणभर सुखाचा आनंद मणभर असतो." जसे घरापासून दूर गेलं की घराची किंमत कळते...  तसे कुटुंबसंस्था नामशेष झाली की त्याची किंमत कळणार आहे बहुदा आपल्याला. हल्लीच्या पिढीवर सतत टीका होते की मुले वाट्टेल त्याचा / तिचा हात धरून पळून जातात, लग्न झालं तरी काही दिवसांत भांडून तंटून वेगळे होतात, कुणी कुणाला विचारत नाही, आईवडिलांचं लक्ष घालणं म्हणजे आयुष्यातली ढवळाढवळ... हे सारं सारं व्हायला काही अंशी आपणच जबाबदार नाही का? एकाला त्रास झाला, दुःख झालं, तर त्याच्या वेदना दुसऱ्या आडनाव बंधूला होत नाही. फार तर क्षणभर हळहळ व्यक्त करून तो सोडून देईल..; पण एकाच कुटुंबातील माणसांना एकमेकांच्या दुःखांच्या धारा चिरत असतात.. ती धग सगळ्यांना चटका लावत असते. जो धडा हॉलिवूडच्या लोकांना मिळालाय तो आपण अजून गिरवायचा बाकी आहे.. बघा बहुतेक हॉलिवूड मूव्हीत शेवटी सगळीं मारधाड करून झाली की हिरो म्हणतो, ... "सगळ्यांचं एक कुटुंब असतं, .. आणि कुटुंब सर्वाधिक महत्वाचं ." AT last everyone has a Family which is most most important...

©️🔏 यशश्री रहाळकर




२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम.. पु ल म्हणाले होते युरोपात प्रत्येक घरामधलं हॉल हा एक थिएटर आहे अन स्वयंपाकघर एक हॉटेल... आपल्याकडे आपणही झपाटयाने तिकडे वाटचाल करतोय

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी खरे आणि कटू सत्य आहे. सगळे जण स्वतः साठी जगतात.

    उत्तर द्याहटवा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!